अंतर्बाह्य खळबळ

एक प्रश्न  :  पहिल्या सहा वर्षांत मिशनची वरील वाढ झाली हें खरें !  पण ती होत असतांना अनेक अडचणी, विघ्नें, गैरसमज आणि परीक्षेचे प्रसंग आले हेंही खरेंच.  वाढ झपाट्यानें होऊं लागली असतां पहिला प्रश्न असा उद्‍भवला कीं, हें मिशन मुंबई प्रार्थनासमाजानें आपल्या ताब्यांत आणि जबाबदारीखालीं आपलेंच एक अंगभूत काम अशा दृष्टीनें चालवावें कीं, तें सर्व राष्ट्राचें काम आहे म्हणून सर्वांचें सहकार्य मिळवून शक्य तेवढी त्याला बाहेरूनच मदत करावी ?  डॉ. भांडारकरांचें मत पहिल्या बाजूनें पडलें.  आरंभीं मिशनच्या मध्यवर्ती कमिटीवर सर्व अधिकारी आणि सभासद प्रार्थनासमाजाचेच पुढारी होते.  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या प्रोत्साहनानें आणि बळावरच मीं हें काम काढलें होतें.  पुढें बरींच वर्षे समाजाची सहानुभूति आणि मदत मिशनला बिनतक्रार व आनंदानें मिळत होती.  मिशनचा सामाजिक हेतु समाजाला पूर्णपणें मान्य होता.  इतकेंच नव्हे तर मिशनचें कार्य धर्माच्या पायावरच चालवावयाचें होतें.  तो पायाही समाजाला मान्य होता.  मात्र अस्पृश्यवर्गांतून समाजाला सभासद मिळावे असा हेतु समाजानें कधींच बाळगला नाहीं आणि तशी तक्रारही कधीं कोणी बाहेरच्यांनीं केली नाहीं.  म्हणून साहजिकच डॉ. भांडारकरांना वाटूं लागलें कीं, प्रार्थनासमाजानें हें काम आपल्याच जबाबदारीवर चालवावें.  बंगल्यांत ब्राह्म समाजानें आणि पंजाबांत आर्य समाजानें ह्या मिशनचें काम इतरांची मदत घेऊन पण स्वतःचच नियंत्रणाखालीं चालविलें होतें. म्हणून डॉ. भांडारकरांचे मतांत कांहीं वावगें होतें असें नाहीं.  पण ह्या मिशनचें काम नेहमीं वाढतें राहणार. प्रश्न जरी हिंदूंपुरता असला तरी अस्पृश्यतानिवारणाची जबाबदारी ब्रिटिश सरकार आणि हिंदुस्थानांत राहणार्‍या प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या माणसावर पडते, हें आम्हीं वेळोवेळीं सर्वांना बजावूनच काम चालविलें होतें.  पैशाची मदत जर सर्वांकडून घ्यावयाची तर त्याचा विनियोग आणि सर्व कामांच्या जबाबदारीचा वांटा खुशीनें घेतील त्यांना देण्यांतच शहाणपणा आहे, हें आम्ही जाणूनच होतों.  म्हणूनच सर नारायणराव आणि कमिटीचे इतर सभासदांना मिशनच्या कामांत सर्वांना मोकळीक ठेवावी असें वाटलें.  डॉ. भांडारकरांनाही लवकरच तें पटलें आणि हा वाद फारसा माजला नाहीं.

माझी स्थिति  :  काम झपाट्यानें वाढूं लागल्यामुळें अर्थातच माझा वेळही ह्या कामांत अधिक अधिक जाऊं लागला.  मी मूळ प्रांतिक समाजाच्या कामाला वाहिलेला.  अल्प का होईना पण माझ्या योगक्षेमाची तरतूद समाजानें केलेली.  अर्थातच समाजाच्या कळकळीच्या सभासदांना - विशेषतः ज्यांनीं मला मदत केली होती त्यांना - सहाजिकपणें ह्या बाबतींत वैषम्य वाटूं लागलें.  हळू हळू हा विषय वादग्रस्त होऊं लागला, आणि त्यांत कोणाचा काय इलाज !  जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा असें ब्राह्म आणि प्रार्थना समाज नेहमीं ओरडून सांगत आहे.  हरिजनसेवा करण्यांत प्रार्थना समाजाची सेवा मी विशेष उत्कटतेनें करीत आहें असेंही मनःपूर्वक वाटत होतें.  पण मीं मिशनमध्यें वेळ न खर्चतां समाजालाच चिकटून रहावें असा व्यक्तिशः मजसंबंधी वाद सुरू झाला; तेव्हां माझी स्थिति नाजूक झाली.  मला दगदग चिंता पडत होती; त्यांत आत्मसमर्थनाचा बोजा माझ्यावर येऊं लागला.  तो जड वाटूं लागला.  मिशनांचीं आणि समाजाचीं दोन्हीं कामें मी सांभाळीतच होतों.

