प्रकरण ४. स्थानिक कार्य

वर आंखलेल्या आराखडयाप्रमाणें मी स्थानिक कामाला लागलों. दिवसाचीं कामें आटोपल्यावर रात्रीं सभासदांच्या घरीं भेटी घेणें, रात्रींच्या शाळांची देखरेख करणें वगैरे कामें आटोपून घरीं येण्यास रात्रीचे ११|१२ वाजत. मुंबईसारख्या अफाट वस्तींत सभासदांचीं घरें १०|१२ मैल लांबवर पसरलेलीं असत व शाळाहि दूर दूर असत म्हणून इतका वेळ लागे. त्यामुळें कामांत वक्तशीरपणा राखण्यास फारच जड जाई. प्रथम प्रथम संघटना होणें कठीण गेलें. समाजांत तरुणांचा उत्साह वाढत होता. त्यांचें साहाय्य आनंदानें मिळूं लागलें; पण अनियमितपणाबद्दल टीका कांहीजणांकडून प्रथमपासूनच चालत असे. अद्यापि ती प्रेममूलक होती; त्यामुळें दुःसह होत नसे. समाजाच्या बाहेरची मंडळी मला माझ्या कामांत कितपत यश मिळेल याबद्दल साशंक नजरेनें पाहात असत; तर कांही कौतुकानें पाहात असत. या भिन्न प्रवृत्तींमुळें माझी करमणूकच करून घेत असें. आमच्या घरची मंडळी साध्या रहाणीची व खेडवळ प्रांतांतून आलेली. त्यांना ह्या मुंबईसारख्या नवीन नवीन ढंगाच्या समाजामध्ये आपलें बस्तान बसविण्यास प्रथम प्रथम कठीण गेलें. प्रार्थना समाजाच्या थोर थोर घराण्यांनीं आमची खरी स्थिति पाहून मोठया मान्यतेनें आम्हांस संभाळून घेतलें. भांडारकर, माडगांवकर, चंदावरकर वगैरे घराण्यांतील स्त्रियांनीं आमच्या वृध्द आईशीं मिळून मिसळून वागणूक ठेवून मुंबईचा परकेपणा व तुटकपणा भासूं दिला नाहीं. वासुदेव बाबाजी नवरंगे, सदाशिवराव केळकर, द्वारकानाथ वैद्य, सौ. लक्ष्मीबाई रानडे वगैरे घराणीं तर आम्हांस आमच्या घराण्यासारखीं वाटत होतीं. रा. कोरगांवकरांनीं तर प्रथमपासूनच माझ्याबद्दल फार काळजी वाहिली. वामनराव सोहोनी व सय्यद अबदुल कादर हे तर माझ्या कामांत आजीव येऊन मिळाले. डॉ. सुखटणकरांचा माझ्यशीं परदेशांतून कळकळीचा पत्रव्यवहार चालू असे. डॉ. काशीबाई नवरंगे, डॉ. वैकुंठ कामत वगैरे तरुण मंडळी आमच्या घरगुती अडचणी भागविण्याला सदैव तत्पर असत. असा हा गोतावळा भोंवतालीं जमून आल्यामुळें मुंबई शहरांतल्या राहणीच्या आर्थिक तंगीच्या वेदना सहज सह्य झाल्या. जसजसा माझा कामाचा व्याप वाढूं लागला तसतसा हा गोतावळाहि वाढूं लागला.

