इंटरमिजिएटचें वर्ष

प्रकरण २३ वें
माझ्या हायस्कूलच्या काळापेक्षां कॉलेजचा काळ फार निराळा गेला. मराठी शाळेंतील प्राथमिक शिक्षण संपवून हायस्कूलमध्यें आल्यावर युगांतर झाल्यासारखें वाटलें असें मागें लिहिलें आहे. कांहीं अंशीं तसाच अनुभव मी कॉलेजांत प्रवेश केल्यावर येथील शिक्षणाच्या नवेपणामुळें आला खरा; पण खरा निराळेपणा वेगळाच होता.

उलटा प्रकार
हायस्कुलांत गेल्यापासून आमच्या घरच्या सांपत्तिक परिस्थितीमुळें मला मोठी आपत्ति भोगावी लागली कशी ह्याचें वर्णन मीं केलेंच आहे. पण ही आपत्ति मी अजून लहान व मुग्ध असल्यामुळें मला तितकी जाणवली नाहीं. ती माझ्या आईबाबांस विशेषतः आईला जाणविली. मी त्यांच्या आश्रयाखालीं सुखांत (चैनींत) नाहीं तरी समाधानांत होतों. विशेषतः जमखंडीसारख्या मागासलेल्या ठिकाणच्या मानानें माझा अभ्यास व हुषारी फार चांगली असल्यामुळें व मला स्कॉलरशिप मिळत असल्यामुळें मी आनंदांत असें. आईबापांच्या सहवासाशिवाय माझ्या भोंवतालच्या मित्रमंडळीच्या सहवासामुळें माझा हायस्कुलचा सर्व काळ अगदीं मजेचा गेला. पण कॉलेजचा सर्व प्रकार ह्याच्या उलट घडला.

गाढवी सवाष्णी
प्रिव्हीयस परीक्षेंत मी पास झालों असें मला जमखंडीसच कळलें. कॉलेजची परीक्षा पास झालेला पहिलाच विद्यार्थी ह्या नात्यानें जमखंडी गांवांत माझी ख्याति अधिकच पसरली हें सर्व खरें. तरी मी जेव्हां पुण्यास परत येऊन मुंबई इलाख्यांतील प्रिव्हियसला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्यें माझा नंबर कितवा आला आहे हें जेव्हां मला कळलें तेव्हां माझी मोठी निराशा झाली. माझा नंबर पहिल्या वर्गांत किंवा दुस-या वंर्गात तर आलाच नव्हता पण तिस-या वर्गांतही फारसा वर नव्हता; हें पाहून जमखंडीतील माझी हुषारी म्हणजे खेडेगांवांत गाढवी सवाष्णी ही म्हण प्रत्ययास आणून देणारीच एक चीज झाली. जमखंडी हायस्कूल म्हणजे एक क्षुद्र उंबराचें फळ. त्यांत भरा-या मारणारा मी एक किडा मुंबई विश्वविद्यालयाच्या विस्तीर्ण उघड्या आंगणांत आल्यावर माझें अल्पबळ मला कळून आलें! विश्वविद्यालयांत चमकण्याची तयारी करून देण्याची पात्रता आमच्या त्या वेळच्या बिचा-या जमखंडीच्या हायस्कुलांतच नव्हती, ती माझ्यामध्यें कोठून येणारॽ ह्याशिवाय कॉलेजशिक्षणांत मी निस्तेज होण्याची दुसरींही अनेक कारणें होती. माझ्या घरच्या गरिबीची जाणीव जी मला हायस्कुलांत घडली नाहीं ती पुण्यास मी एकटीच आईबापांपासून दूर राहूं लागल्यामुळें मोठ्या तीव्रपणानें भासूं लागली. शिवाय माझ्या लाजाळू स्वभावामुळें जमखंडींतलेच जे काय १।२ ओळखींचे सोबती होते, त्यांपलीकडे पुणेंकर विद्यार्थ्यांपैकीं कोणाशीं माझी मैत्री जमली नाहीं. जनार्दनपंत करंदीकर, विश्वनाथ पोंक्षे आणि मी ह्या तिघां जमखंडीच्या विद्यार्थ्यांपैकीं करंदीकर आणि मी दोघेच पास झालों. आणि पोंक्षे ह्यांना कॉलेजच्या शिक्षणाला मुकावें लागलें.

कंगाल स्थिति
हायस्कुलांत प्रत्येक वर्गांत थोड्या विद्यार्थ्यांशीं त्यांच्या वर्गांतील शिक्षकाचा प्रत्यक्ष संबंध घडतो. पण कॉलेजांत शेंकडो किंबहुना हजारो विद्यार्थी आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके व तेही दर विषयाला बदलणारे प्रोफेसर त्यामुळें त्यांच्याशीं विद्यार्थ्यांचा वैयक्तिक परिचय घडत नाहीं. आणि मी तर बाहेरगांवचा कानडी मुलखांतला लाजाळू व सामान्य विद्यार्थी! फर्ग्युसन कॉलेजची त्या वेळची स्थितीही माझ्या स्वतःच्या स्थितीप्रमाणें कंगालच होती. वसतिगृह, क्रीडांगण वगैरे इतर उपकरणांचा व विद्यार्थ्यांनीं वरचेवर एकत्र जमण्याच्या प्रसंगाचा अभाव असल्यामुळें; त्यावेळची आमची-निदान माझी तरी-स्थिति जंगलांत चुकलेल्या कोंकराप्रमाणें असह्य भासत होती. इत्यादि अनेक कारणांमुळें कॉलेजच्या शिक्षणावर माझें प्रेम बसेना. हायस्कुलांतली मनाची तरतरी, गुप्त हौस हीं झपाट्याने मावळूं लागलीं. अशांत घरगुती संकटांनीं एकदम उचल खाल्ली. आणि माझ्या सत्वाची चहूंकडून ह्या काळांत पारख चालली. त्यांतून मी कसा निभावलों ह्याचें मला अद्यापि नुसतें आश्चर्य मात्र वाटतें. पण नीच मीमांसा कांहीं होत नाहीं. माझें कॉलेजांत येण्याचें कारण पर्यायानें जमखंडीच्या श्रीमंत संस्थानिकांची मजवर विनाकारण गैरमर्जी होऊन त्यांनीं मला हायस्कुलांतील शिक्षकाच्या नोकरीवरून दूर केलें हें मागें आलेंच आहे. जमखंडीचे यजमान श्री. आप्पासाहेब रामचंद्रराव येथेंच स्वस्थ न बसतां त्यांनीं माझ्या वडिलांनाही नोकरीवरून कमी केलें. त्यामुळें चहूंकडूनच आकाश फाटल्यासारखी स्थिति झाली. आणि पुण्यास माझा व जमखंडीस माझ्या घरचा योगक्षेम कसा चालला हें मला आतां कांहींच सांगता येत नाहीं!

