पोरवयांतील माझी धर्मभावना

प्रकरण १८ वें
प्रस्ताव
हायस्कूलचा काळ इ. स. १८९१ अखेर माझ्या वयाचीं आठरा वर्षें म्हणजे माझें पोरवयच म्हणावयाला हरकत नाहीं. तेथपर्यंत माझा अभ्यास, खेळ, खोड्या, सोबत्यांचा सहवास व माझा एकांत वास वगैरे गोष्टी उघडपणें मीं सांगितल्या. आतां जी धर्मभावनांची आठवण सांगणार आहें तो विषय गंभीर आहे इतकेंच नव्हे तर तो माझ्या चरित्रांतला आत्मा आहे. धर्मानें माझ्या आयुष्याचा प्रवाह-निदान त्याची दिशा तरी-पुढें पार बदलली. अशा महत्त्वाच्या विषयासंबंधी लिहिण्यापूर्वीं धर्माविषयीं माझी दृष्टि कशी आहे तें सांगणें जरूर आहे. मी केवळ आठवणी व मागील अनुभव लिहित असतां मध्येंच माझी आतांची दृष्टि किंवा विचार देणें अगंतुक विषयांतर आहे, हें मला कबूल आहे. पण माझी दृष्टि समजल्याशिवाय मी धर्माविषयीं जें लिहीन तें वाचकांस न समजतां कदाचित गैरसमज होण्याचा संभव आहे. म्हणून हे किंचित् विषयांतर क्षम्य आहे असें मला वाटतें. इतर गोष्टी वेगळ्या आणि धर्म ही बाब वेगळी अशी पुष्कळ सूज्ञांचीही समज असते. पण इतर गोष्टींप्रमाणेंच मनुष्यमात्रांत धर्माची जी उपजत बुद्धि आढळते तीही परिणति व विकासाचाच विषय आहे असें मला वाटतें. म्हणजे तीही नैसर्गिक नियमांना अनुसरूनच उपजते, वाढते आणि कदाचित् लयही पावते. खाणें, पिणें, वाचन, अभ्यास, मैत्री, वैर, खेळ, खोड्या, संपत्ति, विपत्ति वगैरे गोष्टी केवळ निसर्गाच्या नियमांप्रमाणें घडतात. त्यांना कांहीं ईश्वरी प्रसादाची किंवा प्रेरणेची गरज नाहीं. मात्र धर्माच्या जागृतीला आणि वाढीलाच काय ती ईश्वरी कृत्याची जरूरी आहे, असें मला वाटत नाहीं. अशी जरूरी माझ्या धर्मबुद्धीला असेल तर ती माझ्या पाळण्यांतल्या खेळांला आणि पोरकट खोड्यांना कां नसावीॽ मीं जें बरें केलें असेन, तेवढीच नेमकी ईश्वरी कृपा आणि वाईट किंबहुना बरेंही नव्हेत आणि वाईट नव्हेत अशा सर्व एरवी मामुली गोष्टींला मात्र मीच जबाबदार, असें माझें मत नाहीं. तर असें भोळसर मत सर्वज्ञ परमेश्वराचें कोठून असणारॽ आपल्या चारित्र्याबद्दल व्यक्तीच सर्वस्वी जबाबदार असेंही माझें म्हणणें नाहीं. जशी व्यक्ति जबाबदार आहे तसाच त्या व्यक्तीचा अनुवंश (पूर्वपरंपरा) आणि परिस्थिति (हिच्यांतच त्या व्यक्तीचें शिक्षण, नातलग, स्नेही, वैरी वगैरे सर्वच नैसर्गिक बाबींचा समावेश होतो.) ह्याही गोष्टी जबाबदार आहेत. एकूण मनुष्याच्या चारित्र्याबद्दल व्यक्ति आणि निसर्ग हीं दोनच कारणें पुरीं असून, ईश्वराला त्यामध्यें खेचणें अनावश्यक दिसतें. असो. ह्यापेक्षां जास्ती खोल विचारांत शिरण्याचें हें स्थळ नव्हे. दांडगाई, मारामारी आणि माझ्या दुष्ट खोड्यांच्या आठवणी ज्या लेखणीनें आणि ज्या ओघांत लिहिल्या त्याच लेखणीनें आणि ओघांत मी माझ्या धर्माचाही विषय लिहितों हें पाहून कोणा वाचकाचें कोंवळें मन प्रथमच बिचकूं नये; आणि पुढेंही ज्या सहज आणि मोकळ्या मनानें माझीं व्यंगें सांगितलीं तशाच मोकळेपणानें माझ्या धार्मिक भावनांचा अहवाल मी सांगत आहें हें वाचून कोणाच्या कोंवळ्या विचारांना धक्का लागूं नये म्हणून मध्येंच ही थोडी प्रस्तावना केली आहे.

