माझी आई

प्रकरण ५ वें
[जन्म (अदमासें) १८४० — मृत्यु ८ फेब्रुवारी १९१०]

येथवर आठवणी लिहून कोणाचीच जन्माची किंवा मृत्यूची तिथि, महिना अगर निदान वर्ष तरी मीं कां लिहिलें नाहीं याचें कारण तें मला माहीत नाहीं. माझ्या बाबांचा चौकसपणा, सुसंस्कृतपणा इतका होता कीं, त्यांनीं आमच्या घरच्या पुरोहितांकडून घरच्या सर्व मुलांची जन्मपत्रिका ज्योतिषशास्त्रान्वयें वर्तवून ठेविल्या आहेत. सुदैवानें तेवढ्या तरी आम्हीं अद्यापि जपून ठेवल्या आहेत. मीं मोठा झाल्यावर मला आपली जन्मभूमि बदलावी लागली. इतकेंच नव्हे तर मी एवढी मोठी परीक्षा इतक्या मागल्या काळांत पास होऊनही आपल्या संसारांत लक्ष न घालतां आजन्म दारिद्र्याचें व्रत घेतलें. त्यामुळें व्यवहारांत मी बाबांपेक्षांही अधिक नालायक व निष्काळजी ठरलों. बाबांनीं कर्जाखालीं खानदानी घालविली तर मीं त्यांच्यापेक्षां सुशिक्षितपणाचा कांदा त्या मीं ती कधींच मिळविली नाहीं. किंबहुना खानदानीनें राहण्याला मी अपात्र ठरलों. तशांत कांहीं वर्षें मुंबईंत व नंतर पुण्यांत नेहमीं बदलणा-या भाड्याचे घरांत रहावें लागल्यामुळें बाबांच्या पोथीपुस्तकांची व कागदपत्रांची मी अक्षम्य हयगय केली आणि दैवहत असा मीं आतां आठवणी लिहीत बसलों आहें! फार तर काय मीं माझा स्वतःचा पत्रव्यवहारही जपून ठेवला नाहीं. ही चूक मला खेद देत आहे.

बाबांचें लग्न
माझी आई आलगूर या गांवीं जन्मली. ती आपल्या आईबापांची बहुतेक पहिलीच मुलगी असावी असें तिच्या बोलण्यावरून दिसतें. नंतर कांहीं मुलांनंतर आतां हयात असलेले आमचे मामा रामजीबावा व शेवटची मुलगी आमची मावशी तानूबाई ही होय. आमच्या आईची पहिली मुलगी बाळाबाई हिचेपेक्षां माझा मामा रामजी हा लहान असावा असें दिसतें. सोमा मुलगा अगदीं लहान असतांना आलगूरचे आजोबा एक वर्ष गुडघी रोगानें आजारी पडले. आणि त्या आजारांत चूल व मूल यांची सर्व जबाबदारी माझ्या अगदीं लहान असलेल्या आईवर पडली असें वर सांगितलेंच आहे. आईचें लग्न ह्या आजारापूर्वीं झालें कीं मागावून झालें हें कळत नाहीं. माझ्या बापाच्या घरची स्थिति जर चांगली होती आणि बाबा जर शिकलेले व हुशार होते तर माझ्या आजोबांनीं अशा गरीब व लंगड्या मनुष्याशीं सोयरीक कां केली बरेंॽ यावरून वाटतें माझ्या आई-बाबांचें लग्न अगदीं लहानपणीं म्हणजे माझ्या बाबांच्या शिक्षणापूर्वीं झालें असेल. म्हणजे माझी आई सात वर्षांची व बाबा बारा वर्षांचे असतील हा सर्व केवळ अजमासच आहे. या अजमासाला आणखी एक कारण आहे. माझे बाबा लहानपणीं फार खोडकर असत. विशेषतः त्यांना झाडावर चढण्याचा नाद असे. माझ्या आजोबांच्या मळ्यांत एक मोठे केवड्याचे झाड होतें. केवडा काढावयास जाऊन बाबा लहानपणीं त्या झाडावरून पडून मरतां मरतां वाचले. तेव्हांपासून आमच्या आईनें हरताळिकेचें व्रत घेतलें असें ती लहानपणीं सांगत असे. तिचें लग्न होण्यापूर्वी जर बाबा पडले असते तर तिनें हें व्रत घेण्याचें कारणच नाहीं. लग्नाचें वय मुलीचें ७।८ व मुलाचें १२।१३ हें सामान्यतः असतें. निदान ह्यापेक्षां जास्त तितक्या मागल्या काळांत असणें संभवनीय नाहीं. झाडावरून पडण्यालाही १२ वर्षांचें वय – २।३ वर्षे पुढें मागें संभवतें.