जनाक्काचा छळ
अशा कठीण स्थितींत आणखी आकस्मिक संकट उद्भभवलें. तें असें, माझ्या दोन लहान बहिणींपैकीं मोठी बहिण जनाक्का हिचा सासरीं फार छळ होत होता. तिची सासू मोठी खाष्ट बाई होती आणि नवरा फार अविचारी व उर्मटपणानें वागत होता. ह्या सासूचा व  नव-याचा छळ जनाक्काच्या सास-याला प्रत्यक्ष आवडत नव्हता, पण त्याचें कांहीं घरीं अशा बाबतींत चालत नसे. जनाक्का चार यत्तेपर्यंत लिहावयाला वाचावयाला शिकली होती आणि तिचा नवरा केवळ अक्षरशत्रु होता. येवढेंच ह्या छळाचें कारण होतें. घरीं पडेल तें सर्व काम उत्कृष्ट एकाद्या मोलकरणीप्रमाणें जरी जनाक्का आपल्या लहान वयांत बिनबोभाट करीत असे, तरी तिच्या सासूला तें खपत नसे. शेवटीं जनाक्काच्या नव-याला बाहेरचा नाद लागून त्यानें घरीं एक द्वितीय संबंधाची बायकोही आणिली आणि जनाक्काच्या जिवाला अपाय घडण्याचेही वरचेवर प्रसंग येऊं लागले. गोष्ट येथवर आल्यानें मला ह्या प्रकरणांत हात घालावा लागला. घरची गरिबी, माझ्या कॉलेजच्या खर्चाची ओढाताण अशा वेळीं मी जनाक्काची काय व्यवस्था करणारॽ पण त्यावेळीं माझ्या सुधारणेच्या मताला आणि सामान्यतः स्त्रीजातीसंबंधीं कारुण्यालाही पूर येत चालला होता. अशा वेळीं माझ्या प्रत्यक्ष बहिणीवर तिची वागणूक इतकी पवित्र व स्वभाव सहनशील असूनही असा प्रसंग आलेला पाहून मी बेफाम झालों. मी त्या वेळीं मे च्या सुटींत जमखंडीस आलों असेन. माझ्या कानावर जनाक्काच्या छळाची वार्ता विशेषतः तिच्या क्रूर नव-यानें दुसरी बाई घरीं आणून ठेविली हे ऐकल्याबरोबर मी माझ्या आईबाबांनीं जनाक्काला एकदम आमचें घरीं आणावयाचा आग्रह केला. आमचे बाबाही मानीच होते. आम्हीं कोणींच ह्यापेक्षां मागचा पुढचा विचार जास्त न करितां, आमच्या आलगूरच्या मामांना माझ्या बहिणीला आसंगीहून आमचे घरीं आणण्याला पाठवून दिलें. त्यामुळें जनाक्काच्या सासूला व नव-याला आयतेंच फावलें. त्यांनीं जनाक्काचे दागिने सर्व काढून घेऊन नेसलेल्या एका फाटक्या लुगड्यानिशीं मामांबरोबर तात्काळ पाठविली. त्यावर आम्ही जनाक्काला अखेरपर्यंत आसंगीला कधींच पाठविलें नाहीं. अगदीं लहानपणींच जनाक्का अशी आपल्या सासरला कायमचीच अंतरली. आणि ती केवळ अविवाहित जणूं आमचे घरीं राहिली. ह्या पुढें कांहीं दिवसांनीं जनाक्काचा सासरा गोपाळराव हा तिला न्यावयाला आला, पण तिला सासरीं कोणत्याहि प्रकारें सुख लागण्याची आशाच नव्हती. उलट तिच्या जिवालाच अपाय घडण्याची भीति होती म्हणून आम्ही तिला पाठविली नाहीं. गोपाळरावालाही विशेष आशा वाटत नव्हती म्हणून तो बिचाराही जास्त आग्रह न करितां निमूटपणानें आल्या पावलींच परत गेला. ह्या सर्व प्रकरणाला मीच कारण होतों म्हणून जनाक्काच्या पुढच्या सर्व आयुष्याची जबाबदारी माझ्या कोवळ्या शिरावर पडली. हें किती प्रचंड ओझें मी शिरावर घेतलें ह्याची मला त्या वेळीं कांहींच कल्पना नव्हती! ह्या वेळीं माझी इंटरमिजिएट क्लासांतली एक टर्म संपली असावी. पण मला हा काळ नक्की कोणता हें आतां आठवत नाहीं.

बाळमित्र
प्रीव्हियस परीक्षा पास होऊन मी पुण्यास आल्यावर प्रथम नारायण पेठेंत मुंजाबाचे बोळासमोरील केळकराचे वाड्यांत खोली घेतली होती. एक खोली मी आणि दुसरी कोल्हापूरचे रा. गोविंदराव शासने अशी जोड खोलींचे एक दालन होतें. दुसरी विजापूरचे रा. गोविंदराव कलकेरी आणि कोल्हापूरचे रा. तळाशीकर ह्यांचें एक जोड खोलीचें दालन अशा चार खोल्या आम्हां चौघांमध्यें होत्या. अर्थात् मी ह्यावेळीं खोलीचें भाडें भरीत होतों; पण कसें तें मला सांगतां येत नाहीं. रा. शासने ह्यांची ओळख नक्की कोठें व कशी झाली हें मला आतां निश्चितपणें आठवत नाहीं. पण आरंभापासून अगदीं आतांपर्यंत टिकलेल्या अगदीं थोड्या मित्रांपैकीं ते एक म्हणजे चौघां मित्रांपैकी ते एक आहेत. तेरदालचे विष्णुपंत देशपांडे हे इंग्रजी ५।६ व्या यत्तेपासून म्हणजे इ. स. १८९० पासून, प्रिन्सिपॉल केशव रामचंद्र कानिटकर हे प्रिव्हीयस वर्गापासून म्हणजे इ. स. १८९३ पासून आणि गोविंदराव शासने इंटरमिजिएट म्हणजे सन १८९४ पासूनच माझे मित्र आहेत. पहिले देशस्थ, दुसरे कोकणस्थ ब्राह्मण आणि तिसरे मराठा जातीचे आहेत. चौथे जनार्दनपंत करंदीकर हे तर माझ्या गांवचेच म्हणजे जमखंडीचे बाळमित्र आहेत. ह्यांपेक्षां जास्त कोणी लहानपणापासूनचे मित्र किंबहुना अलीकडचेही कोणी विशेष म्हणण्यासारखे समान वयाचे मित्र नाहींत.