विसाव्या शतकाच्या आरंभापासून वृध्द पिढी जाऊन नवीन पिढीनें त्यांची जागा घेतल्यामुळें प्रार्थना समाजांत एक प्रकारची क्रांति होऊन तो नवीन वाढीला लागला, असे वर सांगितलेंच आहे. जुन्या संस्थांचा नवीन जोम आणि नवीन संस्थांची भर ह्यामुळें चहूंकडे नवचैतन्य फुलूं लागलें. रा. द्वारकानाथ वैद्यांनीं ‘सुबोध-पत्रिका’ सांवरली, वामनराव सोहोनी यांनी रात्रींच्या शाळा हातीं घेतल्या, कोरगांवकरांनीं जमाबंदीची काळजी केली आणि इतर नवीन नवीन तरुण स्वयंसेवक म्हणून पुढें आले. ह्याचा परिणाम पुढें कांहीं वर्षे समाजाच्या वार्षिक उत्सवाचे वेळीं स्पष्ट दिसूं लागला. दूर दूर राहणा-या सर्व कुटुंबांचीं स्नेहसंमेलनें घडूं लागलीं. निरनिराळया दर्जामध्यें परिचय वाढून निरनिराळया कुटुंबांमध्यें कौटुंबिक उपासना होऊं लागल्या. सगळा समाज म्हणजे एक कुटुंब ही भावना रुजूं लागली. ह्यामुळें परकीयांचें लक्षहि समाज-जीवनाकडे अधिक वाढूं लागलें. हितचिंतक सभासद होऊं लागले; आणि सभासद कार्यवाहक होऊं लागले. गिरिजाशंकर त्रिवेदीसारखी गुजराथी मंडळी देखील सभासद होऊं लागली. कराचीचे डॉ. रुबेन ह्यांचा वरचेवर भजनाचा लाभ घडूं लागला. स्वामी स्वात्मानंदजी ह्या आर्यसमाविष्ट प्रचारकाची जोड प्रचारकार्यामध्यें मिळूं लागलीं. मणिलाल पारेखसारख्या भावनाशील भक्ताची भर पडली. सय्यद अबदुल कादर व त्यांची बहिण हाजराबाई हीं दोन भावंडें तर जमखिंडीपासूनच आमच्या घरांत नेहमींचींच असत. केरो रावजी भोसले ह्या मराठा तरुणानें नुसतें सभासदच होऊन न राहतां पंढरपूर येथील अनाथाश्रमाचे चालकत्व आपणाकडे घेऊन तो बराच नांवारूपास आणला. प्रार्थना समाजाचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास यांचें मूक औदार्य या सर्व नवचैतन्यास पुष्टिदायक होऊन चिरस्मरणीय झालें. डॉ. भांडारकरांसारख्या पूज्य विभूतीचा समागम मुंबईकरांस वेळोवेळीं घडून आध्यात्मिक लाभांत भर पडूं लागली. शिवरामपंत गोखले या वृध्द प्रचारकाचा बालबोध उपदेश बायकामुलांनाहि आवडूं लागला. पण ह्या सर्व घटनेचा मध्यबिंदु प्रार्थना समाजाचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर व त्यांची प्रेमळ पत्नी लेडी चंदावरकर यांनीं साधला, आणि ते एक मुंबईचे तोलदार नागरिक असल्यामुळें सरकार दरबारांत तसेंच प्रतिष्ठित लोकसमाजांत प्रार्थना समाजास एक अढळ भूमिका त्यांनीं मिळवून दिली. गत पिढींतल्या एकाहून एक महानुभाव श्रेष्ठ विभूतींनीं प्रार्थना समाजाला जें उच्च अधिष्ठान मिळवून दिलें तें
अद्यापि मागें उरलेल्या दादासाहेब भांडारकरांनीं आणि नवीन मिळालेल्या चंदावरकरांनीं कायम राखिलें.

ह्या सर्वांचा एक दृश्य परिणाम समाजाच्या १९०५ च्या ३८ व्या वार्षिकोत्सावामध्यें स्पष्ट दिसून आला. स्त्रिया पुरुष, लहान थोर, तरुण, वृध्द सभासद आणि हितचिंतक वैगरे सर्वांनींच ह्या उत्सवांत जोमानें भाग घेतला. ह्या वर्षाचें प्रीतिभोजन फारच थाटाचें झालें. त्यांत प्रो. गोपाळ कृष्ण गोखले, प्रिन्सिपल रघुनाथराव परांजपे, रा. बंडोपंत भाजेकर अशा कितीतरी बाहेरच्या हितचिंतकांनीं भाग घेतला. इतकेंच नव्हे तर अस्पृश्य समाजांतील कांहीं मंडळी पंक्तीस हजर होती. त्यामुळें थोडीशी आंतबाहेर खळबळ उडाली. पण ही नवी प्रथा लवकरच पचनीं पडून सामाजिक जीविताला भरपूरपणा आल्यावांचून राहिला नाहीं.

