समाजशास्त्रीय विचार

आतांपर्यंत मराठ्यांच्या पूर्वपीठिकेचा केवळ भाषाशास्त्राच्या आधारें विचार झाला. आतां तो समजशास्त्राच्या दृष्टीनें कर्तव्य आहे. भाषाशास्त्राच्या दृष्टीनें निरनिराळीं नांवें आणि निरनिराळे धातु यांच्या संबंधांवरून ‘मराठा’ या नांवांत निरनिराळे वंश कसे मिसळले आहेत हें दाखविण्यांत आलें. आतां रीतिरिवाज, खाणेंपिणें, पेहराव, विवाह, धर्म आणि धंद्यांच्या परंपरा यांचा विचार करूं. ह्या दृष्टीनें पाहतां मराठा आणि कुणबी हे दोन शब्द अतिशय चिंतनीय आहेत. ह्या दोन शब्दांनीं गणले जाणारे जे दोन मनुष्यसमूह आजकाल ‘मराठा’ ह्या नांवाच्या जातींत जितके एकजीव झालेले दिसत आहेत तितके ते दोन हजार वर्षांपूर्वीं खास नव्हते. भाजें येथील शिलालेखांत जें महारथी अथवा महारथिनी हें जातिवाचक विशेषनाम आढळतें तें त्या वेळच्या कुणब्यांना खास लावलें जात नसावें. महारथीचा धंदा इतमामाने लढण्याचा व कुणब्याचा धंदा स्वतःची अगर दुस-याची जमीन इतमामानें वाहण्याचा. दोन्ही धंदे तेव्हां प्रतिष्ठित खानदानीचे होते. केवळ पोटार्थी मजुरी करण्याचे नव्हते.
कुणबी ह्या शब्दाची व्युत्पत्ति आणि व्याप्तिहि मनोरंजक आहे. कुणबी हा शब्द कूळ ह्या शब्दापासून झाला आहे. यांत कूड = एकत्र होणें, राहणें हा तामिळ धातु आहे. कुलू असा अपभ्रंश संस्कृत भाषेंत झालेला आहे. कूली = मजूर हा शब्द तामीळ भाषेंत प्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ शेतावरचा मजूर असा कानडी भाषेंत प्रसिद्ध आहे. कुणबी हा मराठी शब्द कुटुंबी असा संस्कृतांत, कणबी असा गुजराथेंत, कुडमी अथवा कुरमी असा संयुक्तप्रांत आणि बिहारांत प्रतलित आहे. ह्या नांवाचेच नव्हे तर अर्थाचे व वृत्तीचे अफाट समाज महाराष्ट्राबाहेर, गुजराथ-बिहारपासून खालीं दक्षिणेंत पसरलेले आहेत; परंतु ह्या नांवाचे समाज महाराष्ट्राबाहेरील इतर सन्मान्य समाजांत न मिसळतां स्वतंत्रपणें आहेत. ते महाराष्ट्रांतील मराठ्यांत मात्र एकजीव झाले आहेत; तथापि हा मराठ्यांचाच विशेष आहे असें नाहीं. गुजराथेंत पाटीदार म्हणून जो एक वर्ग आहे तो कुणबी क्षत्रियांचा आहे; आणि उत्तरेकडील राजपुतांत जाटांचा समावेश तंतोतंत मराठ्यांतील कुणब्यांच्याप्रमाणेंच झाला आहे.
जाट पाटीदार आणि बिहारमधील कुर्मि क्षत्रिय हे वंशानें कोण आहेत हें ठरविणें आपल्या विषयाबाहेरचें आहे. महाराष्ट्रांतले कुणबी मात्र अस्सल द्रावीड आणि मराठ्यांचे दक्षिणेंतील आगमनापूर्वीं येथें आलेल्या किंवा येथेंच मूळचे असलेल्या कोणा इतर वंशाचे असतील, असें त्यांच्या चालीरीतींवरून दिसतें. ह्या चालीरीति मराठ्यांनीं यांच्याशीं सर्रास शरीरसंबंध ठेवल्यामुळें मराठ्यांतहि आतां दृढमूल झाल्या आहेत. मराठ्यांचे मुख्य धंदे दोन. कटकटीच्या काळीं मुलुखगिरी, किंबहुना प्रतिष्ठित लूट आणि एरवीं जमीनदारी. कुणब्यांची वृत्ति एकच आणि ती अधिक सात्त्विक . ती म्हणजे जमीनदारी व जमिनीची मशागत. इंग्रजींत Peasant Proprietor म्हणून जो शब्दप्रयोग आहे तो कुणबी शब्दाचा सोळा आणे अर्थवाहक आहे. रा. त्रिं. ना. अत्रे यांनीं आपल्या गांवगाडा या नमुनेदार पुस्तकांत या अर्थाचें यथार्थ वर्णन केलें आहे. महाराष्ट्राच्या वसाहतीचें मराठ्यांपेक्षांहि कुणब्यांकडे अधिक श्रेय जातें हें या बालबोध पुस्तकावरून उघड होतें.
