मूर्ति-पूजा

प्रकरण १९ वें
देव्हारा
येथपर्यंत मी जें लिहिलें त्या माझ्या बालवयांतल्या चेष्टा होत्या. हा माझ्या प्राथमिक शाळेंतला १२ वर्षांच्या वयांतला काळ होता. ह्या काळांतही मी घरीं देवपूजा केव्हां केव्हां फार मी लावून करीत असें. देव्हा-यावर देव पुष्कळ असत. शिवाय इतर कोनाड्यांतूनही पूजनीय वस्तु पुष्कळ ठेविल्या असत. उदाहरणार्थ आमचा देव्हारा म्हणजे देवघरांतल्या भिंतीत माझ्या कंबरेइतक्या उंचीवर एक मोठा चार फूट रुंद व तितकाच उंच आणि ३।४ फूट खोल असा कोनाडा होता. त्यांत प्रथम देवांच्या मूर्ति आणि पितरांचे टांक नीट मांडावयाचे असत. त्यापुढें शाळिग्राम, निरनिराळ्या नद्यांतले गोटे; त्याचेहिपुढें घंटा, धूपार्ति, कापुरारती, निलांजनें, पळी, पंचपात्री आणि उजवीकडे एका अडणीवर मोठा शंख आणखी एक लहान शंख वगैरे ठेवले असत. उजवीकडे आंत पुनः एका खिडकींत श्री यल्लमाची चवरी आणि आमच्या आजीची ताळी वगैरे जवाहीर असें. डावीकडील एका लहानशा देवळींत एक समयी आणि जवळ एक काशीहून आणिलेला गंगोदक बंद करून ठेविलेला तांब्या अशा कितीतरी वस्तूंचा सुंदर संभार असे. पूजेचा उत्साह मनाला आलें कीं, ह्या सर्व देवदेवता आणि इतर वस्तु धुवून पुसून व्यवस्थेनें मांडून त्यांवर गंधाक्षता, कुंकूं, हळद, फुलें यथासांग लावून पूजा करण्यांत त्या बाळपणीं देखील मला मोठें सुख आणि ईर्षा वाटे. ती माझ्या वडील भावाला वाटत नसावी आणि हा आम्हां दोघा भावांमधील भेद बहुतकरून माझ्या बाबांच्या लक्ष्यांत आला असावा म्हणून ते मलाच पूजा करावयास सांगत असावेत. ह्यावरून माझ्या स्वभावांतील उत्साह हा गुणही दिसून येतो. विशेष सणावारीं घरीं कांहीं गोडधोड नैवेद्याचें झालें म्हणजे माझ्या बाळभक्तीला तर पूरच येत असे. मानवी जातीप्रमाणें व्यक्तींतही सकाम भक्ति अगोदर असणारच. मग मला ह्यांत लाज आणणारें कांहीं विशेष नाहीं.

आध्यात्मिकता
मूर्तिपूजा मुलांना आणि बायकांना देखील आवश्यक नाहीं असें माझें आतां धर्माचा इतिहास शास्त्रीयदृष्टीनें वाचून ठाम मत झालें आहे. तरी त्यावेळीं मूर्तिपूजेंत मला मोठी करमणूकच नव्हे तरी आपण कांहीं विशेष गोष्ट करीत आहों असें वाटे. ती गोष्ट आध्यात्मिक होती हें त्यावेळीं वाटणें शक्यच नव्हतें. तरी मला जो उत्साह आणि निरतिशय आनंद वाटत होता, तो केवळ नैवेद्याच्या लोभामुळेंच होता असेंही नव्हतें. माझ्या बाबांचा दरारा घरीं फार होता तरी माझ्या आईवर लहानपणींही मी इतका दाब टाकीत असें कीं, हट्ट धरिला असतां तर देवांच्याही अगोदर मला केलेले गोड पदार्थ खावयाला मिळाले असते. आणि बाबांनींहीं ज्याअर्थी पूजेची मजवर सक्ति कधीं केली नाहीं त्याअर्थीं पूजा करण्यांत मला तितक्या कोवळ्या वयांतही ९।१० वर्षांचा असतांना तेव्हां न सांगता येण्यासारखें कांहीं तरी आंतरिक सुख होत असावें. नाहींतर माझ्यासारख्या त्या वेळच्या काफिर आरबाला अगर तुफान पठाणाला ह्या हिंदु पूजेची दगदग सहनच झाली नसती! “व्यतिषजति पदार्थान् आंतरः कोSपि हेतुः" ह्या पूजेंत माझी कोंवळी आध्यात्मिकताच असेल, नसेल कशावरून! हा जो मी वरील तर्क रचला आहे त्याला कारण पुढें जें लिहित आहें त्यांत दिसणार आहे. तो चुकीचा ठरला तर माझी चूक कबूल करावयाला मी केव्हांही तयार आहें. कारण हें जें सारें प्रकरण मी लिहित आहें तें मी मोठा धार्मिक होतों असें भासविण्यासाठीं नसून, पुढें प्रौढपणीं माझ्यांत ज्या धार्मिक भावना स्पष्ट झाल्या त्याचेंच हें प्राथमिक अस्पष्ट रूप होतें किंवा असेल हें दाखविण्याच्या माझ्या शास्त्रीय प्रयत्न आहे.

