प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (७)

जे. टी. संडरलंडसाहेबाची व माझी पूर्वीपासून चांगली ओळख होती. कारण त्यांच्या शिफारशीनें ऑक्स्फर्ड येथील मँचेस्टर कॉलेजांत मला व अमेरिकेंतील मिडिव्हल थिऑलॉजिकल स्कूलमध्यें हिंदुस्थानांतील ब्राह्य विद्यार्थ्यांना पाठवून प्रचारक बनविण्याची योजना सुरू करण्यांत आली होती. संडरलंड यांनीं ह्यावेळीं आपल्याबरोबर आपल्या मुलीस आणले होते. संडरलंडसाहेबांची सोय कराचींतील एका युरोपियन हॉटेलांत करण्यांत आली होती. ते परिषदेचे नियोजित अध्यक्ष आणि मी चिटणीस म्हणून कांहीं महत्त्वाच्या कामासाठीं मी त्यांना हॉटेलांत भेटावयास गेलों असतां एक मासलेवाईक प्रकार घडला. नाताळच्या मोसमांत युरोपियन पाहुण्यांनीं हॉटेल गच्च भरलें होतें. हॉटेलच्या व्यवस्थापकांनीं संडरलंडसाहेबांस भेटण्यास मला मनाई केली. मला आंत जातां येत नसल्यास साहेब मजकुरांस मला भेटण्यास बाहेर आणले पाहिजे असा मीं आग्रह धरला. डॉ. संडरलंड बाहेर आले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनीं खेद प्रदर्शित केला. मीं त्यांना स्पष्ट बजावलें कीं, कामानिमित्त मला वेळोवेळीं भेटावें लागणार, ह्या प्रकाराची पुनरावृत्ति झाल्यास येथील पाहुणचार सोडून आम्ही व्यवस्था करूं तेथें साहेबांना अवश्य जावें लागेल. साहेब सध्यां अमेरिकेच्या स्वतंत्र वातावरणांत नाहींत. आमच्या देशांत आमच्या इतकेच परतंत्र आहेत. साहेब मजकुरांना हा व्यावहारिक प्रकार पाहून ख-या उदार धर्माच्या प्रसाराबद्दल पुन्हां एकवार विचार करावा लागला. मग पुढें मात्र ब्राह्म परिषदेचीं सर्व कामें रीतसर पार पडलीं.

सर नारायण चंदावरकर आणि इतर प्रांतांतील बडी बडी मंडळी ह्या बैठकीस हजर होती. पुढील वर्षी जागतिक परिषद हिंदुस्थानांत भरावयाची तिच्या पूर्वतयारीचा विचारविनिमय करण्यासाठीं एक खासगी सभा बोलावली. हिंदुस्थान देश म्हणजे एक छोटा खंड. एका अधिवेशनानें ह्या नवीन चळवळीचें काम भागणार नाहीं, म्हणून १९१४ सालीं कलकत्ता, मद्रास, मुंबई, लाहोर या चार मुख्य ठिकाणीं चार अधिवेशनें भरविण्याची योजना ठरली. अमेरिका, युरोप, आणि हिंदुस्थान या तीन देशांतील उदार धर्मवाद्यांनीं पैशाचा निधि जमविण्याची जबाबदारी घेतली. कलकत्त्यांत हेमचंद्र सरकार, मद्रासेंत डॉ. व्यंकटरत्नम् नायडू, मुंबईस वि. रा. शिंदे, लाहोरास प्रो. रुचीराम सहानी या चौघांना आपापल्या प्रांताच्या अधिवेशनाचे चिटणीस नेमण्यांत आलें.

कराची येथील काम आटोपल्यावर बडोद्याचे श्रीमंत सर सयाजीराव महाराज गायकवाड यांची डॉ. संडरलंडशीं समक्ष भेट करून देण्यासाठीं मीं महाराजांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला आगाऊ भेटून तयारी केली. डॉ. संडरलंड, त्यांची कन्या व मी महाराजांचे पाहुणे म्हणून बडोद्यास दोन तीन दिवस होतों. असा जागतिक परिषदेची महाराजांना हौस फार. त्यांची सहानुभूति आणि मदत मिळण्याची आम्हाला आशा होती. त्यांनी मदतीचें आश्वासन दिलें. राजवाडयांत डॉ. संडरलंडचें एक व्याख्यान त्यांनीं करविलें. विषय “इमर्सन” हा होता. व्याख्यान संपल्यावर लक्ष्मीविलास राजवाडा संपूर्णपणें फिरून दाखविण्यांत आला. वाडयाचें एकंदर काम व मांडणी पाहून डॉ. साहेबांनी संतोष व्यक्त केला आणि जगांतील उत्तमोत्तम वाडयांमध्यें ह्याचा नंबर बराच वर येतो अशा अभिप्राय दिला. हिंदुस्थानांतील प्रमुख शहरीं ह्या जागतिक परिषदेची ठरलेली योजना तेथील पुढा-यांस समक्ष समजावून सांगून डॉ. मजकूर अमेरिकेस परत गेले. लगेच मी ह्या नवीन कामास लागलों. एक जाहीर विनंतीचें लहानसें पुस्तक छापलें. आणि तें हिंदुस्थान, युरोप आणि अमेरिकेंतील परिचित गृहस्थांना पाठवून पत्र व्यवहार सुरू केला. बरींच समाधानकारक उत्तरें आलीं. युरोपांतील त्याकाळचे प्रसिध्द व अग्रगण्य जर्मन तत्वज्ञानी प्रो. रुडॉल्फ ऑयकेन यांचें परिषदेस हजर राहून भाग घेतो अशा अर्थाचें पत्र आलें. प्रो. मजकूर पुढील वर्षी जपानला जाणार होते म्हणून वाटेंत हा कार्यभाग उरकून घेण्यास त्यांना कठीण पडणार नव्हतें. पूर्वतयारीची ही धामधूम चालली असतांना विधिघटना निराळीच चालूं होती. १९१४ च्या ऑगस्ट महिन्यांत महायुध्द अकस्मात सुरू झालें. त्यांत ही परिषदच काय पण अनेक जागतिक महत्त्वाच्या गोष्टींची होळी झाली. महायुध्दानें सर्व जागाला त्राहि त्राहि करून सोडलें. मग पुढें भरणा-या परिषदेची काय कथा? गेल्या दहा वर्षांत अत्यंत श्रम करून ज्या एकेश्वरी धर्म परिषदेला आम्हीं नांवारूपाला आणलें होतें तिचासुध्दां ह्या खाईंत स्वाहा झाला.