रा. शासने
शासने ह्यावेळीं पुणें नेटिव्ह इनस्टिट्युशन नांवाच्या हायस्कुलांतील ७ व्या यत्तेंतील विद्यार्थी होते. वयानें माझेपेक्षां सुमारें वर्ष सहा महिन्यांनीं मोठे असावेत. हे दिलदार मनाचे मराठा मित्र लवकरच माझ्या घरांतल्या माणसांप्रमाणें मला जवळचे भासूं लागले. ‘समानशील व्यसनेषु सख्यम्’ ह्या न्यायानें सहज जो स्नेहसंबंध आम्हा दोघांचा जडला तो कायमचाच जडला. माझा स्वभाव तापट तर त्यांचा किरकि-या! ह्या प्रकृतिदोषामुळें आमच्यांत नेहमीं कमीअधिक गोष्टीवरून वाद माजे व तो विकोपासही जाई. पण त्या मतभेदामुळें आमच्या स्नेहांत लवमात्रही बाधा येत नसे. गोविंदरावाची घरगुती स्थिति माझ्याप्रमाणें तंग नव्हती. त्यांचें वडील कोल्हापुरांतील एक घरंदाज फौजदार होते. खाऊन पिऊन सुखी घराणें होतें. माझीं उदार मतें व मोकळा स्वभाव यांवर लुब्ध होऊन गोविंदराव मजबरोबर राहूं लागले. ते आणि आम्ही जरी अभ्यासांत भिन्न वर्गांतले होतों, तरी परस्परांचा स्वाभाविक चांगुलपणा ओळखून होतों.

स्वयंपाकव्रत
ह्यावेळीं साहजिकपणें मला खर्चाचा फारच तुटवडा पडत असावा. कारण खाणावळींत न जातां मी घरींच माझा स्वयंपाक काही दिवस करून जेवत होतों. आणि केवळ माझ्यासाठीं म्हणून गोविंदरावही कदाचित् माझेप्रमाणें स्वयंपाकी बनले असतील असे वाटतें. पण दुस-या टर्ममध्यें परीक्षेचे दिवस जवळ येऊन अभ्यासाचा मारा जास्त पडल्यावर साहजिकच आम्हांला हें स्वयंपाकव्रत नाइलाजानें सोडावें लागलें. मी किंवा गोविंदराव कलेंत कधींच प्रवीण होण्यालायक नव्हतें. भात चांगला करीत असूं; पण गव्हाची पोळी मात्र खाण्यापेक्षां प्रदर्शनांत पाठविण्याच्या अधिक लायक होत असे. त्यामुळें प्रकृतीवरही परिणाम होऊन हा नाद आम्हीं सोडला.

चैतन्य शून्यता
माझ्या हायस्कूलच्या काळाच्या आठवणी लिहितांना माझे मित्र, खेळ, इतर छंद वगैरेसंबंधीं मला बरेच लिहितां आलें, तसें मला कॉलेजच्या काळासंबंधीं लिहितां येत नाहीं. ह्याचें कारण हेंच कीं दारिद्र्यामुळें व आईबापांच्या आश्रयापासून दूरच्या रहिवासामुळें माझ्या स्वभावांतला सहज आनंद बराच कमी झाला. किंबहुना मला अकालीं पोक्तपणा व विचारीपणाही आला. त्यामुळें माझा खेळकरपणा तर पार मावळलाच पण मला इतरांशीं मैत्री जोडण्याची हौस नाहींशी झाली! फार काय पण कॉलेजच्या वर्गांतील ठरीव अभ्यासावरील मनही उडूं लागलें. अभ्यास जुलमाच्या रामरामाप्रमाणें मला दुःसह झाला. त्यामुळें फर्ग्युसन कॉलेजबद्दलच नव्हे तर एकंदरींत तत्कालीन विश्वविद्यालयीन चैतन्यशून्य शिक्षणपद्धतीसंबंधीं विरक्ति आणि विमनस्कता माझ्यामध्यें वाढूं लागली. जमखंडी हायस्कुलांत पहिला नंबर म्हणून मिरवलेला मी फर्ग्युसन कॉलेजमध्यें कोठल्या कोनाकोप-यांत बेपत्ता विद्यार्थी होऊन राहण्याची मला मनांत टोंचणी लागली. अभ्यासाची हयगय चाललेली माझ्या लक्षांतच येईना.


बौद्धिक विकास
ठराविक अभ्यासाची वर सांगितल्याप्रमाणें अवस्था झाली तरी माझ्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला अशांतला मुळींच प्रकार नव्हता. तें कधीं शक्यच नव्हतें. ह्याहीपेक्षां भयंकर आपत्ति मजवर पुढील आयुष्यांत कितीतरी कोसळल्या. तरी माझ्या मनाची अंतर्वाढ थांबणें शक्यच नव्हतें. सहज आनंद माझ्या मनोरचनेचा पायाच आहे असें आतां मला दिसूं लागलें आहे. माझ्या आनंदाला, शांतीला, समाधानाला-अतएव अंतर्विकासाला बाह्य उपाधीची मदत झाली नाहीं किंबहुना विरोधही झाला नाहीं, असो.
सोबती, खेळ, बाह्य सुखसोयी वगैरेची बाजू लंगडी पडली. तरी माझें खासगी वाचन त्या काळाच्या मानानें बरेच चाललें होतें. जमखंडीसारख्या गांवढ्या गांवांतल्या हायस्कुलांत पुस्तकालयाची उणीव होती तितकी व तशी फर्ग्युसनसारख्या नवीन चालू झालेल्या कां होईना, पण कॉलेजांत असणें शक्य नव्हतें. प्रीव्हियस वर्गांत असतांनाच मला जॉन स्टुअर्ट मिल्लसारख्या तत्त्वज्ञानाचा आणि मेकॉलेसारख्या ऐतिहासिक निबंधकाराचा परिचय घडला. Liberty (स्वातंत्र्य) Utilitarianism (उपयोगवाद, बहुजनहितवाद); Subjection of Women (स्त्रियांची गुलामगिरी) वगैरे मिल्लचे प्रासादिक ग्रंथ मूळ इंग्रजींत वाचून कानांत वारें शिरलेल्या वासराप्रमाणें माझी स्थिति प्रीव्हीयसमध्येंच झाली होती! इंटरमिजियटमध्यें आल्यावर हर्बट स्पेन्सरच्या Education (शिक्षण), Introduction of the Study of Sociology (समाजशास्त्राच्या अध्ययनाचा परिचय) ह्या इंग्रजींतील मूळ ग्रंथांचे वाचन झालें. त्यावेळीं स्पेन्सरची चलती यूरोप-अमेरिकेंतच नव्हे तर हिंदुस्थान व जपान ह्या पौरस्त्य देशांतही फार वैभवशाली आणि विजयी झाली होती. बहुतेक त्या काळचे कॉलेजांतले शिक्षक स्पेन्सरच्या अज्ञेयवादानें जवळ जवळ झपाटल्याप्रमाणेंच झालें होतें. दाभोळकर नांवाच्या एका गृहस्थांनीं तत्कालीन तरुण विद्वान गृहस्थाकडून स्पेन्सरच्या ब-याच ग्रंथांची भाषांतरमाला प्रसिद्ध करण्याचें काम नेटानें चालविलें होतें. त्यांपैकीं बरींच पुस्तकें मी हाव-या हाव-यासारखें वाचीत असें.