शिवलिंग पूजा
इंग्रजी तिस-या चौथ्या यत्तेंत असतांना मी १४।१५ वर्षांचा होतों. त्यावेळीं माझ्या भावनाशील अंतःकरणांत स्पष्ट रूपानें भक्तिभावनांचा उद्रेक मला दिसून आला. ह्यावेळीं माझी मराठी वाङ्मयांत चांगली प्रगति होत होती. मी पौराणिक पोथ्या वाचीत होतों. विशेषतः मी शिवलीलामृत ह्या लहानशा पोथीचें पारायण आवडीनें करीत असें. हें मी स्नान करून जेवणापूर्वी करीत असें. शिवाय श्रावणमासांत शिवलिंगाचें अर्चन मी मोठ्या भक्तिभावानें करूं लागलों. पाटावर शिवलिंग ठेवून मी त्यावर बेलपत्राची सहस्त्रदळें वाहात असें. म्हणजे बरोबर जरी हजार पानें नसलीं तरी पुष्कळशीं पत्रीं मी स्वहस्तें तोडून आणून माझ्या आवडत्या शिवलिंगावर अर्पीत असें. आणि विष्णु सहस्त्रनामाप्रमाणें शिवनामांचा जप करीत असें.

शिव व विष्णु
हिंदु धर्मांतील शिव आणि विष्णु ह्या मुख्य दैवतांपैकीं मला पहिलेंच विशेष आवडे. अजून झालें तरी मला एकाद्या विष्णु मंदिरापेक्षां एकाद्या शिवालयांत जाऊन बसणें अधिक पसंत आहे. ह्याचें कारण विष्णु मंदिरें सापेक्षतः अधिक अर्वाचीन आणि त्यांत शिवालयापेक्षां भजनपूजनांचा व स्त्रीपुरुषांचा अधिक गोंगाट असतो. शिवालयें प्राचीन आणि निवांत असतात. गाभा-यांत मूर्तीचा सुळसुळाट आणि उपकरणांचा दणदणाट नसतो. पण हरिचिंतनात मी कृष्णाचे जे चाळे वाचीत असें त्यापेक्षां शंकर पार्वतीचे गोष्टींत अधिक साधेपण आणि भोळेपण मला त्या लहान वयांतही दिसत असे. ह्यामुळें कृष्णापेक्षां भोळा सांब अधिक आवडे!

पुराणिकाचा थाट
ह्याच दोनचार वर्षांत मी शाळेंतील माझ्या सोबत्यांस जमवून सुट्टीचे दिवसांत हरीविजयांतील गोवर्धनाख्यान, रामविजयांतील कुंभकर्णवध किंवा पांडवप्रतापांतील हरिश्चंद्राख्यान असले भक्तिरसोत्पादक अध्याय वाचून पुराणिकाप्रमाणें अर्थ सांगत असें. विशेषतः शेवटच्या आख्यानाचे वेळीं श्रोते आणि वक्ता आम्हीं दोघेही करुणरसानें व्याकुळ होऊन रडत बसल्याचें मला आतां नीट आठवत आहे. तसेंच विठोबाच्या मठांत मागें वर्णन केलेल्या सप्ताहांत अगदीं लहानपणीं मी जो तमासगिराप्रमाणें जात होतों तो ह्यावेळीं प्रेमानें वश होऊन भाग घेऊं लागलों. पुढें बाबा गुरुचरित्र वाचून दत्तमंदिरांत जाऊं लागले तेव्हां त्या चरित्रांतील कथा मला रामरावणाच्या युद्धापेक्षां, किंबहुना कृष्णगोपींच्या लीलेपेक्षां अधिक मानवी त-हेच्या व करुण भक्तीला पोषक असलेल्या अधिक आकळू लागल्या. आणि दत्तमंदिरांतील करुणाष्टकें बाबांच्या तोंडून ऐकणें मला फार आवडत. ह्या माझ्या बुद्धिविकासाबरोबर जो धर्मभावनांचा विकास होऊं लागला त्यांतील शास्त्रीय संबंध जरी त्यावेळीं मला कळून येणें शक्य नव्हतें, तरी वस्तुस्थिति तशी होती खरी!