प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (६)

मी तेथें एक आठवडयापूर्वी गेलों. प्रत्येक परिषदेपूर्वी सर्व ब्राह्म आणि प्रार्थना समाजांत सर्क्युलर काढून खर्चाची तरतूद करणें हें माझें काम असें. केव्हां पुरेसे पैसे मिळत आणि केव्हां मिळतहि नसत. माझ्या प्रवास खर्चाचीहि नेहमीं रडच असे. एकच महिन्यापूर्वी (नोव्हेंबर १९१० मध्यें) मुंबई प्रार्थना समाजाशीं प्रचारक या नात्यानें मीं संबंध सोडला होता. अर्थात् प्रवास खर्चच नव्हे तर घरखर्चाचाहि प्रश्न मजपुढें आ पसरून उभा होता. नाताळचे थंडीचे दिवस, आगगाडींतून भयंकर गर्दी, थर्ड क्लासची दगदग अशा स्थितींत मध्यरात्रीं मी अलाहाबादेस उतरलों. प्रो. बाबू रामानंद चतर्जी यांचेकडे मी उतरणार होतों. पण गाडीवाल्याला तें ठिकाण माहीत नसल्यामुळें तास दोन तास अपरात्रीं इकडे तिकडे भटकल्यावर नाइलाज म्हणून त्यानें मला शेवटीं म्युइट कॉलेजच्या विस्तीर्ण पटांगणांत माझें सामान टाकून तो निघून गेला. थंडी भयंकर पडली होती. सामानाला डोकें टेकून त्या माळयावर ती रात्र मीं कसीबशी मोठया कष्टानें काढली. प्रवासांत हे सोहाळे माझ्या नित्याचेच असत. कलकत्त्याचे बाबू हेमचंद्र सरकार ह्या परिषदेला हजर होते. ह्या परिषदेचें विशेष काम म्हणजे परिषदेच्या संघटनेला खलिता तयार करून मंजूर करुन घेणें. हा मसुदा तयार करण्यासाठीं एक पोट समिती, हेमचंद्र सरकार, नृत्यगोपाळ राय, लाहोरचे लाला रघुनाथ सहाई आणि मी स्वतः यांची नेमण्यांत आली. खलित्यांत खालील मुद्दे होते (१) नावं थिइस्टिक कॉन्फरन्स असें असावें. (२) उद्देश-एकेश्वरी धर्माचा प्रसार. (३) एकेश्वरी धर्माचे कोणीहि अनुयायी, रीतसर निवडून आलेले हे सभासद. (४) परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष, चार सभासद, एक किंवा दोन चिटणीस यांची स्टँडिंग कमिटी. या सर्वांची निवडणूक दरवर्षी परिषदेंत होणें. वर्षभर काम करून शेवटीं अहवाल सादर करणें. (५) ठरावांचा अंमल करणें वगैरे स्टँडिंग कमिटीचीं कामें. (६) परिषदेच्या ठिकाणीं स्थानिक सभासदांची स्वागत कमिटी नेमून आपले अवश्य ते अधिकारी स्टँडिंग कमिटीनें या कमिटीस तात्पुरतें देणें. या नियमांत बदल करण्याचा असल्यास परिषदेच्या उघडया जाहीर सभेंत दोनतृतीयांश सभासदांच्या अनुमतीची जरूरी. इत्यादि. लवकर एकमत होईना म्हणून अध्यक्षानें हा खलिता निरनिराळया ब्राह्म आणि प्रार्थना समाजांच्या अभिप्रायासाठीं सर्व देशभर फिरविण्यांत यावा आणि कलकत्त्यांत पुढच्या वर्षीच्या परिषदेंत हें सर्व प्रकरण सादर करावें, असा ठराव मांडल्यावर तो पास झाला.

प्रचाराचें काम चोहीकडे फार अव्यवस्थित रीतीनें चाललें होतें आणि तत्कालीन प्रचारक आपापलीं कामें सोडून बाहेरगांवीं फारसा संचार करीत नसत. म्हणून मीं एक ठराव आणला कीं, देशांतील मुख्य मुख्य ब्राह्मसमाजानें आपल्या प्रचारकाला निवडक प्रांतांतून निदान तीन महिने तरी संचारास पाठवावें. अर्थात् बंगाल्यांनीं हा ठराव हाणून पाडला. एकच काम करा म्हटलें कीं, त्यांचा मस्तकशूळ उठत असे. मीं दुसरा ठराव बहुजन समाजांत ब्राह्मधर्माचा प्रचार करावा हा आणल्याबरोबर मात्र तात्काळ एकमत झालें. कारण ठरावच तसा मोघम होता. हेमचंद्र सरकारनें ठराव आणला कीं, सन १८७२ चा तिसरा कायदा मिश्रविवाहासंबंधी होता तो सुधारावा. कलकत्त्यांतील ब्राह्मसमाज कमिटीनें या बाबतींत काय प्रयत्न केले ह्याची हकीकत त्यांनीं सांगितली. ठराव एकमतानें पास झाला. पुढील सालाकरितां वि. रा. शिदें, बाबू अविनाशचंद्र मुझुमदार, विनयेंद्रनाथ सेन व्यंकटरत्नम् नायडू, गुरुदास चक्रवर्ती आणि नृत्य गोपाळ राय ह्यांची स्टँडिंग कमिटी नेमण्यांत आली. हेमचंद्र सरकार ह्यांना मुख्य चिटणीस नेमण्यांत आलें.

१९११ च्या नाताळांत कलकत्यास सिटी कॉलेजमध्यें ही परिषद भरली. मगंळूर ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष उल्लाल रघुनाथय्या यांना अध्यक्ष नेमण्यांत आलें. जर्मनींतील गॉटिंजन युनिव्हर्सिटीचे प्रख्यात प्रोफेसर डॉ. रुडॉल्फ ऑटो हे परिषदेसाठीं मुद्दाम आले होते. पहिली उपासना सत्येन्द्रनाथ टागोर यांनीं संस्कृतमध्यें चालविली. स्वागतमंडळाचे अध्यक्ष प्रिन्सिपाल हेरंबचंद्र मित्र यांनीं भाषण करून स्वागत केलें. निरनिराळया ठिकाणच्या अनेक प्रसिध्द सभासदांनीं महत्वाचीं भाषणें करून निबंध वाचले. बारा महत्वाचे ठराव पास झाले. तिसरा ठराव परिषदेच्या संघटनेबद्दल होता. मागल्या परिषदेंतील मसुदा आणि समाजांच्या अभिप्रायाचा अहवाल वाचल्यावर अविनाशचंद्र मुझुमदारांनीं तो ठराव पुढें मांडला. परिषदेच्या अध्यक्षांच्या नेमणुकीबद्दल एक जादा नियम घातला होता तो हा कीं, स्टँडिंग कमिटीनें स्वागत कमिटीचा अभिप्राय घेऊन अध्यक्ष निवडावा व तो परिषदेच्या बैठकींत मंजूर व्हावा. हा ठराव पास झाला. कलकत्ता ही देशाची राजधानी आणि ब्राह्मसमाजाचें मुख्य केंद्र असल्यानें हा सर्व समारंभ त्या मानानें थाटाचा झाला. नंतर एक सुंदर स्नेहसंमेलन मेरी कार्पेंटर हॉलमध्यें झालें. त्यांत जर्मन प्रोफेसर रुडॉल्फ ऑटो यांचें सहानुभूतिपर भाषण झालें.

