भावी सामाजिक सुधारणेची तयारी

प्रकरण २० वें
हायस्कुलांत असतांना विशेषतः ४ थ्या ५ व्या यत्तेपासून पुढें माझ्यामध्यें भावी सामाजिक सुधारणेचें बीजारोपण कसें होऊं लागलें ह्यासंबंधींच्या आठवणी देऊन मी हा हायस्कूलचा काळ पूर्ण करणार आहें. ह्यालाही माझ्या आईबाबांचा धर्म आणि शील हीच केवळ कारणीभूत आहेत.

भावंडांचीं नांवें
माझ्या आजाआजीचा धर्म कसाही असो. ते जिवंत असे तोंपर्यंत जरी माझ्या आईबाबांनीं त्यांच्या पुरातन देवदेवींच्या उपासनेची परंपरा बिनतक्रार चालविली होती, तरी ती त्यांच्या पाठीमागें फार दिवस टिकली नाहीं. आजाआजी असतांनाच बाबांचा पंढरपूरच्या वारकरी पंथांत नुसता प्रवेशच नव्हे तर पुढाकारही चालू होता. माझ्या वडील भावाचें लाडकें नांव जरी भाऊ असें होतें तरी त्याचें पाळण्यांत ठेविलेलें खरें नांव परशुराम हें होतें. श्रीयल्लमा हें रेणुकादेवी-जमदग्नी ऋषीची पत्नी - हिचे तेलगू अथवा कानडी नांव होय. तिचा मुलगा परशुराम. हें नांव माझ्या भावाला श्रीयल्लमाची भक्ति करणारी जी माझी आजी तिनें ठेविलें असावें. पण पुढील सर्व मुलांचीं नांवें माझ्या बाबांनीं आपल्या पंढरपूरच्या भागवत संप्रदायाप्रमाणें ठेविलेलीं आहेत. तीं अशीं. परशुरामाच्या पाठीवरच्या आणि माझ्या आधींच्या मुलाचें नाव कृष्णा. हा लहान असतांनाच माझे आईचे अंगाखालीं झोपेंत चेंगरून मरण पावला हें मागें आलेंच आहे. ह्यानंतर माझें नांव विठू. जन्म पत्रिकेंत माझें पाळण्यांत ठेविलेलें नांव तुकाराम असें आढळतें. माझ्या जन्माचेवेळीं बाबा पंढरपूरच्या वारीला गेले होते. म्हणून परत आल्यावर त्यांनीं माझें नांव विठ्ठल हें ठेविलें. मी पांचवा मुलगा. माझ्यानंतरचा मुलगा नांव ठेवण्यापूर्वीं ६।७ वे दिवशींच वारला. नंतर मुलगी झाली. ती ७ वी जनाक्का. ही कार्तिक शुद्ध एकादशीस जन्मली. ह्यावेळींही बाबा पंढरपुरास जाऊन आले असावेत. आठवी मुलगी तान्याक्का हिचें पाळण्यांतलें नांव मुक्ताबाई असें आहे. पुढें जीं बरींच मुलें झालीं तीं लहानपणींच वारलीं. त्यांपैकीं एकाचें नांव दत्त होतें. शेवटचा मुलगा एकनाथ. अगदीं अखेरचें मूल चंद्राबाई. हें नांव मात्र बबलादी सिद्धांचे जे उपास्य दैवत चंद्रगिरीताई असें होतें तिचेवरून ठेविलें होतें. एकंदरींत वारकरी पंथाच्या साध्या, उदार, प्रागतिक, भागवत धर्माचा पगडा माझ्या वडिलांच्या मनावर आणि अकृत्रिम शीलावरही बसला होता ह्यात शंका नाहीं. त्याचींच हीं नांवें साक्ष देतात!

