1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

प्रेमसंदेश

आजच्या व्यख्यानाच्या विषय प्रेमसंदेश हा आहे. प्रेमाचा संदेश म्हणजे काय हे भाषेने स्पष्ट करून सांगणे कठीण आहे. एकादे लहान मूल रस्त्यामध्ये रडत असता आपण त्याला म्हटले मुला रडू नकोस, मी तुझा मित्र आहे, बंधू आहे तर त्याला ते काही समजणार नाही. पण त्यालाच जर आपण वर उचलून कडेवर घेतले, त्याच्या अंगावरून हात फिरविला तर त्याला समजून येते की आपण त्याच्यावर प्रेम करणारे आहो. फुलाला भाषा बोलता येत नाही. पण एकादे सुंदर फूल आमच्या हृदयाला आकृष्ट करून बोलते. लहान-लहान पक्षी कित्येक वेळा आपल्या भाषेच्यायोगे आपले सुख किंवा दु:ख आपणास व्यक्त करतात. एकदा रात्री माझ्या घरामधील एका पक्षाने भयसूचक शब्द काढला व तो तसा असावा हे आम्हास समजले. बाहेर जाऊन पहातो तो खरोखरच एक श्वापद तेथे आले होते व त्यायोगे त्या पक्षाला भीती वाटत होती. ह्याचप्रमाणे मनुष्याच्या अंत:करणाचीही एक भाषा आहे. एकाद्याचे कोणी जवळचे मृतप्राय झाले असता त्याजपाशी जाऊन न बोलूनदेखील आपल्या डोळ्यांतून अश्रू आले असता त्या मनुष्याच्या लक्षात येते की, त्याजविषयी सहानुभूती बाळगणारे आपण आहो. मातेचे आपल्या बालकावरचे प्रेम भाषेने सांगता यावयाचे नाही. अशाप्रकारे जे प्रेम त्याचा संदेश म्हणजे काय? एकादा चपराशी एका मनुष्याची चिठ्ठी दुस-यास नेऊन देतो. त्या चिठ्ठीच्या योगाने पहिल्या मनुष्याचा निरोप दुस-यास समजतो. त्याचप्रमाणे आपला संबंधी मनुष्य कितीही दूर अंतरावर असला तरी तारेयोगे त्याची हकीकत आपणास कळते. असेही मानसिक यंत्र आहे की त्यायोगे एका मनाची भावना दुस-या जागी दुस-या मनाला समजते. बिगर तारेनेही एक मजकूर दुस-या जागी जाऊ शकतो. ह्याचप्रमाणे ह्या संसारामध्ये आत्मा व परमात्मा ह्यांच्यामध्ये परस्पर प्रेमाच्याद्वारे नित्यश: संवाद होत असतो. हा जो संवाद तो प्रेमसंदेश होय. एकाद्या बिलोरी काचेच्या तुकड्यातून सूर्याकडे किंवा इंद्रधनुष्याकडे पाहिले तर सात प्रकारचे रंग दिसतात, नुसत्या काचेचा रंग शुभ्र आहे. त्याचप्रमाणे नुसत्या प्रेमाकडे पाहिले तर ते एक आहे. पण संसारामध्ये तेच प्रेम पाहिले तर त्याचे सात रंग करता येतील. मातेच्या अंत:करणामध्ये आपल्या मुलाविषयी एक प्रकारचे प्रेम असते. त्यायोगे ती अनेक प्रकारचे कष्ट सोसून रात्रंदिवस अनेक खस्ता खाऊन त्याचे पालनपोषण करते. ते आजारी पडले असता स्वत:च्या जिवाकडे न पाहता त्याची शुश्रूषा करते, त्याला यत्किंचितही दु:ख आले असता तिचे हृदय उद्विग्न होते. त्याचे लालनपालन करण्यामध्ये तिचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो.


तिच्या मनाचा स्वाभाविक भाव जे प्रेम त्या प्रेमामुळेच ती असे करीत असते.

हे जे मातेचे किंवा पित्याचे आपल्या बालकाविषयी प्रेम त्यास आपण वत्सलता म्हणू. लहान बालक मोठे होऊन जवान पुरूष झाल्यावर त्याचे लग्न होते. तो व त्याची स्त्री ह्यांचा परस्पर संबंध प्रेमाचा होतो. पती पत्नीकरिता व पत्नी पतीकरिता अतिशय कष्ट सोसतात. मातेच्या किंवा पित्याच्या प्रेमापेक्षा हे प्रेम निराळ्या प्रकारचे होय. त्याला आपण प्रणय म्हणू. तिस-या प्रकारचे प्रेम म्हमजे सख्यभाव होय.  एक मुलगा आपल्यावर किंवा शाळेतील सोबत्यावर प्रेम करतो. त्याला दु:ख झाले तर ह्याला दु:ख होते. त्याला सुख झाले तर ह्याला सुख होते. हा जो भाव तो सख्यभाव. चौथा प्रकार अनुकंपा. आपण रस्त्यातून जात असता एक गरीब मनुष्य कण्हत पडला आहे, त्याला उठवून घरी आणून अन्नवस्त्र दिले तर ही अनुकंपा होय. ह्या ठिकाणी पितापुत्राचा, मातापुत्राचा, स्वामीस्त्रीचा किंवा मित्रामित्राचा संबंध येत नाही. पाचवा प्रकार स्वदेश अनुराग. मनुष्य कोठेही गेला तरी त्याला स्वदेशाचा अभिमान असतोच. दुष्काळामध्ये आम्ही पुष्कळ मुले परदेशातून आणली पण दुष्काळ संपल्याबरोबर जो तो आपआपल्या देशाकडे बोट दाखवू लागला. अन्नवस्त्र देऊन येथेच रहा असे त्यांना आम्ही सांगत असताही ते ऐकेनात. हा जो स्वदेश अनुराग तो प्रेमाचा पाचवा प्रकार होय. प्रेमाचा सहावा प्रकार मैत्री. टिटॅनिक नावाचे मोठे जहाज बुडाले. १,५०० माणसे बुडाली. त्यामध्ये पुष्कळ ज्ञानी, श्रीमंत, गरीबही लोक होते. गरीबाकरिता इकडच्या लोकांनी फंड उभा करून पैसे पाठविले. आमच्या इकडेही जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा तिकडच्या लोकांनी एक वेळचा चहा बंद करून आमच्याकडे पैसे पाठविले. ही जी प्रेमाची भावना ती मैत्री होय. प्रेमाचा सातवा प्रकार भक्ती. आत्म्याचे परमात्म्यावरील जे प्रेम ती भक्ती. ह्या प्रेमाची खूण कोणती? एकाद्या कमळाचे फूल पाण्यामध्ये जन्म पावते. जलाचे अनेक तरंग इतक्या जोराने येतात की त्या कमळाचा देठ तुटून जाईल असे वाटते. पण ते कमळ आपले स्थान सोडीत नाही, त्याला च चिकटून राहते. त्याचप्रमाणे भगवद्भक्त जो आहे त्याच्यावर कितीही आपत्ती आल्या तरी तो ईश्वरास सोडीत नाही. उलट जास्त जास्तच ईश्वराला आपल्या हृदयामध्ये साठवितो. पाण्यात राहणारा मासा, ते पाणी पुष्कळ जरी वाढले तरी भीत नाही, उलट त्याला आनंदच होतो. त्याप्रमाणे भगवद्भक्तांची भक्ती सुखदु:खामध्ये वाढतच असते. चातक पक्षी दुसरे पुष्कळ पाणी मिळत असताही ते न पिता पावसाच्या पाण्याची अपेक्षा करीत आतुर झालेला असतो, त्याप्रमाणे भगवद्भक्ताचा प्राण परमेश्वराच्या भेटीविषयी व्याकूळ झालेला असतो. दूध विस्तवावर ठेवले असता पाणी ज्याप्रमाणे म्हणते की, प्रथम मी मरेन. त्याप्रमाणेच आपणही स्वार्थत्याग करून ईश्वरावर प्रेम करावयास पाहिजे. टिटवी रात्रभर ओरडत असते व सूर्योदय झाला म्हणजे तिला आनंद होतो, इतके तिचे सूर्यावर प्रेम असते. त्याप्रमाणे आपलेही ईश्वरावर असावे. पुष्कळ साधुसंत होऊन गेले आहेत, त्यांनी ईश्वरावर कोणत्या प्रकारे प्रेम केले आहे हे जाणून घून आपणही त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा.

