प्रकरण १५. निधि योजना

मिशनच्या सुरुवातीस निराश्रित सेवासदन चालू करण्यासाठीं दरमहा १०० रु. ची देणगी दयाराम गिडुमल यांनीं दिली हें मागें सांगितलेंच आहे. ही देणगी ३ वर्षासाठींच होती. ह्या तीन वर्षांत मिशनची बरीच वाढ झाली. पण १९१० जून अखेर ही देणगी बंद झाली. काम वाढलें पण मदत नाहीं, अशी पंचाईत पडली. निराश्रित सेवासदन बंद पडल्यामुळें त्यांतील कार्यकर्त्यांची इतर कामाकडे वांटणी करण्यात आली. श्रीमती वेणूबाईस पुण्याच्या शाखेंत पाठविलें. भगिनी जनाबाईस प्रचार कार्यासाठीं बरोबर नेण्यांत आलें. भगिनी तान्याबाईस परळच्या शाळेंत शिक्षकीण म्हणून ठेवण्यांत आलें. सय्यद अबदुल कादर यांस बाहेरच्या शाखांची पूर्वतयारी करण्यास पाठविण्यांत आलें. पण ह्या सर्व कामास निधीची फार जरूर लागली.

पुण्यास ना. गव्हर्नर सर जार्ज क्लार्क ह्यांच्या कन्येनें जलसा करून जी शिल्लक उरली त्यांत थोडया रकमेची भर घालून ५००० रु. ची रक्कम मुंबईतील ट्रस्टीकडे पाठविण्यांत आली. पण तो कायम निधि म्हणून राखून ठेवण्यांत आल्यानें चालूं खर्चास त्याचा उपयोग करतां येईना.

ता. १८ ऑक्टोबर १९०९ रोजीं मिशनचा संस्थापनेचा दिवस साजरा करण्यासाठीं मुंबईच्या टाऊन हॉलमध्यें एक अपूर्व जाहीर सभा भरविण्यांत आली. तिचें अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीराव महाराज यांनीं मंडीत केलें. महाराजांनीं आपले अध्यक्षीय भाषण संपवून आपली १००० रु. ची देणगी दमाजीराव गायकवाड शिष्यवृत्ति या नावानें देऊं केली. मिशनचे उपाद्यक्ष सेठ दामोदरदास सुखडवाला ह्यांनीं ५००० रु. ची देणगी दिली. मिशनच्या घटनेच्या नियमाप्रमाणें त्यांना आश्रयदते करण्यांत आलें. ह्याप्रमाणें ह्या मोठया रकमा कायम निधीकडे गेल्यामुळें चालू खर्चाची हळहळ उरलीच. समारंभास महिला समाजाच्या सभासद व इतर प्रतिष्ठित स्त्रिया हजर होत्या. त्यांपैकीं कांहीं चालू संधीचा फायदा घेऊन, निधि जमविण्यास पुढें आल्या. टाऊन हॉलचे पुढचे तीन दरवाजे त्यांनीं रोखले. एकेका दरवाज्यांत दोघां दोघां भगिनींनीं आपली शाल पसरुन ह्या प्रचंड समुदायांतील बाहेर जाणा-या प्रत्येकास कांहींतरी देणगी टाकण्यास आग्रह करूं लागल्या. या बाबतींत सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांनीं पुढाकार घेतला होता. सारा जमाव जणूं काय कैद झाल्यासारखा दिसत होता. पण कोणीहि तक्रार न करतां उलट या स्त्रियांचें कौतुक करून आपखुशीनें शालींत देणग्या टाकू लागले. ह्या कैदेंत मुंबईचे पोलीस कमिशनर सांपडले होते. खिसे चांचपल्यावर आपल्या खिशांत कांही न सांपडल्यामुळें कमिशनरसाहेब गयावया करूं लागले. लक्ष्मीबाईंनीं एक शिसपेन्सिल आणि कागदाचा तुकडा त्यांच्या हातीं देऊन, “झोळींत आंकडा टाका म्हणजे सुटका होईल; एरवी नाहीं.” असें सागितलें. कमिशनरसाहेबांनीं दुसरे दिवशीं देणगीची रोकड सेक्रेटरीकडे पाठविली तेव्हां ‘ही माझी खंडणी घेऊन माझी मुक्तता करा’ अशी विनंति केली होती. देणगीचा आंकडा अशाप्रकारें बराच मोठा झाला होता. ह्या मिशनचा बोलबाला लवकरच हिंदुस्थानचे व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंज व त्यांची पत्नी लेडी हार्डिंज यांचे कानीं गेला. न मागतां लेडी हार्डिंज यांनीं मोठया उदारपणें २००० रु. रोख पाठविले.