स्पष्टोक्ति
शिमग्यांतल्या माझ्या ९।१० वर्षांच्या वयांतल्या अश्लील लीला वाचून किंबहुना १४।१५ वर्षांच्या वयांत जुन्या श्रृंगारिक कादंब-या वाचून हुरळलेल्या माझ्या मनाला, “कारंज्याचे तुषार वाटती अग्निकणाचे परी” हा भपकेदार अनुभव आला; अशी माझी स्वतःचीच जबानी वाचून कोणी सूज्ञ वाचक, मी त्यावेळीं मोठा बदफैली होतों असें अनुमान काढणार नाहीं. त्याचप्रमाणें पुढें ज्या मी माझ्या पोर धर्माच्या कहाण्या सांगणार आहें त्या वाचून मी जन्मसिद्ध संत-शिरोमणी होतों, असेंही कोणी अनुमान काढण्याचें कारण नाहीं हें उघडच आहे! कच्च्या दिलाच्या, अर्धवट विचाराच्या व पक्षपाति वाचकांसाठीं माझ्या आठवणी मुळींच नाहींत हें सर्वांनीं ध्यानांत ठेवावे.

बागुलबोवा
धर्म हा विषय बुद्धीपेक्षां भावनेचा अधिक असल्यानें, आणि तो विकासशीलही असल्यानें मी ह्या बाबतींतील माझ्या आठवणींना अगदीं माझ्या पाळण्यांपासून सुरवात करितों. मी-तान्हें बालक असतांना-ज्या पाळण्यांत उताणा निजत असें तो पाळणा आमच्या घरच्या सोप्यांत टांगलेला असे. साधारणपणें पाळण्यावर कांहीं खेळणीं अगर भपकेदार, रंगीबेरंगी, बेगडी झिळमिळ्या बांधण्याचा मातांना शोक असतो. माझ्या पाळण्यावर तसलें कांहीं बांधलेलें आठवत नाहीं. निदान आठवण राहील अशा वयांत तरी कांहीं नव्हतें. पण माझें लक्ष पडल्यापडल्या वरच्या छताकडे जाई. नेमकें पाळण्याच्या वरती असलेल्या एका वेळूला एक चमत्कारिक गांठ होती. तिच्याकडे मी नेहमी निरखून पाही. ती मला एका दाढीवाल्या बोवाच्या मुखवट्याप्रमाणें भासे. मी माझ्या आईचें अंगाईचें गाणें ऐकूनही लवकर निजलों नाहीं आणि कामाखालीं बेजार झालेल्या आईला तर मला निजवावयाची घाई झाली म्हणजे शेवटीं आईनें मला बागुलबोवाची भीति घालावी. इकडे आईनें केलेला बागुलबोवाचा उल्लेख आणि वरती ह्या वेळूच्या गाठींत दिसणा-या बुवाची माझी दृष्टादृष्ट एक झाली म्हणजे माझा लय त्याच्याकडे विशेषच लागे आणि माझें रडणें थांबे. कारण ही वेळूची गांठ म्हणजेच बागुलबोवा अशी भीति आणि आश्चर्य ह्या भावनांनीं मिसळलेली माझी कोंवळी समजूत होऊन माझा वर लय लागे! मी निजलों असें समजून आई कामाला जाई. पण मी इकडे जागाच असें. ह्या वेळीं मी फार तर २।—२॥ वर्षांचा असेन. ही माझ्या आयुष्यांतील अगदींच पहिली आठवण!