या क्रांतिकाळांत उपासनापध्दतीमध्यें एक महत्वाची भर पडली. सिंध आणि पंजाब या प्रांतांतून डॉ. रुबेन आणि लाहोराहून रामरखामलसारखी भजनाची रसिक मंडळी राममोहन आश्रमांत येऊन रहात. तसेंच बंगालहून तरुण विद्यार्थी, ब्राह्मसमाजाचे सभासद मुंबईंत शिक्षणासाठीं येऊन रहात. त्यांत प्रबोधकुमार दत्त या नांवाचे तरुण गृहस्थ कलकत्याकडील ब्राह्मसमाजांत प्रसिध्द गायक होते. या सर्वांचा आमच्या घराशीं फार निकट संबंध आला. त्यांच्या सहवासामुळें प्रार्थना समाजाच्या साप्ताहिक उपासनेच्या पूर्वी वेदीखालीं बसून अर्धा तास भजन करण्याची प्रथा पडली. त्यांत विशेषेंकरून सिंध प्रांतांतील हिंदी भजनें आणि बंगालमधील रवीन्द्रनाथ टागोरकृत सुंदर पदें यांचा समावेश अधिकाधिक होऊं लागला. मुंबई समाजांतील उपासनेच्या वेळीं ब्राह्म-संगीत म्हणण्याचे बाबतींत आमच्या सभादांच्या भगिनी मंडळाकडून पुढाकार घेण्यांत येऊं लागला. त्यांत द्वा. गो. वैद्य यांच्या पत्नी व सीतारामपंत जव्हेरे यांची कन्या गुलाबबाई व त्यांची बहिण कृष्णाबाई जव्हेरे आणि विशेषतः मराठी पद्यें म्हणण्यामध्यें तर माझी बहिण श्रीमती जनाक्का यांचा पुढाकार असे. प्रार्थना समाजांत बंगाली गाण्यांचा प्रवेश सीतारामपंत जव्हेरे यांच्या कालापासून आहे. सत्येन्द्रनाथ टागोर
साता-याला डिस्ट्रिक्ट जज होते. तेव्हां साता-याला एक प्रार्थना समाज चालला होता. सीतारामपंतांच्या मुलींनी-गुलाबबाई, कृष्णाबाई, इंदिराबाई यांनी-तेव्हांपासून बंगाली गाणी घेतलीं. सीतारामपंतांनीं त्यांचें मराठी भाषांतर करून प्रार्थना-संगीतांत त्यांचा समावेश केला. आम्ही राममोहन आश्रमांत राहायला लागल्यावर वरील प्रबोधकुमार दत्त यांचा आमच्या घरीं फार लळा पडला. त्यांचा गळा अत्यंत मधुर असून ब्राह्म-संगीतांत त्यांचें सुंदर प्रभुत्व असे. त्यांच्याकडून श्रीमती जनाबाईंनीं बंगाली भाषेची आणि विशेषतः संगीताची बरीच माहिती करुन घेऊन आमच्याकडील संगीतांत त्यांचा प्रसार केला.

आमच्या इकडील प्रार्थना संगीताची सहावी आवृत्ति सन १९०१ मध्यें झाली. तेव्हांपासून हें पुस्तक बरेंच बोजड आणि किंमतीनें महाग झालें. रात्रींच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठीं आणि बहुजनसमाजांत ब्रह्मोपासनेचा प्रसार करण्याचे कामीं संगीत पुस्तकें आटोपशीर व स्वस्त दराचीं असणें आवश्यक झालें. म्हणून ब्रह्मो पोस्टल मिशनच्याद्वारें सुलभ संगीत या नांवाचें एक लहानसें पुस्तक प्रसिध्द करण्यांत आलें. या कामीं माधवराव केळकर यांनीं बरीच मदत केली. डॉ. रुबेन यांच्या भजनामुळें सिंध प्रांतीय गाणीं इकडील मंडळींना विशेष आवडूं लागलीं. त्यामुळें प्रेमलहरी नांवाचें एक छोटेंसे पुस्तक प्रसिध्द केलें. उपासनेच्या वेळचें संगीत भगिनी मंडळींनीं म्हणावें आणि उपासनेच्या पूर्वीच्या वेळचें भजन तरुणांनीं म्हणावें असा प्रघात पडूं लागला. या बाबतींत सय्यद अबदुल कादर यांनीं पुढाकार घेतला. त्या वेळीं त्यांची प्रथम पत्नी वारली असल्यामुळें त्यांच्या मनाची स्थिति विरक्त झाली होती. ‘अपने हरीकी मैं जोगन बनी’हें पद म्हणतांना ते गहिंवरून जात. ह्या सुलभ संगीत पुस्तकाची लोकप्रियता इतकी वाढली कीं, पुढें त्याच्या पांच आवृत्या निघाल्या; आणि बहुजनसमाजांतच नव्हे तर प्रत्यक्ष प्रार्थना समाजाचे उपासनेच्या वेळीं आतां हींच पुस्तकें उपासकांच्या हातीं बहुतेक दिसत आहेत. आतां हें भजनाचें काम व पोस्टल मिशनचें काम प्रार्थना समाजाचे चिटणीस व राममोहन राय हायस्कूलचे शिक्षक रा. वेलिनकर यांनीं चालवलें आहे. पूर्वीच्या पिढींत हें भजनाचें आणि गाण्याचें काम रा. गणपतराव आंजलेंकर हरिकीर्तनाचं आणि उपसनेचे वेळीं दादासाहेब भांडारकरांचे मागें राहून चालवीत असत.