इंटरमिजिएटचें वर्ष

प्रकरण २३ वें
माझ्या हायस्कूलच्या काळापेक्षां कॉलेजचा काळ फार निराळा गेला. मराठी शाळेंतील प्राथमिक शिक्षण संपवून हायस्कूलमध्यें आल्यावर युगांतर झाल्यासारखें वाटलें असें मागें लिहिलें आहे. कांहीं अंशीं तसाच अनुभव मी कॉलेजांत प्रवेश केल्यावर येथील शिक्षणाच्या नवेपणामुळें आला खरा; पण खरा निराळेपणा वेगळाच होता.

उलटा प्रकार
हायस्कुलांत गेल्यापासून आमच्या घरच्या सांपत्तिक परिस्थितीमुळें मला मोठी आपत्ति भोगावी लागली कशी ह्याचें वर्णन मीं केलेंच आहे. पण ही आपत्ति मी अजून लहान व मुग्ध असल्यामुळें मला तितकी जाणवली नाहीं. ती माझ्या आईबाबांस विशेषतः आईला जाणविली. मी त्यांच्या आश्रयाखालीं सुखांत (चैनींत) नाहीं तरी समाधानांत होतों. विशेषतः जमखंडीसारख्या मागासलेल्या ठिकाणच्या मानानें माझा अभ्यास व हुषारी फार चांगली असल्यामुळें व मला स्कॉलरशिप मिळत असल्यामुळें मी आनंदांत असें. आईबापांच्या सहवासाशिवाय माझ्या भोंवतालच्या मित्रमंडळीच्या सहवासामुळें माझा हायस्कुलचा सर्व काळ अगदीं मजेचा गेला. पण कॉलेजचा सर्व प्रकार ह्याच्या उलट घडला.

गाढवी सवाष्णी
प्रिव्हीयस परीक्षेंत मी पास झालों असें मला जमखंडीसच कळलें. कॉलेजची परीक्षा पास झालेला पहिलाच विद्यार्थी ह्या नात्यानें जमखंडी गांवांत माझी ख्याति अधिकच पसरली हें सर्व खरें. तरी मी जेव्हां पुण्यास परत येऊन मुंबई इलाख्यांतील प्रिव्हियसला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्यें माझा नंबर कितवा आला आहे हें जेव्हां मला कळलें तेव्हां माझी मोठी निराशा झाली. माझा नंबर पहिल्या वर्गांत किंवा दुस-या वंर्गात तर आलाच नव्हता पण तिस-या वर्गांतही फारसा वर नव्हता; हें पाहून जमखंडीतील माझी हुषारी म्हणजे खेडेगांवांत गाढवी सवाष्णी ही म्हण प्रत्ययास आणून देणारीच एक चीज झाली. जमखंडी हायस्कूल म्हणजे एक क्षुद्र उंबराचें फळ. त्यांत भरा-या मारणारा मी एक किडा मुंबई विश्वविद्यालयाच्या विस्तीर्ण उघड्या आंगणांत आल्यावर माझें अल्पबळ मला कळून आलें! विश्वविद्यालयांत चमकण्याची तयारी करून देण्याची पात्रता आमच्या त्या वेळच्या बिचा-या जमखंडीच्या हायस्कुलांतच नव्हती, ती माझ्यामध्यें कोठून येणारॽ ह्याशिवाय कॉलेजशिक्षणांत मी निस्तेज होण्याची दुसरींही अनेक कारणें होती. माझ्या घरच्या गरिबीची जाणीव जी मला हायस्कुलांत घडली नाहीं ती पुण्यास मी एकटीच आईबापांपासून दूर राहूं लागल्यामुळें मोठ्या तीव्रपणानें भासूं लागली. शिवाय माझ्या लाजाळू स्वभावामुळें जमखंडींतलेच जे काय १।२ ओळखींचे सोबती होते, त्यांपलीकडे पुणेंकर विद्यार्थ्यांपैकीं कोणाशीं माझी मैत्री जमली नाहीं. जनार्दनपंत करंदीकर, विश्वनाथ पोंक्षे आणि मी ह्या तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांपैकीं करंदीकर आणि मी दोघेच पास झालों. आणि पोंक्षे ह्यांना कॉलेजच्या शिक्षणाला मुकावें लागलें.