पहिली धर्मभावना
पुढें वर्ष सहा महिन्यांनीं मी किंचित् बोबडें बोलूं लागल्यावर त्या वेळूच्या गाठीकडे बोट दाखवून तो पाहा बागूलबुवा तोच कायॽ असे मीं आईला विचारीही व ती हासून होय म्हणे! पण हें बागुलबोवाचेंच नव्हे तर माझ्या पहिल्या देवाचें दर्शन होय, हें मला आतां कळतें. तेव्हां मलाच माझें मन कळत नव्हतें तर तें माझ्या साध्या भोळ्या आईला कोठून कळणारॽ माझाच नव्हे तर अखिल मानव जातीचाही पहिला देव बागुलबुवाच असतो, हें मला पुढें ऑक्सफर्ड विश्वविद्यालयांतील मँचेस्टर कॉलेजांत तुलनात्मक धर्माच्या अभ्यासानें कळलें. व्यक्तींत असो किंवा मानव जातींत असो धर्मविकासाच्या पाय-या जवळजवळ त्याच आहेत, ह्या सिद्धान्ताला माझी ही बाळआठवण किती पोषक आहे ! Fear of God is the beginning of all knowledge ह्या बायबलांतल्या जुन्या करारांतील म्हणीलाही माझी आठवणच जोराची साक्ष देते. मात्र ह्या नव्या बागुलबुवाचा प्रथम परिचय घडतांना मनामध्यें केवळ भीतिच वाटत नसून, भीति थोडी पण आश्चर्य जास्त अशी कांहींशीं मिश्र भावना नवीनच उत्पन्न होत होती. काहीं असो तीच माझी पहिली धर्मभावना होय!

धर्माची गोडी
ह्या पुढील चार वर्षांत म्हणजे मी सात वर्षांचा होईपर्यंत आमचे घरांतल्या कुळाचारांत आणि विधि संस्कारांत देवापेक्षां देवी उपासनेचें प्राबल्य अधिक असे. माझे आजोबा बसवंतराव विशेष धार्मिक नव्हते. संताबाई ही माझी आजीच धर्मकृत्यांत पुढाकार घेत असे. आमचे घरीं नवरात्राचा सण आणि सोहळा सर्वांत मोठा होत असे. नवरात्रांत माझी आजी नऊ दिवस उपास करीत असे. केवळ फळावर, तेही थोडीं केळीं खाऊन ती असे. तिचें मुख्य दैवत श्री यल्लमादेवी हिचें वर्णन मागें आलें आहेच. तुळजापूरची अंबाबाई माझ्या आजोबांची व यल्लामा ही माझ्या आजीची. वस्तुतः पहिलीपेक्षां दुसरी मला अधिक पसंत असण्याचें कांहीं कारण नाहीं. असलेंच तर आजीचा पुढाकार येवढेंच. जितका गाजावाजा अधिक किंवा जितकें गोड खावयाला ज्याच्या पुजेंत अधिक मिळेल तितके तें दैवत लहान मुलाला अधिक प्रिय हा नियम निसर्गसिद्धच आहे. वैदिक देवतांत इंद्र अधिक प्रिय आणि प्रबल कां तर तो दारू अधिक पीत असे म्हणून. ती इंद्रालाही प्रिय अशी समजूत रूढ झाली असावी. ह्या न्यायानें मला ही यल्लाम्मा ५।६ वर्षांपासून प्रिय झाली. मनावरचा हा संस्कार मी पुढें इंग्रजी पांचव्या यत्तेंत असतांनाही कसा मला जाणवला हे मीं मागें सांगितलें आहे.