मातापित्यांचें ऋण
तुकाराम हें नांव मागें पडून विठू हें नांव माझें कसें पुढें रूढ झालें त्याचा जरी शोध आतां नीट लागण्याचा संभव नाहीं; तरी माझ्या बाबांच्या भागवत धर्मांतून स्वतः माझी भावी सामाजिक सुधारणा कशी उदय पावली हें शोधून काढणें तितकें कठीण नाहीं.

“ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
  कोणाहि जीवाचा न घडो मत्सर । वर्ण सर्वेश्वर पूजनाचें ॥१॥
हा तुकारामाचा अभंग सर्वच वारकरी म्हणतात. पण त्याचा जोराचा ठसा बाबांनींच नव्हे तर माझ्या आईनेंही माझ्या ग्रहणशील हृदयावर आपल्या प्रत्यक्ष आणि पदोपदीच्या प्रेमळ आचरणानें जो उठविला आहे; त्यांत ज्या भावी साधारण ब्राह्मसमाजाचा मी प्रचारक झालों त्यानेंही विशेष भर टाकिली असें माझ्यानें म्हणवत नाहीं.
ज्ञानदेवें घातला पाया । तुका झाला कळस ॥
ह्या उक्तीप्रमाणें ज्या शुद्ध भागवत धर्माची प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्रांत झाली त्यांतच उदार, सामाजिक प्रागतिकतेची व सहानुभूतिपूर्ण सहिष्णुतेचीं भरपूर बीजें होतीं, तरी महाराष्ट्रांत १९ व्या शतकांत सामाजिक सुधारणेचा म्हणण्यासारखा कां प्रकर्ष झाला नाहीं हें सांगण्याचें हें स्थळ नव्हे.
“ निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ।
  आवडीनें नामें गाती, ते नर पावती मंगल धाम ।।
हें सुंदर भजन म्हणून नाचणा-या पुष्कळ वारक-यांच्या आचरणामध्यें वरील साधूंच्या शुद्ध शिकवणीचा मेळ दिसत नाहीं. पण माझ्या वडिलांच्या आचरणाविरुद्ध मला ही कुरकुर करावयाला मुळींच जागा नाहीं, ह्या गोष्टींचा मला मोठा अभिमान वाटतो. प्रार्थना अगर ब्राह्म समाजाचा परिणाम अद्यापि मराठ्यांवरच नव्हे, इतरही महाराष्ट्रियांवर झालेला नसून मी मात्र आज ह्या समाजाचा एक कां होईना पण अपात्र प्रचारक म्हणून वावरत आहें. ह्यांत कांहीं श्रेय असेल तर मोठा भाग ह्या समाजापेक्षां माझ्या वडिलांनीं घालून दिलेल्या जिवंत आचरणाच्या धड्यांकडेच जास्त जात आहे! आमचें घराणें मूळचें दक्षिणेकडील अस्सल कर्नाटकांतलें. राजपुतांशीं संबंध लावणा-या उत्तरेकडील मराठ्यांपेक्षां दक्षिणेकडील देशस्थ मराठे साध्या राहणीचे व बाळबोध वळणांतले. ह्यांचा मराठमोळा पडदानशीन् नख-याचा नाहीं, किंवा ब्राह्मणी सोंवळेपणाच्या जातिभेदालाही फारसा जुमानणारा नाहीं. निदान माझ्या पाहाण्यांत माझ्या आजीपासून तरी ह्या दोन सामाजिक विषांची बाधा आमचे घरीं दिसून आली नाहीं. ह्यांत माझ्या बाबांनीं आपल्या सहजसुंदर भागवत धर्माची भर टाकिली. “कोणाही जीवाचा न घडो मत्सर” हें वर्म तर माझ्या आईच्या स्वभावांत अगदीं श्वासोच्छ्वासाप्रमाणें सहज भिनलें होतें. ह्यांत मी पामरानें कांहींच भर टाकणें शक्य नव्हतें.