गोड फरक
पोथ्या वाचणें हा तिस-या प्रहरचा आणि भजनास जाणें हा एक सायंकाळचा, कांहीं अंशीं फावल्या वेळेचा, प्रकार होता. तरी श्रावण महिन्यांत स्नान करून जेवणाचे पूर्वी मी श्रीशिवलीलामृताच्या पारायणाचा, नामजपाचा, लिंगार्चनाचा आणि उपवास करून रामतीर्थास (१॥ मैल डोंगरांत) जाऊन येण्याचा जो नाद घेतला त्यांत खरा भक्तिभाव होता. आणि हा माझा नवीन नाद पाहून आईबाबांना कौतुकच नव्हे तर आश्चर्य वाटे. श्रावणमासांत डोंगरांत आपल्या वानरसेनेला घेऊन जाऊन रामेश्वराहून परत येतांना जिवंत विंचवांची माळ घरीं आणून लहान बहिणींना भेडसावणारा पठाण पो-या, आतां सरळमार्गानें उपवाशी एकाकी रामेश्वराला जाऊन त्याचा अंगारा आणून वडिलांनाही लावतो हा कोण गोड फरक! हा फरक आपल्या मुलाच्या स्वभावांत पडत आहे हें पाहून कोणा प्रेमळ आईबापाला कौतुक वाटणार नाहीं! हा जो परिपाक माझ्या स्वभावांत दिसूं लागला तो कांहीं तिस-या चौथ्या यत्तेंत एकदम आला असें नव्हे. माझ्या भावाच्या मृत्युबद्दल शोक, घरांतील दारिद्र्य, आईबाबांचा उदासीनपणा वगैरे अनेक नैसर्गिक कारणें ह्या अंतरपालटीचीं होतीं. इतकेंच नव्हे तर तिस-या, चौथ्या यत्तेंत मला माझ्या वर्गांतील हुषारीमुळें सोबत्यांमध्यें आणि वर्गामध्यें जें जें यश आणि प्रभुत्व मिळालें त्याचाही हा सात्विक परिणाम होता. इतर मुलांप्रमाणें मी यशामुळें आढ्य, हेकेखोर व जुलमी न होतां माझ्या सोबत्यांना घेऊन जरी बराच वेळ धांगडधिंगा घालीत असें तरी पुनः कांहीं वेळ पोथ्या वाचण्यांतही घालीत असें, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे, असें मला वाटत आहे. पण तेव्हां मात्र मी केवळ अनभिज्ञ आणि मुग्ध भावनाशील होतों!