कंगाल स्थिति
हायस्कुलांत प्रत्येक वर्गांत थोड्या विद्यार्थ्यांशीं त्यांच्या वर्गांतील शिक्षकाचा प्रत्यक्ष संबंध घडतो. पण कॉलेजांत शेंकडो किंबहुना हजारो विद्यार्थी आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके व तेही दर विषयाला बदलणारे प्रोफेसर त्यामुळें त्यांच्याशीं विद्यार्थ्यांचा वैयक्तिक परिचय घडत नाहीं. आणि मी तर बाहेरगांवचा कानडी मुलखांतला लाजाळू व सामान्य विद्यार्थी! फर्ग्युसन कॉलेजची त्या वेळची स्थितीही माझ्या स्वतःच्या स्थितीप्रमाणें कंगालच होती. वसतिगृह, क्रीडांगण वगैरे इतर उपकरणांचा व विद्यार्थ्यांनीं वरचेवर एकत्र जमण्याच्या प्रसंगाचा अभाव असल्यामुळें; त्यावेळची आमची-निदान माझी तरी-स्थिति जंगलांत चुकलेल्या कोंकराप्रमाणें असह्य भासत होती. इत्यादि अनेक कारणांमुळें कॉलेजच्या शिक्षणावर माझें प्रेम बसेना. हायस्कुलांतली मनाची तरतरी, गुप्त हौस हीं झपाट्याने मावळूं लागलीं. अशांत घरगुती संकटांनीं एकदम उचल खाल्ली. आणि माझ्या सत्वाची चहूंकडून ह्या काळांत पारख चालली. त्यांतून मी कसा निभावलों ह्याचें मला अद्यापि नुसतें आश्चर्य मात्र वाटतें. पण नीच मीमांसा कांहीं होत नाहीं. माझें कॉलेजांत येण्याचें कारण पर्यायानें जमखंडीच्या श्रीमंत संस्थानिकांची मजवर विनाकारण गैरमर्जी होऊन त्यांनीं मला हायस्कुलांतील शिक्षकाच्या नोकरीवरून दूर केलें हें मागें आलेंच आहे. जमखंडीचे यजमान श्री. आप्पासाहेब रामचंद्रराव येथेंच स्वस्थ न बसतां त्यांनीं माझ्या वडिलांनाही नोकरीवरून कमी केलें. त्यामुळें चहूंकडूनच आकाश फाटल्यासारखी स्थिति झाली. आणि पुण्यास माझा व जमखंडीस माझ्या घरचा योगक्षेम कसा चालला हें मला आतां कांहींच सांगता येत नाहीं!