पवित्र वातावरण
आमच्या घरीं पडदा नव्हता इतकेंच नव्हे तर बाहेरची कोणी सभ्य आणि विश्वासार्ह पाहुणे मंडळी अगर मित्र मंडळी आली, तर त्यांच्याशीं आमच्या घरचीं स्त्रीपुरुष आणि लहान थोर सर्व माणसें फार मोकळेपणानें व आपलेपणानें वागत असत. ह्या स्वाभाविक बाळबोधपणामुळें आमच्या घरीं येणा-यांना अगदीं पवित्र आणि भारलेल्या वातावरणांत उतरल्याप्रमाणें अनुभव येई, असें कित्येकांनीं आमचेजवळ उघड उद्गार काढावे. माझ्या मित्रांना आमच्या घरच्या अकृत्रिम व निष्कपट चालीरीति, घरांतील लोकांचा एकमेकांशीं स्नेह व गोड वागणूक आणि दुस-यांशीं तसेंच वर्तन अगदीं नमुनेदार वाटत. कांहीं तर नवीन आलेले स्नेही कांहीं गोष्टींकडे टक लावून पाहातच बसत! आमचे घरची शांति, तृप्ति, प्रीति ह्या कांहीं अवर्णनीय त्यांना वाटत. आमच्या घरीं आल्यावर एकाद्या पुरातन देवळांत गेल्याचा त्यांना भास होऊन, परत जावेंसें वाटत नसे! आमचे बाबा आपल्या मुलींना “आई” म्हणून हाक मारीत असत; ही लहानशीच गोष्ट पण परकीयांवर ह्या गोष्टींतील सहृदयतेचा परिणाम चटकन् होई. माझ्या दोन लहान बहिणी माझ्या लहानग्या मित्राबरोबर अगदीं भावांप्रमाणें लडिवाळपणानें व मोकळेपणानें वागत आणि आई तर माझ्या कोणाही मित्राला आपल्याच मुलाप्रमाणें वागवावयाला केव्हांही तयार असे. ह्यामुळें आमचे घरीं विश्वकुटुंबियतेचा जिवंत देखावा अथवा साक्षात्कार दिसे. नुसता पडदा न घालणें ह्यांत कांहीं विशेष नाहीं. पण अंतःकरणांतच मुळीं पडद्याला थारा न देणें ही दैवी कृपा होय. आमचें घर म्हणजे ह्या कृपेचा एक देव्हारा होता! प्रापंचिक विपत्ति कितीही आल्या; दारिद्र्य, आजार, मरण, कर्जाचा बोजा असले इतर कितीही मनाची पारख करणारे प्रसंग आले तरी घरचे शांतीचें वातावरण कधीं क्षुब्ध होत नसे. येणेंप्रमाणें भौतिक दारिद्र्यांत आत्मिक श्रीमंतीचा भोग आमचे घरीं आणि घरांतील लहानथोर व्यक्तींत दिसत असे. अशा घरीं मग जातिभेदाला कोठून वाव मिळणार! आधुनिक सुधारकांप्रमाणें जातिभेद मोडण्याची उठाठेव करण्याची आम्हांवर कधीं पाळीच येत नसे. कारण तो जातिभेदाचा संस्कारच आम्हांवर घडला नव्हता. मग तो मोडण्याची वार्ता कोठून येणारॽ लहान मुलापुढें मद्यपान निषेधाच्या किंवा व्यभिचार निषेधाच्या व्याख्यानाची जरुरीच नसते. किंबहुना तीं हास्यास्पद ठरतात. त्याप्रमाणें जातिभेद मोडण्याचा कोणी आम्हांला उपदेश केला असता तर तो मुळी आम्हांला समजलाही नसता, इतके आम्ही ह्या भेदाच्या अमंगळ विषाचे अनभिज्ञ होतों!