१९१२ सालीं ही परिषद बांकीपूरला भरली. अध्यक्षस्थान सर नारायण चंदावरकर यांस देण्यांत आलें होतें. या ठिकाणीं कलकत्त्यांतील दोन्हीं शाखेचे (साधारण व नवविधान) ब्राह्मसमाज असल्यानें आणि बाबू हेमचंद्र सरकार हे मुख्य चिटणीस असल्यानें पूर्वतयारीचा त्रास पडला नाहीं. माझ्याबरोबर डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे एक आस्थेवाईक कार्यकर्तें अमृतलाल ठक्कर हे बांकीपुरास आले होते. मिशनची एक जाहीर सभा झाली. राष्ट्रीय सभेचें अध्यक्ष नामदार आर. एन. मुधोळकर ह्यांनीं सभेचें अध्यक्ष स्थान स्वीकारलें होतें, अमृतलाल ठक्करनीं माहितीचे आंकडे वगैरेंची जय्यत तयारी ही सभा यशस्वी रीतीनें पार पाडली. पुढील अधिवेशन कराची येथें ठरलें. तेथें नवविधान पक्षाचा फार जोर असल्यानें परिषदेचे जनरल सेक्रेटरी मलाच नेमण्यांत आलें. १९१३ सालीं नाताळांत ही परिषद कराचीस नव्यानेंच भरविण्यांत आली. हैद्राबाद समाजाचे अध्यक्ष दिवाण कौरामल वगैरे पुढा-यांनीं कराचीच्या सभासदांच्या मदतीनें कराचीच्या टाऊन हॉलमध्यें परिषदेच्या जाहीर बैठकीची सोय केली होती. अमेरिकेचे जे. टी. संडरलंड हे या परिषदेसाठीं मुद्दाम आले होते. त्यांनाच अध्यक्ष नेमण्यांत आले. युनिटेरियन लोकांच्या नेतृत्वाखालीं एक उदार धर्ममतवादी लोकांची जागतिक परिषद आजपर्यंत युरोप आणि अमेरिकेंतील निरनिराळया ठिकाणीं करविण्यांत येत असे. १९०३ सालीं ऍम्स्टरडॅम येथें भरलेल्या परिषदेंत हिंदुस्थानचा प्रतिनिधि म्हणून हजर राहून मीं भाग घेतला होता. १९०५  सालीं जिनीव्हा येथें भरलेल्या परिषदेंत डॉ. सुखटणकर हे हजर होते. १९११ सालीं कलकत्ता येथें भरलेल्या परिषदेंत ह्या आंतरराष्ट्रीय जागतिक परिषदेचें अधिवेशन लवकरच हिंदुस्थानांत भरावें असा ठराव पास करण्यांत आला होता. म्हणून अमेरिकेंतील युनिटेरियन असोसिएशननें डॉ. संडरलंड यांस जागतिक परिषद हिंदुस्थानांत भरविण्याची पूर्व तयारी करण्यास मुद्दाम पाठविलें होतें. डॉ. संडरलंड हे १८९५ सालीं काँग्रेस पुण्यांत भरली असतां तिला हजर होते आणि पुण्यांत भरलेल्या एकेश्वरी परिषदेंत त्यांनीं भागहि घेतला होता. शिकागो येथें १८९२ सालच्या सुमारास पार्लमेंट ऑफ रिलीजन ह्या पहिल्या परिषदेंत हिंदुस्थानच्या ब्राह्मसमाजाच्या वतीनें बाबू प्रतापचंद्र मुझुमदार, बळवंतराव नगरकर आणि हिंदुधर्माच्या वतीनें स्वामी विवेकानंद ह्यांनीं प्रामुख्यानें भाग घेतला होता. म्हणून हिंदुस्थानाला ही जागतिक परिषद अगदीं अपरिचित होती असें नव्हे.

प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (५)

यावेळी मी माझे मित्र प्रसिध्द बिपिनचंद्र पाल यांचे घरीं उतरलों होतों. हे मँचेस्टर कॉलेजमधून ब्राह्मोप्रचारक होऊन आले होते. पण स्वदेशीं येतांच ते राजकारणाकडे वळले. तरी देखील ब्राह्मसमाजाच्या कार्यांत अत्यंत सहानुभूतीनें भाग घेत होते. ह्यावेळीं कलकत्त्यास समाजांत एका महत्वाच्या प्रश्नावर मोठा वाद माजला होता. तो विषय म्हणजे ब्राह्मसमाजांतील तरुणांनीं रंगभूमीवर नाटकांतील कामें करावींत किंवा नाहीं हा होय. ब्राह्मसमाजांतील तिन्ही पक्षांतील सर्व वृध्द मंडळी विशेषतः कृष्णकुमार मित्र आणि हेरंबचंद्र मैत्र यांचा या कामीं फार विरोध होता. पण प्रसिध्द कलाप्रिय रवीन्द्रनाथ टागोर हें या कामीं फार अनुकूल होते. बहुतेक सारा तरुण वर्ग त्यांच्याच मताचा होता. डॉ. रवींद्रनाथ टागोर यांना साधारण ब्राह्मसमाजाचे सन्मान्य सभासद करावे असा आग्रह तरुणांनीं घेतला. वृध्दांना याची फार चीड आली. बिपिनचंद्र पाल हे टागोर यांच्या मताचेच होते. त्यांच्याकडूनच मला ह्या रणसंग्रामाची बरीच हकीकत कळली. पुढें बरींच वर्षें हा तंटा विकोपाला गेला तरी रवीन्द्र बाबूंचाच अखेर जय झाला. १९११ सालीं ब्राह्मसमाजाच्या माघोत्सवांत रविवारच्या नीति शाळेचा जो बक्षिस समारंभ झाला, त्यावेळीं तरुण मुलांमुलींनीं एक सुंदर नाटयप्रयोग केला. पण तो पाहण्यास वृध्दांचीच अधिक गर्दी जमली होती. पुढें पुढें तर रवीन्द्रनाथ टागोर हे माघोत्सवाच्या वेळीं आपल्या घरीं आपल्या लेकी सुना नातवंडें यांना घेऊन आपण केलेल्या नाटकाचे प्रयोग जाहीरपणें करून दाखवीत आणि १९२३ च्या सुमारास मी कलकत्यास गेलों असतां डॉ. रवीन्द्रनाथ टागोर यांना साधारण ब्राह्मसमाजानें आपल्या वेदीवरून उपासना करण्यास बोलाविलें. तरुण वर्गांचा हा मोठा विजय; पण वृध्द हेरंबचंद्र बाबूंना हा शेवटपर्यंत कधींच खपला नाहीं. त्यांचीच एक चमत्कारिक गोष्ट सांगतात कीं, बाबू महाशय एकदा रस्त्यानें जात असतां त्यांच्याकडे एक तरुण विद्यार्थी येऊन त्यानें अमूक एक नाटकगृह कोठें आहे म्हणून विचारलें. बाबूजींना अत्यंत संताप येऊन, “मला ठाऊक नाहीं जा”असें त्यांनीं रागारागानें सांगून त्याला झिडकारलें, विद्यार्थी गेला, पण बाबूजींना आपण खोटें बोललों याचा पश्चाताप होऊन त्यांनीं त्या विद्यार्थ्यांस परत बोलाविलें, “अरे मला ठाऊक आहे, पण मी सांगत नाहीं जा” असें म्हणून पुन्हा झिडकारलें.