भक्ति व यश
शाळेला मी नियमानें जात होतों. कारण नंबर पहिला असल्यानें वर्गाचा सेक्रेटरी मलाच व्हावें लागे. मार्कपत्रकें, हजरिपत्रकें नीट ठेवणें वगैरे शिक्षकांच्या हाताखालचीं सटर फटर कामें सेक्रेटरी नात्यानें मला करावीं लागत. म्हणून शाळेंत उशीर करून जाणें किंवा गैरहजर राहणे हें शक्यच नसे. तरी मी शाळेत जाण्यापूर्वीं आईला किंवा बाबांला न सांगतां, अथवा जातां जातां शाळेपुढच्या मारुतीचें दर्शन न घेतां कधींच जात नसें! पुढें बबलादीचे सिद्ध पुरुष २।३ वर्षें घरीं येऊं लागले, त्यांचेवरही माझी श्रद्धा बसली. तसा त्यांच्यांत मजविषयीं प्रेमळपणा होता. त्यांचा प्रसाद म्हणून बराच अंगारा मी एका पेटींत घालून ठेवीत असें. ह्यांतच रामेश्वराचा, मारुतीचा, दत्ताचा वगैरे अंगारा असे. शाळेंत जाण्यापूर्वी सर्व देवांचीच नव्हे तर बबलादीच्या सर्व सिद्ध पुरुषांचीं नांवें घेऊन आणि कपाळाला हा मिश्र अंगारा लावून मी शाळेंत जाईं. आणि मला वाटे कीं, ह्या माझ्या भक्तीमुळें मला वर्गांत रोज मार्क इतरांपेक्षां जास्त मिळून माझा नंबर नेहमीं पहिला राही. वस्तुतः हा माझा धर्मभोळेपणा होता. कारण खरा प्रकार असा कीं हा माझ्या भक्तीचा नवीन उद्रेक होण्यापूर्वीच १।२ वर्षें माझी हायस्कुलांत प्रगति होऊन माझी प्रसिद्धि झाली होती. भक्ति प्रथम असो किंवा यश प्रथम असो; ह्या दोन्हींचे कांहीं वर्षांनीं पुढें साहचर्य घडलें ही गोष्टही खोटी नाहीं.
पांचव्या यत्तेंत असतांना मला खरूज फार लागली व घरीं आम्ही सर्वचजण बेजारलों. तेव्हां श्री यल्लमाचे यात्रेला जाण्याचा मींच घरीं आग्रह धरिला आणि तो बाबांनीं पारही पाडला असें मी जर सांगितलेंच आहे, वगैरे गोष्टींवरून जरी ह्या माझ्या धर्माच्या दुस-या विकासांत कांहीं अंशीं सकामपणाची झांक मारतें; तरी एकंदरींत त्यावेळच्या माझ्या भक्तिभावनांतून ब-याच अंशानें सहजमधुरता होती असें मला वाटतें. येरवीं, माझे सोबती जे अभ्यासांत, खेळांत आणि इतर करमणुकींत माझ्या प्रभावळींत गुरफटले ते माझ्या धार्मिक छंदांतही तसेच गुरफटले नसते.

अधिक स्फोट
हा जो मजमध्यें भक्तीचा उद्रेक झाला म्हणून मीं वर म्हटलें तो जसा एकादा भूकंप अकस्मात व्हावा तशा प्रकारें मी हायस्कूलमध्यें असतांना झाला असें मुळींच नव्हे. हायस्कूलमध्यें गेल्यावर मी नव्या जगांत गेल्यासारखें मला कां वाटूं लागलें, घरची स्थिति बदलल्यामुळेंही माझ्या स्वभावांत फरक कसा झाला वगैरे वेळोवेळीं माझ्या स्वभावविकासाची मीमांसा शास्त्रीयदृष्ट्या वर केली आहे. धर्मभावनेविषयीं माझी स्वतःच्या शास्त्रीय दृष्टीचें थोडे दिग्दर्शन मीं केलें आहे. त्यावरून धार्मिक भावना ह्या इतर भावनाहून अगदीं तत्वतः भिन्न आहेत असें कित्येक विचारी माणसें समजत आहेत तसें मी समजत नाहीं. माझी पुढची कहाणी ऐकून वाचक गोंधळू नयेत म्हणून ह्याचा थोडासा जास्त स्फोट करणें मला येथें जरूर दिसतें.

बालस्तावत् क्रीडा सक्तस्तरुणस्तावत्
तरुणी-रक्तः
वृद्धस्तावत् चिंतामग्नः परेब्रह्मणि
कोपि न लग्नः