प्रेमप्रकाश

पुत्र वित्त वारागृहादि सकळ| देऊनि दयाळ वाट पाहे||
देवाचे मनांत मज हे ध्यातील| अंती पावतील निजपद||
सोडूनि दवासि गुंतले दोरासी| झाले अविश्वासी विश्वंभरी||
तुका म्हणे फार भुलूनिया मेले| विरळा लागले हरिपायी||

ह्या अभंगातील उक्ती विचार करण्यासारखी आहे. देवाने पुत्र, वित्त, दारा देऊन गृह निर्माण केले व त्या घरामध्ये अशी एक प्रेमाची ज्योत उत्पन्न केली की त्या ज्योतीच्या प्रकाशामुळे कुटुंबातील माणसे एकमेकांस स्पष्ट दिसतात, आपणांस नेत्र आहेत पण बाहेरच्या व आतल्या गोष्टींचे संनिकर्ष करणारा प्रकाश नसता तर त्या नेत्राचा काहीएक उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे धैर्य, सहनशीलता वगैरे प्रेमाची अधिष्ठाने असूनही प्रेमाचा प्रकाश पडला नाही तर त्याचा काहीएक उपयोग होणार नाही, म्हणजे जड सृष्टीमध्ये प्रकाश हे कार्य करतो. ह्या प्रेमप्रकाशातूनच पुत्र, पती, पत्नी, बंधू, भगिनी, माता, पिता ही सर्व संबंधाच्या योगे एकत्र झालेली माणसे परस्परांस स्पष्ट दिसतात. बाह्य सृष्टीतील प्रकाशामुळे पदार्थ जसा स्पष्ट दिसतो, त्याचप्रमाणे डोळ्यांस अंधारी येऊन सूक्ष्म पदार्थही दिसत नाही किंवा तो आहे त्यापेक्षा निराळा दिसतो, त्याचप्रमाणे प्रेम हे डोळ्यांना डोळेपण देणारे आहे तसेच आंधळेपणही देणारे आहे. म्हणजे प्रेमाच्या प्रकाशातून स्वत:च्या संबंधी माणसाचे गुण जेवढे दिसतात, तेवढे अवगुण दिसत नाहीत. माता केवळ बालकाच्या लाघवाने मोहीत स्वकर्तव्यास कधी कधी विसरते. पण साधारणपणे मनुष्याच्या अंगी जाणीवबुद्धी असेल तर स्वयंस्फूर्तीने व स्वयंशक्तीने प्रेमाच्या प्रकाशाच्या साहाय्याने घरातील मंडळीचे गुणावगुण दिसतील म्हणजे मग आपण प्रेमाच्या प्रवाहात सापडून ईश्वराकडे सहजगत्या चाललो आहो हे आढळून येईल. ह्याकरिता एकमेकांविषयी यथार्थ ज्ञान होण्यास प्रेमप्रकाश ही ईश्वराची एक योजना आहे. ह्या योजनेमुळे आपणांस ईश्वराबद्दलचे ज्ञान प्राप्त होते. पण ह्या प्रकाशाचा योग्य उपयोग केला नाही तर देवास विसरून दोरीवर प्रेम बसते. म्हणजे हा प्रेमप्रकाश ज्याने उत्पन्न केला त्यासच आपण ओळखीत नाही. देव हा गारूड्याप्रमाणे आपल्याकडून खेळ करवून शेवटी आपल्या सर्वांना स्वत:कडे खेचतो, ह्यात त्याचा स्वार्थ नसून आपणांस निजपद प्राप्त करून देण्याचा त्याचा हेतू असतो.


ह्याकरिता आपणांस आपला पुढचा मार्ग सुलभ करणे असेल तर आपण आपल्या गृहातील माणसांच्याच गुणावगुणांचे निरीक्षण करावे. मात्र अवगुण काढून टाकण्याची जेव्हा त्यांना संधी प्राप्त झाली तेव्हा ती संधी त्यांनी साधली की नाही ह्याचे योग्य निरीक्षण करावे व त्यापासून आपण धडा घ्यावा म्हणजे आपोआप आपण निजपदास जाऊ. तुकारामांनी अभंगात सांगितल्याप्रमाणे पुत्र, वित्त, घर, दार, आपणास देऊन तो द्याळू परमेश्वर आपण निजपद अंती पावू अशी वाट पहात बसला आहे तर ह्याची पूर्ण गाठ बांधून ज्याने प्रेमप्रकाश निर्माण केला त्या प्रभूला आपण ओळखावे आणि ते घरातील कुटुंबाच्या गुणावगुणांच्या निरीक्षणानेच उत्तम साधले जाईल, शेजा-यावर, देशावर, राष्ट्रावर प्रीती ठेवून ईश्वरास ओळखणे हा निराळा मार्ग, पण सोपा म्हणजे वर सांगितलेलाच होय.

प्रार्थनासमाजाचा एक नमुना

“ऐसी कळवळ्याची जाति । करी लाभावीण प्रीती ।।”

श्री. बी. बी. केसकर ह्यांनी माझे मित्र श्री. द्वारकानाथ गोविंद उर्फ भाऊसाहेब वैद्य ह्यांचे काही लेख आणि अल्पसे चरित्र ह्या ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या आग्रहावरून मी दोन स्वतःचे परिचयात्मक शब्द लिहिण्याचे धाडस करीत आहे. धाडस म्हणण्याचे पहिले कारण हे की, मी जरी प्रथम पुण्याच्या प्रार्थनासमाजाचा सभासद १८९८ चे सुमारास झालो, तरी मुंबई समाजाचा प्रचारक ह्या नात्याने सन १९०३ साली मी प्रत्यक्ष काम करू लागल्यावर भाऊसाहेबांचा व माझा निकट संबंध जडला, आणि तसा जवळचा संबंध १० वर्षेच टिकला. त्यापुढे कार्यानिमित्त मला पुण्यासच राहावे लागले. मित्रत्व राहिले तरी सान्निध्य राहिले नाही. दुसरे कारण हे की, मी हा जो अल्प लेख लिहीत आहे, तो केवळ मित्रपणाच्या पक्षपाताने किंवा औपचारिक प्रशंसेने नव्हे. भाऊसाहेबांच्या कामगिरीचे व स्वभावाचे जे ठसे माझ्या अंतःकरणावर उमटले आहेत, त्यांचे हे अस्पष्ट चित्र आहे. ह्यात केवळ माझ्या प्रामाणिकपणाची साक्ष आहे. मूळ प्रकृतीशी ही प्रतिकृती खरोखर किती जुळते ह्याची मला खात्री नाही. अशी निर्भीड चित्रकृती त्या माणसाच्या मागाहून झालेलीच बरी. पण स्वतः भाऊंनीच परिस्थितिवशात् असे धाडस किती वेळां तरी आपल्या वाङ्मयसेवेत केले आहे ! ते आठवून माझे काही ‘चुकले वाकले’ त्यांनी सांभाळावे.

मुंबई समाजाच्या व्यासपीठावरून सर नारायण चंदावरकरांनी Greatness of small men (लहान माणसांचा मोठेपणा) ह्या विषयावर एकदा एक मार्मिक प्रवचन केले. गुरुवर्य भांडारकर आपल्या विद्वत्तेच्या जोरावर आम्हांस आपलेकडे ओढीत, तर सर नारायण चंदावरकर आपल्या कोमल सहानुभूतीने आम्हांस आपलेसेच करीत. वरील प्रवचन होऊन बरीच वर्षे झाली. पण तेव्हापासून अगदी आतापर्यंत आमच्या भाऊंचे चित्र मजपुढे उभे आहे. असे (श्री. द्वा. गो. वैद्य ह्यांच्या ‘संसार व धर्मसाधन’ ह्या ग्रंथास लिहिलेली प्रस्तावना. १८ मार्च १९३५.) म्हणण्यात मी भाऊंना लहान म्हणालो म्हणून, त्यांचे कोणी विनोदहीन चहाते मजवर रागावतील, रागावोत ! मला बाहेर पहावयाचे नाही, अंतःकरणतील ठशांकडे पाहून लिहावयाचे आहे. भाऊंनी आपले महत्त्व लहानपणाचे कोंदणात बसविले आहे. ह्यावरून ते जीवितकालाभिज्ञ दिसतात. सर नारायण चंदावरकरांनी मजजवळ वारंवार जे उद्गार काढीले, त्यावरून न जाणो, त्यांनाही हाच अनुभव आला असावा. समाजाचे वाङ्मय निर्माण करण्याच्या कामी भाऊ एकटेच एक दिसतात. त्यांचे हे वाङ्मय अगदी असामान्य कोटीतले आहे, असे मी सुचवीत नाही, तरीपण ते निर्माण करण्याचे कामी त्यांनी जी निष्ठा, चिकाटी, निःस्वार्थता निरहंकारता दाखविली आहे, ती खास असामान्य कोटीतली आहे. असामान्यता कृतीतच अडकून असते की काय ? नाही. ती पद्धतीतही पसरलेली असते. असामान्य कृती करणारी आमच्या समाजात भाऊहून श्रेष्ठ किती तरी माणसे झाली. रामभाऊ माडगावकरांची ‘ज्ञानदेवी’. शंकर पांडुरंग पंडितांचे ‘वेदार्थयत्न’, आणि ‘तुकारामाची गाथा’, शिवाय न्या. रानडे व डॉ. भांडारकर ह्यांच्या अनेक कृती जगापुढे आहेतच. ह्या मोठ्यांनी प्रार्थनासमाजाच्या खास मराठी भांडारात काय भर टाकली ? जी काय भर पडली, त्यात नुसत्या भाग ह्या मोठ्या लोकांचा आणि परिश्रमाचा बोजा भाऊसारख्यावरच पडला ना ! ज्यांनी सुधारकांना विरोधच करावयाचा विडा उचलला होता, ते तर कित्येक वेळां आपसांत कुजबुजत की, ह्या जाड्या पंडितांना मराठीत लिहिताच येत नव्हते ! पण भाऊंनी आपल्या वाङ्मययज्ञात केवळ प्रार्थनासमाजासच नव्हे तर मराठी भाषेलाही वाखाणण्यालायक किती तरी आहुत्या दिल्या आहेत, हे आज नाही उद्या तरी कबूल केले जाईलच. ही भाऊंची कामगिरी प्रार्थनासमाजाचा एक नमुना नसून उलट प्रार्थनासमाजाच्या सर्व लोकांनाच एक नमुना घालून देण्यासारखी झाली आहे, नव्हे ?