यमुनाबाई
माझे बाबा आपल्या आईप्रमाणें काळे व रूपानेंही आपल्या आईचे चेह-याचे होते. माझी आई तिच्या आईप्रमाणें फारशी गोरी नसली तरी थोडी उजळ निमगोरी आणि चेह-यानें आपल्या बापासारखी होती. अर्थात् आईला लिहितांवाचतां येणें शक्य नसलें तरी वैष्णव ब्राह्मणाचें वळण, सात्विक राहाणी, शाकाहार, घरकामांत कष्टाळूपणा व हुषारी वगैरे गुणांनीं मंडीत होती म्हणून बाबांच्या वडिलांनीं हा जोडा पसंत केला असावा. ह्या दोन्ही घराण्याचें ब्राह्मणी वळण व माझ्या बाबांचें सुशिक्षण यामुळें माझें शिक्षण इतकें झालें. इतकेंच नव्हे तर शेवट पर्यंत माझा सहवासही ब्राह्मणाशींच घडला.  आईची कानडी भाषा अगदीं शुद्ध वैष्णव ब्राह्मणाची तर बाबांची मराठी भाषा कर्नाटकांतील शुद्ध देशस्थ ब्राह्मणाची. त्याचप्रमाणें पेहराव; व तशाच संवयी. गोपीकृष्णावरची किती सुंदर सुंदर कानडी गाणीं व पुरंदर विठ्ठलाचीं भजनें आई म्हणून पाळण्यांत लहानपणीं आम्हांला निजवीत असे. तिचा गळा अकृत्रिम फार गोड, म्हणण्यांत स्वाभाविक करुणरसाचा उठाव असे. मोठेपणींही आम्हाला हीं गाणीं व गोपीकृष्णाच्या गोष्टी सांगून आम्हां भावंडांना असह्य कठीण दारिद्र्याच्या वेदना हळूवार करीत असे. व्रतें, उपवास व इतर गृहकृत्यें ब्राह्मणाप्रमाणें करण्याला आई आलगुरांत लग्नापूर्वींच शिकली असावी. शिवाय बसवंतरावाच्या सुशिक्षित व पाणीदार मुलाला दिली म्हणून कदाचित् ह्या कुळकर्ण्याकडच्या बाया मंडळींनी या लहान यमुनेला अधिकच काळजीनें घरगुती वळण लावणें शक्य आहे. कारण माझी आजी गंगाबाई हिच्या अंगांत कांहीं हें वळण देण्याची करामत नव्हती. इकडे बसवंतराव जरी मोठे पाणीदार व रुबाबदार मराठे होते, तरी त्यांच्यांत आमच्या बाबांना कारकुनी बाण्याचें वळण लावणें शक्य नव्हतें. केवळ ह्या कोवळ्या जोडप्याला ब्राह्मणी संस्कृति सहानुभूतीनें व योग्य दक्षतेनें तीं एकमेकांस विवाहपाशानें बद्ध होण्यास योग्य ठरली. ही एक भाग्याची विधिघटनाच नव्हे तर काय! माझ्या आईबापांचा वैवाहिक संबंध अगदीं आदर्शवत् मला ३७ वर्षे पहावयास मिळाला. माझ्या आजीचे दागिने तितक्या मागील काळीं कर्नाटकी ब्राह्मणेतरांप्रमाणें किंचित् ग्राम्य असत. पण माझ्या आईचे दागिने मराठा पद्धतीचे व सर्व सोन्यामोत्याचे वजनदार जडावाचे होते. केवळ सांपत्तिक दृष्ट्या पाहातांही माझे वडील कर्ते झाल्यावर आजोबापेक्षां अधिक संभावित व श्रीमंत स्थितीला पोहोंचले. पण आजा आजीचे मागें त्यांनीं आपल्या निष्काळजीपणानें म्हणा किंवा धार्मिकपणानें म्हणा आपल्या घराची धूळधाण केली, इतकेंच नव्हे तर, आम्हांला अन्नालाही महाग केलें. फार काय आईची जोड व एक प्रकारचा निर्बंध नसता तर बाबा कदाचितं आम्हांला कोणावर तरी टाकून बैरागी होऊन गेलेही असते. म्हणून आम्हीं सर्वस्वी आईचें ऋणी आहोंत.