असें प्रत्यक्ष आद्य शंकराचार्य म्हणतात. पण मला तर वाटतें कीं, लहानपणीं मुलांची खेळाची आवड, तरुणपणीं तरुणीसंबंधीं उदात्त रस आणि म्हातारपणीं एकाद्या ऐहिक बाबतींतील सात्विक चिंतामग्नता; ह्या तिन्ही भावनांहून भक्तीची भावना तत्वतः अगदीं भिन्नच आहे असें म्हणता येत नाहीं. ह्या भावनांत जी वयपरत्वें अंतःकरण्याची परिणति होत जाते तीच किंचित् आणखी थोडी जास्त शुद्ध, जास्त व्यापक आणि जास्त जोरदार झाली कीं तिला आम्ही भक्ति हें नांव देतों. ज्या सहज आनंदानें मूल खेळतें, तरुण रमतों, आणि वृद्ध सात्विक चिंतेनें व्याकुळ होतो; तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तींत आहे, हें माझें मत कित्येकांना विपरीत वाटेल. ऐहिक रस आणि पारमार्थिक रस ह्या दोन्हींला एकाच माळेंत गोंवतों ही माझी अक्षम्य भूल वाटणें साहजिक आहे. परंतु ऐहिक काय कीं पारमार्थिक काय रस तो रसच; तो कांहीं अरस होणार नाहीं. ह्याच दृष्टीनें वेदान्तानेंही ईश्वराची ‘रसोहि सः’ अशी व्याख्या केली आहे. आणि सत्, चित् आणि शेवटचें आनंद हे त्याचें स्वरूप सांगितलें आहे. मग मी भक्तिभावनेची इतर स्वाभाविक भावनांमध्येंच गणना करितों ह्यांत काय पाप घडतेंॽ ह्या न्यायानें पाहतां बाळपणींचा मी खेळकर, पोरपणींचा मी खोडकर किंबहुना कादंब-या वाचून अकालींच श्रृंगार रसाच्या वेदनांनीं विव्हळ होणारा, पुढें पोक्तपणीं अनेक राजसी भावनांचे हेलकावे खाऊन, शेवटीं वृद्धपणीं महारापोरांच्या घरच्या चिंतेत असो किंवा स्वतः माझ्या घरच्या मुलाबाळांच्या चिंतेंत असो, प्रसंगोपात्त मग्न झालों असलों तरी ह्या सर्व निरनिराळ्या भावनांत आणि माझ्या धार्मिक आयुष्यांतील उत्तमोत्तम भक्तिभावनेंत तत्वतः भिन्नता माझ्या तरी अनुभवास आली नाहीं. मी मोठा झाल्यावर प्रार्थना समाजांत असतांना आवड, प्रेम आणि भक्ति ह्या विषयावर एका कौटुंबिक उपासनेच्या प्रसंगीं प्रवचन करीत असतांना जे विचार प्रकट केले आहेत ते विचार आतां मी येथें भक्तिभावनेविषयीं जी मीमांसा करीत आहें तिच्या उलट आहेत हें खरें. पण हल्लींची माझी दृष्टि आधुनिक शास्त्रांतील विकास वादाला अधिक सुसंगत आहे असें वाटतें. ह्यामुळें हायस्कूलमधलाच काय पण पुढचाही माझ्या धर्मभावनांचा सर्व विकास माझ्या आयुष्यांतील इतर सर्व अनुभवांशीं आणि तदनुसार घडलेल्या वागणुकीशीं तत्वतः मुळींच विसंगत नाहीं असें माझें आतां मत झालें आहे. असो!

साधुसमागम
पोरवयांतल्या सहजभक्तीच्या आठवणी सांगतांना मी माझ्या पूजाअर्चाच्या, पोथीवाचनाच्या, नामजपाच्या, भजनांच्या व यात्रादिकांच्या वगैरे आठवणी वर सांगितल्या. पण आणखी एक मुख्य विषयाच्या आठवणी सांगणें जरूर आहे. ती गोष्ट संतसमागम ही होय. आतां ह्या पोरवयांत मला खरे संत व खोटे संत ह्यांत फरक तो काय कळणार! मी करीत होतों त्या भक्तीचा विषय जरी मूर्तिच होत्या आणि ती भावना जरी पोरकट होती तरी त्या सर्व भावना त्यावेळच्या मानानें अगदीं शुद्ध, निष्कपट आणि जोरदार होत्या एवढीच गोष्ट मुद्याची आहे. त्याचप्रमाणें ज्या ज्या कांहीं पुरुषांच्या समागमामुळें मला ह्या वयांत धार्मिक आनंद होत असे, त्या त्या पुरुषांचा खरा साधुपणा किंवा विज्ञान कोणत्या दर्जाचा होता हा मुद्दा गौण आहे. माझी श्रद्धा व प्रेम त्या त्या माणसावर बसत असे हाच मुद्दा मुख्य आहे. ह्याच दृष्टीनें पुढच्या आठवणींचें महत्व आहे. एरवीं त्यांत कांहीं विशेष अर्थ नाहीं. बाबांना देवळांचा व भजनांचा जरूर नाद होता, तसाच भटकणा-या साधु बैराग्यांचा आणि सिद्ध महंताचाही नाद होता, असें मी मागें त्यांच्या आठवणी देतांना सांगितलें आहे. त्यांनीं नादावून घरीं आणिलेल्या असल्या माणसांवरच साधू समजून माझीही श्रद्धा बसत असे. एरवीं अशा वयांत माझा इतर कोठल्या साधूंशीं परिचय घडणें शक्य असणार बरेंॽ