सुबोध पत्रिका (मराठी बाजू) म्हणजे भाऊंनी आपल्यापुरते एक निराळे व्यासपीठच उभारले आहे. गेल्या जवळ जवळ चाळीस वर्षांत ते ह्या पीठावरून क्वचितच खाली उतरले. हा देवाघरचा एक मक्ताच म्हणावयाचा ! फक्त तीन पानांची पत्रिका ती काय ! पण ती आयुष्याची किती बळकट हो ! भाऊंनी आपले जीवनच तिचेवर ओतून, तिला आयुरारोग्य दिले. अलीकडे तर मोठयामोठ्या आढ्यतेच्या पत्रांतून ह्या पत्रिकेच्या मताचे उतारे येत असतात. ह्यावरून, ही एक केवळ वृद्धाच नसून हिचे वैशिष्ट्य लहान-थोरांस जाणवत आहे, असे होते. पत्रिका म्हणजे वैद्य आणि वैद्य म्हणजे पत्रिका, अशी एक म्हण प्रार्थनासमाजात पडली आहे. पण, खरा प्रकार एवढाच नाही. भाऊंचे खरे सौंदर्य त्यांच्या लेखणीतच कोंदलेले नसून, त्यांच्या जीवनातही ते भरले आहे.

अनुष्ठान ह्या पारिभाषिक शब्दाचा अर्थ ब्राह्मसमाजाने घालून दिलेल्या नियमानुसार आपल्या कुटुंबाचे सर्व गृह्यविधी व संस्कार करणे असा एक आहे. ह्या संकुचित अर्थाने पाहता समाजाचे पुढा-यांवर विशेषतः प्रार्थनासमाजाचे धुरीणांवरही अनेक वेळां पत्रिकेतूनच आक्षेप प्रसिद्ध झाले आहेत. अर्थात ते सर्व भाऊंनीच घेतले असे म्हणणे नाही. भाऊंमध्ये तितका निर्भीडपणा नाही. पण कोणाही निर्भीड सभासदाला मी विचारतो की, प्रत्यक्ष भाऊवरच हा आक्षेप घेता येईल काय ? भाऊंनी समाजातील आपल्या दत्तक गुरुजनांजवळ जो भिडस्तपणा व नमतेपणा दाखविला तो आपल्या घराण्यातील प्रत्यक्ष वाडवडिलांजवळ स्वीकृत मताप्रमाणे वागण्याची वेळ आली तेव्हा, दाखविला काय ? अनुष्ठान म्हणजे अनुष्ठानच. ते घरी काय, बाहेर काय, स्वकीयांशी, तसेच स्वीकृतांशी त्याच्या कडकपणाचा ओघ सारखाच वाहिला पाहिजे. भाऊंनी आपल्या स्वतःच्या आणि आश्रितांच्या बाबतीत जो अनुष्ठानिक करारीपणा व कडकपणा धरिला, तो इतरांशी विशेषतः पुढा-याशी धरिला नाही, असे म्हणतात ते खरे. सदाशिवराव केळकरांचे हे दुधारी अनुष्ठान आमच्या भाऊंना पेलता आले नाही, तरी स्वतःपुरता तरी कधी ढिलेपणा त्यांनी दाखविला नाही, ही गोष्ट कोणास दृष्टीआड करता येईलसे वाटत नाही.

अनुष्ठानाचा हा आकुंचित अर्थ सोडून सर्वसाधारण प्रशस्त अर्थाने पाहिल्यासही भाऊंचे अनुष्ठान फार उच्च दर्जाचे दिसून येते. पुष्कळांनी मूर्तिपूजा सोडली असेल, कित्येकांनी मिश्रविवाह केले असतील, काही थोड्यांनी गुरु आणि ग्रंथांचे वगैरे प्रामाण्य झुगारून देवाकडे आपला सरळ प्रवेश करून घेतलाही असेल. ही सर्व व्यक्तिविषयक संपादणी झाली, पण प्रार्थनासमाजाचाही एक समष्टिसंसार आहेच ना ! नित्य आणि नैमित्तिक उपासना, कार्यवाहक समितीची कामे, आल्यागेल्याचा समाचार, समाजांनी चालविलेली परोपकाराची कामे, कोणी प्रचारक नेमल्यास त्याच्या खासगी गरजांची विचारपूस, ह्या आणि अशा प्रकारच्या डोळ्यात न भरणा-या आणि वार्षिक रिपोर्टात न येणा-या गोष्टींचा समावेश ख-या अनुष्ठानात झाला पाहिजे. होवो न होवो ! भाऊंचा ह्या ख-या आणि भरीव अनुष्ठानात नंबर पहिला ठरलेला. ह्या बाबतीत भाऊ हा प्रार्थनासमाजाचा एक नमुना नसून, उलट भाऊंनीच समाजाला एक नमुना घालून दिला आहे, असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.

दुर्दैवाने भाऊंना विवाहसुख व तज्जन्य कौटुंबिक जबाबदारी आणि समाधान मिळावे तितके मिळाले नाही. तरी, त्यांनी आपला कौटुंबिक आश्रितांचा जो व्याप बळेच वाढविला आहे, त्याची जबाबदारी अनुष्ठानपूर्वक त्यांनी आतापर्यंत तरी राखली आहे, अशी माझी माहिती मला साक्ष देत आहे. ह्या आकुंचित अनुष्ठानाचीही उदाहरणे प्रार्थनासमाजात विपुल नाहीत, तर मग त्यांनी संपादिलेल्या वर निर्दिष्ट केलेल्या उच्चतर अनुष्ठानाचा मासला आमच्या इकडील समाजात तरी अगदी विरळा, अशी कबुली देण्यास आम्हांस का जड जावे बरे !

भाऊ सहज बोलताना व वागताना, हे एक विनयशाली पुरुष असतील, असे वरवर पाहणा-या हृदयविहीन माणसाला वाटत नाही. वाळूतल्या प्रवाहाप्रमाणे किंवा मर्दाच्या अश्रूप्रमाणे भाऊंची विनयगंगा पडदानशीन आहे. त्यांनी केलेली आणि करविलेली किती तरी दाने त्यांच्या उजव्या हाताची डाव्या हातास माहीत नाहीत ! त्यांच्या लेखांना जसा त्यांच्या सहीचा विटाळ घडत नाही, तसाच त्यांच्या विनयाला त्यांच्या जाणिवेचा घडत नाही. जसा त्यांचा विनय, तशाच त्यांच्या मनोभावना. जणू काय, खडकाखालील पाणीच ! भाऊंचे बाह्यवर्तन म्हणजे केवळ शिस्त आणि नियमितपणाचे एक अवजड यंत्र ! त्यात कोमलपणा किंवा ओलसरपणा दिसत नाही. हे मानवी गुण त्यांच्या शिस्तीचा खडक फोडूनच आत डोकावावे, तेव्हा दिसणार ! ह्या गर्दीचे दिवसांत इतका उपद्व्याप कोण करावयाला तटला आहे ! तरी, प्रसंगी भाऊंच्या भावनेचे उमाळे वर कसे फुटून येत असतात, हे कोणी भाऊंच्या जिव्हाळ्याचा स्नेहीच सांगावयास पुढे येईल, तेव्हा कळेल !

भाऊंना संततीचे बळ अथवा सुख नाही, संपत्तीचेही नाही. घालून नटावयाला एकाद्या जाड्या विद्यालयाचा फाटका झगाही नाही. राजमान्य पदवीचे शेपूट किंवा लोकमान्य नावाचे आयाळही नाही. किती भाग्य ! ह्यांपैकी एकही जर उपाधी असती तर भाऊंचाच नव्हे, तर बिचा-या मुंबईच्या प्रार्थनासमाजाचाही तोटाच झाला असता ! आणि जर का ह्या संपत्ती उर्फ आपत्तीचा एकत्र घाला भाऊंवर पडला असता तर काय झाले असते ? व्हावयाचे काय ? नामदार भाऊसाहेब वैद्य फार तर आमचे अध्यक्ष झाले असते ! पण नमुनेदार सभासद झाले असतेच कशावरून ? त्यांच्याकडून आईसारखी पडद्याआड सेवा झाली असती कशावरून ? अलीकडे मुंबई प्रार्थनासमाजाची बहुतेक उठाठेव भाऊंकडे येऊन साचत आहे व त्यांचे एक दोन साथीदार आहेत, असे ऐकतो. पण भाऊसाहेब अध्यक्ष झाले असते तर, ही जिवापाड दगदग त्यांना सहन झाली असती काय ?

असो. भाऊंची आरती ओवाळावयाची नाही मला. तसे ते मोठे नाहीत, असले तरी मला मानवले असतेच कशावरून ? कार्लाईल ह्यांनी विभूतिपूजेचे देव्हारे माजविले, तसे ब्राह्मसमाज करणार नाही. निदान करू नयेच. जगाला मोक्ष सामान्यजनांच्या दगदगीमुळेच मिळेल—मिळालाच तर विभूतीच्या कृपेने नव्हे. त्यासाठी तळमळणारे भाऊ एक सामान्य माणूस आहेत. म्हणून गुणांप्रमाणेच त्यांच्यात दोषही अवश्य असणार. ते त्यांचे त्यांना माहीत. त्यांच्यात काय कमी आहे, ते पाहिल्यासही त्यांच्या महत्त्वास बाधा येत नाही.

