मुंबईतील स्थानिक कार्यक्रम

परत आल्यावर मुंबईंतील कामाचा कार्यक्रम मी ठरवूं लागलों.  धर्मकार्याचीं दोन मुख्य अंगें आहेत.  पहिलें आचार्यकार्य; दुसरें प्रसारकार्य.  ज्यांनीं धर्माचा स्वीकार करून दीक्षा घेतलेली असते अशांच्या धर्माचरणाची व्यवस्था राखण्यासाठीं प्रयत्‍न करणें, त्यांतील प्रमुख भाग म्हणजे दर आठवड्यांला साप्‍ताहिक उपासना चालविणें, घरोघरीं भेटी देऊन कौटुंबिक धर्माचरणाची निगा ठेवणें, समाजांत जे निराश्रित आणि अपंग असतील त्यांची शुश्रूषा करणें; नामकरण, उपनयन, विवाह, अंत्येष्टि इत्यादि गृहविधि चालविणें, सभासदांतील परस्पर-परिचय वाढवून समाज दृढ व्हावा म्हणून वेळोवेळीं स्नेहसंमेलनें करणें इत्यादि इत्यादि.  स्त्रियांसाठीं दर शनिवारीं आर्य महिलासमाज, मुलांसाठीं रविवारचे धर्म व नीति शिकवण्याचे वर्ग, तरुणांसाठीं तरुण ब्राह्म मंडळ, वृद्धांसाठीं संगतसभा आणि बाहेरच्यांसाठीं व्याख्यानें हा क्रम आठवडाभर चाले.  ह्यांत मी आल्यावर पुढील नवीन संस्थांची भर टाकली.

पोस्टल मिशन  :  मी विलायतें असतांना तेथील स्त्रियांनीं चालवलेलें युनिटेरियन पोस्टल मिशन हें कार्य निरखून पाहिलें होतें.  माझे मित्र वासुदेवराव सुखटणकर या वेळीं पुण्यास होते.  त्यांच्याकडून अशाच थाटावर ब्राह्म पोस्टल मिशन ही घटना मीं स्वदेशीं येण्यापूर्वीच करवली होती.  ब्राह्मधर्माच्या तत्त्वावर आणि उपासनापद्धतीवर लहान लहान पुस्तकें छापवून तीं टपालमार्गे लोकांस वांटून त्यांवर वाचकांकडून जीं प्रश्नोत्तरें येतील त्याबाबत सतत पत्रव्यवहार ठेवून सवडीप्रमाणें वाचकांस भेटीस बोलावून धर्मप्रसार करण्याच्या पद्धतीला पोस्टल मिशन हें नांव आहे.  या कामांत युनिटेरियन लोकांकडून त्यांचीं लहानमोठीं पुस्तकें व द्रव्यनिधीची ही मदत मीं मिळविली.  मी स्वदेशीं आल्यावर सुखटणकर माझ्याजागीं विलायतेला गेले.  त्यांचें पुण्यांतील कार्य मुंबईला आणून मीं तें वाढविलें.  ह्या कामीं माझे मित्र व समाजाचे सभासद सय्यद अब्दुल कादर यांची मोठी मदत झाली.  ह्या मिशनसंबंधानें पहिल्या १० वर्षांची जी माहिती प्रसिद्ध झाली आहे ती फार बोधपर आहे.  त्या सातआठ वर्षांच्या अवधींत एकंदर ३४३८ ब्राह्मधर्मावरील पुस्तकें, १२७०० लहानसान पत्रकें, ६३३ युनिटेरियन पुस्तकें व ५००० युनिटेरियन पत्रकांचा प्रसार करण्यांत आला.  ह्यांतील पुष्कळशीं फुकट वांटण्यांत आलीं.  कांहींची अल्प किंमत घेण्यांत येत असे.  जे कोणी पुस्तकांची मागणी करीत अगर पत्रव्यवहार करीत त्यांचीं नांवें एका पुस्तकांत दाखल करण्यांत येत असत व त्यांच्याशीं पत्रव्यवहार करून उदार धर्मवार्ता त्यांस कळावी, अशी व्यवस्था करण्यांत आली होती.  मी दोन वेळां मुंबई इलाख्यांतील कांहीं ठिकाणीं प्रवास करून व्याख्यानें दिलीं.  ह्या दोन्ही सफरींचा खर्च युनिटेरियन असोसिएशननें त्या वेळीं दिला होता.  पुढें प्रार्थनासमाजाशीं धर्मप्रचारक या नात्यानें असलेला माझा संबंध सुटल्यानंतर हें काम बंद पडलें.

उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग (Liberal Religious Reading Class)  :  हायस्कुलांतील व कॉलेजांतील तरुण विद्यार्थ्यांना मौलिक धर्मग्रंथांचे वाचन करण्याची संवय लागावी म्हणून हा वर्ग काढण्यांत आला.  ह्या वर्गांत महाराष्ट्रीय, गुजराथी, ख्रिश्चन आणि मुसलमान अशा भिन्न विद्यार्थ्यांचा समावेश होत असे.  म्हणून हा वर्ग इंग्रजींत चालवावा लागे.  हा वर्ग दर बुधवारीं सायंकाळीं प्रार्थनामंदिरांत भरत असे.  ह्याच्या प्रसिद्धीसाठीं वेळोवेळीं जाहीर व्याख्यानें करावीं लागत.  डॉ. आर्मस्टाँगचें God & Soul, इमर्सनचीं पुस्तकें, प्रो. डॉयसेनचें Philosophy of Upanishad  अशा पुस्तकांचें अध्ययन चालत असे व डॉ. भांडारकर समाजांतील फ्री लायब्ररीमधून ह्या वाचनाला पोषक अशीं इंग्रजी पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचण्यास देत असत.

तरुण ब्राह्मसंघ (Younh Theists Union)  :  इकडील प्रांतीं ब्राह्मधर्माचा स्वीकार आणि प्रसार प्रार्थनासमाजाकडून आतांपर्यंत कित्येक वर्षे चालला असला, तरी ब्राह्मधर्माच्या तत्त्वाप्रमाणें सभासदांचे गृह्यसंस्कार व विधि चालवण्याचें काम त्या मानानें फार चाललेलें असे.  तत्त्वाप्रमाणें विधि चालविण्याला अनुष्ठान हें नांव असे.  ह्या अनुष्ठानाचा परिणाम ब्राह्मकुटुंबांतील तरुणांपासूनच घडविण्याचा प्रयत्‍न करणें बरें आणि त्यासाठीं तरुणांनीं ब्राह्मधर्मानुसार उपासना चालवण्यास शिकावें, परस्परांत स्नेहवर्धन करावें, गृहसंस्काराच्या वेळीं एकमेकांत मिसळावें, आपल्या घरीं असे संस्कार चालविण्याचा आग्रह धरावा वगैरे हेतु साध्य करण्यासाठीं सन १९०५ सालच्या दसर्‍याच्या दिवशीं मीं ही महत्त्वाची संस्था स्थापन केली.  प्रार्थनासामाजांत समाविष्ट झालेल्या तरुणांनीं कट्टर अनुष्ठानाला तयार व्हावें, म्हणून मीं ह्या संघाच्या घटनेचे नियम मोठ्या कसोशीनें तयार केले.  बाहेरच्या तरुणांनीं हे नियम पाळण्याची प्रतिज्ञा घेतल्यास त्यांनाही आंत येण्यास वाव असे.  ह्याविषयीं सविस्तर हकिकत द्वा. गो. वैद्यकृत प्रार्थनासमाजाचा इतिहास या पुस्तकाच्या १७३ ते १७७ पृष्ठांवर आहे.  वरील कार्याशिवाय लोकशिक्षण आणि परोपकाराची कृत्यें करण्यासाठीं प्रार्थनासमाजाच्या खालील संस्था होत्या.  मुंबई शहरांत निरनिराळ्या १०।१२ ठिकाणीं मजुरांसाठीं रात्रीच्या शाळा चालत.  त्यांतील दोन शाळा अस्पृश्यांसाठीं होत्या.  त्यांची देखरेख मला ठेवावी लागे.  पंढरपुरांत बालहत्त्याप्रतिबंधकगृह म्हणून एक नमुनेदार संस्था समाजाकडून चालविण्यांत येत आहे.  समाजाचें मुखपत्र सुबोध-पत्रिका मराठी आणि इंग्रजी दर आठवड्यांस प्रसिद्ध होत आहे.  त्याचाही मला नेहमीं परामर्ष घ्यावा लागे.  अशीं निरनिराळीं स्थानिक कामें चालवून शिवाय मुंबई प्रांत आणि त्याबाहेरही मला वरचेवर प्रवास करावा लागे.