नास्तिकपणा
जेथें आमचे गुरुच त्या नवीन विचारानें असें हैराण झालेलें, मग माझ्यासारख्या उतावळ्या विद्यार्थ्यांची अत्यवस्था झाली म्हणावयाला काय हरकत आहे. पुस्तकें जरी मी म्हणण्यासारखीं पुष्कळशीं वाचलीं नसलीं तरी जीं तात्विक महत्वाचीं वाचलीं त्यांचा माझ्यामध्यें अभिनिवेश फार जोराचा घडला. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे जमखंडींतल्या आमच्या वाड्यांतल्या अंधेरी देवघरांत बसून श्रीशिवलीलामृतांचें पारायण करीत शिवलिंगावर श्रावणी सोमवारीं सहस्त्रदळें वाहिल्याशिवाय तोंडांत पाणी न घेणारा पो-या. मी पुण्यांत आल्यावर आगरकरांचे लेख आणि मिल्ल-स्पेन्सरचे प्रत्यक्ष ग्रंथ वाचून पुण्यांतल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठ्या नास्तिक बनलों!

चर्चा मंडळ
मी नुसतें वाचून स्वस्थ बसणारा युवक नव्हतों. जें आपल्या मनांत आलें तें दुस-याजवळ बोलून त्यावर चर्चा करावयाची प्रवृत्ति किंबहुना खोड माझ्यामध्यें आनुवंशिकच होती. माझ्या वडिलांप्रमाणेंच मलाही बोलावयाला फार आवडतें. मात्र लाजाळूपणाचा दाब असल्यामुळें अपरिचिताजवळ किंवा अप्रासंगिकपणें वाकतांडव करण्याचें मात्र मला कधीं धैर्य होत नसे. तथापि पोटांत घटकाभर विष आवरेल पण नवीन विचार अगर एकादा सुंदर अनुभव मनाला घडला, कीं कोणातरी सहानुभूतिच्या मित्राजवळ किंवा आप्ताजवळ ओकून टाकल्याशिवाय मला चैनच पडत नसे. ह्यामुळें केळकरांच्या वाड्यांत असतांना माझ्या नेतृत्वाखालीं आमच्या खोलींत एक छोटेखानी Debating Union (चर्चामंडळ) स्थापन करण्यांत आलें होतें. त्यांत माझाच सुळसळाट जास्त असावयाचा. ह्या लहानशा मंडळांत नवीन भेटलेल्या मिल्ल-स्पेन्सरच्या विचारांची पुनरावृत्ति करण्यांत मी मोठें वक्तृत्व पाघळीत असें. ह्या वक्तृत्वाची संवय आमच्या जमखंडींतील वसंत व्याख्यानमालेंतल्या माझ्या दुढ्ढाचार्यपणावरून मला लागत चालली होती. विचारस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, विकासवाद, स्त्रीदाक्षिण्य, इ. इ. मोठमोठ्या अवजड विषयांवर लहान तोंडीं मोठा घास घेण्याचें मला जमखंडींतल्या वसंत व्याख्यानमालेंतच आंगवळणीं पडलें होतें. मग पुण्यासारख्या वाचाळ आणि मुंबईसारख्या चवचाळ शहराचा संपर्क घडल्यावर आणि विशेषतः मिल्ल-स्पेन्सरच्या तत्कालीन वेदतुल्य नवीन विचारांच्या ज्ञानलतांनीं दुर्विदग्ध झाल्यावर माझें डोकें ताळ्यावर राहणें कठीण झालें. मंडळांतील सभांतूनच नव्हे तर विद्यार्थ्यांशीं खासगी संभाषणांत मी त्यांना माझा नवीन तुटपुंजा नास्तिकपणा शिकवूं लागलों. त्यावेळीं मी एक लहानसा इंग्रजींत निबंध लिहिला होता. त्यांत ‘देवानें माणसाला निर्माण केलें नसून माणसानेंच उलट देवाला निर्माण केलें’ हें अर्धवट सत्य मी मोठ्या उत्साहानें प्रतिपादिलें होतें हें पण आतां नीट आठवतें! तें कसेंही असो. कोणीं कोणाला निर्माण केलें हा वाद जगाच्या अंतापर्यंत चालणारा आहे. पण इतर अनेक कारणांत माझ्या विक्षिप्त खासगी वाचनाची आणि वादविवादाची भर पडून ठराविक अभ्यासाची आबाळ झाली. अर्थात् मला इंटरमिजियट परीक्षेंत अपयश आलें! जमखंडी हायस्कुलांतील पहिला नंबर विश्वविद्यालयांत बराच खालीं घसरतो; इतकेंच नव्हे तर उगीच घमेंड मारील तर चांगली आपटीही खातो कसा, हें मला प्रत्यक्ष अनुभवास आलें. विशेष हा कीं, ज्या (Logic) तर्कशास्त्र ह्या विषयांत माझा विशेष तोरा चालत असे त्यांतच मी नापास झालों असें वाचून तर “ज्वर इव मदो मे व्यपगतः” हा भर्तृहरीचा टोमणा मला चांगलाच जाणवला!

पशुपणा
परीक्षेंत नापास होण्याचा अनुभव मला आतांपर्यंत मुळींच नव्हता. तो आला हें एका परीनें बरेंच झालें. वाईट वाटणें साहजिकच आहे; पण अगदीं धक्का असा बसला नाहीं. मात्र विश्वविद्यालयीन परीक्षांविषयीं आदर कमी कमी होऊं लागला. ह्या परीक्षेच्या चरकांत तरुण विद्यार्थ्यांचे रक्त कसें पिळून निघतें, आणि इतक्या रक्ताच्या आहुत्या ओतूनही शेवटीं अपयशाचा टिळा लागला म्हणजे विद्यार्थ्यांचें कंबरडेंच मोडतें हें कळलें! कंबरडें मोडल्यावरही पुनः जो कॉलेजची वाट धरितो तो “स वै मुक्तोsथवा पशुः” ह्या वचनाप्रमाणें मुक्त किंवा पशु असावा. मी मुक्त नसल्यामुळें पशुपणा पदरीं घेऊन इ. स. १८९५ चे जानेवारींत हातांत नाक धरून जमखंडीहून पुनः कॉलेजच्या अभ्यासासाठीं पुण्याला निघालों!