सासुरवास
माझ्या आईच्या अंगी ही दैवी पात्रता येण्याला तीन प्रकारचे टाकीचे घाव तिला अगदीं लहानपणापासून तो अगदीं मरणाचें दारापर्यंत जवळ जवळ ७० वर्षें सोसावें लागले. प्रथम तिचे माहेरचें दारिद्र्य आणि बाप लंगडा व आई कर्तृत्वहीन असल्यामुळें, माझ्या आईचे झालेले हाल. दुसरें तिचा परकियांचें म्हणजे वैष्णव ब्राह्मणांचें लागलेलें वळण आणि तिसरें तिला कठीण सासुरवास. पहिल्या दोन्हींची कल्पना वरील माहितीवरून येण्यासारखी आहे. तिसरा जो सासुरवास त्याच्या गोष्टी आईनें आमच्या लहानपणीं ज्या उठतां बसतां सांगितल्या त्या ऐकून आमचें कोवळें हृदय तर करपत होतेंच; पण अद्यापि त्यामुळें सामान्यतः स्त्रीजातीचे हाल विशेषतः हिंदुस्थानच्या कन्यांचें दुर्भाग्य कळून येतें. आमच्या आजीचा-संताबाईचा-स्वभाव खाष्ट होता हें वर सांगितलें. ती फार क्रूर होती अशांतला प्रकार नव्हता, पण अगदीं हेकड, सहानुभूतिशून्य आणि पक्षपाती होती. तिला दोनच मुलें होतीं व त्यांतल्या त्यांत तिचें प्रेम तिच्या मुलीवर, आंबाबाईवर - जास्त होतें. गरिबीमुळें ही मुलगी आमच्या घरींच राहात असल्यामुळें सासूच्या कहरांत नणंदेची भर पडत असे. त्यामुळें ती सुनेला मरे मरेतों राबवी हें त्याकाळीं साहजिक असें.

आमचा रयतावा
आमचे घरीं रयतावा मोठा होता. दावणींत आठ बैल औताचे तर असतच. शिवाय गाई, म्हशी आणि वासरांचें खिल्लार असे. आजी रानांत गड्यांच्या बरोबर सर्व काम स्वतः करी. तिचा भाऊ व्यंकप्पाही राबत असेच. माझ्या आईला शेतांत मात्र जावें लागत नसे, पण घरकामाचा बोजा लहानपणापासून एकटीवरच पडे. नणंद होती तिचा उपयोग चहाड्या सांगण्यापुरताच. आजोबा, आजी, बाबा, नणंद, आंबाबाई, केव्हां केव्हां तिचा नवराही, व्यंकप्पा, त्याचा मुलगा शिद्दु, आम्ही दोन तीन मुलें, आंबाबाईची मुलगी भागूबाई, दोन चार गडीमाणसें शिवाय अतिथी, बैरागी, पाहुणे; इतका हा नेहमींचा राब ! सकाळीं चार वाजल्यापासून दळणाची घरघर सात वाजेपर्यंत चाले. मग पाणी विहीरींतून आणणें, स्वयंपाक, भांडीं धुणें, जेवण होतें न होतें तोंच सूत कातणें, मग इतक्या बैलांच्या शेणाच्या गोव-या करणें, शिवाय रात्रीचा स्वयंपाक. श्रीमंत आप्पासाहेबांचे राहणें जमखंडीहून १॥ मैलावर डोंगरांत रामतीर्थ नांवाचे ठिकाणीं असे. तें काम आटोपून यावयाला रात्रीं ११!१२ वाजत, तोंपर्यंतही घरचें काम आटपत नसे. बाबा कामावरून लौकर येत नसत. पुन्हा भल्या सकाळीं दळणाला उठावें लागत असे. बाबांचे आणि आजोबांचें वैभव असतां तरुण सुनेला इतकें काम कांॽ तर त्या काळची साधी आणि कष्टाळू राहणी, आणि विशेषतः आजीचा हेकडपणा. आजोबांना हा सासुरवास आवडत नसे. पण नित्याची कटकट करणेंही त्यांच्या सुखवस्तु स्वभावाला आवडत नसे. नशीब आईचें!