माझ्या पाठीमागें माझे परम मित्र वासुदेवराव सुखटणकर हे मँचेस्टर कॉलेजांत धर्मशिक्षणार्थ गेले.  इंग्लंडांत दोन वर्षे राहून व जर्मनींत आणखी दोन वर्षे राहून १९०७ सालीं ते मुंबईस परत आले आणि प्रार्थना समाजाच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनीं अंगावर घेतली.  पण योगायोग असा झाला कीं, त्यांनीं हें काम वर्ष-सहा महिन्यांतच सोडून दिलें.  म्हणून माझ्यावर प्रार्थना समाजाच्या कामाचा बोजा पडल्यानें मीं तिकडे अधिक लक्ष पुरवावें हें म्हणणें सकृद्दर्शनीं सयुक्तिक होतें.  तरी पण समाजांतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बहुतेक सभासद यांना कळून चुकलें होतें कीं, मिशनच्या कामांतून माझी सुटका होणें केवळ अशक्य होतें.  म्हणून त्यांनीं कोणत्याही प्रकारची हरकत घेतली नाही; इतकेंच नव्हे तर सालोसाल अधिक नेटानें सहकार्य केलें.

टिळकांस शिक्षा :  वादाचें तिसरें एक कारण उद्‍भवलें.  हिंदुस्थानच्या राजकारणांत राष्ट्रीय पक्ष आणि प्रागतिक पक्ष असे दोन भेद पडून एकाचें लक्ष समाजसुधारणेकडे आणि सरकारशीं जुळतें घेऊन काम करण्याकडे अधिक तर दुसर्‍याचें लक्ष राजकीय यशाकडे आणि तेंही सरकारशीं विरोध करून, निदान फटकून राहून, मिळण्याकडे होतें.  आणि मला तर माझ्या कामांत मग तें प्रार्थना समाजाचें असो, मिशनचें असो कीं इतर कोणतें असो, होतां होईल तों सर्वांचें सहकार्य मिळविणें अवश्य होतें.  इतकेंच नव्हे तर माझेंही मतस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य कोणतीही आपत्ति आली तरी पूर्ण राखून ठेवण्याच्या हक्काला मीं कधींही बाधा येऊं दिली नाहीं.  पडेल तो त्याग करणें, येतील त्या संकटांना तोंड देणें, ह्या बाबतींत घरादाराचाही मुलाहिजा न राखणें ही गोष्ट वेगळी.  पण स्वतःचें व्यक्तिस्वातंव्य घालवून घेऊन, आपलें व्यक्तित्वच नष्ट करून घेणें ही गोष्ट वेगळी.  राजकारणांत माझें मत आणि कल पूर्णतः राष्ट्रीय बाजूकडे होता.  तथापि मी कोणत्याही पक्षाशीं तादात्म्य पावलों नाहीं.  पण मत स्पष्ट सांगावयाला आणि तदनुरूप वागायला मी कधींही कचरलों नाहीं.  माझीं मतें प्रार्थना समाजावर लादण्याचा आणि प्रार्थना समाजाचीं राजकारणांतील प्रागतिक बाजूचीं मतें इतरांवर लादण्याचा मीं कदापिही प्रयत्‍न केला नाहीं.

पण एकदां एक चमत्कारिक योग आला.  १९०७ च्या सुमारास लोकमान्य टिळकांनीं मद्यपाननिषेधाची प्रचंड धामधूम उठविली.  तींत सर्व पक्षांनीं आणि कांहीं ख्रिश्चन मिशनरीसारख्या लोकांनीं भाग घेतला.  अशाच वेळीं सुरत येथें झालेले काँग्रेस अधिवेशन लोकमान्यांनीं उधळून लावून काँग्रेसला आपल्या कक्षेंत खेंचलें.  त्यामुळें ते सरकारच्या विशेष डोळ्यांवर आले.  लवकरच त्यांच्यावर खटला होऊन त्यांना सहा वर्षे कारावासाची जबर शिक्षा झाली.  शिक्षा फार निष्ठुर झाली, म्हणून पुष्कळांना तिचा फार चटका लागला.  मद्यपाननिषेधाची चळवळ आणि त्यांत कुठें कमीजास्त बोलल्याबद्दल ही शिक्षा.  त्याबद्दल मलाही फार वाईट वाटत होतें.  शिक्षा झाल्यावर लवकरच रविवारचा दिवस आला.  त्या दिवशींच साप्‍ताहिक उपासना चालविण्याची माझी पाळी होती.  प्रार्थनेच्या वेळीं मीं गहिंवरून लोकमान्यांचा उल्लेख केला.  एवढ्या मोठ्या कारावासांत ह्या जनतेच्या पुढार्‍याला आयुरारोग्य लाभो, शरिराला विश्रांति आणि मनाला शांति मिळो, इतकेंच नव्हे तर त्याचें कोठें कांहीं चुकत असलें तर उच्च सत्याचा त्याला मार्ग दिसो अशी मीं स्पष्ट शब्दांत प्रार्थना केली.  ह्याबद्दल समाजांत खळबळ उडाली.  सर नारायणराव चंदावरकर व डॉ. भांडारकर वगैरे गुरुजनांनीं मला समक्ष बोलावून घेऊन खुलासा मागितला.  मीं नम्रतापूर्वक सांगितलें कीं, ''मला आपण विश्वासानें आचार्य आणि प्रचारक नेमलें आहे.  समाजांत सर्व प्रकारचीं, सर्व मतांचीं आणि सर्व दर्जांचीं माणसें आहेत, हें मी पूर्ण जाणून आहें.  ईश्वरापुढें उभा राहून प्रार्थना करीत असतां भारताचें संकलित भवितव्य ओळखून प्रार्थना करणें माझें जरूर आणि पवित्र कर्तव्य आहे.  ह्यांत ब्रिटिश सरकारची कदर ओळखून माझें आध्यात्मिक कर्तव्य करणें भाग आहे.  ह्यांत मीं कच खाल्ली तर मी स्वतःशींच अपात्र ठरेन.  आपला विश्वास असेल तर मला ह्या जागेवर ठेवा.  पण माझ्या कामांत स्वतः मला आणि माझ्या ईश्वराला जबाबदार राहूं द्या.''  हें निर्वाणीचें उत्तर ऐकून गुरुजनांनीं चांगला विचार केला आणि हें संकट तात्पुरतें मिटलें ह्याबद्दल मी गुरुजनांचा निरंतर आभारी राहिलों.