१९०७ च्या नाताळांत सुरतेस या परिषदेची बैठक झाली. रवीन्द्रनाथ टागोरांचे वडील बंधू व हिंदुस्थानांतील पहिले आय् .सी. एस्. सत्येंद्रनाथ टागोर हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते. अहमदाबाद समाजाचे अध्यक्ष लालशंकर उमियाशंकर हे स्वागत मंडळाचे अध्यक्ष या नात्यानें त्यांनीं प्रतिनिधींचें स्वागत केलें. सुरतेस समाज नसतांहि ही बैठक समाधानकारक रीतीनें तेथील टाऊन हॉलमध्यें पार पडली. पहिली उपासना मुंबई समाजाचे स्वामी स्वात्मानंदजी यांनीं हिंदींत चालविली. जाहीर सभेंत डॉ. भांडारकर, गुजराथचे प्रसिध्द कवि नानालाल, लाहोरचे प्रो. रुचीराम सहानी यांचीं भाषणें झालीं. ठरावाचे वेळीं ह्या परिषदेचे मार्फत लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालीं दुष्काळ निवारणाचे कामीं घटना व्हावी असा एक विशिष्ट ठराव पास करण्यांत आला.

राष्ट्रीय सभेचा मात्र या वेळेस फारच गोंधळ उडाला. ही सभा आजपर्यंत मवाळांच्या हातांत होती. लोकमान्य टिळकांनीं ह्या वर्षी ती उधळून लावून पुढें कित्येक वर्षें तिला आपल्या मुठींत ठेवलें होतें. गेल्या वर्षी मुंबईंत स्थापन झालेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनची एक जाहीर सभा याच वेळीं झाली.

१९०८ च्या नाताळांत मद्रास शहरीं ही परिषद भरली. मी मद्रासला निघालों त्या वेळीं माझी प्रकृति किंचित् नादुरुस्त होती म्हणून बंगलोरपर्यंत मीं सेकंड क्लासांतून प्रवास केला. वेळ नाताळची असल्यामुळें व्यापारी वगैरे मंडळींची डब्यांत बरीच गर्दी होती. गुंडकल स्टेशनवर तार करण्यासाठीं मी खालीं उतरून परत डब्यांत येऊन पाहतों तों तीन नवे आडदांड युरोपियन गृहस्थ बसले असून बाकीची सारी हिंदी मंडळी उतरून दुसरीकडे गेली होती. माझें सामान एकीकडे ठेवण्यांत आलें होतें. मी माझ्या जागेवर जाऊन बसलों व तेथून कांहीं हाललों नाहीं. उतरून गेलेल्या मंडळींत एक मोंगलाईंतला मुसलमान आडमुठया अधिकारी होता. मी बसलेला पाहून थोडेसें धैर्य आल्यामुळें उतरून गेलेले व्यापारी परत येऊन बसले. युरोपियनांनीं मला कोणताहि त्रास दिला नाहीं. दारू पिणें, चिरूट ओढणें आणि पत्ते खेळणें ह्यांतच ते गुंग झाले होते. पण पुन्हां आलेले कानडीअप्पांनीं त्यांच्या खेळण्यांत मुद्दामच लक्ष घालून फाजील आगंतुकपणा दाखविल्यानें त्या युरोपियनांना तो असह्य होऊन त्यांना फार चीड आली.  त्यांचें इंग्रजी व ह्यांचें कानडी परस्परांस न कळल्यानें प्रकरण अधिक विकोपाला जाऊं नये म्हणून मला मध्यस्थी करणें भाग पडलें. प्रसंगविशेषीं आम्हां हिंदी एतद्देशियांना आपला आब राखून घेतां येत नाहीं म्हणून असले खटके उडतात.

लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार हे या परिषदेचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष मंगळूर समाजाचे अध्यक्ष उल्लाल रघुनाथय्या यांनीं सुंदर भाषण केलें. ही जाहीर बैठक  Anderson Memorial Hall मध्यें झाली. सौ. सरोजिनी नायडू, अहमदाबादचे रमणभाई नीलकंठ, लाहोरचे धर्मदास सूटी यांचीं व माझीं जाहीर भाषणें झालीं. ब्रिटिश ऍंड फॉरेन असोसिएशनचे प्रतिनिधि प्रो. टी. डेव्हिस हे कोलंबोहून मुद्दाम आले होते. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची जाहीर सभा ३० डिसेंबर रोजीं करविण्यांत आली. त्या वेळीं रा.ब.एम्. आदिनारायणय्या यांनीं अध्यक्षस्थान स्वीकारलें. परिषदेंतील मुख्य प्रवचन करण्याचें काम मजकडे होतें. या परिषदेच्या खर्चाप्रीत्यर्थ ब्राह्मसमाजाचे प्रसिध्द हितचिंतक पिठापुरचे महाराज यांनीं ५०० रु. दिल्यामुळें परिषदेच्या यशांत भर पडली. याच वेळी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची मद्रास शाखा उघडण्यांत आली. तिच्यासाठीं मला ५।६ दिवस मद्रासेंत राहावें लागलें. त्यानंतर कोइमतूर, कालिकत, फ्रेंचांचा गांव माही, कानानारे या गांवीं भेट देऊन शेवटीं मंगलोर येथें दोनतीन दिवस थांबून मी मुंबईस परतलों.
१९०९ सालीं लाहोर येथें ही परिषद झाली. या परिषदेचे दुय्यम चिटणीस अविनाशचंद्र मुझुमदार यांनीं परिश्रम घेऊन स्वागताची जंगी तयारी ठेवली होती. कलकत्त्याचे विनयेंद्रनाथ सेन ह्यांचें अध्यक्षीय भाषण फारच परिणामकारक झालें. पंजाब येथील दोन्ही पक्षाच्या ब्राह्मसमाजिस्टांनीं मिळूनमिसळून काम केलें. या परिषदेतील एक विशेष म्हणजे बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं आपल्या संस्थानचे विद्वान माणसांना प्रतिनिधी म्हणून लाहोरास पाठविलें होतें. परिषदेचें काम पाहून त्यांना आनंद झाला, आणि उदार धर्माच्या कार्याचें महत्व त्यांना कळलें. मुंबईचे गिरिजाशंकर त्रिवेदी हे लाहोरास जातांना व परत येतांना माझ्याच बरोबर प्रवास करीत होते. जातांना वाटेंत अहमदाबाद, पालनपूर, जयपूर, आग्रा, मथुरा, वृंदावन आणि दिल्ली हीं शहरें आम्हीं उतरून बारकाईनें पाहिलीं. परिषद आटोपल्यावर अमृतसर येथें जाऊन शीखांचें सुवर्णमंदिर पाहिलें. ह्या वेळीं कांहीं कारणांवरून पंजाबांतील आर्यसमाजावर पतियाळाच्या संस्थानाधिपतींचा फार रोष झाला होता. लाला मुनशीराम, स्वामी श्रध्दानंद यांचेवर या रोषाचा घाला पडला होता. पतियाळाच्या आर्यसमाज मंदिराचें रुपांतर संस्थानच्या घोडशाळेंत करण्यांत आलें होतें. लालाजींना आम्ही भेटण्यास गेलों तेव्हां ते खिन्न मुद्रेनें पण उदात्त वृत्तीनें या शाळेंत बसलेले दिसले. सौ. हेमंतकुमारी चौधरी या ब्राह्मभगिनीकडे आम्ही एक दिवस उतरलों. उपासना वगैरे आटोपून आम्ही निघालों. परत येतांना अजमीर जवळील अबूच्या पहाडांत आम्हीं दोन दिवस धर्मचिंतनांत घालविले. तेथील सुप्रसिध्द जैन मंदिर, दिलवारा आणि प्रेक्षणीय स्थळें पाहिलीं. या मंदिराचें सर्व काम संगमरवरी दगडाचें असून तेथें कलाकुसरीची इतकी कमाल झाली आहे कीं, तशी सुबकता व साजुकता जगांत इतरत्र क्वचितच आढळेल. मोंगलांच्या तडाक्यांतून हें रत्न कसें वांचलें याचें आम्हांला मोठें आश्चर्य वाटलें. हें स्थळ इतकें अपूर्व असून त्या मानानें त्याची प्रसिध्दि कां नाहीं याचें अधिक आश्चर्य वाटलें. कदाचित् त्याच्या अप्रसिध्दपणामुळेंच हें सुरक्षित राहिलें असेल अशी भोळी समजूत आम्हीं करून घेतली.