हिंदुस्थानांत किंबहुना दक्षिणेंत येण्यापूर्वीं मराठे हे फिरत्या अवस्थेंत होते. त्या प्राचीन काळीं यांचा विकास शेतकींत झालेला नसावा. ते पशूचे पालक आणि लुटारू होते. ते रथी आणि अश्वी होते, ह्याचें कारण ते फिरते होते. हींच नांवें त्यांच्या जातीला पडलीं. अशी ह्या नांवाची शकांची जी एक प्रतिष्ठित शाखा होती, तिचेमुळेंच असिरिया, सीरिया, आशिया वगैरे देशवाचक आणि खंडवाचक नांवें प्रचारांत आलीं असावीं. मराठे हे फिरते आणि मुलुखगि-या ऊर्फ लुटालूट करणारे असल्यामुळें, खाण्यापिण्याचा व शरीरसंबंधाचा सोवळेपणा त्यांच्यांत शक्य नव्हता; आणि तो अद्यापि शक्य नाहीं. “राजे लोकांना जात नाहीं” ही म्हण ह्या वृत्तीवरूनच पडली आहे. परधर्मी आणि अस्पृश्य ह्यांना शिवायकरून मराठ्यांची रोटीलोटी आजहि राजरोस सर्व हिंदु जातींशीं चालूं आहे. हजार वर्षांपूर्वीं मिश्र बेटीव्यवहार निदान अनुलोमानें तरी ( Hypergamy ) चालू होता ही गोष्ट आतां लपूं शकत नाहीं. संशोधनामुळें ती दिवसेंदिवस अधिक उजेडांत येईल. जातिभेद मानणें व माजविणें हें धनलोलुप नेभळ्या भांडवलशाहीचें हीन लक्षण आहे. बुद्ध, महावीरादि सुधारकांनाहि न जुमानतां हे आजचे भेद वैश्यांच्या वृत्तिसंघांनीं (Trade Guilds) मधल्या पौरुषविहीन अडाणी युगांत माजविले गेले आहेत; आणि उप-या ब्राह्मणांनीं व क्षत्रियांनीं त्यांना हातभार लावला असला तर तोहि त्यांच्या वेदबाह्य बिनबुडाच्या मतलबामुळेंच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय ह्या जाती नव्हत, वृत्ति होत; आणि त्यांचा पाया जन्मावर नसून गुणकर्मावर आहे. ह्या विधानाला एका गीतेचाच नव्हे, तर सा-या इतिहासाचा पाठिंबा आहे. असो. ह्यामुळें मराठे व कुणबी हे भिन्न वंश वृत्तिसाम्यानें सहज एक झाले, असें मानण्यांत आम्ही मोठेंसें धाडस करितों असें नाहीं.