हालअपेष्टा
नुसता कामाचाच भार नसे. आईला एकदां जी अगदीं लहानपणीं सासरीं आणली होती ती माहेर ६ मैलांवर असूनही २।४ वर्षांत एकदांही तेथें पाठविण्याची मारामार पडूं लागली.  कारण माहेरचीं माणसें गरीब, आईचे बाळंतपणही करण्यास असमर्थ. घरांत वस्त्रालंकाराची रेलचेल असूनही आईला ती घरांत घालून कौतुक करण्याची सहृदयता आजींत नसे. इतकेंच नव्हे तर आपल्या लाडक्या मुलीला तितकेच दागिने नाहींत म्हणून कांहीं अंशीं मत्सरही आड येत असावा. हिंदु सासूरवासाचीं नाजूक कारणें इतकीं आहेत कीं जुन्या वळणांतील सर्व लोकांना सुद्धां त्यांची मीमांसा करतां येत नसते. आमच्या बाबांचाही स्वभाव, फार रागीट असे. मुलें होऊं लागेपर्यंत एक प्रकारचा जाच व मुलें होऊं लागल्यावर तो एक दुसराच भार. आमच्या आईला एकंदर वीस मुलें झालीं ( एक खंडीभर अशी म्हण आहे.) त्यांपैकीं एकाच वेळीं पांचांहून जास्त केव्हांच नव्हती. ह्यावरून निदान पंधरा तरी मुलांचा शोक आईला करावा लागला. आणि आमच्या आईच्या प्रेमाला सीमाच नाहीं. विशेषतः दोन मुलें मोठीं होऊन वारलीं. माझा मोठा भाऊ त्याचें नांव परशुराम (लाडकें नांव भाऊच होतें) हा आठरा वर्षांचा होऊन वारला. आणखी सर्वांत धाकटी बहीण चंद्राबाई नांवाची सुमारें १४।१५ वर्षांची होऊन वारली. भाऊ पटकीनें दोन दिवसांत तडकाफडकी वारला. त्याचा शोक तिनें कित्येक वर्षें इतका केला कीं दगडालाही पाझर फुटावा. पुढें आईचें म्हातारपणी चंद्राबाई क्षयानें झिजून वारली. तिचा शोक आईला मरेपर्यंत पुरून उरला! घरचें काम इतकें पडे की, त्याचा एकदां हृदयद्रावक परिणाम घडला. मी ५ वा मुलगा, माझ्या अगोदरचा कृष्णा म्हणून एक मुलगा होता. तो रंगानें उजळ आणि पिंडानें गुटगुटीत होता. सुमारें ६ महिन्यांचा असतां तो आईच्या अंगाखालीं चिरडून झोपेंतच मेला तें तिला कळलेच नाही. त्याला पाजीत असतां आईला गाढ झोंप लागून, मुलाचा दम कोंडून सकाळीं मेलेला आढळला! मग त्या आकांताला व आईच्या हालाला कोण सीमा असणार !! हा प्रकार इ. स. १८७०।७१ मध्ये घडला असला पाहिजे. आजा आजी असेंतोंपर्यंत म्हणजे इ.स.१८८० पर्यंत तरी आईला स्वातंत्र्य म्हणजे काय तें माहीत नव्हतें. कोणत्या अस्सल हिंदु सुनेला हें स्वातंत्र्य असणार! आणि आजी गेल्यावर लवकरच आमच्या घरची सुबत्ताही तिचे बरोबरच गेली. कारण बाबांनीं माझ्या जन्माचे अगोदरच म्हणजे इ. स. १८७३ चे सुमारासच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. इतकेंच नव्हे तर त्यांनीं त्यानंतर कोणताच किफायतीचा धंदा केला नाहीं. गड्यामाणसांवर शेती कसची चालते. खर्च बिनहिशोबी. एकूण आईला घरीं स्वातंत्र्य मिळतें न मिळतें तोंच आठरा विश्वें दारिद्र्यानें गाठलें!