जनाक्काचा छळ
अशा कठीण स्थितींत आणखी आकस्मिक संकट उद्भभवलें. तें असें, माझ्या दोन लहान बहिणींपैकीं मोठी बहिण जनाक्का हिचा सासरीं फार छळ होत होता. तिची सासू मोठी खाष्ट बाई होती आणि नवरा फार अविचारी व उर्मटपणानें वागत होता. ह्या सासूचा व  नव-याचा छळ जनाक्काच्या सास-याला प्रत्यक्ष आवडत नव्हता, पण त्याचें कांहीं घरीं अशा बाबतींत चालत नसे. जनाक्का चार यत्तेपर्यंत लिहावयाला वाचावयाला शिकली होती आणि तिचा नवरा केवळ अक्षरशत्रु होता. येवढेंच ह्या छळाचें कारण होतें. घरीं पडेल तें सर्व काम उत्कृष्ट एकाद्या मोलकरणीप्रमाणें जरी जनाक्का आपल्या लहान वयांत बिनबोभाट करीत असे, तरी तिच्या सासूला तें खपत नसे. शेवटीं जनाक्काच्या नव-याला बाहेरचा नाद लागून त्यानें घरीं एक द्वितीय संबंधाची बायकोही आणिली आणि जनाक्काच्या जिवाला अपाय घडण्याचेही वरचेवर प्रसंग येऊं लागले. गोष्ट येथवर आल्यानें मला ह्या प्रकरणांत हात घालावा लागला. घरची गरिबी, माझ्या कॉलेजच्या खर्चाची ओढाताण अशा वेळीं मी जनाक्काची काय व्यवस्था करणारॽ पण त्यावेळीं माझ्या सुधारणेच्या मताला आणि सामान्यतः स्त्रीजातीसंबंधीं कारुण्यालाही पूर येत चालला होता. अशा वेळीं माझ्या प्रत्यक्ष बहिणीवर तिची वागणूक इतकी पवित्र व स्वभाव सहनशील असूनही असा प्रसंग आलेला पाहून मी बेफाम झालों. मी त्या वेळीं मे च्या सुटींत जमखंडीस आलों असेन. माझ्या कानावर जनाक्काच्या छळाची वार्ता विशेषतः तिच्या क्रूर नव-यानें दुसरी बाई घरीं आणून ठेविली हे ऐकल्याबरोबर मी माझ्या आईबाबांनीं जनाक्काला एकदम आमचें घरीं आणावयाचा आग्रह केला. आमचे बाबाही मानीच होते. आम्हीं कोणींच ह्यापेक्षां मागचा पुढचा विचार जास्त न करितां, आमच्या आलगूरच्या मामांना माझ्या बहिणीला आसंगीहून आमचे घरीं आणण्याला पाठवून दिलें. त्यामुळें जनाक्काच्या सासूला व नव-याला आयतेंच फावलें. त्यांनीं जनाक्काचे दागिने सर्व काढून घेऊन नेसलेल्या एका फाटक्या लुगड्यानिशीं मामांबरोबर तात्काळ पाठविली. त्यावर आम्ही जनाक्काला अखेरपर्यंत आसंगीला कधींच पाठविलें नाहीं. अगदीं लहानपणींच जनाक्का अशी आपल्या सासरला कायमचीच अंतरली. आणि ती केवळ अविवाहित जणूं आमचे घरीं राहिली. ह्या पुढें कांहीं दिवसांनीं जनाक्काचा सासरा गोपाळराव हा तिला न्यावयाला आला, पण तिला सासरीं कोणत्याहि प्रकारें सुख लागण्याची आशाच नव्हती. उलट तिच्या जिवालाच अपाय घडण्याची भीति होती म्हणून आम्ही तिला पाठविली नाहीं. गोपाळरावालाही विशेष आशा वाटत नव्हती म्हणून तो बिचाराही जास्त आग्रह न करितां निमूटपणानें आल्या पावलींच परत गेला. ह्या सर्व प्रकरणाला मीच कारण होतों म्हणून जनाक्काच्या पुढच्या सर्व आयुष्याची जबाबदारी माझ्या कोवळ्या शिरावर पडली. हें किती प्रचंड ओझें मी शिरावर घेतलें ह्याची मला त्या वेळीं कांहींच कल्पना नव्हती! ह्या वेळीं माझी इंटरमिजिएट क्लासांतली एक टर्म संपली असावी. पण मला हा काळ नक्की कोणता हें आतां आठवत नाहीं.