एक काहूर  :  पण ह्यानंतर दुसरेंच एक प्रचंड काहूर अकस्मात् उठलें.  १९०७ सालीं महाराष्ट्रांत एक अशांतीची वावटळ सुटली.  ती वर्ष दोन वर्षे चालली.  तींत १९०८ सालीं नाशिक जिल्ह्यांत एक अत्यंत खेदजनक प्रकार घडला.  त्या जिल्ह्याचे लोकप्रिय कलेक्टर जॅक्सन ह्यांचा खून एका माथेफिरूनें केला.  सरकारी अधिकार्‍यांना आणि समंजस लोक-पुढार्‍यांना मोठा धक्का बसला.  थोड्यांच महिन्यांपूर्वी ह्याच कलेक्टरांच्या उदार सहाय्यानें नाशिक येथें आमच्या मिशनची स्थानिक कमिटी स्थापिली गेली होती.  अमरावतीचे तरुण महार पुढारी यांनीं ह्या कमिटीच्या स्थापनेसाठीं नाशिक जिल्ह्यांत हिंडून, व्याख्यानें देऊन लोकमत तयार केलें होतें.  ह्यापूर्वी नामदार गव्हर्नरसाहेब सर जॉर्ज क्लार्क यांनीं आपली कन्या मिस् व्हायोलेट क्लार्क यांच्याकरवीं मोठा जाहीर जलसा भरवून मिशनला मोठी देणगी देऊन आपली सक्रीय सहानुभूति दाखविली होती.  मोठमोठे संस्थानिक, हिंदु, पारशी, ख्रिस्ती वगैरे लोकांचे पुढारी ह्यांचे लक्ष मिशननें वेधलें होतें.  इतकेंच नवहे तर जिल्ह्याचे कलेक्टर, असिस्टंट कलेक्टर वगैरे युरोपियन अधिकारी मिशनला मदत करूं लागले होते.  डॉ. हॅरोल्ड एच. मॅन, कर्नल स्टीन, मिस्टर सेज्विक वगैरे सारखे मुलकी आणि लष्करी अधिकारी पुणें शाखेच्या कमिटीवर सभासद होऊन निधि जमविण्याच्या कामीं मदत करीत होते.  अशा शुभ वेळीं ह्या भयंकर खुनामुळें मोठा अपशकून झाला.  वसतुतः ह्या खुनाचा मिशनच्या कार्याशीं काडीमात्र संबंध नव्हता.  तथापि स्थानिक अधिकार्‍यांत खळबळ उडणें साहजिक होतें.  पुणें शाखेकडून मला आणि अध्यक्ष चंदावरकरांना तांतडीचीं पत्रें आलीं.  साहजिकच चंदावरकरांना चिंता लागली.  त्यांना मीं समक्ष भेटून ताबडतोब पुण्यास जाऊन सर्व संशय निवारण करून येतों असें आश्वासन देऊन मी पुण्यास गेलों.  त्या वेळीं सर जॉन म्यूर मॅकेंझी मुंबई सरकारच्या कार्यकारी मंडळाचे मुख्य सभासद होते.  पुढें ते कांहीं वेळ तात्पुरते गव्हर्नरही झाले.  त्यांची पत्‍नी लेडी म्यूर मॅकेंझी या आमच्या मिशनच्या महिला कमिटीच्या अध्यक्ष होत्या.  मी मिशनच्या सोज्वळपणाबद्दल ह्या दोघा नवराबायकोची खात्री पटविली होती.  माझ्या मुलाखतींत सर जॉन यांनीं स्पष्ट सांगितलें कीं, ''सर नारायण चंदावरकरांचे नांवामुळें आणि तुमच्या कामाच्या तपशीलवार माहितीमुळें तुमच्याबद्दल तिळमात्रही संदेह आमच्या मनांत येणार नाहीं हें पक्कें ध्यानांत ठेवा आणि तुमचें काम निर्वेधपणें पुढें चालवा.  झालेल्या गुन्ह्याबद्दल सरकार योगय तो बंदोबस्त करील.  त्याची झळ तुम्हांला लागणार नाहीं.''  माझा जीव खालीं पडला.  पुणें शाखेच्या कमिटीला नवीन धीर आणि नवीन जोम आला.  कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन हे दमदार कार्यकर्ते.  सर नारायणरावांप्रमाणेंच ते मिशनच्या कामीं जातीनें लक्ष घालीत.  त्यांना कोणत्याच प्रकारचा संशय आला नव्हता.  पण मी मुंबईस परत येऊन पाहतों तों सर नारायणराव यांच्या राजीनाम्याचें पत्र माझ्या टेबलावर आढळलें.  मी ताबडतोब त्यांच्याकडे जाऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला.  अशा धामधुमीच्या वेळीं नामदार गव्हर्नरांची भेट घेणें उचित नव्हे; ही लाट उसळून गेल्यावर त्यांच्याकडे एक शिष्टमंडळ नेऊन घडलेल्या शोचनीय प्रकारांचा त्यांत संबंध न दाखवतां मिशनच्या अनेक गरजा त्यांचेपुढें ठेवून सरकारी रीत्या त्यांची सहानुभूति मिळविण्याचा आम्हीं प्रयत्‍न करावा.  असा प्रेमळ आणि पोक्त सल्ला सर जॉन म्यूर मॅकेंझी यांनीं दिला वगैरे मजकूरही मीं सर नारायणरावांस सांगितला.  मग त्यांनीं राजीनाम्याचा आग्रह धरला नाहीं.