भाऊ एकलकोंडे, एककल्ली, एकमार्गी आहेत. ते पुष्कळांच्या उपयोगी पडतील, पण जिव्हाळ्याचा स्नेही त्यांना एकच. पुष्कळांचे ते ऐकतील, पण एकनाथाप्रमाणे चोवीस गुरु करणार नाहीत. त्यांनी एकच गुरु केला. भाऊ लढतील, पण वीर बनून शिंगावर धूळ घेणार नाहीत. त्यांचा संप्रदाय मवाळांचा, त्यांचे धोरण तडजोडीचे ! तत्त्व मात्र तीव्र. पण उपाय सैल. भाऊ भित्रे ! मी तसा असतो तर किती बरे झाले असते ! सार्वजनिक कार्याचे वाण घेतल्यावर शरिरांची नसली तरी काही लाडक्या मनाची हिंसा घडतेच ! मग ती कळत असो वा नसो. यज्ञसंस्था अद्यापि बंद झाली नाही. कोणाचा तरी बळी पडतोच. महात्मा गांधीनी कितीतरी बळी घेतले आहेत. बुद्धांनी, ख्रिस्तांनी बळी घेतले. तेथे म. गांधीचा पाडा काय ? आध्यात्मिक मार्गात भाऊ शाकाहारी ठरले ! प्रसंगी ह्यांनी पडही खाल्ली आहे.

काही असो ! भाऊंनी पुष्कळ चहाते मिळविले, नव्हे त्यांना मिळाले. मग त्यांना एकलकोंडे कसे म्हणावे ? त्या चाहत्यांनी हा गौरवग्रंथ प्रसिद्ध केला आहे. पण ह्यात भाऊंचा गौरव नसून, ईश्वराचाच आहे. ह्या प्रसिद्धीचे बहुतेक श्रेय माझे दुसरे मित्र श्री. बी. बी. केसकरांनाच आहे. हा पडदानशीन कर्मयोग केसकरांनी भाऊपासूनच घेतला, आणि त्यांच्याशी एक होऊन आमच्या समाजाची साहित्यसेवा केली. ह्या ग्रंथातील बहुतेक लेख पत्रिकेत येऊन गेले आहेतच. श्री. वैद्यांच्या लेखणीची एक खूण मला पटली, ती ही की, तिचे टोक ज्याच्यासंबंधी लेख लिहावयाचा, त्यांच्या उलट कधीही रोखले गेले नसून, लेखकाने आपल्याकडेच रोखलेले पुष्कळदां दिसते. हिला म्हणतात सहानुभूती उर्फ मैत्री (Charity). ईश्वराच्या भीतीमुळे ही मैत्री भक्ताच्या अंगी जडते. एरवी परोपदेशपांडित्य बोकाळते. सहानुभूती हा गुण ईश्वरी देणगी नव्हे. तो कसून कमवावयाचा असतो. वाटेवर पडलेला आढळणार नाही. हीच ब्रह्मज्ञानाची खूण. ही लेकराची गोष्ट नव्हे. पोटी अनुताप असल्याशिवाय ही खूण जड लेखणीतून उतरणार नाही. उतरल्यास ती घोर प्रतारणाच म्हणावयाची !

भाऊंना मी ह्या लेखात प्रार्थनासमाजाचा नमुना म्हटले ते त्यांनी प्रार्थनासमाजाचा नमुना घेतला आणि समाजाला आपल्या चारित्र्याचा नमुनाही घालून दिला, ह्या दोन्हीं अर्थांनी खरे कसे आहे, हे वरील लेखाने ओझरते जरी दिसले, तरी माझे काम होईल. प्रार्थनासमाज ही सेवक संस्था आहे, म्हणून ती अप्रसिद्ध किंबहुना अयशस्वी ठरली तरी तिला खंती वाटण्याचे कारण नाही. मग श्री. वैद्यांना ते कारण कोठून उरणार ? प्रार्थनासमाजात विद्या म्हणजे विज्ञान आहे, पण, त्या प्रमाणात विनोद नाही. तळमळ आहे, शांती नाही. शोध—उच्च प्रकारचा अंतःशोध—आहे, पण साक्षात्कार नाही, म्हणून तर त्यासाठी आमची प्रार्थना चालू आहे. धर्ममार्गात प्रार्थनासमाज ही अगदी कोवळी आणि अलीकडची संस्था असून एकाद्या जरठेप्रमाणे तिच्यात सोवळेपणाचा दोष क्वचित डोकावतो. पण आमच्या भाऊसारखे काही सभासद आहेत, त्यांनी खबरदारी घ्यावी, म्हणजे आशेला जागा राहील. प्रार्थनासमाजाची शक्ती आणि आटोप सर्व संग्राहक नाही. राजकारणात बाजू चढती नसून पडती, समाजसुधारणेत चालती नसून बोलती, लोकसेवेत राबती नसून बैठी, अशा आमच्या मर्यादा आहेत. प्रत्यक्ष धर्माचरणात आमच्या तितिक्षेपेक्षा प्रतीक्षाच फार, त्यागाहून भोगाकडे जास्त प्रवृत्ती, ईश्वरापेक्षा जगाकडेच अधिक लय ! मग तो जगाच्या हिताचेच दृष्टीने का असेना ! अशी आमची ओढाताण चाललेली असते. आमच्या प्रतिपक्षाला हा आमचा कबुलीजबाब ऐकून आनंद वाटला तर वाटो ! मात्र हे सर्व कठोर आत्मनिवेदन प्रस्तुत ग्रंथात भरलेले वाचकांना आढळो, म्हणजे श्री. वैद्य, केसकर आणि त्यांच्या साहाय्यका-यांना ह्या ओढाताणीचे काळात किंचित हायसे वाटले !

नाचत नाचत जाऊ त्याच्या गावा सुख देईल विसावा रे ।
पुढे गेले ते निघाय झाले । वानतील त्यांची सीमा रे ।।

ह्या परिचयाच्या वरील पहिल्या भागात मी केवळ माझ्या अंतःकरणावरील ठशांचे शब्दचित्र दिले आहे. आता ह्या दुस-या भागात ह्या पुढील ग्रंथासंबंधी माझी आवड-नावड कशी काय आहे हे मी जाहीर करणार आहे. हा अभिप्राय नव्हे, टीका तर नव्हेच नव्हे ! माझ्या पुढील रस मी नुसता जाहीरपणे चाखीत आहे. कोणाला काय परिचय होईल, तो ज्याचा त्याने पाहावा. मी त्याबद्दल जबाबदार नाही.

प्रथम मी बहिरंग पाहून घेतो. ग्रंथ वाजवीपेक्षा जास्त विस्तृत झाला आहे. तरी संपादक म्हणतात— ’२१ प्रकरणांपैकी ६ च घेतली. बाकीची अजीबात गाळली.’ ही मोठी कृपा ! दिवस कोण काबाडकष्टाचे येत आहेत ! आणि ग्रंथ पहावेत तर असे बोजड. तरी संपादकाने नाउमेद होऊ नये. उरलेला भाग लहानलहान ताटल्यांतून हात राखून व भूक पाहून वाढावा. अलिकडे उपदेशवाङ्मय जगाला नकोसे झाले आहे. वक्ते फार, श्रोते कमी. स्वतःचा उपदेश आम्हांला ऐकू येईना, तेथे दुस-याची काय पिरपीर, असे लोक उघड म्हणू लागले आहेत. ग्रंथ विस्तृत झाला म्हणजे त्यात वाच्य फार, व्यंग कमी असा प्रकार होतो. म्हणूनच लोक लघुकथा व भावगीते मागू लागले. असो, संपादकाचे म्हणणे असे कोठे आहे की हा ग्रंथ बसल्या बैठकीला वाचून टाकावा ! लेखकांच्या आयुष्यातले हे विचार वाचकांनीही आयुष्यभर वाचावे. देव करो, आणि हा ग्रंथ कोणाच्या तरी वशिल्याने मुंबई विद्यालयाच्या एकाद्या परीक्षेला नेमला न जावो ! नाहीतर ६४० पाने पाठ करून पहिल्या वर्गात पास झालेले विद्यार्थी पीठाकडे पाठ वळवतील आणि प्रार्थनासमाजात पाऊलही टाकणार नाहीत !

लेखक हे एका मोठ्या गुरूचे पट्टशिष्य आहेत. भाषेचा संस्कार, विचाराचे गांभीर्य, ध्येयाचे पावित्र्य आणि शोधाची आंतरिकता वगैरे गुरूच्या लहानमोठ्या गुणांच्या खाणाखुणा शिष्याच्या ह्या ग्रंथातील पानापानांवर, ओळीओळीतूनही आढळतात. लेखकाने ह्यात गुरूचे म्हणून जे उतारे दिले आहेत, ते दिले नसते आणि संपादकाने लेखकाचे नाव गाळले असते तर, भांडारकरांच्या धर्मपर व्याख्यानाची ही एक सुधारून वाढविलेली नवी आवृत्तीच आहे असा वाचकांना भास झाला असता. ह्या गुरुशिष्यांनी तुकारामाला तर अगदी सळो का पळो करून सोडले आहे. तुकाराम जिवंत असता, तर तो पुनः काही सजीव स्वर्गाला गेला नसता !