ह्या प्रवासास निघण्यापूर्वी माझी वृध्द मातोश्री कॅन्सर (व्रण) च्या व्यथेनें अत्यवस्थ होती. तिला सोडून मला प्रवासास निघवेना आणि गेल्याशिवाय राहवेना असा पेंच घडला. पण मातोश्रींनीं मला धीर दिला. जावयास अनुज्ञा दिली आणि ‘तू परत येईपर्यंत मी तुला सोडून जात नाहीं’असें आश्वासनहि दिलें. हा जुन्या माणसांचा कारारीपणा! पण मी परत आल्यावर ता. ८ फ्रेबुवारी १९१० रोजीं माझ्या प्रेमळ मातोश्री सुमारें ७० वर्षांच्या होऊन निवर्तल्या.

१९१० सालीं ही परिषद अलाहाबाद येथें भरली. तेथें पूर्वी एक ब्राह्मसमाज होता; पण अलिकडे तो बंद पडला होता. लाहोरचे अविनाशचंद्र मुझुमदार या प्रांतांतील माहितगार होते म्हणून त्यांना माझ्या जोडीला चिटणीस म्हणून नेमण्यांत आलें होतें. परिषदेच्या पूर्वी तीन आठवडे जाऊन त्यांनीं पूर्वतयारी चालविली. जागा मिळण्यास कठिण जाऊं लागलें. कर्नल गंज, बंगाली स्कूलच्या अधिका-याला त्यांच्या शाळेला २०० रुपयांची मदत देऊन परिषदेसाठीं तेथें जागा मिळविली. अध्यक्ष कोणास नेमावें हाहि प्रश्न बिकट झाला. शेवटीं पं. शिवनाथशास्त्री यांनीं कबूल केल्यावर हा प्रश्न सुटला.

प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (४)

हा गांव लहान व येथील समाजहि अगदींच लहान होता. तरी समाजांतील मंडळींची जूट व एकमेकांविषयीं कळकळ पाहून संतोष झाला. विशेष करून स्त्रियांमध्यें उपासनेविषयीं अत्यंत आतुरता दिसली. त्याच रात्रीं मी घरीं परत येऊन पोषाख बदलून प्रार्थनेला गेलों तों स्त्रिया आधींच पडद्याआड बसल्या होत्या. बहुतेक सर्व उपासना त्यांच्यासाठीं हिंदी भाषेंत करणें भाग पडलें. दुसरे दिवशी सायंकाळीं समाजांत Some Ideals for Modern India यावर माझें इंग्रजींत व्याख्यान झालें. ता. १७ रोजीं सकाळीं तरुणांसाठीं शाळेंत व्याख्यान झालें. ता. १७ रोजीं तेथून निघून नदीवरून आगबोटीनें जगन्नाथगंज येथें गेलों. ता. १८ रोजीं मैमनसिंग येथें पोहोंचलों.

येथें दोन्ही पक्षाचे दोन समाज आहेत. बाबू ईशानचंद्र विश्वास हे गृहस्थ कलकत्त्याहून येथें येऊन त्यांनी १८५५ चे सुमारास ब्राह्मसमाजाची स्थापना केली. नंतर डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वडील भगवानचंद्र येथें आल्यापासून ह्या समाजाची भरभराट झाली. तथापि गांवांत ह्यांना फार हाल काढावे लागले. संबंध गांव येथील जमिनदाराचे ताब्यांत असल्यामुळें आणि तो विरुध्द असल्यानें मंदिराकरतां जागाच मिळेना. प्रथम मंदिर १८६७ त बांधलें; पण तें १८८६ च्या भूकंपांत पडलें. म्हणून पुन्हां बांधण्यांत आलें. ह्यापूर्वीच कुचबिहारच्या लग्नामुळें झालेल्या दुफळीमुळें ह्या समाज मंदिराचे मालकीसंबंधीं तंटा होऊन विघ्नें उपस्थित झालीं. १८९७ सालच्या भूकंपांत हें नवीन मंदिरहि पडलें. ह्याच भूकंपांत पूर्वी ज्या जमिनदारानें विरोध केला त्यांचाहि वाडा जमिनदोस्त झाला. हल्लीं (१९०५) जें मंदिर बांधलें आहे त्याचे उंच व नकशीचे भारी दरवाजे, तुळया व इतर संगमरवरी दगडाचें सामान ज्याच्याकडून पूर्वी जागाहि मिळाली नाहीं त्याच जमिनदाराकडून मिळालें आहे. समाजाला त्याची बरीच सहानुभूति आहे. नवविधान समाजांत एकंदर बायकामुलें मिळून २६ व साधारण समाजांत ७८ मंडळी आहेत. साधारण समाजाचे आचार्य श्रीनाथ चंदा यांनीं गांवाबाहेर बरीच जागा घेऊन तेथें ब्राह्म लोकांचें एक स्वतंत्र खेडें वसविलें आहे नि त्याचा कार्यक्रम आटोपून मी मैमनसिंगहून डाक्काच्या वाटेवर कौरेड म्हणून एका लहानशा खेडेगांवीं गेलों. हें खेडें नामदार के. जी. गुप्त यांच्या मालकीचें आहे. शेतांत साहेब मजकुरांचें घर नदीचे कांठीं आहे. बाबू कालीनाथ गुप्त हे त्या कमिशनरांचे वडील असून भाविकपणाबद्दल सर्व ब्राह्मसमाजांत प्रसिध्द आहेत. हें एकांत स्थल त्यांच्या आवडीचें आहे. कोणी अतिथी आल्यास नेमलेलीं नोकर माणसें त्याची सोय मोठया आदरानें करीत असतात. पण येथें समाज नाहीं. येथें एक दिवस एकांत व आत्मसमाधानांत भोगून ता. २१ रोजीं पूर्वबंगालची राजधानी डाक्का येथें गेलों.