दुष्ट वार्ता  :   पुढें १९०९ सालच्या आरंभीं मी मुंबईस असतांना मिस् व्हायोलेट क्लार्क ह्यांच्याकडून एक खाजगी पत्र आलें.  ह्या उदार स्त्रीनें जलसा करून मिशनला देणगी दिल्यापासून मिशनचें कार्य प्रत्यक्ष पाहावें अशी इच्छा धरली होती.  प्रतिष्ठित स्त्रियांच्या कमिटीकडून आणि निराश्रित सेवासदनाच्या प्रचारकांकडून अस्पृश्यवर्गाच्या कंगालखान्यांतून या गरीब लोकांची जी प्रेमळ शुश्रूषा व निःस्वार्थ सेवा चालली होती तिचा तपशील ह्या उदार स्त्रीचे कानांवर गेला असला पाहिजे, म्हणूनच तिनें मजला खाजगी पत्र लिहून गरिबांच्या घरोघर जाऊन हीं सेवेंची कामें आपल्याला समक्ष पाहाण्यास मिळतील काय असा प्रश्न केला होता.  अर्थात् मीं अनुकूल उत्तर दिलें.  लवकरच १९०९ च्या मार्चमध्यें मिशनच्या शाळेचा बक्षिससमारंभाचा बेत ठरविण्यांत आला.  एल्फिन्स्टन रोडजवळील मिशनच्या ठिकाणाच्या बाजूस एक विस्तीर्ण पटांगण होतें.  तेथें भव्य मांडव घालण्यांत आला.  सामाजिक मेळा, स्त्रियांची सभा, प्रीतिभोजन वगैरे पूर्वीचीं कामें देखील आटोपून घेण्यांत आलीं.  मुख्य बक्षीससमारंभाचे दिवशीं अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्या कन्येच्या हस्तें मुलांना बक्षिसें वांटण्याचें गव्हर्नरसाहेबांनीं कबूल केलें होतें.  पण दैवदुर्विलास कांहीं निराळाच होता.  आम्ही ह्या समारंभाची वाट पहात असतां त्याच दिवशीं एक भयंकर व्याधी अचानकपणें होऊन ही प्रेमळ तरुण कुमारी ख्रिस्तवासी झाली अशी दुष्ट वार्ता गांवभर पसरली.  आश्चर्य आणि दुःख यांनीं आम्हां सर्वांस घेरलें आणि ईश्वरी इच्छेस मुकाट्यानें मान द्यावा लागला.  अर्थात् मिस् क्लार्क यांना गरिबांचीं दुःखें समक्ष बघण्यास संधि मिळाली नाहीं.  पुढें कांहीं दिवसांनीं सर जॉर्ज यांच्या पत्‍नीही निवर्तल्या, म्हणून रजा घेऊन ते कांहीं दिवस एडन येथें रहावयास गेले.  त्यांच्याकडे रीतसर मिशनचे दुखवटे गेले.  त्यांच्या जागीं सर जॉन म्यूर हे तात्पुरते गव्हर्नर झाले.  पुढें ढकलण्यांत आलेला बक्षीससमारंभ ता. १२ ऑक्टोबर १९०९ रोजीं श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड यांच्या हस्तें मुंबई येथील टाऊन हॉलमध्यें टोलेजंग सभा भरवून उरकण्यांत आला.  त्याचें वर्णन मागें आलेंच आहे.