घरची स्थिति  :  याप्रमाणें समाजाच्या कामाचा आराखडा ठरला; पण घरची व्यवस्था अद्याप झाली नव्हती.  माझे आईबाप आणि पत्‍नी सौ. रुक्मिणीबाई माझ्या जन्मभूमीच्या गांवींच राहात असत.  जनाक्का, तान्याक्का व चंद्राक्का या तीन बहिणी पुण्यास हुजूरपागेंत शिकत होत्या.  लहान भाऊ एकनाथ कोल्हापुरांत माझे मित्र गोविंदराव यांचेकडे शिकत होता.  त्याची मुलगी सुशीला आणि माझ्या आलगूरच्या मामाची मुलगी मथुरा या दोन मुली जमखंडीस आमच्याच घरीं राहून शिकत होत्या.  पहिला मुलगा लहानपणींच वारल्यामुळें दुसरा मुलगा प्रताप या वेळीं ३।४ वर्षांचा होता.  या सर्व विखुरलेल्या कुटुंबाचा पोशिंदा मी एकटाच असल्यानें आणि माझें काम तर देशभर पसरलेलें असल्यानें कुटुंबाची एकत्र राहण्याची सोय कोठें करावी, असा मला मोठा पेंच पडला.  

जमखंडीचा दौरा  :  हा विचार ठरविण्यासाठीं माझा पहिला दौरा मीं जमखंडीकडेच ठरविला.  पुण्यास राहणारे वृद्ध ब्राह्मप्रचारक राजश्री शिवरामपंत गोखले यांना मीं बरोबर घेतलें आणि मार्च महिन्याच्या सुमारास जमखंडीस गेलों.  ब्राह्मधर्माचा प्रचार जमखंडीस अगदीं नवा होता असें नाहीं.  विलायतेस जाण्यापूर्वी दर रविवारीं आमचे घरीं ब्राह्मोपासना होत होत्या.  आईबाबांना त्या इतक्या आवडल्या होत्या कीं, मी विलायतेला गेल्यावरही त्यांनीं हा क्रम चालू ठेवला होता, असें त्यांच्याकडून येणार्‍या पत्रांवरून कळलें.  पण नुसत्या उपासना वेगळ्या आणि या नवीन सुधारकी धर्माच्या तत्त्वांची मांडणी जाहीर रीतीनें करणें वेगळें.  सुमारें दोन आठवडे राहून प्रा. समाजानें पुरस्कारलेल्या सहा मूळतत्त्वांची छाननी करण्यासाठीं सहा निराळीं जाहीर व्याख्यानें मीं दिलीं.  ठिकाण पोस्ट ऑफिससमोरच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर म्युनिसिपालिटीच्या दिवाणखान्यांत होतें.  नाविन्यामुळें बरीच गर्दी जमे.  माझ्याबरोबर आलेले वृद्ध शिवरामपंत ब्राह्मण असूनही माझ्याकडे राजरोस जेवतात ह्या गोष्टीचा गवगवा गांवभर झाला होता.  त्यामुळें व्याख्यानाची प्रसिद्धि करण्यास हस्तपत्रिकांची निराळी योजना करण्याची जरुरी भासली नाहीं.  जमखंडी हा गांव आगगाडीपासून दूर, विचारांत मागासलेला आणि आचारांत अत्यंत सोंवळा असल्यामुळें ह्या व्याख्यानमालेंमुळें त्याच्यावर आकाशांतली कुर्‍हाडच पडली म्हणावयाची.  ह्यापूर्वी ह्या गांवचा मी किती जरी लाडका असलों तरी माझीं आत्यंतिक सुधारक तत्त्वें आणि तीं मांडण्याची सडेतोड पद्धति हीं कोणाच्याही गळीं सहजासहजीं उतरण्यासारखीं नव्हतीं.  लोकमत हळूहळू प्रक्षुब्ध होऊं लागलें.   त्या आगींत तेल ओतण्याचें श्रेय जमखंडी हायस्कुलांतील एका उपद्व्यापी शिक्षकानें आपल्याकडे घेतलें.  हे सद्‍गृहस्थ व्याख्यान ऐकावयास स्वतः सर्वांच्या अगोदर आणि पुढें येऊन जणुं अगदीं भाविकपणें माना डोलावीत बसत; पण त्यांनीं अगोदरच नियोजित केलेली वानरसेना रस्त्यांत गोंगाट करण्यास सज्ज असे.  सर्वांत शेवटीं जातिभेद या विषयावर जेव्हां व्याख्यान सुरू झालें तेव्हां खालील रस्त्यावरील वाननसेनेनें गोंगाट करून तृप्‍त न राहतां दगडांचा आणि कचर्‍याचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.  अशा प्रकारें शेवटची आरती होऊन ही सभा संपली.        