तान्याक्का
माझी आजी संताबाई वारल्यावर दोनतीन वर्षे माझ्या आईचीं फार हालांत गेलीं. त्यावेळीं माझी बहीण मुक्ताबाई (जनाक्काच्या पाठीवरची, आठवी मुलगी) हिचे जन्मापूर्वीं (आई गरोदर होती) जवळ जवळ एक वर्षभर आई हिंवतापानें बेजार होती. त्यावेळीं मी नुकताच मराठी शाळेंत जावयास लागलोंच असेन. बहुतकरून तें १८८०–८१ साल असावें. आईला रोज दोनप्रहरीं कडकडून हींव भरत असे. तिला तहान फार लागे. तेव्हां पाणी तापवून देण्यालाही घरीं कोणी नसे. बाबा कोठें तरी बाहेर जात असत, मला माहीत नाहीं. माझी बहीण जनाक्का २।३ वर्षांची असेल. अशानें आई फार खंगली होती. शेवटीं अशांतच बाळंतपण आलें. आई सर्व महिने आजारी असल्यामुळें जन्मलेलें मूल तान्याक्का अर्थात अशक्त व रोगीच असणार. या आजारामुळें तान्याक्काच्या मेंदूवरही परिणाम झाला होता. ती फार भोळसर होती.

जनाक्का
माझा भाऊ परशुराम ह्याच्या पाठीवर आम्ही चौघे मुलेंच झाल्यामुळें व सातवी मुलगी जनाक्का जन्मल्यामुळें ही आमच्या घरांत पहिलीच मुलगी जणूं, म्हणून जनाक्का ही आमच्या सर्वांची लाडकी होती. विशेषतः ती माझ्या बाबांची मोठी लाडकी होती. ती लहानपणीं अंगानें गुटगुटीत, बुद्धीनें चुणचुणीत, आणि भांडखोर व बोलकी असे. दिवसांतूनच काय पण तासांतूनहि आम्ही कितीदां तरी भांडत असूं. कारण दोघांचाही स्वभाव तापट, हावरा, अधाशी, खोडकर व दोघेंही आम्हीं बाबांचे लाडके, त्यामुळें आमच्या कागाळ्यांना सीमाच नसे ! आमची वर्दळ आईकडे गेली कीं, स्वयंपाकघरांतलें काम सोडून तिनें आम्हांला धमकावयाला सोप्यांत बाहेर यावें. पण आईचा स्वभाव शांत व सहनशील असल्यानें आम्हां दोघालांही तिच्या रागाचा धाक मुळींच वाटत नसे. पण बाबांचा नुसता त्यांच्या नांवाचाही आम्हांस जबर धाक असे. ते घरीं असेतोंपर्यंत त्यांच्यासमोर उभे राहण्याचीही आम्हांला छाती होत नसे. ते बाहेर गेलें कीं, ताबडतोब आमच्या धांगडधिंग्याला सुरवात होई. माझा मोठा भाऊ माझ्या आईसारखा शांत व मवाळ होता. तो आमच्यांत फार मिसळत नसे. धाकटी तान्याक्का थोडी मोठी झाल्यावर आमचेबरोबर खेळावयास येई. पण ती फारच भोळसर असल्यामुळें आम्ही सांगूं तें तें ती मुकाट्यानें करी. दोन भाऊ व दोन बहिणीच काय तीं आम्ही भावंडें घरीं लहानपणीं एकत्र समागमांत होतो. माझा मोठा भाऊ इ.स.१८८५ सालीं पावसाळ्यांत पटकीच्या रोगानें वारला. त्यावेळीं गांवांत ही साथ बरीच होती. म्हणून जमखंडीच्या गांवक-यांनीं मरीआईची मोठी यात्रा केली. त्यावेळीं कित्येक रेडे, पुष्कळशीं बकरीं व कोंबड्यांची तर गणतीच नाहीं, इतक्या प्राण्यांचा वध झाला!