पुढें ना. गव्हर्नरसाहेब एडनहून आल्यावर त्यांचें पुन्हां लग्न झालें.  त्यानिमित्त मुंबईच्या भायखळा येथील इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या पटांगणांत मुंबई अस्पृश्यवर्गीय स्त्रियांची जाहीर सभा भरली.  ही सभा ता. ५ नाव्हेंबर १९१० रोजीं भरली.  तिचें अध्यक्षस्थान मुंबईच्या सेवासदनाच्या कार्यकर्त्या सौ. यशोदाबाई ठाकून यांनीं मंडित केलें होतें.  ना. गव्हर्नरसाहेबांच्या लग्नाचा अभिनंदनपर ठराव पास होऊन त्यांच्याकडे पाठविण्यांत आला.

शिष्टमंडळ  :  सर जॉन म्यूर मॅकेंझींनीं सुचविल्याप्रमाणें मिशनचें एक वजनदार शिष्टमंडळ ता. २५ ऑगस्ट १९१० रोजीं मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांचेकडे पुण्यांतील गव्हर्नमेंट हाउसमध्यें गेलें.  त्यांत सौ. सईबाई परांजपे - प्रि. र. पु. परांजपे यांच्या पत्‍नी, डॉ. हॅरोल्ड एच. मॅन, बॅ. एच. ए. वाडिया, दि. ब. गोडबोले, प्रो. धों. के. कर्वे आणि मी इतकी मंडळी हजर होती.  प्रथम सौ. सईबाईंनीं भाषण करून शिष्टमंडळाचे मुख्य सभासद लेडी म्यूर मॅकेंझी ह्या विलायतेला गेल्यानें त्यांना हजर राहतां आलें नाहीं याबद्दल खेद व्यक्त केला.  नंतर मीं भाषण करून मिशनचा सविस्तर लेखी अर्ज सादर केला.

त्या अर्जामध्यें पुढील विशेश मागण्या करण्यांत आल्या:  (१) ना. गव्हर्नरांनीं मिशनच्या घटनात्मक नियमाप्रमाणें मिशनचे पेट्रन म्हणून पांच हजार रुपये देऊन उदार आश्रयदाते व्हावें.  (२) मुंबई सरकारनें मातृसंस्थेला उदार ग्रँड-इन-एड (वर्षासन) द्यावी.  (३) मिशनचा ५००० रु. फंड वेगळा काढून ठेवला आहे.  त्यापासून मुंबई इलाख्याच्या मध्यभागाच्या ३ जिल्ह्यांतून सरकारी मान्यता दिलेल्या शाळांतून अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीं शिष्यवृत्त्या देण्याचें ठरविलें आहे.  ह्या खर्चाचा १३ खर्च मुंबई सरकारनें ग्रँट म्हणून दरसाल द्यावा.  (४) ह्या फंडाला मिस् व्हायोलेट क्लार्क मेमोरियल शिष्यवृत्त्या फंड हें नांव देण्याला परवानगी असावी.  (५) मुंबई इलाख्याच्या शिक्षणखात्यानें इलाख्यांतील दुय्यम शाळांतून अस्पृश्य विद्यार्थ्यांचा अधिक प्रवेश व्हावा आणि त्याविषयींचे सविस्तर अहवाल शिक्षण खात्यानें प्रसिद्ध करावे असे त्या खात्याला हुकूम सुटावे.  इलाख्यांतील म्युनिसिपालिट्यांना आणि इतर स्थानिक संस्थांना अस्पृश्यांसाठींही नवीन शाळा काढण्यासाठीं आणि जुन्या शाळांतून हजेरीची संख्या वाढविण्यासाठीं सूचना देण्यांत याव्यात.

वरील मागण्यांना नामदार गव्हर्नरसाहेबांनीं आपल्या मगदुराप्रमाणें उत्तरें दिलीं.  त्यांनीं सूचना केली कीं, लोकमतावर परिणाम करण्याचें मिशनचें काम सर्वांत महत्त्वाचें आहे आणि शिक्षणाचे बाबतींत नुसतें वाङ्‌मयीन शिक्षण देऊन न राहतां औद्योगिक शिक्षणाकडे मिशननें लक्ष पुरवावें.  ह्यानंतर डेप्युटेशनच्या सभासदांना गव्हर्नरसाहेबांनीं अल्पोपहार दिला आणि प्रत्येक प्रेमळपणानें स्वागत केलें.