कडेवाला मित्र
इ. स. १८९४ सालीं आम्हीं नारायण पेठेंत केळकरांच्या वाड्यांत असतांना सदाशिव पेठेंतील प्रसिद्ध हौदावर रोज सकाळीं स्नानास जात असूं. त्याच हौदाला लागून पूर्वेस करमरकरांचा (हें नांव पक्कें आठवत नाहीं) वाडा आहे. त्यांत एक ब्राह्मणाची खाणावळ होती. तेथें मी आणि गोविंदराव जेवावयास जात असूं. इ. स. १८९५ वर्षारंभी मी पुनः पुण्यास आल्यावर पहिल्या टर्ममध्यें ह्याच वाड्यांतील दुस-या मजल्यावर आम्हीं एक बि-हाडासाठीं खोली भाड्यानें घेतली. तिच्यांत गोविंदराव, त्यांचे कोल्हापुराकडचे कुळकर्णी नांवांचे एक स्नेही, जनूभाऊ करंदीकर आणि मी इतकेजण मिळून राहात होतों. येथें देखील कांहीं दिवस आमच्या चर्चामंडळाच्या कांहीं सभा झाल्या. रा. कुळकर्णी आणि जनुभाऊ हे दोघे अगदीं जुन्या मताचे आणि गोविंदराव व मी तितकेंच नव्या मताचे असल्यामुळें ह्या पहिल्या टर्मभर अभ्यासापेक्षां आमचा वादविवादच फार झाला. आणि तो अगदीं जोरोजोरानें पुष्कळ वेळ चालत असे. कुलकर्णी हे घरचे श्रीमंत होते. नेसावयाला रेशीमकाठीं धोतरें आणि डाव्या हातांत एक भलें मोठें सोन्याचें कडें नेहमीं घालीत असत. त्यांच्या जुन्या राहटीचीं हीं झगझगीत चिन्हेंच होतीं. आम्ही त्यांना नेहमीं कडेवाला कुलकर्णी म्हणत असूं. ते बोलतांना किंचित् तोतरे बोलत असत. आणि वादांत चिडत असल्यामुळें त्यांच्या तोतरेपणाला मोठी बहारीची लज्जत येत असे! स्नानसंध्या, सूर्याला नमस्कार, धोतरांच्या चापून नि-या, सुंदर चेहरा, पाणीदार डोळे, गोरा रंग आणि हातांतलें बावनकशी सोन्याचें भव्य कडें - एकंदरींत नमुना कांहीं औरंच होता. अभ्यासाची प्रगति मात्र ह्या सर्वांच्या उलट दिशेनें धांव घेत होती! ह्याच्या सहवासांत ही पहिली टर्म हासत खेळत मजेंत गेली. अर्थात् डेक्कन मराठा असोसिएशनची माझी दरमहा १० रु. ची स्कॉलरशिप चालूच होती हें निराळें सांगणें नकोच.

खाद्यक्रम
गोविंदरावांची मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाली कीं नाहीं हें आठवत नाहीं. कुलकर्णी आणि ते पुनः नेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्यें गेले असावेत. असो. ह्या टर्ममध्यें माझी प्रकृति थोडी बिघडावयाचें एक चमत्कारिक कारण घडलें तें असें. दिवस उन्हाळ्याचे होते. चतुःशृंगीचे माळावर आणि आंबराईंतून लांब फिरावयाला जात असूं. फर्ग्युसन कॉलेजची नवी इमारत बांधावयाचें काम त्या माळावर चाललेलें असे. जणूं काय आम्ही सुपरवायझरच, असे तें काम रोज कोठवर आलें तें पाहून येत असूं. आमचें कॉलेज म्हणून मोठा अभिमान वाटत असे! परत येतांना कच्च्या कै-या आणि लकडीपुलावरच्या पश्चिम टोकावर बसत असलेल्या एका भडभुंज्याच्या दुकानांतले डाळेकुरमुरे आणि गुडदाणी ही सपाटून खावयाची आणि वरती बेसुमार पाणी प्यावयाचें हा आमचा मेनू (खाद्यक्रम) असे.

व्यायामाची इर्षा
अशा स्थितींत कडेवाल्या कुळकर्ण्यानें दुसरीच एक शक्कल काढली. ते नमस्कार बरेच घालीत. त्यांचें पाहून आम्हीही व्यायाम करीत असूं; पण व्यायामाप्रमाणें खाणें कांहींतरी पौष्टिक असलें पाहिजे म्हणून भिजलेंली डाळ, वाळलेलें खोबरें आणि खारका ह्यांचा खुराक आम्ही सर्वांनीं चालूं केला. मग काय विचारतां ॽ झटपट पैलवान बनण्यास आतुर झालेले आम्ही जातां येतां डाळीचे फक्के मारणें, खोब-याचे चावे घेणें आणि खारका कुरतडणें ह्यांत एकमेकांवर चढाओढ करू लागलो. जो जास्त खाऊन पचवील तो शूर वीर, ही व्याख्या ठरली. अशांत पाडव्याचा कीं कसलासा, सण आला. खानावळबाईनें केळाचें शिकरण केलें होतें. अर्थात् केळापेक्षां शिकरणांत पाण्याचेंच प्रमाण बेफाम जास्त झालें होतें. त्यांचाही मी मागें पुढें न पाहतां समाचार घेतला. आणि तिसरे प्रहरीं पुनः कच्ची डाळ, खोबरें, खारका आणि कै-या ह्यांचा तोबरा चालू झाला. ह्याचा काय परिणाम झाला हें निराळें सांगण्याची आतां जरूरीच उरली नाहीं.

आजार
त्या रात्रीं इतर मंडळी निजली. पण मला कांहीं झोंप येईना. पोटांत घडघडा करूं लागलें; कळा येऊं लागल्या. आणि वादळ झाल्यावर ज्याप्रमाणें वळवाच्या पावसाच्या सरीवर सरी याव्यात त्याप्रमाणें जोराजोराचे मला जुलाब होऊं लागले. चारपांच जुलाबांनंतर मला जिना उतरून खालीं पायखान्यापर्यंत जाण्याची शक्ति उरली नाहीं. खोलींतल्या न्हाणींतच विधि उरकावा लागला. १०।१५ असे जुलाब झाल्यावर नीट बसावयाचेंही त्राण उरलें नाहीं. पोटांतल्या तिडिकांना कसली उपमा द्यावी हें समजत नाहीं. कोणीतरी दोघांनीं मिळून एकादे धोतर जोरानें पिळून त्यांतले पाण्याचा थेंब न थेंब बाहेर काढावा तशी माझ्या आंतड्याची अवस्था झाली. ही उपमा तरी हल्लीं माझ्या आंतड्याला पीळ पडला नाहीं म्हणूनच सुचत आहे. त्या वेळेला ही सुंदर उपमा सुचणें शक्य नव्हतें!

दुःखानंद
कादंबरीकार आपल्या स्वकपोलकल्पित कथानकांतील नायक-नायिकेच्या दुःखाच्या वेदनांचें रसभरीत वर्णन करीत असतो, ह्याचें कारण तो स्वतः त्या वेदनांच्या चटक्यापासून सुरक्षित असतो म्हणूनच. येरवीं हें काव्य शक्यच नाहीं. संगीत नाटकांतील पात्रें रंगभूमीवर उभी असतांना त्यांच्यावर घोर संकट ओढवलें असतां मोठमोठ्यानें आलाप काढून आपल्या दुःखाचें वर्णन प्रेक्षकापुढें करीत असतात. फासांवर जाणारा चारुदत्त इतका सुंदर गातो कीं गाऊन गाऊन मरावयाला पडद्याआड जाऊं लागला म्हणजे लोक त्याला “वन्स मोअर” करून पुन्हा फासावर आणितात आणि चारूदत्त लोकाग्रहास्तव पुनः त्याच वेदनांचा आनंदानें उपभोग घेतो. हा प्रकार पाहून मला तर माझें हासेंच आवरत नाहीं! अरे पण मी हें काय कोणीकडे भरकटत चाललों, मीही त्या नटाप्रमाणेंच माझ्या जुलाबाचें वर्णन चालू करतों; कारण पोटांत हल्लीं दुखत नसल्यानें वर्णन करण्यास कोणती हरकत आहेॽ