नाव पहा ! संसार व धर्मसाधन ! ही संपादकाची करामत दिसते ! ग्रंथ काही एका बैठकीला झाला नाही. अगोदर सामग्रीच भंडावून सोडण्याइतकी अवाढव्य. ती ४० वर्षांच्या आत्मिक अनुभवातून निघालेली. तिला अशी सहा प्रकरणांच्या साच्यात बसवून वर ह्या सार्थ नावाने कसा बेमालूम एकसूत्रीपणा संपादकाने आणला आहे, ही कलाकुसरी मला बाह्यांगावरून अंतरंगात ओढीत आहे. संसार व धर्मसाधन ह्यात ‘व’ हे उभयान्वयी अव्यय कशाला घुसडले ? मी म्हणतो, संसारच धर्मसाधन आहे. दुसरे काय धर्मसाधन असू शकणार ? ब्रह्मांडात दुसरीकडे काय खटाटोप चालला आहे, तो आमच्या डोळ्यांना दिसेपर्यंत तरी मी हेच म्हणत राहाणार. मीच काय म्हणतो ! ह्या ग्रंथातूनच हा मंजूळ ध्वनी उमटत आहे. संसार व धर्मसाधन हा द्वंद्वसमास थोडाच आहे ? हा आहे ठाईचा तत्पुरुष समास ! ह्यातला पुरुष व्याकरणातला नसून परमार्थातला आहे. संसार हेच धर्मसाधन. संसारातला धर्मसाधनाचा भाग वेगळा केला—हे शक्य असेल तर ना—तर उरलेला भाग म्हणजे नरकयातना. असा झरतृष्ट्रांचा द्वैतसिद्धांत आहे. पण ब्राह्मसमाज असा द्वैतवादी नाही. संसार म्हणून एक आजार आहे, त्यावर तोडगा धर्मसाधन आहे, असा द्वैतवाद कदाचित ख्रिस्त्यांचा असेल, ख्रिस्ताचा नव्हता. निदान ब्राह्मसमाजाचा तरी नाही.

धर्मसाधन म्हणजे काय ? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे, म्हणजेच धर्मसाधन काय ? मुळीच नव्हे. ब्राह्मसमाज म्हणतो प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. एकादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी, विशेषतः प्रेमळ भंगीदेखील एकाद्या पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय ? असे जर आहे तर संसार म्हणजेच धर्मसाधन ठरते.

असो ! आता मी अंतरंगातच बुडी घेतो. मला मधले तिसरे प्रकरण प्रार्थनासमाजाचे ध्येय हे फार आवडले. ते २५८ पानापासून ४३१ पानापर्यंत पसरले आहे. ३२७ पानापासून ४३१ पानापर्यंत ‘प्रार्थनासमाजाचे कार्य’ असे चौथे प्रकरण निराळे केले असते तर ह्या गोड प्रकरणाला असा अवजडपणा आला नसता. कोणतेही ध्येय दूरच असणार. जवळ जवळ अदृश्यच असणार. ते निर्मळ मनाच्या आरशातच (आदर्शातच) दिसणार. बाह्य व्यवहारात ते पाहणेच व्यर्थ. प्रार्थना किंवा ख-या नावानेच उल्लेख करणे झाल्यास, ब्राह्मसमाजाचे ध्येय अद्यापि गणना करण्याइतक्या ब्राह्मांना तरी नुसते कळले आहे की नाही ह्याची जेथे शंका, तेथे ते साध्य कितपत झाले आहे ह्याची चर्चा करणे, हा मृगजळ पाठलाग होय ! ह्या ग्रंथाच्या ३०५ पानावर रा. वैद्यांनी बंगाल्यातील* ब्राह्मसमाजाच्या सभासदांच्या काही नैमित्तिक अनुष्ठानासंबंधी आपला स्पष्ट अभिप्राय दिला आहे. न जाणो, तेव्हापासून वैद्यांचे मन बंगाल्याविषयी उलट खाऊन आपल्या इकडील काही जणांच्या अर्थवादाला बळी पडू लागले, अशी कोणास शंका येईल, पण खरा प्रकार तसा नसावा. ह्याच दृषिने ह्या परिचयाच्या वरील पहिल्या भागात आकुंचित अनुष्ठान व बृहदनुष्ठान असा मी कृत्रिम भेद केला आहे. आणि ह्या दोन्ही अनुष्ठानांत ह्या ग्रंथकर्त्याचा नंबर पहिला ठरवला आहे. पण आमच्या काही—सर्व नव्हे—वृद्ध पुढा-यांना ही दोन्ही अनुष्ठाने लाभली नाहीत. हातचे गेले आणि पळते ते पळालेच, अशी ह्या पुढा-यांची फसगत झाल्याने आज त्यांची मुले, नातवंडे प्रार्थनासमाजाला अगदी पारखी झाली आहेत. त्यामुळे बंगाल्यातील नैमित्तिक अनुष्ठानाला नाव ठेवण्याइतकेही भाग्य, आम्हांला इकडील प्रार्थनासमाजाच्या कौटुंबिक अवस्थेत उरले नाही. ते कसेही असो, ह्या तिस-या प्रकरणाचे शेवटी पान ४२३ पासून ४३१ अखेर जो गुरु-शिष्यसंवाद कर्त्याने रचला आहे, तो (* रा. वैद्यांची ही बंगालची भेट सन १९११ मध्ये झाली. –सं.) बहारीचा वठला आहे. ते एक लहानसे ध्वनिकाव्यच झाले आहे. ह्यात शिष्याने गुरूवरही ताण केली. ह्यात नावीन्य आहे, स्वारस्य आहे, निष्ठा आहे, सर्वस्व आहे. म्हणून ह्या संवादातला शिष्यच आज गुरु झाला आहे, असा भास होतो. चौथे प्रकरण सुखदुःखाविषयीचे वाचीत असता प्रथमप्रथम मला ते किचकट वाटले. ह्यात लेखक धर्माच्या प्रदेशातून तत्त्वज्ञानाच्या प्रदेशात शिरले आहेत. पण सिद्धांत असा काही निष्पन्न झाला नाही. संसारातील सुखदुःखाचा त्रास हा मुळी प्रमेयाचा विषयच नव्हे. हा प्रश्न समष्टीने सुटावयाचा नाही. प्रत्येक व्यक्तीने ह्या अनुभवाच्या दिव्यातून निर्वाणाकडे जावे, असा ईश्वरी संकेत दिसतो. ‘Problem of Evil’, ‘Freedom of Will’ वगैरे कोडी आहेत. ह्यांच्या नादी लागून सबंध पाश्चात्य तत्त्वज्ञान फोल ठरत आहे. तेथे रा. वैद्यांची गती खुंटली ह्यात काय नवल ? तथापि नुसत्या धर्माच्या दृष्टीने पाहू लागले असता शेवटी शेवटी हे प्रकरणही गोड झाले आहे. अखेरीस पान ४९१ पासून ४९९ पर्यंत, ज्या सहा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या हृदयस्पर्शी आहेत. साधकाने त्या वरचेवर आपल्या अनुभवात ताडून पाहून मार्ग क्रमावयाचा आहे.

‘थोरांचा परिचय’ हे प्रकरण आगंतुक आणि अपूर्ण भासते. पण हे बहुतेक मृत्युलेख असल्यामुळे असे झाले आहे. तथापि, ह्या प्रकरणात ब्रह्मानंद केशवचंद्र सेन, विरक्त विजयकृष्ण गोस्वामी अशांचा अवश्य समावेश व्हावयास पाहिजे होता. काऊंट टॉलस्टॉय, रूडॉल्फ आयकेन अशा दूरच्यांची आठवण होऊन ह्या श्राद्धविधीत अगदी जवळच्यांचाच विसर कसा पडला ! प्रार्थनासमाजाच्या इतिहासात आमच्या भाऊंनी असेच एक प्रकरण जोडले आहे. त्याचवेळी मी एक आक्षेप घेतला होता की, त्यात स्त्रियांची चरित्रे नाहीत. ह्या प्रकरणात रमाबाई रानड्याप्रमाणे उमाबाई केळकर ह्यांची तरी निदान आठवण झाली असती तर बरे झाले असते !

‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ ही तुकारामाची महत्त्वाकांक्षा ब्राह्मसमाजाने पुरी करण्याचा हव्यास घेतला आहे आणि अखिल संसार हे आमचे धर्मसाधन, असे आम्ही म्हणतो. पण, स्त्रियांचा आमच्या कार्यात अभाव हे विसंगत दिसत नाही काय ? इतर चळवळीप्रमाणे ब्राह्मसमाजही पुरुषी चळवळच आहे, असे कोणी म्हटल्यास त्यास आम्ही कसे तोंड देणार ! तिसरा प्रहर झाला आहे, घरातील चूल निवाली आहे, मूल निजले आहे, एकाद्या शिवालयात पुराण चालले आहे, सांगणारा डुलक्या खात आहे आणि ऐकणा-या वाती वळत आहेत, असा प्रकार हिंदुधर्मात रोजचा दिसतो. ब्राह्मसमाजातही ह्यापेक्षा विशेष काय दिसते ! उंच व्यासपीठावर कोणीतरी आळीपाळीने बसलेला असतो ! त्याच्याभोवती थोडीबहुत माणसे ऐकत असतात ! हिंदुधर्मात जो प्रकार रोजचा, तो ब्राह्मसमाजात आठवड्याचा ! हिंदुधर्मात ऐकणा-या बायकांची बहुसंख्या तर ब्राह्मसमाजात पुरुषांची ! किंबहुना बायकांना चूल व मूल ह्यांमुळे यावयाला फावतच नाही ! असा प्रकार असल्यामुळे थोरांच्या परिचयात बायका बेपत्ता झाल्या तर काय नवल ! अवघाचि संसार अशाने सुखाचा होईल काय ? म्हणून आम्हांला पुनः प्रार्थना करावयाची आहे. दुसरा तरणोपाय काय ?