गौरवपूर्ण उल्लेख  :  मिशनच्या मागण्यांचा अर्ज आणि त्याला गव्हर्नरनें दिलेलें समर्पक उत्तर ह्यांच्या निराळ्या प्रती छापून जिल्ह्यांतील अधिकार्‍यांकडे पाठवून द्याव्यात आणि मिशनच्या मागण्यांकडे जिल्ह्यांतील म्युनिसिपालिट्यांचें लक्ष वेधवावें असा मुंबई सरकारनें लवकरच ठराव पास केला.  इतकेंच नव्हे तर स्वतः गव्हर्नरसाहेबांनीं पुणें येथील फर्ग्युसन कॉलेजास भेट दिली त्या वेळीं जें भाषण केलें त्यांत कॉलेजच्या तरुण विद्यार्थ्यांचें लक्ष ह्या मिशनच्या कार्याकडे वळविलें.  ते म्हणाले, ''हिंदुस्थानांतील निरनिराळ्या मिश्र जातींना एकत्र करून लवकरच हिंदुस्थानांत एकराष्ट्राची उभारणी करावी हा सरकारचा हेतु आणि कर्तव्य आहे.  हें कार्य सर्वत्र चालू झाल्याचीं लक्षणें हल्लीं दिसत आहेत.  त्यांत भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे कार्यामुळें हिंदुस्थानांत विश्वबंधुत्व निर्माण होत आहे.  त्याचा मी येथें विशेष उल्लेख करतों.  इंग्लंडांतील पुष्कळ कॉलेजांकडून अशा मिशनसाठीं मिशनर्‍यांचा पुरवठा होत आहे.  तुम्ही देखील ह्या बाबतींत आपला शक्य तो वेळ पुरवून पुणें येथील कार्याला मदत कराल तर बरें होईल.''

मिशनचा बक्षीससमारंभ :  मिशनच्या ४ थ्या बक्षीस-समारंभानिमित्त ५ दिवस उत्सव करण्यांत आला.  त्यांत चोखामेळ्याचे प्रसिद्ध हरिदास धोंडीबा सासवडकर यांची कन्या प्रसिद्ध कीर्तनकार सौ. बायजाबाई हिचीं तीन कीर्तनें करण्यांत आलीं.  भायखळा येथील मदनपुरा मोटारस्टँडवर भव्य मंडप घालण्यांत आला होता.  त्यांत मुंबई येथील सर्व जातींचे गिरणीकामगार आणि अस्पृश्यवर्ग ह्यांच्या स्त्रीपुरुषांची अलोट गर्दी जमली होती.  बाईचीं कीर्तनें बहुजनसमाजास इतकीं आवडलीं कीं, तिसरे दिवशींची रात्रीची गर्दी अनावर झाली.  मांडवाचे खांब पाडून गर्दी आंत शिरूं लागली.  मांडव जमीनदोस्त झाल्यानें कीर्तन बंद करावें लागलें.  दुसरेच दिवशीं मुख्य समारंभाचा दिवस असून ना. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क हे अध्यक्षस्थान स्वीकारणार होते.  आयत्या वेळीं त्यांची कन्या वारल्यामुळें गेल्या वर्षी विरस झाला होता.  त्याची पुनरावृत्ति ह्या वर्षी हा मंडप पडल्यामुळें होते कीं काय अशी भीति वाटूं लागली.  मिशनचे उत्साही कार्यकर्ते रा. अमृतलाल ठक्कर, त्या वेळचे मुंबई कार्पोरेशनचे इंजिनियर यांनीं रात्रीचा दिवस करून शेंकडों मजूर लावून पहिल्यापेक्षांही चांगला मंडप दुसरे दिवशीं दुपारचे आंत उभा करून बैठकीची जय्यत तयारी करून दिली.  गांवांतील नामांकित लोकांची गर्दी उसळली होती.  सर नारायणराव यांनीं गव्हर्नरसाहेबांचें योग्य स्वाकत केलें.  

संशयाचें निराकरण  :  नामदार गव्हर्नरांनीं या वेळीं केलेल्या सहानुभूतिपर भाषणाचे खालील उद्‍गार चिरकाल संस्मरणीय राहतील.  ''ह्या मिशनचें काम दुहेरी.  एका बाजूस वरिष्ठ वर्गाचें लक्ष अस्पृश्यवर्गाच्या दुःखाच्या कहाणीकडे वेधणें, दुसर्‍या बाजूला ह्या अस्पृश्यांना शिक्षण देऊन वर आणणें.  माझ्यापूर्वीचे एक प्रसिद्ध गव्हर्नर मौंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ह्यांनीं आपल्या मार्च १८२४ च्या खलित्यांत अस्पृश्यांविषयीं असें स्पष्ट म्हटलें कीं, ह्या अस्पृश्य वर्गाचे लोक संख्येनें अत्यंत मोठे आणि अत्यंत तिरस्कृत गणले गेले आहेत.  ब्रिटिश सरकारनें जर ह्यांना शिक्षण दिलें तर ते उपयुक्त ज्ञानामध्यें शिखरावर बसतील; पण इतर वरिष्ठ वर्गांचा त्यांच्याबद्दलचा तिरस्कार कायम राहील आणि शिक्षण घेऊन हे ज्ञानसंपन्न झाले असतां ह्यांचा तिरस्कार करणार्‍या बहुजनसमाजाला एका बाजूस ठेवून ह्या तिरस्कृत पण नवीन सुशिक्षितांना आम्हांला हाताशीं धरावें लागेल.  ८७ वर्षांपूर्वीच्या मोठ्या मुत्सद्द्याचे हे उद्‍गार आहेत.  ह्या तिरस्कृत वर्गास जर आम्ही शिक्षण देऊं तर प्रत्यक्ष शिक्षणाचाच वरिष्ठ लोक तिरस्कार करूं लागतील अशी भीति ह्या मुत्सद्द्याला पडली होती.  आतां भारतांत किती बदल झाला आहे.  तेव्हां भारतीयांच्या मनांत कोणत्याही प्रकारचा किंतु येऊं न देतां शिक्षण द्यावें लागत होतें.  आतां कांहीं झालें तरी शिक्षणाचा मगदूर आणि पात्रता न पाहतां शिक्षण घ्या अशी एकच ओरड सुरू झाली आहे.  आतां तुमच्या मिशनची इच्छा आहे कीं, अस्पृश्यवर्गांनाही त्या शिक्षणाचा पूर्ण वांटा मिळावा.''