मुक्तता
उजाडल्यावर उतार पडला. पण तेव्हां माझ्या तोंडावर निव्वळ प्रेताची कळा आली होती. आदले दिवशीं सायंकाळीं ज्यांनीं पाहिलें होतें त्यांनी दुस-याच दिवशीं पहाटे माझी ओळख लागेना. अशी भयंकर पालट केवळ सहा तासांत घडली! सकाळीं कोणत्याशा डाक्टराला बोलावून आणिलें त्यानें तात्काळ थोडेसें हिंग आणि तूप खावयास दिलें. पण औषधापूर्वींच व्याधीचा अस्त झाला असल्याकारणानें हें नाटक शोकपर्यावसायी झालें नाहीं. मात्र डाळखोबरें आणि खारका ह्यांच्यावर अर्थात् हद्दपारीची शिक्षा ताबडतोब समरीपावरनें बजावण्यांत आली. आणि झटपट पहिलवान होण्याची ईर्षा बाळगणा-या मला घरीं नुसतें पत्र लिहिण्याचें सामर्थ्य यावयालाही बरेच दिवस वाट पाहावी लागली. बिचा-या गोविंदरावांना तें पत्र लिहावें लागलें. आजार औट घटकेचा असल्यामुळें, ज्यांना आजार झाल्याची बातमी नव्हती त्या माझ्या घरच्या मंडळींना मी आजारांतून बरा झालों हें पत्र वाचून दुःख झालें कीं सुख झाले हे ठरविणेचे मी वाचकांवरच सोपवितों!

सुधारकी हेतू
सन १८९५ च्या मे महिन्याच्या सुटींत मी जमखंडीला होतों. ह्यावेळीं गोविंदराव व मी दोघांनीं आपापल्या कुटुंबांतील कोणास तरी पुण्यास आणून कायमचें घर करून राहण्याचा विचार करीत होतों. इतका आम्हांला खाणावळीच्या जेवणाचा कंटाळा आला होता. त्यावेळीं दरमहा ५ पांच रुपये खाणावळीचा दर होता. केवळ काटकसरीनें व स्वतःचें घरचें जेवण हेंच एक साधें कारण नसून घरांतील स्त्रीनातलगांना स्त्रीशिक्षण व प्रवासाचा लाभ देण्याचा सुधारकी हेतूही आमच्या तरुण मनांत सळसळत होता. ह्याला कारण हरी नारायण आपटे ह्यांच्या कादंब-या! अशा संधीस माझ्या बहिणीवर प्रसंग ओढवून ती कायमची माहेरीं आली. गोविंदराव आणि माझ्यामधील पत्रव्यवहाराचें पर्यवसान असें झालें कीं मी पुढील टर्ममध्यें पुण्यास गेलों; तों बरोबर माझ्या बहिणीस व मातोश्रीस घेऊनच गेलों. कोल्हापुराहून गोविंदरावही आपल्या पत्नीस व लहान मुलीस घेऊन आले. सदाशिव पेठेंत नागनाथाच्या पाराजवळ पालकरांचा एक मोडकळीला आलेला जुना वाडा होता. त्यांत बरीच स्वस्त जागा दुस-या मजल्यावर मिळाली. तो वाडा माझे जमखंडीचे मित्र रा. श्रीनिवास नारायण करकंबकर देशपांडे ह्यांच्या मालकीचा होता. त्यांत माझे व गोविंदरावांचें कुटुंब, जनुभाऊ करंदीकर, माझे एक मित्र रामचंद्र नारायण सावंत असे राहूं लागलों. पण खर्चाचा बोजा गोविंदरावानेंच ब-याच अंशीं आपल्या अंगावर घेतला होता. सन १८९५—९६ हीं वर्षें मुंबई पुण्यास हिंदु-मुसलमान दंग्याची गेलीं. तशांत पुण्यास प्लेग व जमखंडीस दुष्काळ आला. ह्याच वेळीं जमखंडीच्या यजमानांनीं आमच्या बाबांना नोकरीवरून कमी केलें. अशांत मी बहीण व आई घेऊन पुण्यास शिकावयाला आलों. ह्याला म्हणावी सुधारणेची तळमळ! मला शिकवण्या धरून प्रपंच व अभ्यास चालवावा लागत असे; पण चि. जनाक्काला कोणत्या शाळेंत घालावी हा विचार चालला. मला पुण्याची माहिती व तेथील शिक्षणाची व्यवस्था अद्यापि चांगली नव्हती. सदाशिव पेठेंत चिमण्या गणपतीजवळ ख्रिस्ती मिशनची मुलींची प्राथमिक शाळा होती. तिची हेडमास्तरीण श्रीमति सांगले नांवाची बाई होती. त्या शाळेंत मी जनाक्काला घातलें, आनंद झाला. ही प्रत्यक्ष सुधारणेची पहिली पायरी! आपट्यांच्या कादंब-या आम्ही भावंडें अधिक आवडीनें वाचूं लागलों.

पंडिता रमाबाई
ह्या वेळीं पंडिता रमाबाई व तिचा ख्रिस्ती धर्म बराच गाजत होता. तिची पुणें लष्करांत ‘शारदा सदन’ नांवाची एक मुलींच्या बोर्डिंग शाळेची संस्था होती. माझ्या बहिणीची कांहीं सोय लागते कीं काय हें पाहण्यासाठीं मी ह्या मोठ्या धेंडाला भेटावयाला गेलों. बाई शांत गंभीर दिसल्या पण तिचा ख्रिस्ती कावा बरेंच बोलणें झाल्याशिवाय दिसण्यासारखा नव्हता. बाई माझ्या बहिणीस आपल्या पंखाखालीं घेण्यास तयार होत्या. पण त्यांनीं माझ्यासारख्या बाहेर गांवाहून नुकताच आलेल्या बावळटाळा पाहिलें व माझ्या बहिणीच्या निराधारपणाची कहाणी ऐकली. तेव्हां ती एकेक अटी घालून आपलें जाळें विणूं लागली. ती म्हणाली कीं, मुलगी तिचें स्वाधीन केल्यावर पांच वर्षें तिला सुट्टी वगैरे मिळणार नाहीं. तिला आमचे घरीं पाठवणार नाहीं. आम्ही मुलीच्या शिक्षणक्रमांत अडथळे आणूं. ह्याचा सरळ अर्थ मला तरुण हिंदूला कळेना. मुलीच्या हिताच्या दृष्टीनें ही अट अवश्य होती असें बाईचें मत पडलें. पण ज्या नवमताचें पाणी ही पंडिता प्याली होती त्याचें चार थेंब माझ्याही पोटांत गेलें होतें. मीं उत्तर दिलें, “बाई शिक्षणांत अडथळे आणण्यासाठीं मी बहिणीस तुमच्याकडे पाठवण्याचें कारणच नाहीं. तिनें ख्रिस्ती होण्यास अडथळे आणूं ही भीति तुम्हांस असणें साहजिक आहे. असें असलें तरी मुलीस नियमाप्रमाणें (विद्याखात्याच्या) सर्व सुट्या तुम्हांला देणें अवश्य आहे. मुलीच्या हिताची काळजी निदान तुमच्या इतकी तरी मला व मुलीच्या आईबापांला आहेच हा विश्वास तुम्हाला असावा. तुमच्या शिक्षणानें मुलगी आपखुशीनें व अक्कलहुशारीनें ख्रिस्ती होऊं लागल्यास निदान मी तरी अडथळा आणणार नाहीं. तिच्यावर तिला न कळत, जबरी तर राहोच, पण भुलभुलावणी होऊं लागली तर तें मी सहन करणार नाहीं. बेहत्तर आहे तुमची अशी अटीतटीची मदत न मिळाली तरी.” पंडिता रमाबाईंना मी तरुण असून दिसतों तसा बावळट नाहीं, हें कळून चुकलें. तिनें माझ्याविषयीं अधिक चौकशी केली. मी फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी आहें असें ऐकल्यावर ह्या कॉलेजचे प्रोफेसर नास्तिक आहेत, असा शेरा तिनें मारला. जखडलेल्या धर्मापेक्षां मोकळा नास्तिकपणा बरा असें मी माझें मत सांगितलें.