जटाधारी गोसावी
अघोरी पंथांतल्या एका जटाधारी गोसाव्याकडे बाबा एका काळीं फार जात येत असत. ह्यावेळीं मी हायस्कुलांत जात होतो कीं त्यापूर्वींचा हा काळ होता हें मला नीट स्मरत नाहीं. हा एका ठिकाणीं गुप्त होऊन दुसरीकडे प्रगट होतों, अशी कांहीं भाविक लोकांची समजूत झाली असावी. साधारणपणें हा बुवा गांवाबाहेर कोठल्यातरी झाडाखालीं धुणी पेटवून रात्रंदिवस अंगाला राख लावून बसलेला असे. तो बसल्या जागेचा कधीं उठतच नसे अशीही लोकांची समजूत असे. ह्याची मुद्रा प्रसन्न व बोलणें हेंगाडें मराठीच कां असे ना, पण प्रेमळ असे. हा एकाएकी एके दिवशीं दोन प्रहरीं आमच्या गोठ्यांतल्या एका अंधारी कोप-यांत उभा असलेला आम्हांला दिसला. बाबा जरी विश्वासू आणि आदरशील होते, तरी भलत्या सलत्या चमत्कारावर भुलून जाण्याइतकी त्यांची श्रद्धा आंधळी नव्हती. म्हणून त्या बोवाचें हें चमत्कारिक येणें बाबांना आवडलें नाहीं. त्यांनीं त्याला आपल्या ठिकाणीं पोचविलें. तरी पण विशेष न रागावतां त्या बुवाला रोज दोनप्रहरीं एक भाकरी व थोडी भाजी पाठविण्यास बाबांनीं आईस सांगितलें. हें अन्न रोज नेऊन पोचविण्याचें काम मजकडे होतें आणि तें मी आनंदानें करीत असें. ह्यांत मला आनंद तो कां वाटावा बरेंॽ लहान मुलाला असलीं कामें नियमानें करण्याची हौस असणें साहजिक मुळींच नाहीं. मला तर त्या साधुकडे जाऊन त्याचा समाचार घेणें, तो भुकेलेला गोसावी तें अऩ्न आतुरतेनें घेई म्हणून विशेषतः कळकळीनें तें पोचविणें; अन्न ज्या ताटांतून नेत असें त्यांत तो साधू चार दाळींबाचे दाणे, खोब-याचा लहानसा तुकडा, किंवा थोडीशी खडीसाखर प्रसाद म्हणून कांहीं तरी आपल्याजवळचें घालून ताट परत करीत असे - तो प्रसाद मी श्रद्धेनें घरीं भावंडांना आणून वाटणें वगैरें गोष्टी त्या लहान वयांत भक्तीच्याच द्योतक होत्या! केवळ भुकेलेल्यास अन्न देण्याची परोपकारी भावना किंवा साधुसमागमाची जाणूनबूजून आवड राखण्याची आध्यात्मिक भावनेला माझें तें लहान वय पात्र नव्हतें. पण ह्या दोन्हींच्या मधली एक स्थिति मी तेव्हां अनुभवीत होतों हें खरें. तिला काय नांव द्यावें हें मला आतां देखील नीट समजत नाहीं!