ह्यानंतर नामदार गव्हर्नरसाहेबांनीं आपली पूर्ण सहानुभूति व्यक्त करून भाषण संपविलें.  गेल्या वर्षी मि. जॅक्सनसाहेबांच्या खुनामुळें मिशनसंबंधीं कांहीं सरकारी अधिकार्‍यांच्या मनांत जो व्यर्थ गैरसमाज पसरला होता, त्यांच्या कानावर प्रांताधिपतींचे हे रोखठोक उद्‍गार जाऊन त्यांच्या संशयाचा निरास झाला अशी मिशनच्या चालकांची अखेरची खात्री झाली.

कठीण परीक्षा  :  ह्याच वेळीं प्रचारकांनीं अमक्या अमक्या नियमाप्रमाणें वागावें, वेळोवेळीं कामाचे अहवाल पाठवावेत, रोजनिशी ठेवावी वगैरे किरकोळ वाद धुमसतच होते.  अहवाल तर वर्षाकांठीं मी लिहीतच होतों आणि वेळोवेळीं वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करीत होतों.  माझ्या कार्यास अशा प्रसिद्धीची जरूरीच असे.  पण हीं कामें लेखी नियमांच्या चौकटींत बसविणें आणि त्यावर आग्रह धरणें हें मला केव्हां केव्हां परवडत नसे.  ह्यामुळें मी वेळोवेळीं रंजीस येऊं लागलों.  समाजाचें काम मीं माझें आध्यात्मिक काम म्हणून पत्करलें होतें.  एखाद्या ऐहिक नोकरीप्रमाणें लेखी राजीनामा देऊन तींतून सुटून जाणें मला इष्ट वाटेना.  ज्या नोकरीचा मीं अर्ज केला नव्हता ती कशी संपणार ?  विश्वासानें मला हांक मारली होती ती मी तितक्याच विश्वासानें कसल्याही ऐहिक अटी न घालतां स्वीकारली होती.  म्हणून हा प्रसंग अंतस्थ खळबळीचा होऊन राहिला.  ह्यांतून मला एकच मार्ग दिसूं लागला.  तो हाच कीं, समाजानें मला जें अल्पसें वेतन देऊं केलें तें बंद करावें; पण समाजाची नोकरी सोडूं नये.  मी नेहमीं फिरतीवर हिंडत होतों.  घरीं पत्र लिहिलें कीं, माझ्या पश्चात् कोणी हे वेतन आणून दिल्यास घरच्या मंडळींनीं तें स्वीकारूं नये.  थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे १९१० सालच्या नोव्हेंबर महिन्यांत समाजाचा व माझा प्रचारक या नात्यानें संबंध सुटला, असा समाजाच्या कमिटीनें ठराव करून मला कळविलें.  माझें मन शांत झालें.  मिशनची निराश्रित सेवासदनाची दयाराम गिडूमल यांची देणगी ह्याच सालीं दीड महिना अगोदर बंद झाली होती.  म्हणून माझी बहीण जनाबाई यांचेंही वेतन बंद झालें.  तरी त्यांनीं पूर्वीप्रमाणेंच काम चालूं ठेवलें.  समाजाचे प्रचारक या नात्यानें मीं आपलें काम १९०३ नोव्हेंबरपासून १९१० नोव्हेंबरअखेर सतत ७ वर्षे केलें.  त्यांत मीं मोठी पात्रता दाखविली असें मला मुळींच वाटत नव्हतें.  कामच असें होतें कीं, त्यांत आत्मसंतोषाला जागाच नाहीं.