खर्चांत येणारी तुट भरून काढण्यास वेळोवेळीं धडपड करूनहि तूट भरून येईना म्हणून डी. सी. एम. रुपी फंड नांवाची एक नवीन योजना १९११ च्या जुलै महिन्यांत आंखण्यांत आली. त्या फंडाच्या उभारणीसाठीं सुमारे दहा स्वयंसेवक आणि त्यावर एक कॅप्टन व असे दहा कॅप्टन अशी योजना करण्यांत आली. प्रत्येक स्वयंसेवकानें १ रुपया वर्गणी गोळा करून वर्षाअखेर १०० रुपये जमवावेत.

फंडाच्या बोर्डावर खालील ६ कॅप्टन्स मिळाले. (१) सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्यांच्या हाताखालीं १५ स्वयंसेवक, (२) पी. बी. गोठस्कर ह्यांचे हाताखालीं १६ स्वयंसेवक, (३) अमृतलाल व्ही. ठक्कर ११ स्वयंसेवक, (४) वि. रा. शिंदे-११ स्वयंसेवक, (५) सय्यद अबदुल कादर-१७ स्वयंसेवक, (६) एल. बी. नायक-१० स्वयंसेवक.

येणेप्रमाणें ८० स्वयंसेवकांनीं ३१ डिसेंबर १९११ रोजीं संपणा-या सहामाहीच्या आंत प्रत्येकीं १०० रु. जमविण्याचें पत्करलें. पण ऑगस्ट १२ पासून ३१ डिसेंबर १९११ च्या आंत ह्या स्वयंसेवकांनीं १४७१ रु. जमविले. आकांक्षित ४००० रु. च्या मानानें हा आंकडा फारच कमी झाला. बोर्डाची एक साधारण सभा आणि दोन सामाजिक मेळे ह्या सहामाहींत भरविण्यांत आले. स्वयंसेवकांचा परस्पर परिचय होऊन स्नेहसंबंध वाढण्याला ह्या सभांचा फार उपयोग झाला. मिशनला चालू सालीं १३१६ रु. १५ आ. १ पै तूट आलेली आहे. आणि उत्पन्नाच्या बाबी निश्चित नसल्यामुळें पुढील सालीं अधिक तूट येणार हें स्वयंसेवकांना पटवून देण्यांत आलें.

१९१२ सालच्या अखेरीस १२ महिन्यांत एकंदर १०१६ रु. जमा झाले. आकांक्षित ५००० रु. पेक्षां ही रक्कम फारच कमी होती. स्वयंसेवकाची संख्या ६० होती. विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही कीं जनरल सेक्रेटरींची पत्नी सौ. रुक्मिणीबाई शिंदे ह्यांनीं स्वयंसेविका म्हणून एकंदर ५६० रु. जमविले. त्यांच्या कॅप्टन भगिनी जनाबाईंनीं ह्या कामीं सौ. रुक्मिणीबाईंना बरीच मदत केली होती. एकच रुपाया जमविण्याच्या उद्देशांत तें देणा-या व्यक्तीचें हृदय असतें हीच भावना हा फंड जमवितांना होती. अशा दृष्टीनें पाहतां फंड जरी कमी झाला तरी सहानुभूतीचें वलय वाढलें ही गोष्ट समाधानकारक होती.

निराश्रित सेवासदन या संस्थेंतून मिशनचें परळ येथें विद्यार्थी वसतिगृह निघालें होतें. जेवून राहणा-या विद्यार्थ्यांची संख्या १९१२ मध्यें ४० होती. मुंबईसारख्या शहरामध्यें ह्या संस्थेचा फार खर्च येऊं लागला. रोखीनें निधि मिळविण्याचें काम पुरें पडेना. त्यामुळें तांदूळ फंड म्हणून एक युक्ति काढली. गृहिणीनें रोज मूठभर तांदूळ टाकण्यासाठीं घरोघरीं तांदूळ व इतर धान्याच्या पिशव्या ठेवण्यांत आल्या. दर आठवडयांत स्वयंसेवकांमार्फत विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन हें धान्य वसतिगृहामध्यें आणण्यांत येई. १९१२ सालीं ३४ फरे तांदूळ, २॥ फरे गहूं आणि ८ फरे डाळ गोळा करण्यांत आली. किंमतीच्या दृष्टीनें ही मदत फार नसली तरी प्रत्येक मूळभर तांदुळाच्या मागें एकेक स्त्रीचें मानवी हृदय होतें. ह्या दृष्टीनें पाहतां रुपी फंडापेक्षांही या फंडानें सहानुभूतीचें वलय कितीतरी वाढविलें. अश्पृश्यता निवारण्याचे कामीं लोकमत तयार करण्याचें सर्वांत मुख्य काम अशा युक्त्या प्रयुक्त्यांनीं बिनबोभाट चाललें होते.