येथील समाज कलकत्ता समाजाच्या खालोखाल महत्वाचा आहे. या सफरीच्या प्रवासाचा ताण मजवर इतका पडला कीं, त्यामुळें माझी तब्येत किंचित् ढासळली होती. मद्रासच्या सफरींत अन्नांतील तिखटामुळें जसा परिणाम झाला तसाच उलट बाजूनें बंगालचे भोजनांत गोड फार असल्यामुळें व त्यांतील मोहरीच्या तेलाचा मला अत्यंत वीट आल्यामुळें प्रकृतीवर फार परिणाम झाला होता. डाक्का समाजांत माघोत्सवाचा समारंभ चालू होता. मँचेस्टर कॉलेजमधून उच्च धर्मशिक्षण घेऊन परत आलेला मी म्हणून माझ्या व्याख्यानाला अलोट गर्दी जमली होती. मी इंग्रजींत बोलावयास उठलों. १०|१५ मिनिटें बोललों नाहीं तोंच भोंवळ येऊन मी खुर्चीत गळून पडलों. सभेचा मोठा विरस झाला. मला उचलून घरीं पोंचविण्यांत आलें. एक दोन दिवस विश्रांति घेतल्यावर ब्रह्मपुत्रा नदीवरील बोटीनें प्रवास करून बंगालच्या उपसागरावरील बारीसाल या जिल्ह्याच्या गांवीं आलों. या जलप्रवासानें प्रकृतीवर चांगला परिणाम झाला. बारीसालमधील माझें व्याख्यान फार परिणामकारक झालें. पण व्याख्यान आटोपून मी खालीं उतरतों तोंच माझ्या हातांत प्रकरण चौथ्यांत सांगितल्याप्रमाणें एक तांतडीची तार देण्यांत आलीं. मुंबई येथें माझी पत्नी आजारी असल्यानें व अहमनगर येथे माझी बहीण चंद्राक्का आसन्नमरण झाल्यानें मला मुंबईस परतावें लागलें.

१९०६ सालच्या नाताळांत या परिषदेची कलकत्ता येथें मोठया थाटानें बैठक झाली. सर नारायण चंदावरकर यांनीं के. नटराजन्, बंडोपंत भाजेकर आणि मला कलकत्त्यास आपल्याबरोबर नेले. कोकोनाडयाचे डॉ. व्यंकटरत्नम् नायडू यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलें होतें. ब्रिटिश ऍंड फॉरेन असोसिएशनचे एक प्रतिनिधि मि. जी. ब्राऊन हेहि हजर होते. सुरुवातीच्या उपासना सिटी कॉलेजचे वृध्द प्रिन्सिपाल बाबू उमेशचंद्र यांनीं चालविली. केशवचंद्र सेनेचे शिष्य प्रसिध्द गायक त्रैलोक्यनाथ संन्याल यांचें भजन झालें. या अधिवेशनाच्या सर्व सभा ब्राह्मसमाजाच्या सिटी कॉलेजच्या हॉलमध्यें यशस्वी रीतीनें पार पडल्या.

प्रकरण ८. भारतीय एकेश्वरी धर्मपरिषद (३)

काठीहार हें रेल्वेचें एक मोठें जंक्शन आहे. बरीच चौकशी केल्यावर अर्धवट बांधलेल्या ब्राह्म मंदिराचा पत्ता लागला. पण तेथें समाज नाहीं. दारें व खिडक्या नसून, नुसत्या भिंतीच पाहून हें मुक्तद्वार गौडबंगाल काय आहे याचा तपास करण्यासाठीं तेथेंच राहिलों. शेजारच्या एका मुसलमान गृहस्थानें सांगितलें कीं, या अर्धवट इमारतीचा क्वचित प्रसंगीं अत्यंत खेदजनक दुरुपयोग होतो. १८८७ सालीं रेल्वेंतील ब्राह्म नोकरांनीं विशेषतः जानकीनाथ गांगुली व रखलदर्श चतर्जी यांच्या प्रयत्नानें येथें समाज स्थापन झाला. त्यावेळीं दहा सभासद होते. १८९९ सालीं ही अर्धवट इमारत उभी राहिली. पण इतक्यांत तेथील रेल्वे ऑफिस एकदम कलकत्त्यास गेल्यामुळें येथें एकहि ब्राह्मो उरला नाहीं.

येथून १८ मैलांवर पूर्णिया हें जिल्ह्याचें गांव आहे. येथें बाबू हजारीलाल हे आस्थेवाईक गृहस्थ होते त्यांचेकडे गेलों. तेथें मला तारकनाथ रॉय नांवाचे गृहस्थ भेटले. ह्या दोघांना काठीहारचें वर्तमान कळविलें. तेथील पूर्वीच्या फंडापैकीं २०० रु. अद्यापि शिल्लक आहेत असें कळलें. काठीहार येथें मंदिर आहे. पण समाज नाहीं. आणि पूर्णिया येथें समाज आहे पण मंदिर नाहीं. पूर्णिया येथील आस्थेवाईक सभासदांस घेऊन काठीहार येथें पुन्हां गेलों. सायंकाळीं माझें हायस्कुलांत व्याख्यान झालें. तेथील मुख्य अधिकारी मुन्सफ एक उदार मताचे बॅरिस्टर मुसलमान होते. त्यांनी आपल्या सहीच्या आमंत्रण चिठ्ठया लोकांना पाठविल्या व अध्यक्षस्थान पत्करलें. व्याख्यानानंतर बाबू हजारीलाल यांनीं येथील कांहीं मंडळींच्या सल्ल्यानें बाकी उरलेल्या शिलकेंतून मंदिर पुरें करून देण्याचें ठरविलें.