प्रो. कर्वे
ह्या सुमारास प्रो. अण्णासाहेब कर्वे यांनीं हिंगणें येथें अनाथ बालिकाश्रमाची स्थापना नुकतीच केली होती. त्यांच्याकडे मी माझ्या बहिणीसाठीं भेटावयास गेलो होतो. शेणामातीनें सारवलेल्या कुडाच्या भिंतीच्या एका खोपटांत प्रो. अण्णासाहेब जमिनीवर बसले होते. त्यांचे आश्रमांत ब्राह्मण जातीच्याच १०।१५ विधवा मुली होत्या. माझ्या बहिणीला आपल्या आश्रमांत घेतां काय ह्या माझ्या प्रश्नाला , “ब्राह्मणेतरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाहीं” असें प्रोफेसर अण्णासाहेबांनीं सांगितलें व माझ्या बहिणीला आश्रमांत घेण्याचें साफ नाकारलें. ह्यामुळें माझी फार निराशा झाली. तत्कालीन महाराष्ट्रांत एक सुधारणा करतांना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई ह्याचें हें उदाहरणच आहे.

मिस् मेरी भोर
पुढें माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठीं पुष्कळ धडपड करावी लागली. तिला मीं शेवटीं पुणें येथील प्रसिद्ध (हुजर पागेंतील) मुलींच्या हायस्कुलांत घातलें. जमखंडीस तिच्या ३।४ यत्ता मराठी झाल्याच होत्या. इंग्रजी पहिल्या यत्तेंत तिचें नांव घालण्यास इतर कोणतीच हरकत नव्हती. पण हिंदु विवाहित स्त्री म्हणजे कोणत्या भयंकर तुरुंगांत असते, ह्याची कल्पना मला नव्हती. शाळेचे अधिकारी चि. जनाक्कच्या नव-याची तिच्या शिकण्यास परवानगी मागूं लागले. तिचें येथवर शिक्षण झालें हेंच तर तिच्यावर नवरा जिवंत असून वैधव्याचा असला प्रसंग गुदरला वगैरे माहिती मला जिथें तिथें कष्टानें सांगावी लागली. नव-याच्या हरकतीची जबाबदारी मीं घेतली. तिला शाळेंत प्रवेश मिळाला; पण मला तर तिला कोठून तरी स्कॉलरशिप मिळवावयाची होती. माझा वशिला तर कोठेंच नव्हता. त्या वेळीं हुजूर पागेंत मिस् मेरी भोर नांवाची हुशार ख्रिस्ती बाई एक शिक्षकीण होती. आणि मिस् हरफर्ड नांवाची एक युरोपिअन बाई मुख्याध्यापिका होती. त्या दोघींना जनाक्काचा कळवळा आला. उच्च वर्णीय हिंदु लोकांत घटस्फोटाचा कायदा नाहीं. आणि कांहीं झालें तरी घटस्फोटाची नुसती कल्पनाही चि. जनाक्काजवळ काढण्याची माझी छाती नव्हती; इतकें तिचे तेज व पवित्रतेचा परिणाम घरांत आम्हां सर्वांवर पडत असे. ही सर्व परिस्थिति तिच्या शाळेंतील मुख्य अधिका-यांना कळली. मिस् भोरकडे माझें जाणें येणें होऊं लागलें. माझी सुधारणेचीं मतें व वागण्याचा बाणेदारपणा पाहून तिचा फार अनुकूल ग्रह आम्हां भावंडाविषयीं झाला. ह्यामुळें आमच्या सर्व अडचणींतून पुढें जनाक्काला संस्थान मुधोळच्या राजेसाहेबांची मराठा मुलीकरितां दहा रुपये दरमहाची एक स्कालरशिप होती ती मिळाली. ह्यामुळें माझी अंशतः तरी सोय झाली. येरवी प्रसंग फारच कठीण आला होता.

कावेबाजपणा
सन १८९५ सालीं आमच्या फर्ग्युसन कॉलेजची नवीन इमारत चतुःश्रृंगीचे माळ्यावर उघडण्यांत आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कोल्हापुरचे महाराज श्रीछत्रपति शाहुमहाराज होते. त्यांच्या हातून हा उद्घाटन समारंभ उरकून घेण्यांत आला. माझें वय त्यावेळीं सुमारे २२ वर्षांचें होतें; पण ह्या छत्रपतींचें वय माझ्याहूनही २।४ वर्षांचें लहान असावें. महाराष्ट्राचे छत्रपति ह्या नात्यानें महाराज अध्यक्षपदाला सर्वस्वी लायक होते, तरी वयोमानानें ते अद्याप अननुभवी होते. मी नेहमीं म्हणत आलों आहें कीं, महाराष्ट्रांतील चितपावन जात युरोपांतील इंग्रजांप्रमाणें धोरणी व कावेबाज आहे. ही गोष्ट ह्या जातीला मोठी भूषणावह आहे. ह्या कावेबाजीचें उदाहरण म्हणजे छत्रपतींचा अध्यक्षपणा होय. कोवळ्या वयाचा हा क्षत्रिय छावा चितपावनांचा हा सोहळा साजरा करावयाला आला होता. ह्याचें इंगित त्यावेळींही मला समजून आल्याशिवाय राहिलें नाहीं. पुढें हे शाहूमहाराज ब्राह्मणेतर पक्षाची मुहुर्तमेढ रोवणारे ह्या नात्यानें चितपावन ब्राह्मणांच्या डोळ्यावर आले व दृष्टीसमोर नकोसे झाले. इतके कीं हे निधन पावल्यावर नागपुराकडे मवाळांची एक मजलस भरली असतां, उमरावती जिल्ह्याचे श्री. गणेश अक्काजी गवई नांवाचे एका महार जातीचे गृहस्थांनीं मृत महाराजांचे विषयीं दुखवट्याचा ठराव मांडला. पण तो श्रीनिवास शास्त्र्यांसारखा थोर पुरुष अध्यक्षपदावर झळकत होता तरी पास झाला नाहीं. तथापि त्या महाराजांचे औरस पुत्र छत्रपति राजाराम महाराजांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपदाचा वारसा चितपावनानें पुन्हां दिलाच व छत्रपतीनेंही तो वारसा मुकाट्याने स्वीकारला, तें कसेंही असो. तरुण शाहूमहाराज सन १८९५ च्या ह्या समारंभांत फार शोभायमान दिसले! ह्या १८९५ साल अखेरीस पुण्यास अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचें अधिवेशन थाटानें भरलें. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे बंगाली वाचस्पति अध्यक्ष होते. त्या वेळीं मी स्वयंसेवक होतों. तेव्हांपासून देशाभिमानाचें वारें समाजसुधारणेच्या वा-याप्रमाणें माझे डोक्यांत शिरलें आणि मी राष्ट्रीय पक्षाचा झालों.