ग्रंथाच्या शेवटी ज्या २२ प्रार्थना दिल्या आहेत, त्याविषयीही संपादकाचा मी मोठा ऋणी आहे. निराशेत हाच आधार. जागृतीला हाच उपाय. हा ग्रंथ एक कमान आहे असे कल्पिले तर तिच्या शिरोभागी जो कळाशीचा दगड असतो तो ह्या प्रार्थना होत. हा प्रार्थनेचा भाग जर निखळून काढला तर ग्रंथाची सारी इमारत ढासळून जाईल. प्रार्थना म्हणजे नुसती कळसाची शोभा नव्हे, तर पायाची बळकटी आणि तसेच प्रत्येक दगडादगडामधील सिमेंटही होय. म्हणूनच न्या. रानडे म्हणतात की आधी, मध्ये आणि अंती आम्ही प्रार्थना करावी, ते खरे.

ह्या प्रार्थनांतील लीनपणा, अंतःशोध, शरणागती ही लक्षणे, ज्या थोड्या थोरांचा परिचय म्हणून भाऊंनी आपल्या इतिहासात आणि ह्या उपदेशग्रंथात नमूद केला आहे, त्या थोर पुरुषांत काही सुप्रसिद्ध आहेत, दामोदरदास सुखडवाला, रामभाऊ माडगावकर ह्यांसारखे काही असावे तितके प्रसिद्ध नाहीत, आणि भिकोबादादा चव्हाणसारखे कधी प्रसिद्धही होणार नाहीत. पण प्रसिद्धी ही केवळ उपाधी आहे. वरील तीनही लक्षणे ह्या सर्वांतून सारखीच शोभत आहेत.

प्रेमसमाजाचे प्रमुख प्रवर्तक श्री. नामदेव महाराज ह्यांचे पुढे प्रसिद्ध भरतवाक्य आठवून मी माझा हा परिचय पुरा करतो.

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरिच्या दासा ।।१।।
कल्पनेची बाधा न हो कदाकाळी । ही संत मंडळी सुखी असो ।।२।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णुदासा भाविकांसी ।।३।।
नामा म्हणे तया असावे कल्याण । ज्या मुखी निघान पांडूरंग ।।४।।

प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का ?

ह्या विषयावर ‘स्पष्टवक्त्याने’ उपस्थित केलेल्या वादासंबंधी माझे मत आपण विचारून बरेच दिवस झाले. आज प्रसिद्धपणे ह्या विषयावर अशी वाच्यता करण्याची मला स्वतःला मोठीशी आवश्यकता दिसत नाही. तथापि तुमचा इतका सद्हेतुपूर्वक आग्रह आहे, ह्यामुळे फायदा होईल असे इतर काही मंडळीलाही वाटत आहे, आणि ह्यात फायदा नाही तरी तोटाही नाही असे स्वतः मलाही वाटत असल्यामुळे खालील चार ओळी आपल्याकडे पाठविल्या आहेत.

(१) समाज अप्रिय असल्यास तो का ? हा विषय घेऊन त्याचा खल करीत बसण्यापेक्षा समाजाची प्रगती होत नसल्यास ती का ? ह्या विषयाचा खल होणे अधिक योग्य व इष्ट होते असे मला वाटते. तथापि प्रस्तुतच्या वादात पहिल्या नावाखाली दुस-या विषयाचा बराचसा भाग येऊन गेला आहे. एकाद्या संस्थेची लोकप्रियता व तीची प्रगती ह्यांचा वस्तुतः अगदी आवश्यक कार्यकारणसंबंध असतोच असे नाही. ख्रिस्ती समाजाची गेल्या शतकात ह्या देशात आम्ही ह्या गोष्टीकडे किती जरी डोळेझाक केली तरी—पुष्कळ प्रगती निदान प्रसार तरी झाला आहे. ह्यावरून त्याची लोकप्रियता वाढली म्हणून प्रसार झाला असे मुळीच नाही. उलटपक्षी, राजकीय सुधारणा व काही अंशी सामाजिक सुधारणा इत्यादी गोष्टींची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे पण त्या मानाने त्यांची प्रगती होते असेही म्हणवत नाही. तिस-या पक्षी आर्यसमाज पूर्वीप्रमाणेच आताही अप्रिय आहे पण त्याची वाढ पुष्कळ झाली आहे. चवथ्या पक्षी केवळ लोकप्रियतेच्याच जोरावर भराभर वाढलेल्या पण दुसरे काही सत्त्व नसल्यामुळे आता हटत चाललेल्या ब-याच चळवळींचा उल्लेख करिता येईल. असो. एकंदरीत प्रियता व प्रगती ह्यांचे काही म्हणण्यासारखे साहचर्य नाही. म्हणून प्रगतीची बाजू अगदी एकीकडे ठेवून केवळ प्रिय व अप्रियतेचाच येथे मला विचार विषयाच्या नावामुळे नाईलाजाने करावा लागत आहे. (फुट नोट – सुबोध पत्रिका ८-४-१९०६)

(२) अप्रिय ह्या शब्दाने दोन अर्थ मनात येतात, एक समाजाचा लोक अगदी द्वेष करितात असा आणि दुसरा, समाज लोकांना प्रिय नाही असा. म्हणजे लोकांची समाजाकडे ओढ नाही असा. आणि दुसरा समाज लोकांना प्रिय नाही असा. पहिल्या अर्थान्वये समाज अप्रिय आहे असे माझ्या जरी अल्प अनुभवावरून दिसत नाही तरी काही अप्रबुद्ध विद्यार्थी व अशिक्षित माणसे प्रसंगविशेषी समाजाचा—त्यातील काही व्यक्तींविषयी तिटकारा दाखवीत असतील. मागे आरंभी समाजाचा द्वेष लोकांनी केला असेल, पण हल्ली केवळ द्वेषाचा प्रकार क्वचितच आढळतो. दुस-या अर्थाने समाज अप्रिय आहे व हे साहजिकच आहे.

(३) आता ह्या अप्रियतेच्या कारणासंबंधी ज्या कोट्या नेहमी लढविण्यात येत आहेत त्या मला स्वतःला अगदी व्यर्थ दिसत आहेत. त्यांत दोन मुख्य आहेत, त्या ह्या. समाजाचे विचारविधी, अध्ययन, अध्यापन, उपदेशाचे वेळी घेतलेले वेचे ह्यांमध्ये देखील परावलंबीपणा व परकीयानुकरण आहे म्हणून समाजाकडे लोकांचे मन घेत नाही. ही कोटी दोन्ही बाजूंनी बरोबर नाही. एक तर वस्तुस्थिती अशी आहे की, समाजातील स्वकीय आणि परकीय विचारांच्या विधींची आणि वेच्यांची जर खरोखर गणती केली तर पहिली बेरीज दुसरीपेक्षा कितीतरी मोठी होईल ! इतकी की समाजाने जरी सार्वत्रिक धर्म स्वीकारला आहे तरी व सर्व साधू व सर्व धर्मपंथ समाजाला सारखेच मान्य असावयाला पाहिजेत तरी, संवय, परिस्थिती, शिक्षण, आनुवंशिक संस्कार इ. च्या जोराने समाज ह्या बाह्य गोष्टीत अद्यापि केवळ हिंदूच आहे असे म्हणावे लागेल. म्हणजे ब्राह्मधर्म जरी सनातन व सार्वत्रिक आहे तरी हिदुस्थानातील ब्राह्म लोक अथवा इंग्लंडातील युनिटेरियन लोक ह्यांच्या सामाजिक पद्धती व गृहकर्मे ही तद्देशीयच आहेत व तसे नसणे शक्यही नाही. इंग्रजी वाङ्मयाची व शिक्षणपद्धतीची छाप सर्व हिंदुराष्ट्रावरच बसून गेल्यामुळे इतर बाबतींप्रमाणे समाजरचनेतही एक दुस-याचे अवलंबन कदाचित जास्त करीत असेल. तथापि दोन्ही देशांतील उदार धर्माचे समाजात अद्यापि पुष्कळच एकदेशीयता आहे. नुकताच युनिटेरियन लोकांच्या इनक्वायरर पत्रात, उपासनेच्या वेळी जे पीठावरून पवित्र ग्रंथांतील उतारे वाचावयाचे ते बायबलातूनच घ्यावेत की दुस-या कोणत्याही प्रासादिक ग्रंथातून घ्यावेत अशाविषयी पुष्कळ पत्रव्यवहार होऊन शेवटी बहुमताचा कल हल्लीची एकदेशीयता सोडली पाहिजे असे जोराने प्रतिपादण्याकडेच होता. दुस-या बाजूने ह्या कोटीचा पोकळपणा असा दिसून येतो की समाजात जे वेचे घेण्यात येतात किंवा विवेचन करण्यात येते त्यांत समाज स्वकीयांचे अनुकरण करीत आहे की परकीयांचे ही काही ऐकणा-यांनी शोधून पहाण्याची मुख्य गोष्ट नव्हे. तर समाज केवळ नक्कल करीत आहे की मनोभावाने म्हणा किंवा प्रसंगवशात प्रेरित झाला आहे ही आहे. केवळ नक्कलच असल्यास ती स्वकीय काय परकीय काय, जुनी काय नवी काय, सारखीच अप्रीतीला कारण झाली पाहिजे.


पण उलट जर ख-याखोट्याचा विचार न करिता केवळ स्वकीय परकीयावरच प्रीती अप्रीतीचे तरंग उठू लागले तर तो दोष वस्तुस्थितीचा नसून लोकदृष्टीचा म्हणावा लागेल, किंबहुना स्पष्टवक्त्यांच्या कोटीचाही म्हटल्यास चालेल. ह्या प्रकारचा समाजावर जो अनुकरणाचा आक्षेप आहे तो वस्तुतः व विचारतः दोन्ही दृष्टीने माझ्या अल्पमतीला बरोबर पटत नाही.