ताईबाईचें प्रस्थ
आमच्या देव्हा-यावर आणि नवरात्राच्या पूजेंत तुळजापूरच्या अंबाबाईच चित्र आणि आरत्या अधिक येते. ह्याचें कारण श्रीयल्लमा ही कानडी देवता आणि तिची उपासना अधिक ग्राम्यपणाची. आमचे घरचे पुरोहित तम्मण भटजी डेंगरे ह्यांना अंबाबाईच्याच मराठी व कानडी आरत्या येत असत. पण सौंदत्तीपेक्षां तुळजापूर अधिक लांब. आणि जमखंडीस अंबाबाईचे देवळापेक्षां श्रीयल्लामाचेंच देऊळ अधिक प्रसिद्ध शिवाय आणि माझ्या आजीचा करारीपणा जास्त. म्हणून ती जिवंत असे तोंपर्यंत माझ्या बाबांनीं पुढें सुरू केलेल्या ब्राह्मणी संस्कृतीला विशेष बळ आलें नाहीं. इतकेंच नव्हे तर देव्हा-यावरच्या श्रीयल्लामापेक्षांही बाहेर गोठ्यांतील कोनाड्यांत बसलेली ताईबाई हिंचे प्रस्थ वर्षांतून एक दिवस इतकें माजे कीं आम्ही सर्वजण त्या दिवशीं अगदीं हैराण होऊन जात असूं. आम्ही सर्वजण शाकाहारी असूनही केवळ नवसासाठीं म्हणून ह्या ग्राम्य ताईबाईची, एक गाभण मेंढी कापून आजीला कंदुरी करावी लागत असे. आमचे आजोबा जरी मोठे भाविक नव्हते तरी तेच एकटा मांसाहारी असल्यामुळें ताईबाईची ही पूजा त्यांच्या पथ्यावर पडे. आजाआजीचें सर्व ठीक झालें, तरी मला हें काय गौडबंगाल चाले तें कळत नसे! तें कसेंहि असो, यल्लामामुळें माझ्या मनावर अनुकूल परिणाम होत तर ताईबाईकडे पाहून प्रतिकूल ठसे उमटत!

सूडाची कल्पना
मी लहानपणीं इतका खोडकर होतों तरी फार कनवाळू होतों. ह्या ताईबाईला बळी देण्यास आणिलेल्या गाभण मेंढीची मला मोठी कीव येत असे. पण माझा इलाज तो काय चालणारॽ माझ्या देखत त्या बिचा-या जिवाचा घात झालेला पाहून मला ह्या ताईबाईचा मोठा राग येत असे. तरी दुसरे दिवशीं इतर देवाबरोबर तिचीही पूजा मला मुकाट्यानें करावी लागत असे. ह्या ताईबाईचें उणें पुरें करण्याचा मार्ग जरी नव्हता तरी तिचा सूड उगविण्याची मला दुसरी एक चमत्कारिक संधि मिळत असे ती अशी. आमच्या वाड्याच्या महाद्वाराच्या बाहेर दाराशीं लागून दोन्हीं बाजूंस दोन तिकोनी दगड ठेविले असत. त्यांना चुना लावलेला असे. प्रसंगविशेषीं त्यांना हळद, कुंकूंही लागत असे. ह्या दोन द्वारपालक देवताच असत म्हणावयाच्या. दिसण्यांत आकृतीनें हे दगड ताईबाईप्रमाणें आणि तेवढेच असत. मला वाटे हे ताईबाईचे कोणीतरी नातलग आहेत. त्या दुष्ट ताईबाईवरचा राग मी केव्हां केव्हां त्या बिचा-या बाहेर ठेविलेल्या दगडांवर मनमुराद काढून घेत असे. त्यांना एकमेकांवर चांगलें ठेचून काढीत असें. त्यांना उलटे ठेवी, पालथे पाडी; पण कांहीं केलें तरी मेलेली मेंढी पुनः थोडीच जिवंत होणार होतीॽ मारमारून माझेच हात दुखरे झाले म्हणजे मला हा खुळा नाद सोडावा लागे.