धर्म—धर्म म्हणजे उपास्यांची परंपरा व जन्म, विवाह, मृत्यु इ. गृह्यसंस्कारांची रूढि असा अर्थ घेतल्यास, शक, मराठे आणि त्यांचे पूर्वीं दक्षिणेंत आलेले द्रावीड कुणबी ह्यांच्यांत बरेंच वैषम्य असलें पाहिजे. पण समान वृत्ति आणि चिरसहवास ह्यांमुळें हें वैषम्य कमी कमी होत जाऊन हे दोघे आज एकजीव दिसत आहेत. तथापि त्यांच्यांत शारीरिक सादृश्य नव्हतें, हें शरीर, मस्तक, रंग, केस वगैरे गोष्टींवरून वंश ठरविण्याचें जें एक शास्त्र किंवा तंत्र आहे, त्यावरून दिसतें. उत्तरेकडील राजपुतांत जाटांची भेसळ झाली असली, तरी ते दोघे वंशाच्याच पोटशाखा असल्यामुळें शरीरतः त्यांची भिन्नता दिसत नाहीं; पण कुणबी भिन्न वंशाचा असल्यामुळें त्यांच्यांत मिसळलेल्या मराठ्यांचे रूपरंग विविध असणें साहजिक आहे. मराठ्यांचीं मूळ उपास्यें सूर्यचंद्रनागादि देवकें, त्यानंतर अधिक विकसित काळांत शिव आणि भूदेवी हीं दैवतें, नंतर बुद्ध जैनांची सुधारणा, त्यानंतर पुन्हा लिंगायतांची छाप, अगदीं अलीकडची लाट म्हणजे वारकरी-वैष्णव पंथ, असा ह्यांच्या धर्माचा विकास होत आला आहे. “ महाजनो येन गतः स पंथा ” ह्या न्यायानें मराठ्यांच्या गाड्याबरोबर कुणब्यांच्या मात्र नळ्यांची यात्रा चालली आहे. हाडाचा मराठा शैव आणि शाक्त आहे. कुणब्याचे मात्र नागनरसोबा अनंत आहेत. मराठा काय, कुणबी काय, ह्यांच्या धर्माची पृच्छा फार न केलेलीच बरी. ब्राह्मण पुराणिकासंबंधानें तुकाराम म्हणतात, “ पुढिला सांगे आपण न करी ”. सामान्य ब्राह्मणांचा धर्म जसा सांगण्यापुरताच, तसाच मराठ्यांचाहि ऐकण्यापुरताच ! हे देखल्या देवाला दंडवत करतील, वेळ पडली तर मुसलमानहि होतील; पण ह्यांच्या देव्हा-यांवर केव्हांहि टाक म्हणजे ह्याच्या पूर्वजांच्या मूर्तिच दिसतील. टाक = तक् नांवाची शक वंशाची एक प्रतिष्ठित शाखा होती. तिचेवरून ही टाकांची परंपरा आली असावी. तिचें नांव तक्षक. हे पांडवांचे मोठे शत्रु. जैमिनीनें ह्यांचा निःपात केला असें महाभारतांत रसभरीत वर्णन आहे. ह्या तक्षक नामक नागवंशांत पूर्वजपूजा विशेष होती असें वर्णन  Story of Parthian Nation या पुस्तकांत आहे. प्रागेतिहासिक काळांतील हीं देवकें मराठ्यांत म्हणा अगर कुणब्यांत म्हणा आतां केवळ लगीनसराईंतच आठवतात. येरवीं आजकाल ह्यांचें दैवत भूदेवी जगदंबा. हें प्रस्थहि आजकालचें नव्हे. सर्व उपास्यांत कालानुक्रमें ह्यांचा नंबर पहिला आहे. हें प्रकरण मी माझ्या भागवतधर्माचा विकास ह्या भागांत सांगोपांग व्यक्त केलें आहे. उत्तरेकडे राजपूत व राठी आणि दक्षिणेंतील रड्डी हे प्रसिद्ध शैव आणि शाक्त होत. तैलंगणांत हिंडत असतां मला रड्डी घराणीं मरीआई, शीतळादेवी वगैरे ग्रामदेवतांचे वतनदार पुजारी व मालक दिसलीं. रड्डी जसे पुढें पुढें व्यापारांत शिरले, तसे ते शाकाहारी आणि वैष्णव बनले. इकडेहि दुकानदार मराठे व कुणबी तुकारामाच्या काळापासून वारकरी होऊं लागले. तरी पण त्यांच्या देवता जाखाईजोखाई; आणि त्यांना नैवेद्य रक्ताभाताचा !  ह्याशिवाय त्यांच्या शेतांतला डाबरा म्हणा किंवा राजधानींतला अश्वमेध म्हणा कसा सिद्ध होणार ?  “धंदा तसाच देव” हेंच खरें.