बाळमित्र
प्रीव्हियस परीक्षा पास होऊन मी पुण्यास आल्यावर प्रथम नारायण पेठेंत मुंजाबाचे बोळासमोरील केळकराचे वाड्यांत खोली घेतली होती. एक खोली मी आणि दुसरी कोल्हापूरचे रा. गोविंदराव शासने अशी जोड खोलींचे एक दालन होतें. दुसरी विजापूरचे रा. गोविंदराव कलकेरी आणि कोल्हापूरचे रा. तळाशीकर ह्यांचें एक जोड खोलीचें दालन अशा चार खोल्या आम्हां चौघांमध्यें होत्या. अर्थात् मी ह्यावेळीं खोलीचें भाडें भरीत होतों; पण कसें तें मला सांगतां येत नाहीं. रा. शासने ह्यांची ओळख नक्की कोठें व कशी झाली हें मला आतां निश्चितपणें आठवत नाहीं. पण आरंभापासून अगदीं आतांपर्यंत टिकलेल्या अगदीं थोड्या मित्रांपैकीं ते एक म्हणजे चौघां मित्रांपैकी ते एक आहेत. तेरदालचे विष्णुपंत देशपांडे हे इंग्रजी ५।६ व्या यत्तेपासून म्हणजे इ. स. १८९० पासून, प्रिन्सिपॉल केशव रामचंद्र कानिटकर हे प्रिव्हीयस वर्गापासून म्हणजे इ. स. १८९३ पासून आणि गोविंदराव शासने इंटरमिजिएट म्हणजे सन १८९४ पासूनच माझे मित्र आहेत. पहिले देशस्थ, दुसरे कोकणस्थ ब्राह्मण आणि तिसरे मराठा जातीचे आहेत. चौथे जनार्दनपंत करंदीकर हे तर माझ्या गांवचेच म्हणजे जमखंडीचे बाळमित्र आहेत. ह्यांपेक्षां जास्त कोणी लहानपणापासूनचे मित्र किंबहुना अलीकडचेही कोणी विशेष म्हणण्यासारखे समान वयाचे मित्र नाहींत.

रा. शासने
शासने ह्यावेळीं पुणें नेटिव्ह इनस्टिट्युशन नांवाच्या हायस्कुलांतील ७ व्या यत्तेंतील विद्यार्थी होते. वयानें माझेपेक्षां सुमारें वर्ष सहा महिन्यांनीं मोठे असावेत. हे दिलदार मनाचे मराठा मित्र लवकरच माझ्या घरांतल्या माणसांप्रमाणें मला जवळचे भासूं लागले. ‘समानशील व्यसनेषु सख्यम्’ ह्या न्यायानें सहज जो स्नेहसंबंध आम्हा दोघांचा जडला तो कायमचाच जडला. माझा स्वभाव तापट तर त्यांचा किरकि-या! ह्या प्रकृतिदोषामुळें आमच्यांत नेहमीं कमीअधिक गोष्टीवरून वाद माजे व तो विकोपासही जाई. पण त्या मतभेदामुळें आमच्या स्नेहांत लवमात्रही बाधा येत नसे. गोविंदरावाची घरगुती स्थिति माझ्याप्रमाणें तंग नव्हती. त्यांचें वडील कोल्हापुरांतील एक घरंदाज फौजदार होते. खाऊन पिऊन सुखी घराणें होतें. माझीं उदार मतें व मोकळा स्वभाव यांवर लुब्ध होऊन गोविंदराव मजबरोबर राहूं लागले. ते आणि आम्ही जरी अभ्यासांत भिन्न वर्गांतले होतों, तरी परस्परांचा स्वाभाविक चांगुलपणा ओळखून होतों.