आमचा वाडा
इतकीं मुलें लहानपणीं वारण्याचें कारण आमच्या वाड्याची आरोग्याच्या दृष्टीनें परिस्थिती वाईट होती. आमचे घराचे पश्चिमेला लागून एक मोठें तळें होतें. त्याच्या खालच्या सखल भागांत आमचा वाडा असे. सांडपाणी जाण्याला कोठें वावच नव्हता. दक्षिणेलाहि आमच्या घराचे मागें उंचवटाच होता. स्वयंपाकघरांत एक न्हाणी होती व बाहेर सोप्याचे खालीं, मोठ्या दरवाजाला लागूनच एक दुसरी न्हाणी होती. पण दोहींचेंही सांडपाणी दोनचार हातांवर जमिनींतच जिरत असे. अर्ध्या घरांत अंधार, ओल व कोंदट हवा असे. मोठा मुख्य दरवाजा उत्तरेकडे तोंड करून होता. व त्याच्या आंत थोडें आंगण व थोडी पडवी होती. हवा आणि उजेड यावयाला काय ती एवढीच वाट होती. दक्षिणेच्या बाजूला तीन खिडक्या होत्या. त्या लहानच होत्या व त्या बाजूला गांवचे लोक शौचास बसत, म्हणून त्या आम्हांला झाकाव्या लागत. उजेडाला साणी राखली होती. त्यांतून दोनप्रहरीं ऊन पडे, पण हवा येणें शक्य नसे. आरोग्याचे दृष्टीनें हें घर अतिशय वाईट असे. मोठ्या दाराच्यापुढें सुमारें एक एकराचें आंगण असे. त्यांत उकिरडे, कडब्याच्या गंजी, गोव-याचे हुडवे, शेणाचे ढिगारे असत. वायव्य कोनास एक पेवाचा पायखाना असे. त्याचा उपसाही वेळेवर होत नसे. एवढेंच बरें होतें कीं, आमच्या वाड्याच्या दक्षिण, पश्चिम व उत्तर बाजूनें ब-याच अंतरापर्यंत दुस-या कोणाचींही घरें नसत. पश्चिमेच्या बाजूला तर मोठें विस्तीर्ण तळें (लक्कन केरी नांवाचें) आणि त्याच्या पश्चिमेस मोठा डोंगरच होता. आमचा वाडा गांवाच्या पश्चिम हद्दीवरचा शेवटचाच होता. वाड्याबाहेर जरी मोकळी हवा मुबलक होती तरी आंतली स्थिति अपायकारक होती. बाळंतपणांत बाळंतिणीचे खोलींतच एक खड्डा खणून त्यांतच बाळंतिणीला १०।१२ दिवस न्हाऊ घालीत. अशा स्थितींत इतकीं मुलें लहानपणींच वारलीं हें आश्चर्य नसून आम्हीं ५।७ जण तरी कसें वांचलों हेंच आश्चर्य होय.

आईच्या गोष्टी
दर दुसरें वर्षीं आमच्या आईचें बाळंतपण हें ठरलेलेंच असे. आणि त्यावेळीं मागलें मूल कांहीं जिवंत नसे. बाळंतपण किंवा मुलांचा आजार व मरण याखालीं माझ्या आईची सर्व शक्ति खचली. तरीपण मुलांचा कंटाळा किंवा संसाराचा तिटकारा-किंबहुना दुःखाचा किंवा निराशेचा एक उद्गारही कधीं आईच्या तोंडांतून आमच्या कानांवर आला नाहीं. उलट दारिद्र्याच्या असह्य वेदना, नव-याचा रागीट स्वभाव व मुलांचा जोजार सोसूनही; आम्हा लहानग्यांना नेहमीं आपल्या माहेरच्या सुखदुःखाच्या गोष्टी रसिकपणानें सांगून आई आमची गोड करमणूक करीत असे. आईच्या गोष्टी व गाणीं हाच आमचा मोठा मेवा होता. तिची आनन्दी आणि विनोदी वृत्ती हीच आमची विश्रांति होती. तिच्या गोष्टीची आम्हांला पुढें पुढें चटच लागली. इतकी कीं, जर भूक लागली असली, स्वयंपाकला अवकाश असला किंबहुना, भाकरीबरोबर खावयास चांगली भाजी नसली तर आम्हीं आईच्या काठवटीभोंवतीं जमून तिला गोष्टी सांगण्यास लावीत असूं. मग तिनें आम्हांस अशा प्रेमळ कहाणींत गुंतवावें कीं, स्वयंपाक केव्हां झाला, आम्हीं काय खाल्लें कीं मुळींच कांहीं खाल्लें नाहीं याचें आम्हांस भानच रहात नसे. बाबा एखादे वेळीं रात्रीं उशीरा घरीं आले कीं, आमच्या गोष्टीची मेजवानी लांबे! केव्हां केव्हां आम्हीं वन्समोअरही म्हणत असूं! एकंदर आईच आमची खेळखडी होती. आम्हांला बाहेरच्या खेळगड्याची जरुरीच लागत नसे. आमचा वाडा एकीकडचा, अंधारी व भयाण असल्यानें लोकांच्या नजरेंत तो भुताटकीचा एक मोठा अड्डाच होता. शिवाय आमचे आजूबाजूचे सर्व घरांतून, किंबहुना आमचे सर्व मराठा जातींतही आमच्या इतकें सुशिक्षित व वजनदार घराणें नसल्यानें भोंवतालच्या लोकांना आमचा मोठा दरारा वाटत असे.