यथासांग पूजा
ह्या ताईबाईसारखीच आमच्या वाड्याच्या अगदीं बाहेरच्या आंगणांतील वायव्येकडील एका पडक्या खोलींतील खांबाचीही मला लहानपणीं पूजा करावी लागत असे. हें रमाबाई नांवाच्या एका मृत बाईचें भूत होतें. येणेंप्रमाणें आमचे घरीं माणसापेक्षां देव देवतांची गर्दी फार मोठी जमली होती. नवरात्रांत, गणेशचतुर्थीत वगैरे महापूजेचा प्रसंग आला म्हणजे देवघरांतील देव्हा-यावरील खंडोगणती टाकांची व मूर्तीची पूजा झाल्यावर, मग उतरंडीच्या डे-यांची (गाडग्यांची) नंतर देव्हा-यासमोरच्या कोनाड्यांत ठेवलेल्या लाकडी पादुकांची, जवळच्या खिडकींत रचून ठेवलेल्या सर्व पोथ्यांची, स्वयंपाकघरांत येऊन ताक करण्यासाठीं रोवलेल्या खांबाची, सोप्यांतील मुख्य कोनाड्यांत बसविलेल्या गणपतीची, गोठ्यांत बसलेल्या ताईबाईची आणि शेवटीं अगदीं बाहेर पायखान्याजवळील खोलींतील वर सांगितलेल्या खांबाची ऊर्फ भूताची अनुक्रमें पूजा करावी लागत असे. ही पूजा म्हणजे ताम्हणांतून नेलेल्या पाणी, गंध, अक्षता, फुलें वगैरेंनीं करावयाची असे. शिवाय हें झाल्यावर धुपारती, दीपारती आणि कापुरारती ओवाळायला पुनः ह्या इतक्या देवतांसमोर यावें लागे. ही आरती ओवाळतांना उजव्या हातानें आरती ओवाळणें आणि डाव्या हातानें घंटा वाजविणें ही कसरत एकाच वेळीं करावी लागत असे. आणि पुष्कळवेळां - विशेषतः गोड नैवेद्यामुळें, अगर शाळेला सुटीं असल्यामुळें मी खुषींत असलों तर - ही सर्व पूजा यथासांग करणें मला आवडतही असे.

मारुतीची पूजा
मराठी चौथ्या पांचव्या यत्तेंत असतांना बाबांनीं घरचें पूजारीपण मजकडेच दिलें होतें. ह्या मूर्तीपूजेंत माझें मन जरी केव्हां केव्हां रमत असे तरी रोज रोज हें सर्व नियमानें करण्याचें लचांड मागें लागल्यामुळें मी बहुतेक फार कंटाळत असे. ह्याचें कारण असें कीं आमची मराठी शाळा सकाळीं ७ पासून १० पर्यंत आणि पुनः दोन प्रहरीं २ पासून ५ पर्यंत असे. उन्हाळ्याचे दिवसांत सकाळीं शाळेंतून आल्यावर कडकडीत भूक लागलेली असायची. तरी पण मला आंघोळ करून सोंवळ्यानें ही सर्व पूजा करावी लागे. इतकेंच नव्हे तर घरांतील सर्व पूजा आटोपल्यावर मग गांवच्या मारूतीचे देवळांत जाऊन त्याची पूजा करून यावें लागे. मारुतीला जातांना सोंवळ्यानें जावें लागे. स्नान करून अंगाला व कपाळाला गंध लावून उजव्या हातांत पळी - पंचपात्री त्यांत पाणी, फुलें, तिचें बाजूला गंधाचा मोठा गोळा लावलेला, डाव्या खाकेंत धुतलेल्या उपरण्याची घडी अशा थाटानें आमची वामनमूर्ति मारुतीला निघावयाची. सुमारें ११।