मुलींचे शिक्षण
शिक्षणाचे बाबतींत आमच्या घराण्याचा त्या प्रांतांत मोठा विशेष होता. बाबांनीं जें पुस्तकी शिक्षण आणि जी बहुश्रुतता मिळविली ती त्या काळचे मानानें नावाजण्यासारखी होती. आणि मीही पुढें हायस्कुलांत जाऊन सतत नंबर पहिला ठेविला, इतकेंच नव्हे त्या काळच्या विद्यार्थी वर्गांत अग्रगण्य झालों; ह्याचें प्रत्यक्ष श्रेय जरी बाबांला नाहीं तरी अप्रत्यक्षपणें पूर्व भूमिका तयार केल्याचें श्रेय त्यांचेकडेच जातें. पण ह्यापेक्षांही त्यांच्या प्रागतिकपणाचें मोठें कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनीं आपल्या दोन्ही मुलींनाही शाळेंत घातलें ही होय. मी जसा माझ्या हायस्कुलांतला अगदीं पहिल्या अमदानींतला मुलगा तशा माझ्या बहिणी त्या वेळच्या मुलींच्या शाळेंतल्या जवळ जवळ पहिल्याच विद्यार्थिनी होत्या! जनाक्का आणि तान्याक्का ह्या दोघी माझेपेक्षां धाकट्या बहिणी. पहिली मोठी हुशार सतेज दिसे, दुसरी धाकटी मात्र अगदीं भोळी आणि बुद्धीनें मागासलेली असे. जनाक्का बाबांची विशेष लाडकी. क्षत्रिय घराण्यांत लहानपणीं मुलींना मुलांचाच पोषाख घालण्याची ब-याच ठिकाणीं चाल आहे. इतकेंच नव्हे तर अशा मुलींना वडील केव्हां केव्हां सभांतून व दरबारांतून अशाच पुरुषी पोषाखांत घेऊन जात असतात. जनाक्काचा हा पोषाख व त्या वेळचें तिचें बाळसें बाबांनाच नव्हे तर आमच्या घरच्या सर्व मंडळींना आवडत असे. स्वतः आम्हीं मुलांनीं कधीं विजार घातली नाहीं तरी पण जनाक्काला ऊर्फ आपल्या “आईला” बाबांनीं कोल्हापुरी पद्धतीची तुमान करून आवडीनें घालावी! आणि तिनेंही ती घालून मोठ्या दिमाखानें आम्हांपुढें यावें!

स्वभाव - लक्षणें
वरील परिस्थितींत वाढल्यामुळें माझ्या भावी सुधारणेची तयारी कशी झाली हें निराळें फारसें सांगावयाला नको. स्वातंत्र्याची प्रीति, नित्य नव्या जीवनाचा शोक व सत्याचा छडा लावण्याची जन्मजात हौस हीं माझ्या स्वभावाचीं मुख्य लक्षणें होतीं. आणि ह्या लक्षणांना कोणत्याही त-हेनें आळा घालण्याचा माझ्या आईबाबांनीं कधींही प्रयत्न केला नाहीं, हें केवढें माझें भाग्य! कुरणांत चरणा-या आईबापांजवळ त्यांचें शिंगरूं ज्याप्रमाणें स्वच्छंदानें बागडत असतें; तद्वत माझ्या आईबाबांचा मला आश्रय होता; पण दाब कसलाही नव्हता! फार तर काय मीं एखादी चांगली पण अगदीं नवी आणि रुढीविरुद्ध गोष्ट केली तर उलट तिचें तें कौतुकच करावयाला तयार असत! ही अपूर्व संधि माझ्या सुधारणेला मिळाली.