आत्मसंतोष
आमच्या बाबांचा स्वभाव रागीट, सडेतोड, करारी असल्यानें व आमची आई आपल्या आईप्रमाणेंच, कधीं आपल्या दाराच्या बाहेर कामाशिवाय पाऊलही टाकणारी नसल्यामुळें आमचे घरीं शेजा-याचा विनाकारण सुळसुळाट कधीं नसे. कितीही त्रास असो व कसलाही प्रसंग येवो, बाबा घरीं असोत नसोत, आई आम्हां चौघां पिलांस एकाद्या पक्षिणीप्रमाणें पंखाखालीं घेऊन आनन्दानें बसे. व आम्हांलाही तिच्या पंखाशिवाय दुसरा आसरा नको असे. आजा-आजी असेतोंपर्यंत ज्या वाड्यांत मोठ्या दणक्यानें रयतावा चालत असे तेथें त्यांच्यामागें थोड्याच वर्षांत सर्व वैभव होरपळून; रानांत शेत नाहीं, गोठ्यांत गुरें नाहींत, घरांत माणसेंही नाहींत अशी ओसाड स्थिति झाली. तरी बाबांना संसाराची काळजी म्हणून कसली ती लागेना, किंवा आईच्या स्वभावांत कडूपणाची कधीं छटा दिसून आली नाहीं. ह्या धन्य संतोषाचा माझ्या मनावर जो परिणाम झाला, मला जे बाळकडू मिळाले तेच माझे अमुल्य भांडवल. माझें पुढील आयुष्याचे तारूं अनेक तुफानांत जें सुरक्षित चाललें त्याला आधार काय ती माझ्या आईबापाची धन्य आत्मसंतुष्ट वृत्ति.
सोळा वर्षें माझ्या बाबांनीं अगदीं कांहीं धंदा रोजगार न करितां घरीं निजून काढलीं. या सोळा वर्षांत घरची शेती-भाती, गुरें, गडी-माणसें आईच्या अंगावरची सर्व चिजवस्तु फुटक्या घड्यांतील पाण्याप्रमाणें गळून व झिरपून माझ्या नजरेसमोर गेली. मी अगदीं लहान असतांना माझ्या हातांत सोन्याचीं कडीं, कमरेस सोन्याची झिळीमिळी करगोटा, गोठ्यांत मोठमोठे धिप्पाड बैल आणि शेतांत फार दिवसांचे इमानी नोकर पहात असे. दोहोंकडच्या आजाआजीच्या कुशींत लडिवाळप्रमाणें लोळलों होतों. सणवार, उत्सव, समारंभ पाहात असे. घरांत पाहुण्यांची व आश्रितांची मांदी जमत असे. घरीं पुराणिक, पुरोहित, भजनीमंडळी, साधु, संत, फकीर, बैरागी, तडीतापडी यांची रीघ लागे. हळूहळू मी नुसत्या दोनतीन भावंडांतच सुख मानून माझ्या आईभोंवतीं घिरट्या घालून सुखानें राहण्यास शिकलों. हा कोणाचा प्रभावॽ केवळ माझ्या आईच्या दैवी संतोषाचा!