ह्या प्रकारें बिहार प्रांतांतील काम झाल्यावर मी श्रीगंगेचा निरोप घेऊन तिचा पिता जो पर्वतराज हिमाचल त्याचे चरणांगुलीवर विराजमान झालेली वनश्रीची जणूं माहेरकडची सखी जी कुचबिहार नगरी तिच्या आंत सायंकाळच्या शांत समयीं अत्यादरपूर्वक प्रवेश केला.
कुचबिहार संस्थानची हद्द भूतान संस्थानचे हद्दीस लागूनच आहे. येथील मूळचे रहिवासी- जे अर्धवट जंगली लोक (कोल-कोळी) शेतकी करून आहेत-त्यांची सांपत्तिक हद्दहि कंगालपणाच्या सीमेला लागून आहे. ह्यांच्या चेह-यांत आर्यांपेक्षां मोंगली साम्य अधिक दिसतें. कुचबिहारचें राजघराणें ह्याच जंगली जातींचे आहे. राजा, प्रजा व मानकरी मंडळ हें सर्व एक जात असून यांचे दरम्यान अधिकारी वर्ग मात्र कारकुनापासून ते थेट दिवाणापर्यंत बंगाली बाबूंचा आहे. आणि मनुष्यस्वभाव अनुसरून यांचे एतद्देशीयांशीं अरेरावीचें वर्तन पाहून किंचित् कौतुकच वाटतें. उत्पन्नाचे मानानें हें संस्थान जवळ जवळ कोल्हापुराइतकें आहे. पण बंगाल्यांत हें पहिल्या प्रतीचें गणलें जाऊन शिवाय ब्रिटिश सरकारच्या मर्जीतलें असावें असें दिसतें. येथें एक एम् .ए. पर्यंतचें पूर्ण दर्जाचें कॉलेज आहे. त्यांत सुमारें ३०० विद्यार्थी असून फी पूर्णपणें माफ आहे. शिवाय एतद्देशीय विद्यार्थ्यांसाठीं मोफत वसतिगृह आहे. सुधारणेचीं हीं थोडीं चिन्हें सोडून दिल्यास कुचबिहार नगरावर व तेथील अस्सल प्रजेवर अद्यापि हिमालयाचेंच पुरातन वन्य साम्राज्य चालूं आहे. राजमहाल व चार बडया लोकांचीं घरें, आणि कांहीं सराकरी इमारती सोडून दिल्यास बाकी सर्व लहान-मोठयांचीं घरें म्हणजे अक्षरशः झोंपडयाच.

गांवाकडे नजर फेंकल्यास असें वाटतें कीं, केळीं व पोफळीं यांच्या सुंदर बनांत एकांत जागा पाहून आधुनिक सुधारणेच्या प्लेगला कंटाळून जणूं एक सेग्रीगेशन कँपच बांधलें आहे. रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीं ह्या बांबूच्या झोपडया, दरम्यान बरीच मोकळी जागा सोडून दाटीनें बांधलेल्या दिसतात. प्रथम जमिनीवर सुमारें तीन फूट उंचीच्या खांबावर ओटा बांधून तिची तक्तपोशी वेळूची, भिंती वेळूच्या, वरचें छत व छप्पर वेळूचें, आंतील सामान वेळूचें आणि बाहेरील कंपौंडहि वेळूचें. यांचीं कारणें पुष्कळ आहेत. एक तर लोक गरीब आणि अल्पसंतुष्ट. दुसरें देश दलदलीचा, सर्द व अतिपावसाळा. तिसरें घरें बांधण्यास चिखल व दगड दोन्ही मिळत नाहीं. जमीन राखेच्या रंगाच्या मऊ व बारीक रेतीची. तिच्या विटाहि बनत नाहींत. बरें, इतक्यालाहि न जुमानता आढयतेनें जर एखादें घर उभारलें तर हिमालयबुवा वरचेवर भूकंपाचे धक्के देऊन जागें करण्यास तयार आहेतच. राजाचा सुमारें १३ लाखांचा सुंदर व भव्य प्रासाद व भोंवतालचा विस्तीर्ण बाग पाहून प्रेक्षक बाहेर राजरस्त्यांत येतो तों दुतर्फा सेग्रीगेशन कँप पाहून त्याचा बराच हिरमोड होतो.
ब्राह्मधर्माचा दिग्विजय करण्याकरतां जी प्रचारकसेनेची अभेद्य फळी उभारली होती तिची दुफळी केली ती याच कोप-यांतल्या कुचबिहारनें. बुध्दधर्माला जसा अशोक, ख्रिस्ती धर्माला जसा कान्स्टंटाइन, तसा ब्राह्म धर्माला एकादा राजबिंडा पुरस्कर्ता कुचबिहारपुरतां तरी मिळाला आहे काय? आतांपर्यंत तरी नाहीं आणि पुढें आशा नाहीं.

कुचबिहारांत साधारण ब्राह्मसमाजपक्षाचे आणि नवविधानपक्षाचे असे दोन समाज व त्यांचीं मंदिरें आहेत. साधारण पक्षाचे अध्यक्ष स्वतः दिवाण रायबहादूर कालिकादास दत्त हे आहेत. त्यांचे विचार पूर्णपणें उदार असूनहि त्यांची व्यवहारकुशलता त्याहूनहि परिपूर्ण असल्यामुळें ते अध्यक्ष होण्यापुरते केवळ हितचिंतकच आहेत. हा साधारण ब्राह्मसमाज विजयकृष्ण गोस्वामी यांनीं १८८४ सालीं स्थापन केला. १८९७ सालच्या भूकंपांत पूर्वीचें मंदिर पडल्यामुळें त्याच्याच पायावर हल्लींचें (१९०५) मंदिर नुकतेंच बांधले आहे.
१८७८ सालीं केशवचंद्र सेन यांच्या ज्येष्ठ कन्येचा विवाह कुचबिहारचा राजा सर नृपेंद्र नारायण भूपबहादूर यांच्याशीं झाला. राजेसाहेब आणि राणीसाहेबांना आपल्या नवविधान पक्षाचा निराळा समाज पाहिजे म्हणून १५ ऑगस्ट १८८६ रोजीं येथील नवविधान समाज स्थापण्यांत आला. त्यापूर्वी म्हणजे १८८४ सालींच केशवचंद्र सेन वारले होते. विवाहाचे वेळीं केशवचंद्रांचे कन्येचें वय १४ वर्षांहून कमी होतें म्हणून ब्राह्मसमाजांत दुफळी झाली हें सर्व विश्रुतच आहे. हल्लीं या समाजाचे प्रमुख स्वतः राजेसाहेब आहेत. पण खरी सर्व व्यवस्था राणीसाहेबांचे हातूनच होत असते. राजाचें कुटुंब धरून समाजांत एकंदर ११ अनुष्ठानिक कुटुंबें आहेत. त्यांत एकंदर ७० मुलें माणसें आहेत. शिवाय ४० हितचिंतक आहेत. समाजाच्या खर्चाकरतां सालीना ५००० रु. ची नेमणूक आहे. एक कायमचा मिशनरी व गायक यांचा खर्च त्यांतूनच होत असतो.

समाजाचें अर्थातच एक सुंदरसें मंदिर आहे. इतकें सुंदर ब्राह्म मंदिर निदान माझ्या तरी पाहण्यांत कुठें आलें नाहीं. डाक्का, कलकत्ता वगैरे ठिकाणीं यापेक्षां मोठमोठीं मंदिरें आहेत; पण तीं केवळ व्याख्यान मंदिरें. आत्म्याला जागृत करण्याकरतां त्यांत विशेष असा कांहीं सात्विक भाव नाहीं. तो ह्या मंदिरांत भरपूर आहे. ह्या मंदिरांत रविवारी सायंकाळीं उपासना झाली. ती फार गंभीर झाली. बराच धूप जळत असल्यानें चहुंकडे सात्त्विक गंध सुटला होता. नियमित वेळीं घंटानाद झाल्यावर नेमणुकीचे प्रचारक वेदीवर बसले.
ते दुर्गानाथ राय हे केशवचंद्रांच्या प्रिय शिष्यांपैकीं एक असून फार साधे व सात्त्विक दिसले. गायन सुस्वर व भजन प्रेमळ झालें. भजनाचा रस जेव्हां दाटत असे व मृदंगाचा नाद जेव्हां घुमटांत घुमूं लागे तेव्हां पडद्यांतील अदृश्य स्त्रियांनीं आपल्या जवळचे मोठे शंख वाजवून त्यांच्या गंभीर ध्वनीचा मेळ असा मिळवून द्यावा कीं श्रोत्याचीं सर्व गात्रें बंद पडून तो कांहीं वेळ आत्मरूपानेंच उरावा.