स्वयंपाकव्रत
ह्यावेळीं साहजिकपणें मला खर्चाचा फारच तुटवडा पडत असावा. कारण खाणावळींत न जातां मी घरींच माझा स्वयंपाक काही दिवस करून जेवत होतों. आणि केवळ माझ्यासाठीं म्हणून गोविंदरावही कदाचित् माझेप्रमाणें स्वयंपाकी बनले असतील असे वाटतें. पण दुस-या टर्ममध्यें परीक्षेचे दिवस जवळ येऊन अभ्यासाचा मारा जास्त पडल्यावर साहजिकच आम्हांला हें स्वयंपाकव्रत नाइलाजानें सोडावें लागलें. मी किंवा गोविंदराव कलेंत कधींच प्रवीण होण्यालायक नव्हतें. भात चांगला करीत असूं; पण गव्हाची पोळी मात्र खाण्यापेक्षां प्रदर्शनांत पाठविण्याच्या अधिक लायक होत असे. त्यामुळें प्रकृतीवरही परिणाम होऊन हा नाद आम्हीं सोडला.

चैतन्य शून्यता
माझ्या हायस्कूलच्या काळाच्या आठवणी लिहितांना माझे मित्र, खेळ, इतर छंद वगैरेसंबंधीं मला बरेच लिहितां आलें, तसें मला कॉलेजच्या काळासंबंधीं लिहितां येत नाहीं. ह्याचें कारण हेंच कीं दारिद्र्यामुळें व आईबापांच्या आश्रयापासून दूरच्या रहिवासामुळें माझ्या स्वभावांतला सहज आनंद बराच कमी झाला. किंबहुना मला अकालीं पोक्तपणा व विचारीपणाही आला. त्यामुळें माझा खेळकरपणा तर पार मावळलाच पण मला इतरांशीं मैत्री जोडण्याची हौस नाहींशी झाली! फार काय पण कॉलेजच्या वर्गांतील ठरीव अभ्यासावरील मनही उडूं लागलें. अभ्यास जुलमाच्या रामरामाप्रमाणें मला दुःसह झाला. त्यामुळें फर्ग्युसन कॉलेजबद्दलच नव्हे तर एकंदरींत तत्कालीन विश्वविद्यालयीन चैतन्यशून्य शिक्षणपद्धतीसंबंधीं विरक्ति आणि विमनस्कता माझ्यामध्यें वाढूं लागली. जमखंडी हायस्कुलांत पहिला नंबर म्हणून मिरवलेला मी फर्ग्युसन कॉलेजमध्यें कोठल्या कोनाकोप-यांत बेपत्ता विद्यार्थी होऊन राहण्याची मला मनांत टोंचणी लागली. अभ्यासाची हयगय चाललेली माझ्या लक्षांतच येईना.