अभेद भाव
हायस्कुलांत गेल्यावर माझ्या अभ्यासांत जसे नवे नवे विषय येऊन त्यांत माझी अप्रतिहत गति होऊं लागून माझ्या चैतन्यक्षितिजाचें वलय दिवसेंदिवस वाढूं लागलें; तसेंच मला निरनिराळ्या जातीचे व संस्कृतीचे मित्र आणि सोबती मिळत जाऊन, माझ्या विचाराला आचाराचें स्वरूप देण्याचे प्रयोग करण्यालाही वाव मला मिळूं लागला. ब्राह्मण, लिंगायतासारख्या ज्या जाति मराठ्यांकडे जेवत नाहींत त्या जातींचीं माणसें आमचे विश्वकुटुंबिय घरीं जेवत. इतकेंच नव्हे तर न्हावी, धोबी वगैरे ज्या इतर हिंदूंकडे किंवा मुसलमान वगैरे परधर्मीयांकडे मराठे जेवीत नाहींत; त्या जातीचे लोकांशींही पंक्तिभेद करण्याचें पाप आमचे घरीं कधीं घडत नसे. पण मी पुढें जेव्हां माझ्या मित्रांशीं मिळून मिसळून वागूं लागलों तेव्हा ह्यापुढची पायरी मला चढावी लागली, ती अशी.

मुसलमान स्नेही
इंग्रजी चवथ्या किंवा पांचव्या यत्तेंत असतांना मूर्तूजा नांवाचा एक माझा मुसलमान स्नेही होता. तो माझ्या घरीं नेहमीं येत असे व जेवतही असे. त्यानें एके दिवशीं सहज मला आपल्या घरीं जेवावयास बोलावलें. परजातीच्या माणसाचे घरीं प्रत्यक्ष जाऊन जेवण्याचा माझ्या जन्मांतला तो अगदीं पहिला प्रसंग होता. मी लागलाच कबूल तर झालोंच; पण जेवणाला बसलों तेव्हां मी कांहीं तरी अपूर्व गोष्ट करितों असें मला वाटूं लागलेलें स्पष्ट आठवतें. त्यावेळीं माझें वय फार तर १४।१५ वर्षांचें असावें. मूर्तूजाला व त्याच्या घरच्या माणसांला तर माझ्या ह्या मोकळेपणाचें जास्तच आश्चर्य वाटलें. ह्यानंतर मी सहाव्या आणि सातव्या इयत्तेंत गेल्यावर सय्यद मीरासाहेब हतरुट ह्या पोक्त मुसलमान गृहस्थाचा माझ्याशीं प्रथम परिचय व नंतर अगदीं जिवलग स्नेह जडला. मीरासाहेब आमच्या घरीं आणि मी त्यांचे घरीं अगदीं उघड जेवत असूं. इतकेंच नव्हे ह्या माझ्या सुधारकी वर्तनानेंच आमचा परस्परांचा लोभ जडला. तो इतका कीं पुढें कांहीं वर्षांनीं ते वारल्यावरही त्यांचे थोरले चिरंजीव सय्यद अबदुल कादीर हे मला आपल्या मुलाप्रमाणें वाटूं लागलें. त्यांनीं शेवटीं ब्राह्मधर्माचा स्वीकार करून ते प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. शिवाय मी स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (Depressed Classes Mission Society of India) चें ते एक आस्थेवाईक प्रचारकही झाले! माझ्या सुधारकी बाण्याचा प्रत्यक्ष मीरासाहेबावरही परिणाम असा झाला कीं ते एक मुसलमान गृहस्थ असल्यामुळें त्यांचे घरीं अर्थात् स्त्रियांचा पडदा होता. तरी मीरासाहेबांनीं माझी आपल्या पत्नीची ओळख करून दिली होती व मजपुढें त्या पडदा पाळीत नसत. ही मोठी विशेष गोष्ट होती!