सामाजिक प्रकोप  :  माधवराव गाडगीळ या नांवाचे एक सरकारी अधिकारी होते.  त्यांना मात्र हीं सर्व तत्त्वें पटलीं.  त्यांनीं शिवरामपंत गोखले यांना आपल्या घरीं ब्राह्मोपासनेस जाहीर रीतीनें बोलावून इतर लोकांसही आमंत्रण केलें.  त्यांचें घर भरबाजारांत मारुतीचे देवळाजवळ होतें.  उपासनेस इतर कोणी आलें नाहीं, तरी वरील उपद्व्यापी मास्तर आणि त्यांची वानरसेना हजर राहिली.  त्यांनीं आमचा बराच छळ केला.  घर भरबाजारांत असल्यानें शौचकूपाची जागा किंचित् लांब होती.  बिचार्‍या वृद्ध शिवरामपंतांना वरचेवर लघवीचा उपद्रव होत असल्यानें त्यांना येथें जावें लागलें.  ते आंत गेल्याबरोबर द्वाड पोरांनीं बाहेरून दरवाज्यास कडी लावली.  शिमग्याचे दिवस असल्यानें ह्या पोरट्यांच्या लीला सशब्द होऊं लागल्या.  त्या गोंधळांत बिचार्‍या शिवरामपंतांच्या आरोळ्या आम्हांस ऐकुं येत नव्हत्या.  शेवटीं कोणी एकानें शिवरामपंतांचा हा निरोप आणून दिल्यावर गाडगिळांनीं आपल्या अधिकाराच्या जोरावर त्यांची कशीबशी सुटका करून त्यांना सुखरूप घरीं पोचविलें.  या गोष्टीचा पुकारा गांवभर झाल्यानं शिमग्यांतला रात्रीचा दंगलीचा मोर्चा आमच्या राहत्या घरावर होऊं लागला.  धुळवडीच्या आदल्या रात्रीं तर असा कहर उडाला कीं, आमच्या बाबांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.  प्रकरण येथपर्यंत आल्यावर आमच्या घरच्या मंडळींनीं कोठें राहावें हा प्रश्न आपोआप सुटला.  असा सामाजिक प्रकोप होण्याचें आणखी एक कारण असें झालें कीं, जमखंडीच्या महारांच्या शाळेंत एक महाराची १० वर्षांची लहान मुलगी होती.  तिला मुरळी सोडण्यांत आलें होतें, असें ऐकल्यावर तिला मीं घरीं बोलावून घेतलें आणि तिच्या पुढील शिक्षणाची चांगली व्यवस्था ठेवण्याबद्दल तिच्या आईबापांस बजावलें.  निदान मुरळीचा धंदा चालूं नये, अशी मीं ताकीद दिली.  सुधारणेची मजल व्याख्यानांतच न आटोपतां ती प्रत्यक्ष कृतींत उतरूं लागलेली पाहून जीर्णमतवादी समाजाला कां चीड येऊं नये ?  ज्यांनीं मराठासमाजाचे एक सन्मान्य पुढारी म्हणून जातपंचायतीचे खटले निकालांत काढावयाचे त्यांच्यावरच हा प्रसंग गुदरावा ही घटना विचाराला निर्णयकारक होती.  माझ्या बाबांनीं आपल्या लहानशा नोकरीची पेन्शन घेऊन आलें सारें चंबगबाळें घेऊन मुंबईस येण्याचें ठरवलें.  मी हें सर्व आतां विनोदानें लिहीत आहें; पण माझ्या मानी बाबांना आपली पिढीजात जन्मभूमि सोडून आपलें सर्व उरलेंसुरलेलें खटलें आंवरून प्रेमळ मित्रांची व नातलगांची अखेरजी रजा घेऊन तडकाफडकीं मुंबईची वाट धरतांना काय वाटलें असेल, हें ते किंवा देवच जाणे !

मुधोळ  :  शिवरामपंत आणि मी मुधोळास गेलों.  हा गांव जमखंडीचे दक्षिणेस बारा मैलांवर आहे.  श्रीमंत घारपडे यांची ती मराठी राजधानी आहे.  पण मागासलेपणांत तिचा नंबर जमखंडीचे वर लागतो.  मायभूमीहून वरील आहेर घेऊन आलेल्या माझ्यासारख्या वीराचा सत्कार अधिक काय व्हावयाचा !  गांवांत विशेष खळबळ उडली नाहीं.  त्यांचे एक कारण जाहीर व्याख्यानाची प्रथाच तेथें नवी होती.  न जाणें माझीं व्याख्यानें कळलींही नसतील.  जमखंडींतील उपद्व्यापी मास्तरांप्रमाणें स्वयंस्फूर्तीनें पुढें येण्याइतका तेथें कोणी कळवळ्याचा माणूस नव्हता.  माझ्याबरोबर माझ्या दोन बहिणी जनाक्का व चंद्राक्का ह्यांना पुण्यांतील शाळेंत जावयाचें होतें, म्हणून त्याही बरोबर होत्या.  त्यामुळें मी दुसरीकडे कोठें दौरा न नेतां पुण्याहून मुंबईस आलों.