इतर बैरागी
मराठा जातींत कोणी तरी गोसावी गुरु करून घेण्याची परंपरा चालत आली आहे. नाशिक जिल्ह्यांतील त्र्यंबकेश्वर येथील विठ्ठलपुरी नांवाचे गोसावी माझे वडिलांचे गुरु होते. ते वृद्ध होते. त्यांचे शिष्य गोसावी ह्यांचा उपदेश मला आणि माझ्या भावाला बाबांनीं कान फुंकण्याचा विधि करून देवविला होता. हे गोसावी एक दोन वर्षांनीं आमचे घरीं फिरतीवर येऊन संभावना घेऊन जात. त्यावेळीं त्यांच्याशीं माझा लळा विशेष असे. तुळजापुरचे भोपे भवानराव कदम आमचे घरीं कुळदेवतेचा नवस वगैरे काय असेल तें घेऊन जाण्यास मधून मधून येत. तेही मला फार आवडत. पुढें इंग्रजी शाळेंत असतांना नाशिकाकडचे भगवानदास आणि माधवदास नांवाचे दोन वैष्णव बैरागी आमचेकडे वरचेवर येत असत. हे नुसते पांथस्थ या नात्यानें जमखंडीच्या कोठल्यातरी देवळांत उतरून बाजारांत भिक्षा मागून एक वेळ जेवून राहात. आमच्याकडून त्यांना कसलीही आकांक्षा नसे. तरी त्यांचा व आमच्या घरचा फार लोभ जडला होता. त्याचें विशेष कारण मी इंग्रजी शाळेंत जाणारा, मोठा समजूतदार, प्रेमळ मुलगा हें ओळखून, बाबा असोत नसोत, माझ्या भेटीला घरीं येऊन माझ्याशीं त्यांनी परिचय वाढविला होता. शेवटीं इंग्रजी ६ व्या ७ व्या इयत्तेंत असतांना बबलादीचे सिद्धांचें येणें जाणें फार झालें. त्यांचा माझेवरच नव्हे तर अखेरीस माझाही त्यांचेवर काय परस्पर परिणाम झाले हें मागें सांगितलेंच आहे.

योग्य पारख
देवपूजा, भजन, पोथीवाचन आणि साधूंची आवड वगैरे जे धार्मिक भावनांचे प्रकार आठवतील तसे जे मी वर सांगितले त्यावरून व आमच्या घराण्यांतील आजी आणि आई ह्यांचीं व्रतें आणि उपास ह्याविषयीं जी मीं हकिकत दिली तिच्यावरून आमच्या घराण्यांत हिंदु धर्माची जुनी परंपरा, आचारविचार आणि बाळबोधपणा कसा रुजला होता हें दिसून येतें. पण ह्यापेक्षां विशेष गोष्ट सांगावयाची ती ही कीं, जुन्या धर्माचे इतके तपशिलवार आचार आमचे घरीं चालत होते तरी केवळ कर्मठपणा, धर्मभोळेपणा, दंभ आणि दुराग्रहाचा पगडा आमच्या घरीं आईबाबांच्या वर्तनांत मला केव्हांच दिसून आला नाहीं. एकाद्या ढोंगी साधूचें कपट दिसून आलें किंवा कोणाही सांप्रदायिक अतिथीचा स्वार्थी मतलब दिसून आला कीं बाबांचा निस्पृहपणा उग्रस्वरूप धारण करीत असे. आल्या अतिथीची आमचे घरीं जरी शक्तिनुसार संभावना होण्याला कधीं चुकत नसे, तरी त्यानें एकादें दुर्वर्तन केलें किंवा त्याचा लोभी आणि मतलबी डाव दिसला तर लागलीच त्याची उलट दिशेनें संभावना करावयाला बाबा कधीं मागें घेत नसत! ह्यामुळें भलत्यासलत्या सालोमालो भटक्याला आमचे दारांत पाय ठेवण्यापूर्वीं विचार करावा लागत असे. आईच्या भक्तींत कोणताही वरपंग नव्हता. ह्या माझ्या वडिलांच्या स्वभावांतच माझ्या भावी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचीं बीजें पूर्णपणें आढळत आहेत. आईनें व्रतें जरी बरीच केलीं तरी अमक्या वेळीं अमका नवस केलाच पाहिजे, अमक्याला अमके दान दिलेंच पाहिजे असा हट्ट कधींच केला नाहीं. दोघांच्याही धर्मभावना साध्या, सहज आणि निर्हेतुक होत्या. आणि त्यांतच माझ्या ‘भावी’ धर्माचाच नव्हे तर माझ्या सर्व सामाजिक सुधारणांचाही उगम आहे.