शुद्ध तत्त्वें
वरील गोष्टीचा विशेष खालील कारणांत आहे. आमच्या घरीं जीं साहजिक सुधारणेचीं तत्त्वें पाळलीं जात तीं समता आणि स्वतंत्रता; उदारता आणि स्वाभिमान ह्यांच्या समतोलांत होतीं. आमचे घरीं जे वरिष्ठ म्हणविणा-या ब्राह्मण, लिंगायत जातीचे सभ्य गृहस्थ येत असत; ते जर आपला पोकळ डौल सोडून आमच्याशीं समानतेनें व ख-या प्रेमानें वागत असले तरच आम्ही त्यांच्या घरीं जेवावयास जात असूं व त्यांच्याशीं घरोबा राखीत असूं. येरवीं ते कितीही श्रीमंत किंवा घरंदाज असले तरी आम्ही त्यांचेकडे ते ब्राह्मण आहेत अगर लिंगायत आहेत येवढ्याच कारणानें जेवावयास जात नसूं! त्याचप्रमाणें मराठ्यांपेक्षां खालच्या मानलेल्या किंवा मुसलमानांसारख्या परधर्माच्या मित्रांकडे जेवावयाला जावयाचें झाल्यास त्यांच्यांत समानतेचें, स्वतंत्रतेचें अंतःकरणापासून प्रेमाचें नातें असेल तरच जात असूं; येरवीं नाहीं. ह्या न्यायानें मीरासाहेबांना किंवा त्यांच्या पत्नींना आमच्या घराण्यापुरता तरी आपला पडदानशीनपणा सोडावा लागला, हें सहजच आहे. अशा गोष्टी केवळ देवाण घेवाण ह्या व्यापारी तत्त्वानें किंबहुना आधुनिक सुधारकांच्या शुद्ध बुद्धिवादानेंही घडून येण्यासारख्या नसतात. अंतःकरणाचा जिव्हाळा, हेतूचा शुद्धपणा आणि अकृत्रिम प्रेम हा सर्व सुधारणांचा अढळ पाया होय. ह्याच तत्त्वावर आमच्या घराण्याला त्या जुन्या काळीं व जमखंडीसारख्या मागासलेल्या अथवा कानाकोप-यांतल्या प्रांतीं एवढी प्रागतिकता राखतां आली. आणि तींच शुद्ध स्नेहाचीं तत्त्वें माझ्या हायस्कूलच्या काळांत माझ्या स्नेह्यांशीं आमच्या परस्पर वर्तनांत होती. पडदा, शिक्षण, जातिभेद वगैरेंचे बाबतींत इतकी प्रगति करून आमच्या विवाहाचे बाबतींत मात्र बाबांनीं असा अविचार कां केला ह्यांचा वरील कारणांवरून खुलासा होण्यासारखा आहे. तो असा कीं, त्यांची प्रागतिकता केवळ नवीन बुद्धिवादावर किंवा विचारावरून अवलंबून नव्हती. ती निर्मळ अंतःकरणावर व दांभिकपणाच्या अभावावर अवलंबून होती आणि ह्याच वळणानुसार माझेंही वर्तन घडत होतें. हायस्कूलमध्यें नवीन वाङ्मय, नवीन विषयांचें अध्ययन व नवीन संस्कृतीचा परिचय घडल्यामुळें माझ्या स्वतःमध्यें कांहीं अंशीं बुद्धिवादाचा अंकुर दिसूं लागला होता. तो हायस्कूलचा काळ संपल्यावर—म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत गेल्यावर अर्थात् जोरानें फोंफावूं लागला. पण सातव्या यत्तेंत असतांना त्या बुद्धिवादाची पूर्वचिन्हें थोडींशीं माझ्या वर्तनांत दिसूं लागलीं होतीं. घरीं माझें वजन घरगुती बाबतींत बाबांवरही पडूं लागलें. त्यामुळें त्यांनीं माझी धाकटी बहीण मुक्ताबाई हिच्या विवाहाची घाई केली नाहीं. एरवीं उपवर होण्यापूर्वीं मुलींचें लग्न झालेंच पाहिजे, ह्या समजुतीला जर आईबाबा चिकटले असते तर मुक्ताबाईचें लग्न माझ्या आणि जनाक्काच्या प्रमाणें त्यांनीं लहानपणींच उरकून घेतलें असतें. मुक्ताबाईचें लग्न ती जवळ जवळ १४ वर्षांची झाल्यावर झालें. त्यावेळीं मी कॉलेजांत होतों. असो.

