निराश्रित साहाय्यक मंडळी

हिंदुस्थानांतील अस्पृश्य मानलेल्या लोकांची स्थिति अत्यंत शोचनीय आहे व त्यांच्या उन्नतीसंबंधीं आपण कांहींतरी प्रयत्न केले पाहिजेत, असें वरिष्ठ वर्गांतील लोकांना पुष्कळ वर्षें वाटत आहे; पण आपल्या महराष्ट्र प्रांतात ह्या कामीं प्रथमतः खऱ्या प्रयत्नाला आरंभ केल्याचें श्रेय परलोकवासी श्रीयुत जोतीबा फुले ह्यांनाच द्यावें लागेल. त्यांच्याच श्रमानें पुणें मुक्कामीं ह्या लोकांसाठीं एक-दोन शाळा स्थापन करण्यांत आल्या. हल्लीं त्या तेथील म्युनिसिपालिटीच्या ताब्यांत आहेत. त्यानंतर ह्या हतभागी लोकांकडे ज्या दुसऱ्या उदार अंतःकरणाच्या पुरुषाचें लक्ष गेलें; ते परलोकवासी श्रीयुत रामचंद्र अण्णाजी कळसकर हे होत. ह्यांनीं प्रथम 'वांगी व्हिलेज एज्युकेशन सोसायटी' नावाची संस्था वांगी येथें स्थापन करून नंतर ती बारामती येथें नेली. ह्या संस्थेच्या आश्रयाखालीं त्यांनीं महार लोकांकरितां खेड्यांतून कांहीं शाळा उघडल्या होत्या; पण त्या फार दिवस चालल्या नाहींत. हें काम भरपूर द्रव्य साहाय्याशिवाय नांवारूपांस येणें शक्य नव्हतें; सरकार, संस्थानिक आणि श्रीमंत व्यापारी ह्यांच्याजवळ द्रव्यबळ आणि सत्ताबळ हीं असतात; पण तेवढ्यानें अशी कामें उदयाला येत नाहींत. हीं मुंबईसारखी धनाढ्य शहरें आणि इंग्रजांसारखें मातबर आणि न्यायी सरकार ह्या देशांत पिढ्यानपिढ्या असूनहि ह्या दीन लोकांचें भाग्य उदयास आलें नाहीं ह्यावरून उघड होतें. महानुभाव श्रीमंत सयाजीराजे ह्यांच्या कारकिर्दीत मात्र ह्या दीनांची बरीच दाद लागत आहे व अलीकडे कोल्हापूर येथेंहि बरीच चळवळ चालली आहे, पण कांही होवो; हें कार्य इतकें अवजड आहे कीं, तशीच असाधारण धर्मप्रेरणा झाल्याशिवाय आणि कोणत्यातरी एका नव्या जोमाच्या उदार पंथानें पुढाकार घेतल्याशिवाय ह्याला कांहीं रूप येईल, हें अद्यापि संभवत नाहीं.

प्रार्थनासमाज, ह्या कामीं हळूळहू पण बिनबोभाट आज बरींच वर्षें अल्पस्वल्प प्रयत्न करित आला आहे. मुंबई, पुणें, सातारा, अहमदनगर ह्या ठिकाणीं ह्या लोकांकरितां रात्रीच्या शाळा उघडून त्यांतून समाजाचे प्रचारक थोडाबहुत धार्मिक आणि नैतिक उपदेश आज बरीच वर्षें करीत आहेत. अलीकडे ह्या वर्गाविषयीं कळवळा वाटणारांना हुरूप येण्यासारखा एक नवीन प्रकार दिसून येतो, तो हा कीं, आज कित्येक वर्षें अज्ञान आणि कंगाल अवस्थेच्या चिखलांत रुतून गेलेल्या ह्या हतभागी लोकांतच स्वतःची स्थिति सुधारण्यासंबंधी जागृति दिसूं लागली आहे.