शक, हूण इ. नांवांच्या मानवी टोळ्या वायव्येकडून पुरातन काळापासून, किंबहुना आर्य म्हणवणा-यांच्याहि पूर्वींपासून तों इ. सनाच्या ४।५ व्या शतकापर्यंत हिंदुस्थानांत आल्या आहेत. दक्षिणेंतहि इ. स. पूर्वीं ५।७ शतकांपासून त्यांचें अगमन वेळोवेळीं झालें असावें. तक्षक ह्या नांवावरून वर दर्शविल्याप्रमाणें हे लोक जसे नागवंशी असावेत असा तर्क वाहतो, तसेंच तौलनिक भाषाशास्त्राच्या अंतर्गत व्याकरण आणि शब्दकोशांच्या पुराव्यावरून शकांच्या, पल्लवांच्या, यवनांच्या (ग्रीकांच्या) टोळ्या आर्य, द्रावीड इत्यादि वंशाच्याहि असाव्यात असा तर्क होतो. ह्या जाती फार फिरस्त्या आणि मुलुखगिरी करणा-या असल्यानें यांनीं आपल्या पेहरावाप्रमाणें आणि भाषेप्रमाणें धर्महि वेळोवेळीं बदलला असल्यास मुळींच नवल नाहीं. उलट नसल्यासच महदाश्चर्य !  अगदीं अलीकडे म्हणजे शालीवाहन शतकाच्या आरंभीं दक्षिणेंत नहपान क्षत्रप नांवाच्या एका शक राजानें व त्याच्या घराण्यानें दोनतीन शतकें ब-याच वैभवानें राज्य केलें आहे. या राजांनीं बौद्धधर्म स्वीकारून ब्राह्मणांनाहि फार खुष राखिले होतें. नाशिक जिल्ह्यांतील चार शिलालेखांचा डॉ. सर भांडारकरांनीं आपल्या पुस्तकांतील पान १३ वर जो तपशीलवार उल्लेख केला आहे, त्यांत नहपानाचा जांवई उशवदात यानें लक्ष गाई दान केल्या, बारणासा या नदीला घाट बांधला, देवब्राह्मणांना सोळा गांवांचा अग्रहार दिला, ब्राह्मणाचीं लक्षभोजनें घातलीं, इतकेंच नव्हे; तर अस्सल ब्राह्मणी धर्माच्या रिवाजाप्रमाणें प्रभासक्षेत्रांत आठ ब्राह्मणांचीं लग्नें स्वखर्चानें करून दिलीं. इ. माहिती आहे. १८५७ सालच्या बंडानंतर ५।७ वर्षांनीं ग्वाल्हेरच्या शिंदेमहाराजांनीं पुण्यास येऊन बरेच दिवस तळ दिला होता, तेव्हां त्यांनींहि ब्राह्मणसंतर्पणाचीं अशींच शतकृत्यें केलीं होतीं. एकूण राजांचा धर्म लवचीक असणें साहजिक आहे.
धंदा—मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, आणि कुणब्यांचा शेतकी एकच, असें आम्ही वर म्हणालों. ह्यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गांवखेड्यांत राहणारे हें सिद्ध होतें; पण ह्या दोघांचा इतका एकजीव झाला आहे कीं, धंद्यांच्या दृष्टीनें त्यांच्यांत भिन्नता कल्पिणें केवळ अशक्य झालें आहे. शंभर वर्षांत म्हणजे तिस-याच पिढींत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतक-याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रांत तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे. कोल्हापूरच्या श्रीशाहू राजांनीं मला स्वतः सांगितलें कीं, राणीपैकीं कोणी बाळंतीण झाली कीं, पहिल्या रात्रीं मुलाला वाळलेल्या गवतावर निजवावें, अशी चाल महाराजांच्या घराण्यांत होती. ह्या चालीचा अर्थहि स्वतः महाराजांनींच