१२ वाजतां उन्हाळ्यांतलें तें कर्नाटकी ऊन पडे, पण अनवाणींच जावें लागे. मारुतीचें देऊळ बरोबर बाजारांत आमच्या हायस्कुलासमोरच होतें. तेथून आल्यावर मारुतीचें तीर्थ घरीं सर्व मंडळींना पळी पळीभर द्यावें लागत असे. हें एक माझी पूजेची हजेरी लावण्याचें साधन बाबांनीं करून ठेविलें होतें! इतकें झाल्याशिवाय मला जेवायला मिळत नसे. पूजेला ब्राह्मण ठेवल्यास कोठल्याही देवस्थानांत त्याला चमचमीत नैवेद्याचें खावयाला आणि वर भरपूर दक्षिणा असे. पण मला मात्र इतकें सारें करून जेवतांना नुसती कोरडी भाकर, तुरीची पातळ डाळ आणि तांबडी भगभगीत मिरच्यांची चटणी ह्याशिवाय कांहीं मिळत नसे. चटणीवर तेलही मिळावयाची मारामार! मग माझ्या कोवळ्या मनावर ह्या पूजेचा काय परिणाम होत असेल बरेंॽ

गाड्याची पूजा
अर्थात् मला ह्या सर्व पासरीभर देवांचा केव्हां केव्हां भारी राग येत असे. पूजा करीत असतां सगळे देव माझ्या हातींच येत. जे दगडाचे कठीण असत ते वाचत. पण जे सोन्यारुप्याचे नाजूक टाक असत त्यांना मी धरधरून वाकवीत असें आणि पुनः बाबांनीं पाहूं नये म्हणून सरळ करून ठेवी. घाई झाली म्हणजे दुरूनच त्यांच्यावर पाणी फेकून भिजवीत असें. घरांतल्या देवांचा असा झटपट संक्षिप्त समाचार घेतल्यावर मारुतीचीही तशीच वाट लागावयाची. घरांतून निघतांना पंचपात्री, गंध, फुलें, अक्षता सर्व श्रृंगार थाटाचा असावयाचा, पण पोटांत कावळे चावूं लागल्यावर कोण मारुतीपर्यंत जातोॽ आमचें मोठे आंगण ओलांडल्यावर बाहेर रस्त्यांत लगेच म्हातारबा नावांचे माझ्या बाबांचे एक सुतार मित्र होते; त्यांच्या मालकीचा सुतारी कारखाना लागत असे. त्यांच्याकडे दुरुस्तीला आलेल्या खटारगाड्या रस्त्यांतच उभ्या असावयाच्या. त्यांपैकीं एकाद्या गाडीच्या चाकाच्या गड्डयाची पूजा करून मी घरीं तीर्थ द्यावयाला येत असें. पण माझी ही चोरी फार दिवस न लागतांच उघडकीला आली. म्हातारबा वरचेवर बाबांना भेटावयाला येत असत. ते म्हणत, “रामा (माझ्या बाबांपेक्षा ते बरेच वयानें वडील असल्यानें ते अशी एकेरी हाक मारीत) आमच्या रस्त्यांत उभ्या असलेल्या गाड्यांच्या चाकांवरून अलीकडे बरेच दिवस पाणी, गंध, फुले, अक्षता आढळतात. हा काय चमत्कार!” बाबांनाही हें काय गौडबंगाल आहे पाहावेसें वाटल्यावरून ते पाहवयास गेले. पाहतात तों आपल्या घरचा गंध व फुलें नित्याचीं त्यांच्या ओळखीचीं दिसलीं. घरीं येऊन त्यांनीं मला दरडावून विचारलें, “कायरे विठ्या, रस्त्यांतल्या गाड्यांची पूजा करीत असतोस कायॽ” कांहीं