ह्या अपूर्व जागृतीस इंग्रजी राज्याचें औदार्य आणि त्या औदार्याची अपूर्णता ह्या दोन्ही परस्परभिन्न गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत. इंग्रजी राज्यांतील समतेच्या वागणुकीमुळें महारमांगांची लष्करांत भरती होऊन गेल्या दोनतीन पिढ्यांत ह्या वर्गांतील बरेच लोक हवालदार, जमादार आणि सुभेदार-बहादूर अशा पदवीला पोहोंचले होते. शिवाय, साहेबलोकांच्या खासगी तैनातींत बटलरचे वगैरे धंदेही इमानानें बजावून त्यांच्या साहजिक समागमानें ह्या वर्गांतील बरींच कुटुंबें अंमळ सुखवस्तु झालीं; पण ह्या बाबतींतील आपल्या उदार धोरणाचा विकास उत्तरोत्तर जास्त होऊं देण्याचें नैतिकधैर्य आणि शक्ति ह्या जातिभेदानें सडलेल्या देशांत इंग्रजबहादुरांच्याही अंगी कायम राहिली नाहीं व सुमारें पंधरा वर्षांपासून अलीकडे ह्या लोकांची लष्करांत पूर्वींप्रमाणें भरती होईनाशी झाली आहे.  पुढें येण्याला जो एकच मार्ग खुला होता, तोही अशा रीतीनें बंद झालेला पाहून ह्या लोकांचे आपल्या निराश्रित अवस्थेसंबंधीं डोळे किंचित् उघडूं लागले. ह्या बाबतींत प्रथम जे प्रयत्न झाले व अजून चालू आहेत; त्याचें बरेंचसें श्रेय पुणें येथील महार जातींतील पाणीदार गृहस्थ श्रीयुत शिवराम जानबा कांबळे यांजकडे आहे. श्रीयुत कांबळे ह्यांचा मुख्य रोंख जरी सरकारांत आपल्या जातीची पूर्वींप्रमाणें भरती व्हावी म्हणून कायदेशीर पद्धतीनें अर्ज करण्याचाच अद्याप आहे, तरी आपल्या जातीला शिक्षण मिळून तिचें पाऊल पुढें पडावें म्हणून त्यांचे दुसऱ्या बाजूनेंही अविश्रांत श्रम चालले आहेत. त्यांनीं 'सोमवंशीय समाज' नांवाची संस्था पुण्यास काढली असून तिच्याच नमुन्यावर अहमदनगर येथें श्रीयुत श्रीपतराव थोरात आणि पांडोबा डांगळे ह्यांच्या परिश्रमानें दुसरा एक 'सोमवंशीय समाज' सन १९०५ सालच्या जून महिन्यांत स्थापन झाला आहे. ह्या पूर्वीं नागपूराजवळ मोहपा येथें श्रीयुत किसन फागू नांवाच्या एका तरुण आणि स्वार्थत्यागी गृहस्थानें धर्माच्या पायावर एक समाज स्थापून चळवळ चालविली होती. मुंबई येथील प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनची कांहीं उदार मताचीं पुस्तकें वाचून ह्या तरुण गृहस्थाचें मन प्रार्थनासमाजाकडे वळले. प्रार्थनासमाजाविषयीं प्रत्यक्ष माहिती करून घेण्यासाठीं म्हणून मुंबई प्रार्थनासमाजाच्या १९०५ सालाच्या वार्षिक उत्सवाला श्रीयुत किसन फागू हे आले होते. तेथें पंधरा दिवसांच्या पाहुणचारामुळें त्यांची आणि समाजाच्या कांहीं मंडळीची ओळख होऊन परस्पर हेतूंची आणि प्रयत्नांची परस्परांस चांगली माहिती झाली. शेवटीं हे गृहस्थ समाजाच्या प्रीतिभोजनांतही हजर असल्याचें प्रसिद्धच आहे. ह्या ओळखीमुळें ह्या जातींतील आत्मोन्नतीसंबंधीं ज्या कांहीं चळवळी चालल्या होत्या, त्यांकडे समाजाच्या प्रचारकांचेंही बरेंचसें लक्ष वेधलें व पुढें लवकरच (हल्लीं परलोकवासी झालेले) स्वामी स्वात्मानंद आणि मी हे दोघे अहमदनगरास फिरतीवर गेलों असतां तेथील नवीनच स्थापन झालेल्या 'सोमवंशीय समाजा' मार्फत भिंगार नांवाच्या खेड्यांतील महारवाड्यांत आमचीं कांहीं व्याख्यानें झालीं.

लोकांची हळुहळु या विषयाकडे सहानुभूति वळूं लागली, आणि विशेषेंकरून मुंबई प्रार्थनासमाजाच्या आणि सोशल रिफॉर्म असोसिएशनच्या उदार मनाच्या अध्यक्षांनीं या कामांत बरेंच प्रोत्साहन दिल्यामुळें मीं एक निबंध लिहून त्यांत या लोकांची कशी स्थिति आहे, संख्या किती आहे, यांच्यासाठी कोणी काय काय केले आहे, या मुद्द्याचे विवरण केलें आणि शेवटीं यांना वर आणण्याकरितां एतद्देशीय लोकांनीं आपले पौरस्त्य आचार, रीतिरिवाज आणि परंपरा यांना धरून एक कायमचें मिशनच स्थापलें पाहिजे आणि तें सध्याच्या स्थितींत प्रार्थनासमाजाशिवाय दुसऱ्याकडून होणे विशेष संभवनीय नाहीं, असे विचार, उदार मतवादी समाजबंधूंपुढें मांडले. हा निबंध 'इंडियन सोशल रिफॉर्मर'च्या
ता. २९ जुलै १९०६ च्या अंकात प्रसिद्ध झाला व नंतर स्वतंत्र पुस्तकरूपानें छापून प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनच्या आश्रयानें त्याच्या पुष्कळ प्रती वाटण्यांत आल्या.

विचार केला, सहानुभूति मिळाली, निर्णय झाला, निश्चय झाला. तथापि 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' हें त्रिकालसत्य कधीं खोटें व्हावयाचें नाहीं. म्हणून ह्या तांदुळांची वाट कांही दिवस पहावी लागली.