सांगितला कीं, आम्ही राजे लोक शेतकरी आहों, हें केव्हांहि विसरूं नये म्हणून ही चाल आहे. कुणबी हा बळी राजा कसा आहे, तो गाय व सर्व गांवठाण त्याचें वांसरूं कसें वगैरे गोष्टी रा. अत्रे ह्यांनीं आपल्या गांवगाड्यांत तपशीलवार वर्णिल्या आहेत. खेड्याचा राजा पाटील. गावडा (ग्रामठा) ह्यालाच कानडींत गौडा (पाटील) म्हणतात. ब्राह्मणापासून तों महारमांगापर्यंत सर्व जातींचें बलुतेंअलुतें ऊर्फ कारूनारू ह्यांचीं वांसरें. ही गांवगाड्याची घटना व ही सर्व परिभाषा फारच पुरातन आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीनें ही अपूर्व घटना मराठ्यांच्याहि आगमनापूर्वींची असावी, असा माझा ह्या परिभाषेवरून तर्क होतो. शेतकीचीं उपकरणें, आउतें, चालीरीति, फार काय बलुतेंअलुतें हे शब्दहि अस्सल देशी, म्हणजे कानडींतले आहेत. एक हजार वर्षांपूर्वीं गोदावरीच्या दक्षिणेकडील सर्व देश, आणि ठाण्याच्या दक्षिणेकडील सर्व कोंकण थेट कावेरीच्या किना-यापर्यंत राजरोस कर्नाटकांत मोडत असें. बगळ म्हणजे कुटुंबाचा पसारा अथवा बल म्हणजे उजवी बाजू ह्या दोन शब्दांपासून बलुतें या शब्दाची व्युत्पत्ति असावी. बगळ + कूड अथवा बल + कूड (उड—ट-त) बलोत असा हा मूळ कानडी शब्द आहे. त्याचें कारूं ( कार, कृ धातूपासून ) हें आर्यन रूप होय. तसेंच अलोतें याचें नारु असें आर्यन भाषांतर होय. बलोतें अथवा कारूं म्हणजे हातानें (उजव्या हातानें) श्रम करणा-याला जें अव्वल दर्जाचें वेतन मिळतें तें; आणि नारु अथवा अलोतें म्हणजे देवांच्या अगर धर्माच्या नांवावर दुय्यम आणि गौण दर्जाची भिक्षा जी मिळते तो हक्क. नारु = नारायण असा देववाचक आर्य भाषेंतला अर्थ आहे. एल म्हणजे देव. ह्या अर्थाचा सेमेटिक आणि सुमेरियन भाषेंतला आहे. तो कानडींत किंवा कर्नाटकांत सिंध प्रांतांतून आला असावा. एल्लप्पा (यल्लाप्पा), एलापूर, एलूर व यल्लम्मा वगैरे माणसांचीं, गांवांचीं, दैवतांचीं नांवें शक मराठ्यांनीं दक्षिणेंत आणलीं किंवा द्रावीड कुणब्यांनीं त्यांच्या पूर्वींच तेथें नेलीं तें सांगतां येत नाहीं. तीं आज मराठा आणि कानडी कुणब्यांशीं एकजीव झालीं आहेत. बलुतें म्हणजे उजवीकडचा संघ असा अर्थ असल्यास त्याला जुळणारा एलुतें म्हणजे एर = दुय्यम अथवा एड = डावीकडचा संघ असाहि अर्थ लागतो. बल=उजवा, एड=डावा असे कानडी शब्द आहेत. व्युत्पत्ति कशीहि असो, हीं नांवें आणि ज्यांचीं हीं नांवें आहेत त्या संस्था मराठ्यांशीं आणि विशेषतः कुणब्यांशीं एकजीव आहेत; पण चमत्कार हा कीं, स्वतः मराठा किंवा कुणबी हा बलुतेदार नसतो. अलुतेदार तर कधींच नसावयाचा. बलुते अलुत्याचा तो दाता अगर धनी असतो. म्हणजे कारूंचा धंदा किंवा नारूंची भिक्षा मराठा अगर कुणबी कधीं स्वतः करणार नाहीं कीं मागणार नाहीं. असा हा परिपाठ पुरातन आहे.