बौद्धिक विकास
ठराविक अभ्यासाची वर सांगितल्याप्रमाणें अवस्था झाली तरी माझ्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला अशांतला मुळींच प्रकार नव्हता. तें कधीं शक्यच नव्हतें. ह्याहीपेक्षां भयंकर आपत्ति मजवर पुढील आयुष्यांत कितीतरी कोसळल्या. तरी माझ्या मनाची अंतर्वाढ थांबणें शक्यच नव्हतें. सहज आनंद माझ्या मनोरचनेचा पायाच आहे असें आतां मला दिसूं लागलें आहे. माझ्या आनंदाला, शांतीला, समाधानाला-अतएव अंतर्विकासाला बाह्य उपाधीची मदत झाली नाहीं किंबहुना विरोधही झाला नाहीं, असो.
सोबती, खेळ, बाह्य सुखसोयी वगैरेची बाजू लंगडी पडली. तरी माझें खासगी वाचन त्या काळाच्या मानानें बरेच चाललें होतें. जमखंडीसारख्या गांवढ्या गांवांतल्या हायस्कुलांत पुस्तकालयाची उणीव होती तितकी व तशी फर्ग्युसनसारख्या नवीन चालू झालेल्या कां होईना, पण कॉलेजांत असणें शक्य नव्हतें. प्रीव्हियस वर्गांत असतांनाच मला जॉन स्टुअर्ट मिल्लसारख्या तत्त्वज्ञानाचा आणि मेकॉलेसारख्या ऐतिहासिक निबंधकाराचा परिचय घडला. Liberty (स्वातंत्र्य) Utilitarianism (उपयोगवाद, बहुजनहितवाद); Subjection of Women (स्त्रियांची गुलामगिरी) वगैरे मिल्लचे प्रासादिक ग्रंथ मूळ इंग्रजींत वाचून कानांत वारें शिरलेल्या वासराप्रमाणें माझी स्थिति प्रीव्हीयसमध्येंच झाली होती! इंटरमिजियटमध्यें आल्यावर हर्बट स्पेन्सरच्या Education (शिक्षण), Introduction of the Study of Sociology (समाजशास्त्राच्या अध्ययनाचा परिचय) ह्या इंग्रजींतील मूळ ग्रंथांचे वाचन झालें. त्यावेळीं स्पेन्सरची चलती यूरोप-अमेरिकेंतच नव्हे तर हिंदुस्थान व जपान ह्या पौरस्त्य देशांतही फार वैभवशाली आणि विजयी झाली होती. बहुतेक त्या काळचे कॉलेजांतले शिक्षक स्पेन्सरच्या अज्ञेयवादानें जवळ जवळ झपाटल्याप्रमाणेंच झालें होतें. दाभोळकर नांवाच्या एका गृहस्थांनीं तत्कालीन तरुण विद्वान गृहस्थाकडून स्पेन्सरच्या ब-याच ग्रंथांची भाषांतरमाला प्रसिद्ध करण्याचें काम नेटानें चालविलें होतें. त्यांपैकीं बरींच पुस्तकें मी हाव-या हाव-यासारखें वाचीत असें.

नास्तिकपणा
जेथें आमचे गुरुच त्या नवीन विचारानें असें हैराण झालेलें, मग माझ्यासारख्या उतावळ्या विद्यार्थ्यांची अत्यवस्था झाली म्हणावयाला काय हरकत आहे. पुस्तकें जरी मी म्हणण्यासारखीं पुष्कळशीं वाचलीं नसलीं तरी जीं तात्विक महत्वाचीं वाचलीं त्यांचा माझ्यामध्यें अभिनिवेश फार जोराचा घडला. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे जमखंडींतल्या आमच्या वाड्यांतल्या अंधेरी देवघरांत बसून श्रीशिवलीलामृतांचें पारायण करीत शिवलिंगावर श्रावणी सोमवारीं सहस्त्रदळें वाहिल्याशिवाय तोंडांत पाणी न घेणारा पो-या. मी पुण्यांत आल्यावर आगरकरांचे लेख आणि मिल्ल-स्पेन्सरचे प्रत्यक्ष ग्रंथ वाचून पुण्यांतल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठ्या नास्तिक बनलों!