माझी राहण्याची सुंदर सोय व थाटाचा पाहुणचार एका वसतिगृहांत केला होता. ता. १३ रोजीं टाऊन हॉलमध्यें Religion at the Basis of Life ह्यावर माझें इंग्रजींत व्याख्यान झालें. दिवाणसाहेब अध्यक्ष होते. कुचबिहार येथें दोन पक्षाचे समाज आहेत. एकाचे अध्यक्ष राजेसाहेब व व्यवस्थापक राणीसाहेब. शिवाय तत्वज्ञानाच्या अध्ययनाबद्दल सर्व बंगाल्यांत नांवाजलेले ब्रजेंद्रनाथ शील हे कॉलेजचे ब्राह्म प्रिन्सिपाल होते. मी तेथें असतांना तेथील कॉलेज कुमारांनीं दाखविलेली जिज्ञासा, तत्परता आणि तरुणांची सभा पुन्हां सुरू करण्याची उत्सुकता व त्यानंतर त्यांचीं आलेलीं पत्रें ह्या सर्वांकरून पाहतां कुचबिहार संस्थानांत एखादा ताज्या दमाचा प्रचारक पाठविल्यास पुष्कळ काम होण्यासारखें आहे. पण राजकारणामुळें तें होणार नाहीं ह्याचीहि खात्री आहे. म्हणून मी दोन दिवसांतच कार्यक्रम आटोपून मुकाटयानें १५ जानेवारी रोजीं ब्रह्मपुत्रेची वाट धरली.

“ब्राह्म धर्माचा प्रचारक होण्यांत मला जी धन्यता व सुख वाटत आहे त्यापुढें राजसुखहि तुच्छ होय.” हें वाक्य जेव्हां मी बाबू उपेन्द्रनाथ बोस, डूब्री ब्राह्मसमाजाचे एक वजनदार पुरस्कर्ते. यांच्यापुढें उच्चारलें तेव्हां त्यांची मुद्रा सचिंत झाली. कोठें अरबी समुद्रावरील मुंबई बेट तर कोठें आसाम प्रांतांतील हा डूब्री गांव ? पण ज्या सनातन ब्राह्मसमाजाचा मी वार्ताहर होतों त्याचा शुभ महिमा असा आहे कीं त्यायोगें ह्या विशाल भरतखंडाचेच नव्हे तर ह्या विपुल पृथ्वीचींहि दूरदूरचीं टोकें पवित्र प्रेमरज्जूनें एकत्र होणार आहेत व हल्लीं होतहि आहेत. तथापि वरील उद्गार ह्या विशिष्ट प्रसंगीं निघण्याचें कारण केवळ हें अंतरीचें सुखच होतें असें नव्हे तर त्यांत भोंवतालच्या शांत व गंभीर देखाव्याची जबर भर पडली होती. सायंकाळीं ता. १५ जानेवारी रोजीं आगगाडींतून उतरल्यावर बाबू मजकुरांबरोबर मी ब्रह्मपुत्रेच्या उंच व विस्तीर्ण तीरावर फिरावयास निघालों. प्रथम एका अक्षरशः एकांत व तटस्थ स्थळीं जणूं प्रार्थनेंत मग्न झालेलें-ब्राह्म मंदिर पाहिलें.
मंदिराच्या दाराशेजारींच एका गतब्राह्म बंधूची सुंदर संगमरवरी समाधि पाहिली. ह्या बंधूंच्या प्रार्थना फारच प्रेमळ व तन्मय होत असत. अशीच एकदां प्रार्थना करीत असतां तिच्या तिच्या भरांत ह्यांचें देहावसान झालें. म्हणून त्या प्रसंगाच्या स्मारकार्थ समाजमंडळींनीं ही समाधी बांधली आहे, हें ऐकून व पाहून झाल्यावर मागें वळतों तोंच साक्षात् ब्रम्हपुत्रेनें आपले विराट् दर्शन दिलें. “मृत्योर्मा अमृतं गमय” असें मनांत येतें न येतें तोंच अमृताची पताकाच माझ्यापुढें फडकूं लागली. हिमालयाच्या पलीकडे कैलास पर्वताच्या पूर्व पायथ्याशीं असलेल्या मानस सरोवरापासून निघून पित्यास प्रदक्षिणा घालून आलेली ही महाभाग ब्रह्मपुत्रा ! हिनें केवळ दर्शनहेळामात्रें करून किती दिवसांची वार्ता सांगितली ! किती कालाची साक्ष दिली ! डूब्री गांवच्या तिन्ही बाजूंनीं हिचा प्रवास असल्यानें हा गांव तिनें खांकेंत कवटाळून धरल्यासारखा दिसतो. महासागरास पाहून ईश्वराच्या अनंत स्वरूपाची व गंभीरतेची थोडी कल्पना येते खरी, पण अशा महानदांच्या विभूती पाहिल्याशिवाय ईश्वराचें कार्य व संसाराची प्रगति याविषयींची प्रत्यक्षता ध्यानांत येण्यासारखी नाहीं. अस्तमान झपाटयानें होऊं लागला, सर्व दृश्य जगावर रात्रींचा अभेद्य पडदा पडूं लागला. मातीच्या डोळयाला जसजसें कमी दिसूं लागलें तसतसें स्मृतीच्या डोळयांस अधिकाधिक दूरदूरचा प्रदेश दिसूं लागला. किती देश! किती भाषा! किती जाती, किती रीति-पण सद्धर्माची किंचित् आंच लागल्याबरोबर हे सर्व भेद विरघळून जाऊन प्रेमरस कसा पाझरतो - धर्माची पताका धारण करून निघालों म्हणजे किती पाहुणचार! किती आदर! किती कळकळ! ही जणूं आपला शोध काढीत येतात आणि मग आलेल्या वाटेनें आपल्या मागें हें प्रेमसुताचें जाळें किती फैलावलेलें दिसतें - तशीच पुढील खांचखळग्यांची दिसणारी वाट जसजशी पायाखाली येते तसतशी कशी सपाट होते, आजच्या चिंताच उद्यांच्या आनंदास कशा कारणीबूत होतात, काल भोगलेले क्षणिक शारीरिक कष्ट आज कसें अक्षय्य मानसिक सुख देतात -या प्रकारें आंतील मानस सरोवरांतून निघालेल्या या स्मृतिनदाचे सुखदायी तरंग बाहेरील ब्रह्मपुत्रा दिसेनाशी झाली तरी एकावर एक स्वप्न वेगानें सुटूं लागले असतां वरील धन्यतेचा उद्गार माझे तोंडून निघाला यांत काय नवल!