मातापित्यांचा अंत  :  माझ्या घरीं मी आणि जनाबाई एवढींच काय तीं मिळवतीं माणसें.  काम अमर्याद आणि मिळकत मात्र अत्यंत मर्यादित आणि अनिश्चित.  अशा स्थितींत घरच्या माणसांचे हाल होणें हें साहजिकच होतें.  आम्ही बाहेरगांवीं मोकळ्या हवेंत राहिलेलों.  मुंबईसारख्या दाट वस्तीमध्यें घरच्या मंडळींची प्रकृति नीट राहीना.  १९०६ सालीं धाकटी बहीण चंद्राबाई नगर येथें वारली.  माझ्या पत्‍नीवर बाळंतपणात अत्यंत कठिण शस्त्रक्रिया करावी लागली.  पांचसहा महिन्यांनीं नवीन जन्मलेलें मुल वारलें.  माझ्या मातोश्रीला कॅन्सरचा असाध्य रोग जडला.  १९१० सालीं माझ्या पत्‍नीचा आजार बळावून अस्थि-क्षय (Bone Tuberculosis) झाल्यानें तिला सुमारें ६ महिने खाटेशीं जखडून ठेवावें लागलें.  १९१० सालीं फेब्रुवारी ८ ला माझ्या मातोश्रीचा अंत होऊन तिची त्या अत्यंत कठिण व्याधींतून मुक्तता झाली. तिचा ध्यास घेऊन माझे बाबाही त्याच सालांत जूनच्या २७ तारखेस कालवश झाले.

मातापित्यांचें कार्य  :  वार्धक्यांतील आणि व्याधीच्या वेदना सोसूनही माझी आई व बाबा महारवाड्यांत घाणेरड्यां वस्तींत स्वतः राहून मला मदत करीत असत.  मला मात्र प्रार्थनासमाजाच्या कामाकाजाच्या कामासाठी राममोहन राय आश्रमांत राहावें लागे.  पुढें मिशनची आथ्रिक स्थिति सुधारून सुसंघटित वसतिगृहें सुरू झालीं.  पण त्यापूर्वी अस्पृश्यांचीं पोरकीं आणि होतकरू मुलें आमच्या निराश्रित सेवासदनांत येत.  तीं वयानें लहान असत.  त्यांचें संगापन करण्याचें काम माझ्या आईनें आनंदानें पत्करलें होतें.  मिशनच्या विद्यार्थ्यांसाठीं हितचिंतकांकडून जे जुने कपडे येत त्यांत कांहीं चांगली लुगडीं येत. तीं कापून त्यांचे लहान लहान परकर, पोलकीं, अंगडीं, टोपडीं वगैरे करण्याचें काम आई काटकसरीनें करीत असे.  टायपिस्ट आणि कारकून हे पुढें मिशनला मिळाले.  पण त्यापूर्वी मिशनच्या सन्माननीय खजिनदाराच्या हाताखालीं पद्धतशीलर हिशोब लिहिणें, ऑडिटसाठीं पावत्यांची जंत्री करून ठेवणें वगैरे तपशिलाचें व दगदगीचें काम माझे बाबा चोख करीत.  ह्या कामांत जमखंडी संस्थानांत त्यांची ख्याति चांगली असे.  हीं कामें करीत असतांना ह्या दोघांच्या पवित्र मनाला वेतनाच्या विचाराचा स्पर्शही झाला नाहीं.  पण ह्यापेक्षां विशेष म्हणजे मिशनच्या कामीं माझ्या सत्त्वाची एकसारखी पारख चालली असतां मला माझ्या आईबापांचा मोठा आश्रय असे.  तो असा एकदम तुटल्यामुळें मी एखाद्या पोरक्याप्रमाणें हवालदील झालों.

अशी ही अंतर्बाह्य खळबळ उडून मी वर सांगितल्याप्रमाणें १९१० नोव्हेंबरांत प्रार्थना समाजाच्या वेतनाच्या बंधनांतून सुटलों.  त्या वेळेपर्यंत मी राममोहन आश्रमांत राहात होतों.  मीं होऊनच वेतन नाकारलें; आश्रमाचा फायदाही मी होऊनच नाकारावा हें स्पष्ट दिसलें.  आश्रम ज्या उदार गृहस्थानें समाजाला दिला त्या शेठ दामोदरदासांनीं मीं आश्रम सोडून जाऊं नये अशी मला गळ घातली.  पण शरिराच्या स्वास्थ्याला मानसिक शांतीचीच अधिक जरुरी असते.  म्हणून मी वांद्रा येथें मोकळ्या हवेंत एक लहानशी जागा भाड्यांनें घेतली आणि आश्रमाला रामराम ठोकला.  परंतु समाजांतील सलोखा मीं बिघडूं दिला नाहीं.  समाजाचे चिटणीस, माझे मित्र रा. द्वा. गो. वैद्य ह्यांनीं माझ्या योगक्षेमाची जबाबदारी व्यक्तिशः आपल्यावर घेतली.  समाजांतील आणि बाहेरच्या कांहीं थोड्यां चाहत्या मंडळींकडून खासगी रीतीनें वर्गणी जमा करून माझ्या या मित्रानें पुढें दोन वर्षे माझी तरतूद राखली.  कोणाकडून वर्गणी जमविली हें त्यानें मला मुळींच कळूं दिलें नाहीं.  मात्र माझ्या स्वातंत्र्याला आणि सुधारणाकार्याला बाध न येईल अशा करारानें ही मदत करावी अशी अट मीं घातली होती.  ती ह्या भल्या मित्रानें पूर्णपणें पाळली.  अशा रीतीनें ६०० रु. दरमहा नियमानें येऊं लागले, आणि माझ्या संसाराचें गाडें चाललें.