चर्चा मंडळ
मी नुसतें वाचून स्वस्थ बसणारा युवक नव्हतों. जें आपल्या मनांत आलें तें दुस-याजवळ बोलून त्यावर चर्चा करावयाची प्रवृत्ति किंबहुना खोड माझ्यामध्यें आनुवंशिकच होती. माझ्या वडिलांप्रमाणेंच मलाही बोलावयाला फार आवडतें. मात्र लाजाळूपणाचा दाब असल्यामुळें अपरिचिताजवळ किंवा अप्रासंगिकपणें वाकतांडव करण्याचें मात्र मला कधीं धैर्य होत नसे. तथापि पोटांत घटकाभर विष आवरेल पण नवीन विचार अगर एकादा सुंदर अनुभव मनाला घडला, कीं कोणातरी सहानुभूतिच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे. ह्यामुळें केळकरांच्या वाड्यांत असतांना माझ्या नेतृत्वाखालीं आमच्या खोलींत एक छोटेखानी Debating Union (चर्चामंडळ) स्थापन करण्यांत आलें होतें. त्यांत माझाच सुळसळाट जास्त असावयाचा. ह्या लहानशा मंडळांत नवीन भेटलेल्या मिल्ल-स्पेन्सरच्या विचारांची पुनरावृत्ति करण्यांत मी मोठें वक्तृत्व पाघळीत असें. ह्या वक्तृत्वाची संवय आमच्या जमखंडींतील वसंत व्याख्यानमालेंतल्या माझ्या दुढ्ढाचार्यपणावरून मला लागत चालली होती. विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, विकासवाद, स्त्रीदाक्षिण्य, इ. इ. मोठमोठ्या अवजड विषयांवर लहान तोंडीं मोठा घास घेण्याचें मला जमखंडींतल्या वसंत व्याख्यानमालेंतच आंगवळणीं पडलें होतें. मग पुण्यासारख्या वाचाळ आणि मुंबईसारख्या चवचाळ शहराचा संपर्क घडल्यावर आणि विशेषतः मिल्ल-स्पेन्सरच्या तत्कालीन वेदतुल्य नवीन विचारांच्या ज्ञानलतांनीं दुर्विदग्ध झाल्यावर माझें डोकें ताळ्यावर राहणें कठीण झालें. मंडळांतील सभांतूनच नव्हे तर विद्यार्थ्यांशीं खासगी संभाषणांत मी त्यांना माझा नवीन तुटपुंजा नास्तिकपणा शिकवूं लागलों. त्यावेळीं मी एक लहानसा इंग्रजींत निबंध लिहिला होता. त्यांत ‘देवानें माणसाला निर्माण केलें नसून माणसानेंच उलट देवाला निर्माण केलें’ हें अर्धवट सत्य मी मोठ्या उत्साहानें प्रतिपादिलें होतें हें पण आतां नीट आठवतें! तें कसेंही असो. कोणीं कोणाला निर्माण केलें हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालणारा आहे. पण इतर अनेक कारणांत माझ्या विक्षिप्त खासगी वाचनाची आणि वादविवादाची भर पडून ठराविक अभ्यासाची आबाळ झाली. अर्थात् मला इंटरमिजियट परीक्षेंत अपयश आलें! जमखंडी हायस्कुलांतील पहिला नंबर विश्वविद्यालयांत बराच खालीं घसरतो; इतकेंच नव्हे तर उगीच घमेंड मारील तर चांगली आपटीही खातो कसा, हें मला प्रत्यक्ष अनुभवास आलें. विशेष हा कीं, ज्या (Logic) तर्कशास्त्र ह्या विषयांत माझा विशेष तोरा चालत असे त्यांतच मी नापास झालों असें वाचून तर “ज्वर इव मदो मे व्यपगतः” हा भर्तृहरीचा टोमणा मला चांगलाच जाणवला!

पशुपणा
परीक्षेंत नापास होण्याचा अनुभव मला आतांपर्यंत मुळींच नव्हता. तो आला हें एका परीनें बरेंच झालें. वाईट वाटणें साहजिकच आहे; पण अगदीं धक्का असा बसला नाहीं. मात्र विश्वविद्यालयीन परीक्षांविषयीं आदर कमी कमी होऊं लागला. ह्या परीक्षेच्या चरकांत तरुण विद्यार्थ्यांचे रक्त कसें पिळून निघतें, आणि इतक्या रक्ताच्या आहुत्या ओतूनही शेवटीं अपयशाचा टिळा लागला म्हणजे विद्यार्थ्यांचें कंबरडेंच मोडतें हें कळलें! कंबरडें मोडल्यावरही पुनः जो कॉलेजची वाट धरितो तो “स वै मुक्तोsथवा पशुः” ह्या वचनाप्रमाणें मुक्त किंवा पशु असावा. मी मुक्त नसल्यामुळें पशुपणा पदरीं घेऊन इ. स. १८९५ चे जानेवारींत हातांत नाक धरून जमखंडीहून पुनः कॉलेजच्या अभ्यासासाठीं पुण्याला निघालों!