सहृदयता
मी मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला पुणें सेंटरला बसून इ.स. १८९१ च्या नवंबर-डिसेंबर मध्यें पास झालों. त्या वेळीं माझें वय १८ वर्षांचें होतें. ह्या कोवळ्या वयांत आणि मागासलेल्या कर्नाटक प्रांतांतील जमखंडीसारख्या एका छोट्या ब्राह्मणी संस्कृतीच्या संस्थानांत त्या जुन्या काळांत माझ्या हातून सामाजिक सुधारणेचे जाणूनबुजून प्रयत्न होण्याचा प्रश्न नव्हता. वर ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या केवळ माझ्या भांवी सुधारणेची पूर्व चिन्हें एवढ्याच अर्थानें सांगितल्या आहेत. पण ह्यांत एका महत्त्वाच्या तत्त्वाचा येथेंच निर्देश करणें बरें वाटतें. तें तत्त्व म्हणजे सामाजिक असो अगर धार्मिक असो कोणत्याही ख-या सुधारणेचें मूळ कारण शुद्ध बुद्धिवाद आहे किंवा सहृदयता आहे ह्याचा निर्णय हें होय. पण ह्या निर्णयाचे बाबतींत माझा कल दुस-या कारणाकडे म्हणजे सहृदयतेकडे जास्त आहे. हीच गोष्ट मीं वर लिहिलेल्या आठवणींतून ब-याच अंशीं सिद्ध होऊं पाहते. निदान त्या वेळच्या माझ्या हायस्कूलच्या शिक्षणांत तरी शुद्ध बुद्धिवादाचा प्रादुर्भाव करून देणारे विषय म्हणजे रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र ह्यांच्या मूलतत्त्वांचीं लहान पुस्तकेंच होत. एका वर्षांत ह्यांची शिकवण ती काय आणि त्यामुळें माझ्या विचारसरणीस निराळें वळण लागणें फारसें संभवनीय नव्हतें. ह्यावरून असें दिसतें कीं, माझ्या आणि माझ्या आईबाबांच्या वर्तनांतील वर सांगितलेला उदारपणा व प्रागतिकपणा ह्याचें कारण माझी व त्यांची सहृदयता, न्यायाकडे प्रवृत्ति, आणि दांभिकपणाचा तिटकारा हेच गुण होते. मी पुढें कॉलेजांत गेल्यावर ह्या स्वाभाविक गुणांत बुद्धिवादाची भर पडली एवढेंच फार तर म्हणतां येईल.

इतराजी
मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यावर पुढील सबंध वर्ष पुढें काय करावें या विवंचनेंत गेलें. नोकरी पाहण्यासाठीं बेळगांवांस सुमारें सहा महिने काढले. तरी कोठें दाद लागेना. शेवटीं जमखंडी हायस्कुलांत शिक्षंकाची जागा रिकामी झाली म्हणून हेडमास्तर श्री. त्रिंबकराव खांडेकर यांनीं मला जंमखंडीस बोलावून घेतलें; आणि रिकामी जागा मला दिली. इंग्रजी २-या यत्तेवर २।३ महिने काम केलें नाहीं तोंच श्रीमंत सरकारांनीं मला रामतीर्थास बोलावून नेलें व मुंबईस व्हेटरनरी कॉलेजमध्यें स्कॉलरशिप देऊन पाठवितो असें म्हणाले. पण मी त्यावेळीं उत्तर दिलें कीं, ‘मला जनावराचा डॉक्टर व्हावयाचें नाहीं. आर्टस् कॉलेजमधील स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे.’ यावरून यजमानास राग येऊन त्यांनीं मला ताबडतोब नोकरीवरून दूर केलें आणि दिपवाळीचा पगारही दिला नाहीं. कांहीं अपराध नसतां असें झाल्यामुळें मला फारच वाईट वाटलें.