संशोधक कै. राजवाडे ह्यांनीं “राधामाधवविलासचंपू” च्या प्रस्तावनेंत लिहितांना मराठ्यांचे दोन भेद कल्पून पुष्कळ टीका केली आहे. तिचें खंडण मीं मागें ‘विजयी मराठ्यां’त एक लेखमाला लिहून केलेंच आहे. उत्तरेकडच्या मराठ्यांना राजपुतांचे वंशज व आर्य असें कल्पून आणि दक्षिणेकडचे मराठ्यांना नाग असें कल्पून एकाची स्तूती व दुस-याची निंदा राजवाड्यांनीं केली आहे. वंशवाचक पुरावा देतांना दक्षिणेकडच्या मराठ्यांचें बिराठे ऊर्फ बेरड हें निंदाप्रचुर एक नसतें नांव कल्पून अतिप्रसंग केला आहे. बेरड = बेडर ह्या नांवाची जी एक हीन मानलेली जात कर्नाटकांत आहे तिच्या नांवाची राजवाड्यांनीं केलेली बिराठे ही व्युत्पत्ति म्हणजे एक अक्षम्य चुकी आहे. बेड हें कानडी व तेलुगु जातिवाचक नांव आहे. हिंचे मूळ व्याध हा संस्कृत शब्द आणि त्याचेंहि मूळ बेटे = शिकार हा अस्सल कानडी व तेलुगु शब्द आहे. मराठे ही शिकारी जात आहे; पण तेवढ्यावरून त्यांना बेडरांप्रमाणें कधीं कोणीं हीन मानलें आहे, असें राजवाड्यांशिवाय कोणी म्हणूं शकणार नाहीं. बेड या एकवचनाचें कानडी व्याकरणांत बेडर हें अनेकवचन आहे. कानडींत व तेलुगूंत जातिवाचकच नव्हे तर समाहारवाचक सर्व शब्द अनेकवचनांत असतात. जसे कुरूब = धनगर एकवचन. कुरुबर अनेकवचन = धनगर जात. जोन्ना = जोंधळा एक जोंधळ्याचा कण. जोन्नलु = जोंधळें (तेलुगू). बिराठ = बेडर ही व्युत्पत्ति कशीहि असो. मराठे हे मृगयाप्रिय असले तरी बेडर, हरिणशिकारी, कटबु, शिकलगार ह्याप्रमाणें हीन अशी एक गुन्हेगार जात खास नव्हत.
ह्याचसंबंधीं राजवाड्यांनीं मराठ्यांचा राजकीय व सामाजिक दर्जा ठरवितांना त्यांना गणराज पद्धतीचें (म्हणजे जिला इंग्रजींत Feudal = सरंजामी म्हणतात त्या पद्धतीचे) ठरविलें आहे. हा ठराव मराठ्यांना व कुणब्यांनाहि लागू आहे, हें खरें. उत्तरेकडचे राजपूत आणि युरोपांतले जर्मन-रशियनांतहि ही पद्धत मागें व आतांहि आढळते. ही सरंजामी पद्धत आणि रा. अत्रे ह्यांनीं वर्णिलेली गांवगाड्याची अति पुरातन पद्धत ह्या दोन्ही एकच नव्हत. सरंजाम ही मराठ्यांची लष्करी घटना आहे, आणि गांवगाडा ही कुणब्यांची मुलकी घटना आहे. मराठे हे धंद्यानें राजकारणी असल्यानें त्यांच्या परंपरेंतच नव्हे तर वैयक्तिक स्वभावांतहि अशा अनेक सामाजिक संस्थांचे अवशेष दडी मारून बसलेले संशोधकाला आढळतील.
विवाह — मराठा ओळखण्यांत त्याची पुरातन विवाहपद्धति एक मुख्य साधन आहे. वर म्हटलेंच आहे कीं, मराठा जात आणि धर्म यापेक्षां कुळ अधिक मानणारा आहे. तो वाटेल त्याच्याशीं जेवील, वाटेल त्या देवाला नवस करील, वाटेल त्याचें नांव आपल्या मुलास देईल; पण धंदा करतांना आपली तरवार व नांगर हींच स्मरेल व त्यांची पूजा करील, आणि लग्न करतांना – विशेषतः मुलगी देतांना, ( घेतांना तितकें नाहीं) प्रतिपक्षाच्या कुळाचा पदर शोधीत बसेल. लष्करी जात असल्यानें बहुपत्नीक बहाणा साहजिक वाढत गेला. त्यामुळें कोँणाचीहि मुलगी उचलून आणली तरी चालेल; पण आपल्या पोटचा गोळा दुस-याला देतांना मात्र त्याला कुळीचा पदर शोधावा लागतो. द्राविडी भाषेंत कुळीलाच जातकुला अशी संज्ञा आहे. आर्यवर्णाश्रमधर्म आर्येतरांमध्यें तंतोतंत नसणारच; पण आपल्या कुंळाचा अभिमान सर्व मानवमात्रांमध्यें आहे. मग स्वत:ला राजे म्हणविणा-या मराठ्यांत व कुणब्यांत तो अधिकच असणार. येवढ्यावरून मराठ्यांमध्यें आर्य म्हणविणारे वंश नाहींतच असें म्हणणें नाहीं. परंतु विवाहाच्यां दृष्टीनें पाहूं जातां त्यांच्या खानदानींत अनेक आर्येतरांच्या रूढि अद्यापि प्रमुखपणानें झळकत आहेत त्या खालीं दिल्या आहेत.