विद्यार्थ्यांना जेवणाशिवाय नवे जुने कपडे, बिछाने, भांडीं, साबण, औषधें, पुस्तकें वगैरे अनेक घरगुती वस्तूंची जरुरी लागे. ती गरज ह्या कापड फंडानें भागविली जात असे. सीलबंद केलेल्या लहान लहान लाकडी पेटया, मुख्य मुख्य कचे-या, खासगी दवाखाने, वकिलांचीं घरें आणि इतर माणसांची जा ये पुष्कळ आहे अशा टिकाणीं ठेवण्यांत आल्या. त्या ठिकाणीं नेहमीं असणा-या मिशनच्या हितचिंतकाला ह्या पेटीची जबाबदारी देण्यांत आली. दर महिन्याच्या शेवटीं स्वयंसेवकानें जाऊन जबाबदार हितचिंतकाचे समोर ती उघडून आंतील रकमेची पावती देऊन स्वयंसेवक मिशनच्या खजिनदाराकडे हा हिशेब देई. खजिनदाराची पावती अखेरची समजली जाई. ह्या निरनिराळया फंडांची योजना मिशनच्या निरनिराळया शाखांतून सुरू करण्यांत आली. तांदूळ आणि कापड फंड जमविण्याचे कामीं रुपी फंडाप्रमाणेंच सौ. रुक्मिणीबाई शिंदे यांनीं मोठें यश मिळविलें. त्या जेथें जात तेथे कनवाळू स्त्रिया मुठीनें तांदूळ न देतां सुपानें तांदूळ भरभरून इतके देत असत कीं विद्यार्थ्यांना ते उचलून आणणें देखील जड जात असे.

विद्यार्थी वसतिगृहें आणि उद्योगशाळा हीं मिशनचीं स्वीकृत कामें फार खर्चाचीं आणि दगदीगीचीं होतीं. मुंबईंतील परळ शाळेंत बुक-बाईंडिंग व शिवण्याचें काम, मंगळूर येथें हातमागावर विणण्याचे काम, महाबळेश्वर येथें काथ्याचे दोरखंड आणि वेताच्या टोपल्या वगैरे करण्याचें काम, अशीं औद्योगिक कामें प्रथमपासून चाललीं होतींच. १९१२ सालीं मुंबईच्या परळ येथील साळेला, एक स्वतंत्र उद्योग शाळा जोडण्याची आवश्यकता भासूं लागली. औद्योगिक शिक्षणाची मुख्य कल्पना ही आहे कीं विद्यार्थ्यांच्या हाताला आणि डोळयाला व्यावहारिक वळण लागावें आणि तद्वारा विद्यार्थ्याला भावी आयुष्यामध्यें कोणता तरी हस्तकौशल्याचा धंदा करतां यावा. बहुतेक अस्पृश्य वर्ग असा कोणता ना कोणता धंदा करून आपलें पोट भरीत असतो. म्हणून अशा धंद्याची तयारी लहानपणापासूनच केली नाहीं तर तें पुढें नुसते पोकळ पंडित बनून आईबापांच्या आणि स्वतःच्या निराशेला कारणीभूत होतील.

ह्या कामीं पुरेसा निधि मिळावा म्हणून मुंबईच्या एन्. एम. वाडिया ट्रस्टीकडे अर्ज करण्यांत आला. त्या फंडाचे प्रमुख ट्रस्टी सर जमशेटजी जीजीभाई आणि बॅ. एच्. ए. वाडिया यांना मिशनची परळ येथील दुय्यम शाळा समक्ष दाखविण्यांत आली. सर्व कामें बारकाईनें पाहिल्यावर औद्योगिक शाळा चालविण्यास मिशन पात्र आहे अशी या ट्रस्टींची खात्री झाली. आणि दरसाल ६००० रु. ची देणगी याप्रमाणें तीन वर्षांपर्यंत एकूण १८,००० रु. देण्याचें त्यांनीं कबूल केलें. त्याप्रमाणें ही नवीन उद्योगशाळा निघाली. ह्या शाळेंत सुतार काम, चित्रकला व रंगकाम, शिवणकाम, पुस्तकें बांधण्याचें काम असे चार निरनिराळे वर्ग योग्य शिक्षकांच्या नजरेखालीं उघडण्यांत आले. कोणत्या ना कोणत्या वर्गांत तरी शाळेंतील सर्व मुलांनीं विशेषतः वसतिगृहांतल्या सर्व विद्यार्थ्यांनीं दिवसांतून दोन तास हें औद्योगिक शिक्षण अवश्य घ्यावें अशी योजना करण्यांत आली. पुणें शाखेंत विद्यार्थी वसतिगृहाची पूर्वतयारी १९१२ अखेर करण्यांत आल्यावर तेथेंहि असा शिक्षणाची तरतूद करण्यांत आली.