(४) दुसरा आक्षेप समाज मतांप्रमाणे कृती करीत नाही. म्हणून अप्रिय झाला आहे. ह्या बाबतीत मी समाजाची मुळीच तरफदारी करीत नाही व कोणी सभासदाने कधी केली आहे असे मला आठवत नाही. उलट मताबरोबर कृती न ठेवल्यास समाजाची प्रगती कधीच न होता कृतीविना उगाच मतांचाच गोंधळ माजविल्यास समाज नष्ट होईल हे तो जाणून आहे, व ह्या बाबतीत कोणी कितीही फुकाचे स्पष्ट भाषण करून काही अधिक मिळेल असे होणार नाही. पण मताप्रमाणे कृती अधिक केल्याने समाज लोकांत अधिक प्रिय होईल ही आशा मात्र मला व्यर्थ दिसते. वरच्याप्रमाणेच ही कोटी देखील मला विचारतः व वस्तुतः निराधार दिसते. चोरी करणे हे वाईट असे लोकांचे खरोखर मत आहे. मी उद्या चोरी करणे चांगले असे प्रतिपादू लागलो तर अप्रिय होईन आणि परवा जर खरोखरीच चोरी केली तर मी प्रिय होईन काय ? बरे जातिभेद मोडणे व चोरी करणे ह्या दोन गोष्टींत लोकमतांच्या दृष्टीने सादृश्य नाही असे म्हटले, कारण जातिभेद मोडणे चांगले एवढे म्हटल्याने कोण अप्रिय होत नाही, मात्र प्रत्यक्ष मोडू लागल्याने होतो तर तेथेही वरची कोटी कशी लागते ? ज्या लोकांना आमची मतेच अप्रिय आहेत त्यांना आम्ही कृतीने कसे प्रिय होणार ? त्यांची मतांसंबंधी अप्रीती खरी असेल तर आम्ही कृती करू लागल्यावर तर ते आमचा अगदी द्वेष करू लागतील. लोकांची अप्रिती जर खरी अंतःकरणापासून नसली, वरवर दाखविण्यातच असली तरीदेखील आम्ही कृतीने कसे जास्ती प्रिय होऊ ? ज्यांच्यात मतांबद्दल प्रीती दाखविण्याइतके धैर्य नाही किंवा सरळपणा नाही त्यांची कृती पाहून काय वाट होणार ? काय झाली त्याचा थोडासा अलीकडे अनुभवही आहे. आता जे लोक भित्रे आहेत पण सरळपणे आपला भित्रेपणा मनात किंवा जनात कबूल करतात अशांना समाज मुळी अप्रिय नाहीच. ज्या अंशाने समाजाची कृती त्या अंशाने हे समाजाचे अभिनंदन करतात व जेथे कृती होत नाही तेथे अनुकंपा दाखवितात. असो. एकंदरीत ह्या बाबतीत लोकप्रीतीचा हिशेब करीत बसणे अप्रयोजक आहे. आता वस्तुतः ही ह्या कोटीची निराधारता आहे ती अशी. प्रार्थनासमाजापेक्षा ब्राह्मसमाजात कृती अधिक आहे व अशी प्रसिद्धीही आहे म्हणून ब्राह्मसमाज बंगाल्यात अधिक प्रिय आहे काय ? उलट तो तिकडे किती अधिक द्वेषाला मात्र पात्र झाला आहे हे तिकडे त्यांची जी अप्रबुद्ध माणसांकडून नालस्ती करण्यात येते त्यावरून दिसते, व चांगल्या प्रबुद्ध माणसांचाही त्याच्यावर असा आक्षेप येतो की समाज कृती करून एकलकोंडा झाला हे फार वाईट झाले. तुकाराम म्हणतात, “लोक जैसा ओक धरिता धरवेना” हे खरे आहे. ह्यावरून समाजाने कृती करण्यात हेळसांड करावी असे माझे मुळीच म्हणणे नाही. कृतीवरच सर्व प्रगती अवलंबून आहे असे वर म्हटले आहेच. जसजशी कृती व सत्प्रयत्न जास्त करू तसतशी सभासदांची व हितचिंतकांची संख्या वाढेल म्हणजे समाज मोठा होईल किंवा प्रगती होईल की जशी आर्यसमाजाची होत आहे. पण ह्या पलीकडे बहुजनसमाजात तो कधी प्रिय होईल असा तूर्त संभव दिसत नाही.

(५) मग ह्या अप्रियतेचे कारण काय असावे बरे ? ह्यात काय मोठेसे गूढ आहे असेही नाही. ह्याची चर्चाही नको होती. आरंभीचा नेणतेपणामुळे जो द्वेष होता तो बहुतेक नाहीसा झाला आहे. मागे उरलेली पंगू अप्रियता अशी रहाणारच. तिचे कारण मानवी स्वभावाचा स्वयंभू सुस्तपणा हेच होय. समाज जसजसा आपली स्वतः सुस्ती टाकून प्रयत्न करील तसतसा तो स्वतः मोठा होईल, पण दिवा किती मोठा केला किंवा लहान केला तरी त्याने प्रकाशित केलेल्या प्रदेशापलीकडे जसे नैसर्गिक अंधःकाराचे अपार वलय रहाणारच. तसे ह्या समाजाभोवती ह्या प्राकृत अप्रियतेचे वलयही रहाणारच. आणि जेव्हा ह्या समाजाचाच जीवनाग्नी विझून जाऊन मागे, जसे उत्तरेस शीख समाजाचे व दक्षिणेस लिंगायत समाजाचे केवळ जड शरीर मात्र उरले आहे तसे ह्याचेही उरेल, तेव्हा तद्वतच हाही प्रिय आहे की अप्रिय आहे व तो का ? इ. सर्व वाद मिटून जाईल. बरे उलटपक्षी ह्याचा भडका हिंदुस्थानवर होऊन ईश्वरी योजनेने ह्याच्या जीवनज्वाला जरी चारी खंडांत पसरू लागल्या तरी म्हणजे हे अप्रियतेचे वलय नाहीसे होईल थोडेच. ख्रिस्ती समाजाचे उदाहरण आपल्यापुढे आहे व तो इतका जरी पसरला आहे तरी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या भोवतालच्या प्रदेशात तो अप्रिय असणारच व आहेही. तोच बुद्धधर्म बिचारा थंड झाला आहे, त्याचे कोणीही वाटेस जात नाही.

(६) ह्यावरून लोकप्रीतीचा मी वाजवीपेक्षा अधिक अनादर करतो असे नाही. उलट प्रत्येक व्यक्तीने आपल्या तत्त्वास व कर्तव्यास बाध न येईल अशा रीतीने शक्य तेवढी लोकप्रीती अवश्य संपादन करावी व हे ज्यांना साधते ते धन्य होत असे मला वाटते आणि ते न साधल्यामुळे ते उगाच लोकप्रीतीचा अनादर करतात किंवा अशा विरळा धन्य पुरुषाला नावे ठेवितात त्याचे करणे कोल्ह्याने द्राक्षे आंबट ठरविण्याप्रमाणेच होय हेही मी कबूल करतो. पण ही सर्व व्यक्तीची गोष्ट झाली. समाजाला, विशेषेकरून धार्मिक समाजाला असे प्रिय होणे शक्य नाही. एकादा गायनसमाज प्रिय होईल. एकादी साहित्यपरिषद प्रिय होईल. पण धार्मिक समाज प्रिय होणार नाही. कारण झाला तर तेवढा प्रीतीचा प्रदेश—ती प्रीती खरी असेल तर—त्या समाजात समाविष्ट होतो व त्याच्या भोवतालचे वलय पूर्वीपेक्षा अधिकच मोठे होते एवढेच मला म्हणावयाचे.

शेवटी माझ्या समाजबंधूंनी आपल्या अंतर्याम-देवतेने प्रकाशित केलेली पायवाट धीराधीराने क्रमीत पुढे जावे, भोवतालच्या तमोवलयाकडे पाहून उगाच वेळोवेळी आपले व आपल्या सोबत्याचे पाय गाळू नयेत किंवा ह्या रात्रीच्या विस्तीर्ण आकाशातील दूरदूरच्या मोहक ता-यांची गणना करण्यात किंवा तद्विषयक वाद माजविण्यात आपला अमोल वेळ दवडू नये ही एक विनवणी आहे.

प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा

सर्व प्रकारच्या भावनामय चळवळी ह्या आध्यात्मिक चळवळी असतात. आपण कोठूनही सुरूवात करा, आपण एकाच उगमापाशी जाऊन पोचतो आणि तो उगम म्हणजे आध्यात्मिक होय. मी ब्राह्म समाजाच्या तत्त्वावरील आपल्या अलिकडील व्याख्यानात महात्मा गांधी ह्यांना हिंदुस्थानातील नवयुगाचे जनक जे राजा राममोहन रॉय त्यांचे नवीन अवतार म्हणून संबोधीत असतो. करिता आपण राजा राममोहन रॉय व महात्मा गांधी ह्यांचे चरित्र व चारित्र्य ह्यांकडे दृष्टी द्या म्हणजे माझ्या विधानातील भावार्थ आपल्या बरोबर लक्षात येईल. राजा राममोहन रॉय ह्यांनी धर्मापासून प्रारंभ करून शेवटी व्यवहार्य धर्माचे सार जे उच्च राजकारण त्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्राचा शेवट केला; उलटपक्षी महात्मा गांधीनी प्रथम राजकारणाच्या प्रवाहात उडी घातली, पण शेवटी ते प्रस्तुत काळातील जो उच्चतम धर्म त्याच्या कडेस लागलेले आहेत. ध्येयात्मक प्रयत्नांचे अशा प्रकारे ऐक्य झालेले आहे.