वाशांचें सरपण  
बाबा देवळांतून, मठांतून, कोठें तरी भजनाला जात. घरीं आले तर निजून रहात. जागेपणीं त्यांचेसमोर उभे रहाण्याची आम्हां कोणाची छाती नसे. मग आम्ही चार मुलें व आई हेंच पंचायतन आत्मसंतोषाचें दिव्य आगर होतें. आमच्या भोंवतालचें भंगुर वैभव कसें पार नाहींसें झालें याचें एकच हृदयद्रावक उदाहरण सांगतों. आमच्या रहात्या घरांतील माया तर सर्व गेलीच; पण आमच्या बाहेरच्या विस्तीर्ण आंगणांत चौफेर कुळवाडी होती. म्हणजे भोंवतालीं खोल्यांतून गरीब भाडोत्री कुटुंबें रहात असत. त्यांच्यापासून बाबा कांहीं भाडें घेत असतील असें मला वाटत नाहीं. कारण त्यावेळीं घराला भाडें घेणें लाजीरवाणीच गोष्ट समजत. हळूहळू हीं सर्व कुळें परागंदा झालीं. त्यांच्या धाबीवजा खोल्यांच्या दुरुस्तीचा त्राण आमच्यांत उरला नाहीं. स्वतः आमच्या चुलीस जळणाचीही पंचायत पडूं लागली. मग काय विचारतां ! या पडक्या खोल्यांच्या मोठ्या तुळ्या व वासे आम्ही एका सोळा वर्षांत सरपण करून जाळलें. 'विठू, वासे आण' म्हणून आईनें सांगण्याचा अवकाश कीं, धांवलोंच मी, एका हाताने शेंडी व दुस-या हातानें लंगोटीचें शेपूट ओढीत वासे ओढावयाला. पांडवप्रतापांतील द्रौपदीवस्त्रहरणाचें चित्र मी पोथींतून पाहिलेंच होतें. दुःशासनाचा आविर्भाव आणून मी आमच्या जुन्या वाड्यांतील आंगणाचे बाजूच्या धाब्याचे वासे ओढीत असे आणि मोठ्या फुशारकीनें आईला जळण आणून देत असे. हा माझ्या बाबांचा संसार !

करवीरची यात्रा
घरचें आणि संसाराचें कांहीं होवो, बाबांच्या देवदेवतेमध्यें व भजनपूजनांत कांहीं खंड पडला नाहीं. आजी वारल्यावर दोनतीन वर्षांनी बाबांला दत्ताच्या उपासनेचा नाद लागला. घरीं श्रीगुरुचरित्राच्या पोथीचें पारायण चाललेलें. बाहेरची भाविक मंडळी ऐकावयास येत व बाबा मोठ्या खड्या आवाजांत पोथी वाचून अर्थ सांगत. जमखंडींत काण्णवआळींत एक दत्ताचें देऊळ आहे. तेथें बाबा सायंकाळीं भजनाला जात. याचवेळीं नरसोबाची वाडीची आणि कोल्हापूरच्या यात्रेची टूम निघाली. त्यावेळीं अद्यापि आमच्या घरची गाडीबैल, गडीमाणसें होतीं. बाबा, आई, आम्ही चार भावंडें कदाचित् एकादें पांचवें तान्हें मूल, शिवाय जिऊबाई नांवाची काण्णवआळींतील एक विधवा ब्राह्मणाची बाई ( ही आमच्या घरची पुरोहित चंद्रभट डेंगरे यांची बहीण होती) व आमचा तुकाराम नांवाचा मराठा गडी इतके जण आमच्या स्वतःच्या गाडींतून कोल्हापूरचे महालक्ष्मीचे यात्रेस निघालों. वाटेंत अथणी, शेडवाळ, कागवाड, कुरुंदवाड, मिरज, सांगली, हातकणंगळें वगैरे लहानमोठीं गांवें पाहिलीं. नरसोबाच्या वाडींत श्रीदत्ताची यात्रा केली.
एका ब्राह्मणाचे घरीं उतरून देवाचा नैवेद्य व ब्राह्मणभोजन केलें. कोल्हापुरास गांवाबाहेर पूर्वेकडे एकवेरीचें देऊळ आहे. त्याच्या ओवरींत तीन दिवस उतरलों होतों. कोल्हापूरचें राजधानीचें वैभव आणि आंबाबाईचें भव्य देऊळ, त्याचें महाद्वार, कोल्हापुरांतील पाण्याचे नळांना सुंदर गायमुखें लावलेलीं, रंकाळे व पदमाळे हे तलाव या सा-यांचा मनावर चांगला ठसा उमटला. एकवेरीं देवळांतील आंगणांत एक मोठा विस्तीर्ण चबुतरा आहे. त्यावर खेळत असतां तेथील एका मुलाशीं भांडण होऊन माझी मारामारी झाली. तेव्हां "विठ्या, तूं कोठें गेलास तरी तुझी आगळीक कांहीं थांबत नाहीं ना रे." असें म्हणून आईनें मला त्या मारामारींतून सोडविलें.