झालें तरी मी खरें बोलणारा मुलगा अशी बाबांची नेहमीं खात्री होती. म्हणूनच त्यांचा मी लाडका होतों. मी मोठा खजील झालों तरी पण चाललेला खरा प्रकार असेल तसा सांगितला. त्यामुळे त्यांच्या रागाला वावच न उरल्यामुळें त्यांना उलट माझी कींव आली आणि खरें बोलण्याबद्दल त्यांनीं माझें कौतुकच केलें. गोष्ट अशा थरावर आली म्हणजे माझे आईलाही मध्यस्थी करण्याचें धैर्य होई. शाळेंत जाणा-या लहान मुलाला जेवणाला उशीर होतो म्हणून तिनेंही मला पाठबळ दिलें. शेवटीं मारुतीची ब्याद माझ्या मागची सुटली, मारुतीपेक्षां मला रस्त्यांतली गाडीच पावली म्हणून मीही आनंदलों. मग त्यापुढें देव्हारांतल्या सोन्यारुप्याच्या टाकांच्या कंबराही मी फारशा वाकविल्या नाहींत. कारण केव्हांतरी बाबा पूजा करावयास आले म्हणजे सगळ्या देवांच्या कंबरा वाकलेल्या पाहून हा काय चमत्कार म्हणत. हे देव म्हणजे आमचे आजे, पणजे हे पूर्वजच असत. ते सर्व म्हातारे होऊन वारले होते म्हणून त्यांच्या कंबरा वांकणें साहजिकच होतें. असल्या पुजा-यापासून आमचें रक्षण कर, अशी त्यांनीं ईश्वराजवळ प्रार्थना केली असावी. म्हणून त्यांची व माझी ह्या अवेळीं पुजेच्या चरकांतून सुटका झाली! मूर्तिपूजा ही पहिली पायरी म्हणून तिचें मंडण करणा-यांनीं हा एक धडा घेण्यासारखा आहे. कांहीं असो, बाबांनीं पूजा करणे अगर न करणें केवळ माझ्याच मर्जीवर सोंपवून आपला समंजसपणा प्रगट केला व त्याचा सुपरिणाम असा झाला कीं, माझ्या धर्मबुद्धीला कायमचा धक्का पोंचला नाहीं.

भिंतीवरील थाप
पुढें आई मला केव्हां केव्हां पूजा करावयाला सांगे. पण आईला झुकांड्या द्यावयाला मला कितीसा उशीर लागणारॽ स्वयंपाक घरांतल्या भिंतीवर मी खडूनें एकदां मोठ्या अक्षरानें खालील वाक्य लिहून ठेविलें होतें. “आई! मी उद्यां पूजा करितों, बरें!” दुसरे दिवशीं आईनें मला टोंकलें, “कारे विठू, आज पूजा करणार नाॽ” मी काय मुलखाचा चवचाल पो-या! तिला म्हणे, “आई माझें वाक्य नीट वाच. मी आज पूजा करण्याचें कबूल केलें नसून उद्यां करण्याचें ठरविलें आहे ना?” तो उद्यां कधींच आज येणें शक्य नव्हतें. “लिहिणें वाचणें शिकलीं म्हणजे मुलें कशीं चावट होतात बाई!” म्हणून आई बिचारी गप्प बसे. भिंतीवरील वाक्य माझ्या अवखळपणाचें स्मारक म्हणून कित्येक दिवस तसेंच राहून गेलें. प्रत्यक्ष बाबाही तें पाहून न पाहिल्यासारखें करीत. “हें पोर पुढें कोणाचे हातीं सांपडणार नाहीं” असें भाकीत आईपुढें करून दोघेही माझें मला नकळत कौतुक करीत व स्वस्थ बसत !