रे. डॉ. संडरलंड
ह्याच वर्षीं आणखी एक महत्त्वाची गोष्ट विशेषतः माझ्या चरित्रावर परिणाम घडविणारी घडली. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशननें आपला प्रतिनिधि म्हणून रेव्हरंड डॉ. जे. टी. संडरलंड ह्या नामांकित मिशनरी गृहस्थाला हिंदुस्थानांत पाठविलें. राष्ट्रीय सभेंत यांचें खणखणीत भाषण ऐकलें. हिंदुस्थानांतील ब्राह्मसमाज किंवा महाराष्ट्रांतील प्रार्थनासमाजापूर्वीं माझ्या ग्रहणशील मनावर ह्या परदेशीय उदार धर्मपंथाचा संसर्ग आधीं घडला ही गोष्ट पाश्चात्यांच्या व्यावहारिक प्रसरणशीलाची साक्ष आहे. डॉ. संडरलंड साहेबांची मीं समक्ष गांठ घेऊन विचारविनिमय केला. युनिटेरियन पंथाच्या लहान लहान चोपड्या ब-याच वाचल्या. Larger meaning of Uniterianism हें चोपडें मला फार बोधपर वाटलें. त्याच वर्षीं पुणें येथील प्रार्थना समाजांत एक लहानशी एकेश्वरी पंथाची परिषद भरली होती असें मला पुढें किती तरी वर्षांनीं कळलें. आमच्या लोकांची काम करण्याची पद्धत किती टाळाटाळीची व पाश्चात्यांची विशेषतः अमेरिकनांची किती आकर्षक हें कळलें. डॉ. संडरलंड साहेबांनी हिंदुस्थानांतील आपल्या कामाचा अहवाल आपल्या देशांतील युनिटेरिअन सभेपुढें मांडला व विशेष सूचना केली की, हिंदुस्थानांतील एकेश्वरी पंथाच्या (ब्राह्म व प्रार्थना समाजाचा) एक तरुण होतकरू विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड येथील धर्माला वाहिलेल्या कॉलेजांत स्कॉलरशिप देऊन बोलावण्यांत यावा. ह्या सूचनेप्रमाणें १।२ वर्षांत कलकत्त्याहून ब्राह्मसमाजानें दर दोन वर्षांनीं एक असे तीन विद्यार्थी पाठविल्यानंतर इ. स. १९०१ सालीं पुढें स्वतः माझीच ह्या कामीं योजना झाली.

प्रपंचाची काळजी
पण हा योग १८९५ सालीं मला कळण्यासारखा नव्हता. मला पुनः इंटरमिजियट मध्यें बसावें लागलें. पुण्यास मी व माझी बहीण. शिवाय १८९६ मध्यें माझ्या पत्नीलाही बहिणीबरोबर शाळेंत घालून ह्या तिघांचा पुण्याचा खर्चच नव्हे तरी जमखंडीस माझे आईबाप व इतर ३ भावंडें ह्यांच्याही खर्चाचा भार माझेवरच पडला. मला १० रु. आणि जनाक्का हिला १० रु. अशी दरमहा वीस रुपयांचीच काय ती जमा असे. शिकवणीचे ५।७ रु. मिळालेच तर भर पडे. बाकीच्या खर्चाचें कर्जच होऊं लागलें! मोठी काळजी पडली. माझ्या तीन सख्या बहिणी; पण प्रपंचाची काळजी ही चौथी एक जन्माची सख्खी बहीण होती. तिनेंच मला शहाणें केलें. तितकें शहाणपण मला मुंबई विश्वविद्यालयानें किंबहुना ऑक्सफर्ड विद्यालयानेंही दिलें नाहीं.

जादा मदत
पण नुसत्या काळजीनें कर्माचा लांडगा कांही दारांतून निघत नाहीं. शेवटीं मला बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव महाराजांची आठवण झाली. डेक्कन मराठा असोसिएशन कडून मला दोन किंवा तीन वर्षें दरमहा १० रु. प्रमाणें फार तर ३६० रु. स्कॉलरशिप मिळाली व मी १८९६ सालीं इंटरमिजिएट मध्यें पास झालों. पण पुढें बी. ए. चीं दोन वर्षें कशी जावीत ही विवंचना श्रीमंत गायकवाड महाराजांपुढें ठेवण्यास मी समक्ष बडोद्यास सुमारें १८९६ मध्यें गेलों. श्री. लक्ष्मणराव माने ह्या नावांचे एक थोर मनाचे मराठा गृहस्थ बडोदें येथें शहाबाग ह्या भागांत होते. त्यांची माझी कशी ओळख झाली व त्यांचेहून एक बडे गृहस्थ श्री. खासेराव जाधव ह्यांचा माझा कसा संबंध जडला हें मला कांहींच आठवत नाहीं. तरी ह्या सद्गृहस्थाच्या शिफारसीनें महाराजांनीं माझेसारख्या निराधार तरुण विद्यार्थ्यांची गांठ घेतली. त्यांनीं मला दरमहा २५ रु. स्कॉलरशिप दिली. ही रक्कम मला डेक्कन मराठा असोसिएशनचे द्वारेंच मिळावयाची होती. ही मदत मिळते म्हणून ह्या संस्थेनें आपली १० रु. मदत बंद केली. खरे पाहता मला १५ रु. च अधिक मिळूं लागले. तेवढ्यालाच पाहून भुकेचा लांडगा आमचें दार सोडून दूर गेला. ही स्कॉलरशिप देतांना माझ्याकडून एक कायदेशीर स्टॅंपवर बाँड लिहून घेण्यांत आला. त्यांत माझें शिक्षण संपल्यावर मी बडोदा संस्थानांत नोकरीस रहावें, नाहींतर घेतलेल्या स्कॉलरशिपची रक्कम परत करावी असा स्पष्ट करार होता. पण ईश्वरी घटनेमुळें ह्यांतील एकही अट पुरी करणें झालें नाहीं. कसें तें पुढें ओघानें कळेल.