देवक : ब्राह्मणांच्या विवाहांत अग्नीचें प्राधान्य आहे. तसें मराठ्यांत किंबहुना राजपुतांतहि नाहीं. संसगामुळें होम, सप्तपदी, कन्यादान, जांवयाची पायपूजा वगैरे ब्राह्मविवाहाच्या रूढी जशा मराठ्यांनीं उचलल्या; तशाच हळदी, देवकार्य, राजभेटी, रासन्हाणी, गडगनेर, रुखवत वगैरे धार्मिक व केवळ सामाजिक रूढि मराठ्यांच्या ब्राह्मणांनींहि उचलल्या. या रीति कांहीं अंशीं हौसेनें व कांहीं अंशीं प्रतिष्ठा वाढविण्यासाठीं एकमेकांपासून उचललेल्या असणें साहजिक आहे. हल्लींचीं क्षुद्र देवकें हीं पूर्वींचीं आद्य उपास्यें. तीं मराठ्यांना लग्नांतच तेवढीं आठवतात. देवकें हीं गोत्राचीं द्योतकें होत. देवक जमलें कीं, गोत्र अथवा कूळ जमलें असें समजून, ब्राह्मणांत जसा सगोत्र विवाह त्याज्य तसाच मराठ्यांत सदेवक विवाह त्याज्य समजतात. देवक जसें मराठ्यांत आहे तसेंच दक्षिणेंतील रड्डीमध्येंच नव्हे, तर इतर आर्येतरांमध्येंहि आहेत. त्याला कानडींत बळि असें नांव आहे. याची व्युत्पित्ति बड्डी = मुळी किंवा बळ्ळी = वेल अशी असावी. कोणत्या तरी झाडाची मुळी अगर वेल हींच पूर्वींचीं विशेष देवकें होतीं. सूर्य, चंद्र, नाग, मच्छ, कच्छ, वराह हीं प्रतिष्ठित चिन्हें राजकीय निशाणांवरून पुढें मराठा वाघ्याच्या पाग्या झाल्यावर त्यांच्यांत झळकूं लागलीं. फार तर काय; कवडी, केरसुणी व फाटकी वहाण हींहि देवकें आहेत; पण कोणी क्षत्रियकुलावतंस असल्या देवकांचें देवकार्य आपल्या राजवाड्यांत आजकाल करील हें संभवत नाहीं. उलट होम, सप्तपदी आणि ऐरणीदान या आर्यपरंपरा अनार्य राजवाड्यांत वेदमंत्र म्हणूनहि जर कोणीं करूं म्हटल्यास, मराठ्यांच्याच काय; पण इतरांच्या मिश्रविवाहांतहि पौरोहित्य करण्यास प्रत्यक्ष शंकराचार्य म्हणविणारे आजकाल प्रसिद्धपणें पुढें येत आहेत ! येथें प्रश्न वंशाचा नसून दक्षिणेचा असतो हें उघड आहे.
एंथोव्हन आपल्या Tribes of Bombay Presidency या पुस्तकांत ऐशीं देवकें आणि ब्यायशीं बळींचा उल्लेख करून म्हणतो कीं, “या सर्वांचीं इंग्रजी नांवें देणें शक्य नाहीं. तीं सर्व कर्नाटक व म्हैसूर प्रांतांतील झाडें व वेली आहेत.” मग या देवकांचें देवकार्य करणारे मराठे व रड्डी यांनीं या वेली उत्तरेकडून येतांना बरोबर आणून त्यांची कर्नाटकांत लागवड केली कीं हें सर्व मूळ कर्नाटकांतलेच वंश? हें कोडें मराठे हे शक आणि कुणबी हे द्रावीड असें मानल्याशिवाय सुटण्याचा संभव दिसत नाहीं. खालील पदार्थ देवकांत आहेत व बळींतहि आहेत. या एकाच माळेंत प्राणी, वनस्पति व निर्जीव पदार्थांचीहि गणना झालेली आहे.