परंतु समाजसुधारणेचे कार्य आमच्या देशात जे इतक्या सावकाशीचे व अल्पप्रमाणात प्रगती करीत आहे त्याच्या आणखी एका कारणाचा (माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या अशा कारणाचा) अद्यापही उल्लेख करावयाचा आहे. आणि ते म्हणजे शुद्ध सामाजिक सुधारणेचे म्हणविले जाणारे कार्य अद्यापही बुद्धिपुरस्सर धर्मापासून अलिप्त ठेवले आहे, हे होय. कै. आगरकरासारखे जुन्या परंपरेतील समाजसुधारक ह्या कार्याची उभारणी अद्यापही उपयुक्ततावाद युक्तिवाद, भूतद्या वगैरे दुस-या कोणत्याही तत्त्वावर करण्यास तयार असतात. पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्यास तयार नाहीत. त्यांना एक तर अशा प्रकारच्या धार्मिक मनोवृत्ती नसतात किंवा असलय् तरीही त्यांच्या उपयोग करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. आणि अशा त-हेची ही धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकामध्ये असावी ही अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे, इतके तरी निदान म्हटल्यावचून माझ्याचाने रहावत नाही.

सांप्रदायिक अस्पृश्यता

साता-याच्या प्रांतिक सामाजिक परिषदेमध्ये अध्यक्षांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधाने अधिकारयुक्त विवेचन केले. जोतिराव फुले ह्यांनी हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेपुढे प्रथम जरी ठेविला असता तरी अलिकडच्या वीस-पंचवीस वर्षातील काळात ह्या प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार करून लोकांमध्ये जागृती उत्पन्न केल्याचे श्रेय जर कोणा एका व्यक्तीस देत येत असले तर ते शिंदे ह्यासच दिले पाहिजे. अस्पृश्य लोकासंबंधाने होत असलेला अन्याय किती थोर आहे हे त्यांनीच दाखवून दिले असून ह्या विषयाची जागृती त्यांनीच सर्व हिंदुस्थानात प्रथम केली. त्या दृष्टीने पहाता त्यांच्या पुढील उद्गारास महत्त्व फार आहे. (संपादक.)

ह्या विशिष्ट प्रकारच्या अन्यायाला जे बळी पडलेले आहेत त्यांच्यामध्ये याबद्दलची जी जाणीव व जागृती उत्पन्न व्हावयास पाहिजे, ती उत्पन्न करण्याचे प्राथमिक काम बहुतेक यापूर्वीच होऊन चुकले आहे.


आता आम्हास सोडवावयाचा बिकट प्रश्न विचार प्रांतातला नसून तो इच्छा प्रांतातला आहे. आता ह्यापुढे ह्या प्रश्नाचा आणखी ऊहापोह व्हावयास पाहिजे अशातला प्रकार नाही. पण आमच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर कसे व्हावे हाच काय तो प्रश्न आहे. त्यासंबंधीचे आमचे विचार कितीही पूर्णत्वास पोहोचले तथापि त्यांच्या योगाने आमच्या हातून प्रत्यक्ष कृती घडण्यास जी इच्छाशक्ती अवश्य आहे, ती आमच्यात प्रादुर्भूत होईल असे म्हणता येत नाही. ह्यासंबंधाने विचार करिता अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की, लाला लजपतराय ह्यांच्यासारख्या प्रसिद्ध पुढा-याच्या नेतृत्वाखाली भरलेल्या हिंदुसभेतही हा प्रश्न निर्णयाकरिता अजूनही शास्त्रीपंडिताकडे सोपविण्यात यावा. ह्या प्रश्नाच्या निर्णयाला जर कोणी अगदी नालायक असेल तर ते हे शास्त्रीपंडितच होय. ह्यांच्या अंगचा मोठा गुण म्हटला म्हणजे त्यांची विद्वत्ता. पण हा प्रश्न तर पडला अत्यंत निकडीच्या व्यवहारातला, तेथे नुसती विद्वत्ता काय कामाची? शिवाय अशा प्रश्नांचा निर्णय करण्यास जी नि:पक्षपात बुद्धी असावयास पाहिजे ती त्यांच्या अंगी असणे शक्य नाही. त्यांच्या पोशिंद्याच्या पसंतीवर त्यांची सारी भिस्त असणार. दुसरे सांप्रतची कायदेकानूची पुस्तके वेगळी व ज्यांच्यावर ह्या शास्त्रीपंडिताची सारी मदार ते स्मृत्यादी ग्रंथ वेगळे. हे स्मृत्यादी ग्रंथ म्हटले म्हणजे त्या त्या प्राचीन काळी जे जे प्रघात अथवा रूढी प्रचारात असत त्यांच्या नोंदीची पुस्तके अगर पोथ्या, त्यांच्या अर्वाचीन कालच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या उलगड्यास उपयोग होण्याचा संभव बहुतेक थोडाच असणार. शेवटची मुद्याची गोष्ट ही की, ह्या दुर्दैवी अस्पृश्य वर्गाविषयी ह्यांना बिलकूल सहानुभूती नसून उलट आपले अभिप्राय त्यांना प्रतिकूल असल्याचे त्यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखविले आहे. अर्वाचीन कालची राजनीती नि:पक्षपाती म्हणतात, पण तेथेही पहावे तो न्यायाधिशाचा कल अनूकूल असल्याची शंका असल्यामुळे खटला वर्ग केल्याची उदाहरणे घडून आलेली आहेत. मी विचारतो की, हा अस्पृश्यांचा प्रश्न जर शास्त्रीपंडिताकडे सोपवावयाचा तर पतितपरावर्तन, हिंदुमुसलमानातील एकी, हिंदूंची संघटना इत्यादी प्रश्नही त्यांच्याकडेच निर्णयाकरिता का सोपवू नयेत? आपला इतका छळ होत असूनही आपल्याला आदिहिंदु म्हणवून हिंदुधर्माविषयीचा आपला आपलेपणा जे जाहीर करीत आहेत, त्यांना निदान ख्रिस्ती वगैरे अन्य धर्माचा आश्रय करणा-यांच्या बरोबरीने वागविणे हे आपले कर्तव्य आहे, इतकेही हिंदुसभेला वाटू नये काय? धर्मांतर केलेले आदिहिंदु आणि आपणास अद्याप हिंदु म्हणविणारे आदिहिंदु ह्यांच्या बाबतीत असा भेदभेद का करावा? तात्पर्य ह्या सर्व प्रकाराचे मूळ शोधू गेल्यास त्या बाबतीत आमच्या अंत:करणात उत्कट इच्छेचा पूर्ण अभाव आहे हेच कबूल करावे लागेल.

साता-याची प्रांतिक सामाजिक परिषद,-एक प्रतिक्रिया,

साता-यास भरलेल्या सामाजिक परिषदेसंबंधाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्यांपैकी एक विशेष गोष्ट म्हणजे रा रा. वि. रा. शिंदे ह्यांची अध्यक्षांच्या जागी झालेली नेमणूक ही होय.
साता-यासारख्या ठिकाणी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद जोरात आहे. ब्राह्मणेतर पक्षाचे एक वृत्तपत्र रा. शिंद्यांना ‘गुरूवर्य’ ह्या नावाने संबोधित असते व स्पृश्य व अस्पृश्य वर्गातील काही लोक त्यास कर्मवीर अण्णासाहेब शिंदे म्हणीत असतात. अशा ब्राह्मणेतर व्यक्तीस दोन * “नीच-हृदयी” चित्पावन ब्राह्मण अध्यक्षपदी विराजमान होण्याचे आमंत्रण देतात, ही गोष्ट ह्या दोघा व्यक्तींपैकी एका नीच-हृदयी ज्यात म्हटले होते असे पत्र प्रसिद्ध करणा-या संपादकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे.

सामाजिक परिषदेचे सेक्रेटरी-दादासाहेब करंदीकर नुकतेच सेक्रेटरी झालेले व पैसा आणि वर्ण ह्या पलिकडे न पाहाणारा असा माणूस ह्यामागील अंकात ज्यांनी लिहिले आहे ते.

रा. शिंदे ह्यांनी अल्पावकाशात आपले भाषण तयार केले व ते नेहमीच्या वहिवाटीप्रमाणे प्रचारातील विषयावर चार उत्तेजक विचारांनी सजविलेले असे न करिता विचारास चेतना देणारे असे केले ह्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो.

बळी तो कान पिळी

गुलामांचा व्यापार, सतीची अमानुष चाल वगैरे बंद करण्याच्या कामी जसे कायद्याचे साहाय्य मिळाले तसेच ह्याही बाबतीत मिळवू म्हटले तर तोही मनु बहुतेक पालटल्यासारखाच दिसतो. इतकेच नाही तर वायकोम येथे घडलेला प्रकार मनात आणिता, कायद्याकडून नको त्या पक्षालाच साह्य मिळू पहात आहे. अशा स्थितीत अन्यायाला नाहक बळी पडत असलेला हा अस्पृश्य वर्ग व त्याचे प्रतिपक्षी ह्यांच्यातील लढा ‘बळी तो कान पिळी’ ह्या न्यायानुसार नुसत्या परस्परांच्या बाहुबलांच्या उणे अधिकपणावरच निकालात लावण्याचा प्रसंग आम्ही येऊ देणार काय?

  1. पॅरीस शहर
  2. पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
  3. पुरस्कार
  4. पुण्यातील मानपत्रास उत्तर
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
Page 20 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी